नाथपंथाचे ज्ञानेश्वर!
आज ज्ञानेश्वरांचे नाव आबालवृद्धांना माहीत आहे.
दारासमोर दिंडी आली की मृदुंगाबरोबर झांजांच्या तालबद्ध आवाजात "ज्ञानबा -तुकाराम" ह्या नावाचा जयघोष ऐकू येतो व आपणही गुणगुणू लागतो "ज्ञानबा-तुकाराम!" इतकी जादू या शब्दात आहे.
ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांच्या जयघोषाने पंढरपुर दुमदुमून जाते.
पंढरीचा एवढा मोठा ओढा लाविणारा ज्ञानोबा आज सातशे वर्षाच्या कालानंतरही तसाच लोकप्रिय आहे.
भक्तीचे वाढते उधान आहे.
पंढरपूरच्या भक्तीरसाच्या सागराला नेहमी उधाणच असते हे सिद्ध करून देणारी ही दोन नावे आज अनंतांची अंत:करणे भरून टाकीत आहेत.
विठ्ठलाच्या ध्यानात एकरूप झालेला ज्ञानोबा हा वारकरी संप्रदायाचा आदर्श आहे यात शंका नाही.
आज अनंतांची अंतःकरणे सद्गदीत करणारी माया ज्ञानोबांनी गेली सातशे वर्षे सातत्याने आपल्या भक्ताला दिली आहे. आळंदी हे तर आज वारकरी संप्रदायाचे माहेरघरच आहे.
माऊलीच्या जवळ नामजपात दंग व्हायचे आणि भाबड्या अंतःकरणाने आपले दुःख ज्ञानोबाला सांगायचे.
डोळ्यातून ओघळणारे अश्रू समाधिस्थ ज्ञानोबा पहातो व माऊलीच्या रूपाने भक्ताजवळ जाऊन ते अश्रू पुसतो, दुःख दूर करतो.
माऊलीचा दरबार तसा भाबडा आहे.
मोठ्या भक्तीचा त्याला उमाळा आहे.
चंद्रभागेच्या काठी सिद्धेश्वराच्या शेजारी समाधिस्थ झालेली ही माऊली आज अनंतांची क्रुपेची सावली आहे.
ह्या माऊलीच्या दरबारात कशाही बुद्धीने जा, त्याचे उत्तर तिथे मिळते.
विद्वत्तेचा अहंकार झाला तरी त्याला मिळते.
योगाचा अभिमान झाला तरी त्याचे प्रायश्चित त्वरित मिळते आणि भक्तीच्या दंभात तिथे राहिले तर दंभाचे बीज करपते.
खर्या मार्गाचा आदर्श दाखविला जातो.
आम्हाला एकदा एक सद्गृहस्थ सांगत होते.
आम्ही नाशिकहून आळंदीला आलो ते एका योगी राजाला घेऊन.
त्या योगी राजाला आपल्या यौगिक सामर्थ्याची फारच प्रौढी होती.
तशीच विद्वत्तेचीही.
योगीराज सभामंडपात येताच वेडेवाकडे हात करून म्हणू लागले, होऽऽहो फारच तेजस्वी छे! छे! "मी तर होरपळून जाईन!
'अहो मला बाहेर घेऊन चला!
'माऊली क्षमा करा!
मला ही आपली प्रखरता सहन होत नाही!
.....न्याहो मला बाहेर......!
असे हातवारे करून स्वगत योगीराज बोलू लागले व स्वतः भोवतीच फिरू लागले.
शेवटी दोघांनी त्यांना धरून धर्मशाळेत बसवले-!
शांत झाल्यावर 'योगीराज' बाहेर आले व नतमस्तक होऊन लांबूनच माऊलीला नमस्कार करून बाहेर पडले!"
तो गृहस्थ पुढे सांगू लागला 'आम्ही ज्यावेळी त्यांना विचारलं की, 'योगीराज' आपण असे हातवारे करून काय बडबडत होता?
-त्यावेळी योगीराज घाम पुसत म्हणाले, 'माऊलीचं तेज अगम्य आहे.
साक्षात सूर्यच आहे.
सूर्याजवळ गर्वानं मी गेलो तो होरपळून निघालो!
मला खरा मार्ग आज मिळाला माऊलीच्या कृपेनं!
ज्ञानेश्वर सामान्य योगी नव्हते
हा वरील प्रसंग १५-२० वर्षापूर्वीचाच आहे.
पण हा प्रसंग विशेषतः बोलका आहे.
एका पंडित योग्याला आलेला तो अनुभव आहे.
त्या योग्याला माऊली पुढे जाताच जे प्रखर चटके बसले ते यौगिक सामर्थ्याचे होते.
पाठीवर भाकरी भाजावयास सांगणाऱ्या ज्ञाननाथांपुढे जायचे म्हणजे हठयोगाशी सामना करण्यासारखेच आहे.
ज्या हठयोगाचे बीज संजीवनी समाधी पर्यंत वाढवले ते ज्ञाननाथ सामान्य योगी नव्हते, इतके समजण्याची बुद्धी, बुद्धीवादी जनातं असू नये ह्याची कीव येते.
ह्या हठयोगामुळेच ज्ञानेश्वरांविषयींचा मोठा वाद गेली शंभर वर्षे माजला आहे.
पंडितांच्या मते ज्ञानेश्वर हे "भाष्यकाराते वाट पुसतु' असे म्हणतात.
याचा अर्थ त्यांच्या पुढे 'श्रीमदाद्यशंकराचार्याचाच आदर्श होता.
तर काही श्री. गोरक्षनाथाते वाट पुसतु' असा अर्थ असून गोरक्षनाथांचा आदर्श पुढे होता असे म्हणतात.
वादाच्या ह्या वरील दोन बाजूंनी जणु आपापले पक्षच तयार केले.
१ल्या वादाचे रूपांतर ज्ञानेश्वरी' ही 'वैदिक
ऋचावरच आधारलेली आहे व वैदिक तत्वज्ञानच ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे अशा निर्णयाप्रत आले.
प्रस्तुत लेखाचा मानस ह्या दोन्ही बाजूंपैकी कोणा एका बाजूचे समर्थन करावयाचे असे नसून ज्ञाननाथ हे एक योगाचे आदर्श आहेत एवढेच सांगण्याचा आहे.
कारण आज आम्ही जे ज्ञाननाथांच्या संदर्भात लेख वाचतो ते वाचल्यावर असे वाटते की ज्ञाननाथ समजण्यात कोठे तरी चूक होते आहे.
हा वाद खुद्द ज्ञानेश्वरांना आवडला असता का?
असा प्रश्न स्वतःच्या मनाला जर विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच येते.
कारण एक नाथपंथी योगी हा वादात न शिरता अनुभूतीच्या प्रमाणातील गोष्टी संयमाने स्वतःजवळ बांधून ठेवतो व स्वत:ला बांधून ठेवतो.
असे नसते तर ज्ञाननाथ ( ज्ञानेश्वर ) यांनी एका अभंगात इतक्या लीनतेने म्हटले नसते.
ते त्या अभंगात म्हणतात,
जगामाजी श्रेष्ठ संप्रदाय नाना।
किर्ति ते भुवनामाजी फार।।१।।
आम्ही एक दिन जाणा नाथपंथीं।
नीचाहुनी आथी अति नीच ॥२॥
सर्वांचे चरण वंदितसे सदा ।
श्रेष्ठपणा कदा कीरे नसे।।३।।
नेणोंची स्वरूप धर्माधर्म कांहीं।
निवृत्तीच्या पायीं लीन जाहलों।।४।।
नाठवेचि कांहीं अन्यथा साधने।
ज्ञानेश्वर आन-उरेचिना ।।५।।
(या जगात नाना प्रकारचे श्रेष्ठ संप्रदाय असून त्यांचा लौकीकही फार मोठा आहे.
आम्ही मात्र नीचाहून नीच आणि दीन नाथपंथी आहोत.
आम्ही नेहमी सर्वांच्या चरणांना वंदन करतो.
मोठेपणाचा अभिमान खरोखर आमच्या मनात कधीही नसतो.
धर्म काय, अधर्म काय हे आम्हांस काही समजत नाही.
आम्ही निवृत्तीनाथाला मात्र अनन्यभावाने शरण गेलो आहोत.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या एका साधनावाचून मला दुसरे काही आठवतच नाही.
मी याच एका साधनाशी एकरूप झालो आहे.)
नाथपंथातील लीनता व गुरूनिष्ठा ज्ञाननाथांनी अभंगात इतकी विनयाने रेखाटली असता, ते कोणाच्या आदर्शाचे पुजारी होते हे समजून घेणे विशेष अवघड नाही.
तथापि 'व्याकरणा' च्या अर्थानेच व्यक्तीला समजून घ्यायचे झाले तरी देखील काही विशेष अवघड नाही.
वरील अभंगात व्याकरणाच्या द्रुष्टीने ज्ञानेश्वर नाथपंथी नव्हते असा काही अर्थ निघत नाही.
तसेच त्यांच्या लीनतेचे व गुरू निष्ठेचे पैलू स्पष्ट होतात हा ही भाग व्याकरणातून काही वेगळा स्पष्ट होत नाही.
नाथ संप्रदायाची थोरी
प्रकट केली ज्ञानेश्वरी
निळोबाराया गाथा-१५५८
संत निळोबाराया देखोल ज्ञानेश्वरीचा गौरव करताना नाथसंप्रदायाची थोरवी गातात.
याचा अर्थ 'ज्ञानेश्वरी' हा ज्ञाननाथांनी लिहिलेला नाथसंप्रदायाचा सिद्ध ग्रंथ आहे.
ज्ञानेश्वरांचीची नाथपंथीय परंपरा
आम्ही ह्या तपशीलात शिरण्याचे कारण इतकेच की जे नाथपंथाविषयी निरर्थक गैरसमज समाजात पसरविले आहेत ते निराधार असून त्यात काहीच तथ्य नाही हे विशद करण्याचाच आहे.
ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) हे आज नाथ संप्रदायाचे एक थोर "हठयोगी' योगी आहेत.
त्यांनी संजीवनी समाधी घेऊन नाथपंथाची परंपरा पाळली व उजळवली.
आता सर्व भावंडांनी संजीवनी समाध्या घेऊन नाथपंथाच्या योग सामर्थ्याचा गौरवच केला आहे.
इतिहासाला हा अध्यात्मिक बोध व्हावयास हवा हाच आमचा दृष्टीकोन आहे!
"नाथ संप्रदायाचे ऐतिहासिक चरित्र लिहावयास घेतल्यास ज्ञाननाथ हे फार महत्त्वाचे चरित्र आहे.
ज्ञाननाथ हे वारकरी संप्रदायांचे आदर्श असले तरी नाथसंप्रदायाचे यौगिक सामर्थ्य दाखविणारे आत्ताच्या काळाला नाथांच्या हठयोगाची ध्येयता राजयोगात कशी विलीन होते हे दाखवून देणारे एकमेव उदाहरण आहे.
इतिहास हा दोन प्रकारांनी लिहिला जातो.
माहिती असलेल्या गोष्टीकडून अज्ञात गोष्टीकडे (म्हणजेच From known to unknown ) किंवा अज्ञात गोष्टीकडून ज्ञात गोष्टीकडे, ( From unknown to known) ह्या बाबीचा विचार केला असता ज्ञानेश्वर हे एकमेव दुवा साधून देणारे 'हठयोगी' साधक आहेत.
निवृत्तीनाथ, सोपान व मुक्ता ही भावंडे अखेर नाथ संप्रदायाची बोलकी उदाहरणे आहेत.
वस्तुतः ह्या चारीहि भावंडांनी गीतेवर टीका केलेली आहे.
पणं ज्ञाननाथांची टीका प्रकाशात आली ती भाषेच्या सौष्ठवाने आणि वादाच्या म्रुदुंगाने
इतिहास संशोधक कै. राजवाडे यांच्या ज्ञानेश्वरीच्या विचाराने विद्वान खडबडून जागे झाले.
लोकमान्य टिळकांच्या एका अग्रलेखातील 'महानुभावपंथ ' ह्या मथळ्याने, विद्वान त्या पंथाच्या अभ्यासात आपली मती गुंतवू लागले व त्या पंथाचे संशोधन झाले त्याचप्रमाणे हे घडले.
पण राजवाड्यांच्या वादाने ज्ञानेश्वरीतील व्याकरण पुढे आले.
नाथपंथाचे सिद्ध तत्त्वज्ञान म्हणून त्याचा तसा दृष्टीकोन निश्चित झाला नाही उलट ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) ह्यांच्या विषयी असे विचार पुढे येऊ लागले की, ज्ञानेश्वरी लिहिणारे' ज्ञानेश्वर हे वेगळे असुन ज्ञाननाथ नावाचे योगी होते व त्यांचा ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीशी काहीच संबंध नाही.
आम्हाला ह्या वादात वाचकाला ठेवायचे नसून स्पष्ट करायचे आहे की, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव व ज्ञाननाथ हा तिन्ही नावांचे संदर्भ ज्ञानेश्वरीशी असतील तर ते फक्त नाथपंथी ज्ञाननाथांशी आहेत.
आणि ह्या तिन्ही व्यक्ती वेगळ्या नसून एकच आहेत.
ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान हे गीतेचे तत्वज्ञान आहे.
गीता हा वैदिक तत्त्वांचा सिद्धांत आहे.
ज्यांना वेदान्त आणि सिद्धान्त हा भाग कळला नसेल त्यांना ज्ञानेश्वर, ' ज्ञाननाथ, ज्ञानदेव काय समजणार?
गीतेचे तत्त्वज्ञान
नाथपंथात गीतेचे तत्त्वज्ञान हा सिद्धांत मानला आहे.
गोरक्षाने-'गोरख गीता' व कानिफनाथांनी कान्हूपाद गीता' म्हणून स्वतंत्रपणे टीका केलेली आहे.
या नवनाथ योग्यांनी ही जी ग्रंथ रचना केली ती सामान्य जनाना गीतेचे तत्वज्ञान प्राप्त व्हावे एवढाच त्यातला भाग आहे.
नाथसंप्रदायानेच प्रथम वैदिक तत्वज्ञान सामान्यांसाठी वर्णातीत व धर्मातीत भावनेने प्राकृतात निर्माण केले.
तोपर्यंत देववाणीतच वेदज्ञान सांगितले जात असे.
ते नाथसंप्रदायाने प्राकृतात अधिकार वाणीने सांगावयास सुरवात केली व नवी बंडाळी सुरू केली.
त्याचवेळी त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला व सगुण निर्गुण उपासनांचा भक्ती आणि साधना यात संगम केला.
नाथसंप्रदाय हा ज्ञानकाण्डी आणि उपासकाण्डी आहे.
जे वेदांनी तत्वरूपाने ज्ञान दिले ते तत्वज्ञान अनुभूतीतून तपासून पाहून मग त्याचा स्वीकार केला म्हणून नाथांचे अद्वैत परम अद्वैत गणले गेले आहे.
यौगिक साधनेतून त्यांनी सगुण-निर्गुण अनुभूतीतून पारखून घेतले आहे म्हणून नाथ संप्रदायिक अधिकारवाणीने वैदिक सिद्ध तत्त्वज्ञान जगात प्रतिपादन करतात व वैदिक सिद्ध दैताद्वैताच्या वादात न शिरता भक्तीचा व साधनेचा बोध सिद्ध
भाषेत सामान्यांना देतात.
सांख्य व योग : ज्ञान व उपासना
गीतेतील वैदिक तत्त्वज्ञानही सांख्य व योग म्हणजेच ज्ञान व उपासना ह्यांचा समन्वय साधणारेच आहे.
सांख्य योगौप्रूथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः
एकमप्यास्थितः सम्यगुमयोविन्दतेफलम् ॥
यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते
एकसांख्यं च योगंच यः पश्यति सपश्यति ॥
भगवत् गीता अ.५.४/५.
[सांख्य व कर्मयोग भिन्न ( फल देणारे) आहेत असे अज्ञ बोलतात, ज्ञानी बोलत नाही.
सांख्य आणि कर्मयोग (यापैकी) एकाचे जरी योग्य अनुष्ठान केले, तरी ते करणाराला दोहोचेही फल (मोक्ष) प्राप्त होते.
सांख्य मार्गाने जाणार्यांना जे (मोक्षरुपी) स्थान प्राप्त होते, तेच (निष्काम) कर्म योगानेच अनुष्ठान करणारांनाहि प्राप्त होते.
सांख्य आणि कर्मयोग हे एकच आहेत असे जाणणारा खरा ज्ञानी होय.]
वरील दोन्ही श्लोकात सांख्य योग यांची सम्यकवादी तुलना आहे.
ह्या श्लोकाचे समर्थन करताना ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) म्हणतात,
'एरव्ही तरी पार्था।
जे मुर्ख होती सर्वथा ।
ते सांख्य कर्मसंस्था।
जाणती केवी-
ज्ञानेश्वरी अ-५/२६
ह्या ठिकाणी ज्ञाननाथ निर्भिडपणे म्हणतात की मूर्ख लोकच हा भेद करतात.
ह्याच भेदक पंडितांचा समाचार ज्ञाननाथांनी 'मूर्ख' विशेषण लावून घेतला आहे असे आम्ही म्हटले तर व्याकरणाच्या दृष्टीने अतिशयोक्ती तर होणार नाही ना!
सारांश साम्यवाद हा नाथप्रणीत तत्त्वज्ञान भाग आहे आणि ह्या तत्त्वज्ञानाचा वैदिक प्रमाण ग्रंथ गीता आहे.
नवनाथाचा योग हाच प्रधान उपासना धर्म असल्याने त्यांनी गीता तत्वज्ञानाची अनुभूती हठयोगातून घेतलेली आहे.
म्हणून ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) आपल्या ज्ञानेश्वरीत हठयोगाचा गौरव 'पंथराज' म्हणूनच करतात.
भक्तीमार्गाला 'पंथराज' म्हणण्याचा प्रयत्न कोणी केला तर 'ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी' ह्यातला फरकच त्या विद्वानाना समजला नाही असे होईल.
कुंडलिनी प्रधान हठयोग हाच पंथराज आहे.
ज्ञाननाथांनी ह्या तत्वज्ञानाच्या टीकेपूर्वी श्री गोरक्षनाथांची प्रत्यक्ष गाठ घेतली होती असे आमचे मत आहे.
आम्हाला जे यौगिक द्रुष्ट्या ज्ञात झाले ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहे ह्याविषयी ऐतिहासिक पुरावे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.
पैठणला ही चार भावंडे आलेली आहेत ही कल्पना येताच श्री गुरू गहिनीनाथ यांनी ह्या भावंडांना आपल्या मठीत बोलावून घेतले.
गहिनीनाथांचे वास्तव्य समाधिस्थ अवस्थेत 'गहिनीगड' गर्भागिरीत होते, तेथे ही चारही भावंडे त्यांच्या गडावर राहिली.
तेथे चार वडाची झाडे आहेत.
त्या झाडाच्या छायेत त्यांनी एक झोपडी बांधली व गुरू निवृत्तीच्या सहवासात ही भावंडे राहिली.
रोज रात्री बाराच्या सुमारास गुरू गहिनीनाथ निवृतीस बोलावून घेत व त्याला नाथपंथी मुद्रांचा अभ्यास उपदेशीत.
पुढे एके दिवशी ज्ञाननाथांना गहिनीनाथांनी बोलाविले व त्यांनाही हठयोगाच्या मुद्रा दिल्या.
असा कार्यक्रम साधारणत: सहा महिने चालला होता.
नंतर त्यांनी सर्वांना गोरक्षनाथांच्या दर्शनास 'डोंगरगण' येथील त्यांच्या मठात जावयास सांगितले.
तेथे गोरक्षनाथांनी ज्ञाननाथांबरोबर गीतेच्या टीकेवर चर्चा केली व गीतेच्या कार्यासाठी नेवासे येथे जाण्याचा आदेश दिला.
ह्या आदेशाप्रमाणे गोरखनाथांची भेट डोंगरगण येथे झाली व त्या मठात ही भावंडे आठ दिवस राहिली.
त्यावेळी गोरक्षनाथांनी गीता तत्वज्ञानावर ह्या भावंडांशी चर्चा केली व त्यातील गूढ उकलून सांगितले.
त्यामुळे निवृत्ती एका ठिकाणी म्हणतात -
निवृत्ती गयिनीदेवे उपदेशिला सर्व
गोरक्षी गुह्यभाव सांगती मज।
- निवृत्तीनाथ-गाथा-११९
तसेच-
निवृत्ति गायिनी कृष्ण जप तो अनुपजाण।
सांगितली खूण गोरक्षाने ।
निवृत्ति सघर गोरक्षगयिनी।
ब्रह्मरुपी पूर्णी समरसे।
निवृत्ति परिवार-गुरू गयिनी अमर ।
गोरक्ष कंधर ब्रह्म माझें।
-निवृत्तीनाथ गाथा
वरील अभंगावरून हे लक्षात येईल की आम्हाला जे ज्ञात झाले ते समर्थनीय आहे.
गोरक्षनाथांनी मार्ग दाखविला
श्रीगोरक्षनाथांनी डोंगरगणच्या आपल्या मठात ह्या भावंडांना ठेवून घेतले होते व निवृत्तीनाथ ज्ञाननाथ ह्यांना गोरक्षनाथांनी साधनेतील बारकावे तसेच गीतेचे मर्मही सांगितले.
ती जी गीता तत्त्वज्ञानाची चर्चा निवृत्तीनाथ ज्ञाननाथ आणि गोरक्षनाथ यांच्यात झाली ती, गोरख-गीता' म्हणून मराठीत प्रसिद्ध आहे.
ती आम्ही लवकरच प्रसिद्ध करण्याच्या विचारात आहोत.
ह्या भेटीचे वर्णन करताना गोरक्षाचा उल्लेख 'दत्तात्रेय योगिया' असा केलेला आहे.
ज्ञान गोदावरीच्या तीरी। स्नान केले पंचाळेश्वरी ।
ज्ञानदेवांच्या अंतरी । दत्तात्रेय योगिया
पैल-गुरुच्या शिखरी । एक योगी निराकारी
- ज्ञानेश्वर गाथा
श्री गुरु गोरक्षनाथांनी समाधी घेतलेली नाही.
ते अवधूत अवस्थेत असून कोठेही त्यांचा संचार असतो व ते नेहमी दत्तात्रेयांच्या सहवासात असतात.
त्यामुळे दत्तयोगी असा गौरव ज्ञाननाथांनी केला आहे.
तसेच मुक्ताबाईला गोरक्ष भेटल्याचे वर्णन नामदेवाने केले आहे तेही बोलके आहे.
"मोतीयाचा चुरा फेकिला अवरी ।
विजुचिया परी कीळ जाले ॥
जरी पीतांबरे नेसविलीं नमा।
'चैतन्याचा गाभा नील बिंदुः॥
तळी परी पसरे शुन्याकार जाले।
सर्पाची ही पिले नाचु लागे।।
कडकडे वीज निमालि ठायिचे ठायीं।
भेटली मुक्ताबाई गोरोबाला ॥
ज्ञानदेव म्हणे कैसी जाली भेट।
ओळखले अविट आपुले पण ॥"
ह्यात 'गोरोबा' हा शब्द विद्वानांमध्ये गोंधळ करतो की गोरोबा म्हणजे गोरक्ष की गोरा कुंभार ?
पण आमच्या मते वरील आलेले वर्णन हे गोरक्षाचे आहे, गोराकुंभाराचे नव्हे.
गोरक्षाशी झालेल्या चर्चेमुळेच ज्ञानेश्वरी हा नाथपंथाचा सिद्धांत झाला आहे. ज्ञानेश्वरीत सिद्धांत वगळले असता काय शिल्लक राहील ते 'भाष्यकाराते वाट पुसतु' असेच म्हणावे लागेल.
ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ज्ञाननाथ म्हणतात,
या गीतार्थाची चोरी।
स्वयें शंभू विवरी।
जेथ भवानी प्रश्नु केवी।
चमत्कारोनी ।। ७०।।
-ज्ञानेश्वरी अ.१-७०
'शंकर (आदिनाथ), आपल्या मनाशीच सतत विचार करू लागतात हे पाहून पार्वती विचारते, कसला एवढा गहन विचार करता आहात त्यावर शंकर म्हणाले, 'हे देवी ज्या प्रमाणे तुझ्या स्वरूपाचा शोध लागत नाही त्या प्रमाणे गीतेचाही थांग लागत नाही.
ह्या गीता तत्त्वाचा विचार करू लागावे तर रोज नवीनच काही दिसते--'
ग्रंथाच्या प्रारंभीच आदिनाथांच्या विभ्रमाचा दाखला देऊन गीतेची थोरवी गाऊन नंतर गुरुकृपेने हे मी अवघड काम करीत आहे.
ते सहज सोपे होईल असा निर्वाळा देतात.
ह्या दोन्ही भावात नाथपंथांच्या तत्वांचा आविष्कार आहे.
आदिनाथ हे सर्वब्रह्म तो ह्या गीतार्थाविषयी साशंकित आहे.
तरी देखील मी गुरुकृपेने हे सर्व करीन.
ह्यात परमतत्त्वाचा मेरुमणि गुरू आहे, हे नाथतत्त्व आहे.
'भाष्यकाराते वाट पुसतु'
आता इतर तत्त्वांचा वा बाह्यांगाचा विचार न करता फक्त संक्षिप्तपणे 'भाष्यकाराते वाट पुसतु' याचाच विचार करू.
कारण ज्ञानेश्वरीच्या गीता तत्त्वज्ञानावर हाच वादाचा भाग आहे.
'ज्ञाननाथ आणि ज्ञानेश्वरी' ह्या आमच्या पुस्तकात ह्या विषयी स्वतंत्र विवरण केलेले आहे.
अठराव्या अध्यायात ज्ञाननाथ म्हणतात,
'तैसा व्यासाचा मागोवा घेतु। भाष्यकारांतें वाठ पुसतु ।
अयोग्यहि मी न पवतु । के जाईन ।
-ज्ञानेश्वरी १८. १७२९
त्याप्रमाणे व्यासांचा मागोवा घेत घेत व भाष्यकारांना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी तेथे (गीतार्थाच्या ठिकाणी)
प्राप्त न होता कोठे जाईन ]
ह्या ओवीमुळे प्रश्न-उपप्रश्नांची सुरुवात होऊन विद्वानांच्या पुढे आद्यशंकराचार्याचा गीतेवरील टीका ग्रंथ उभा राहिला आहे.
त्या टीका ग्रंथातील साम्यता पाहून शंकराचार्यांनाच ज्ञाननाथांनी तत्वतः मान्य केले असा सूर कशा तर्हेने येतो त्यात रामानुज हेही वादात येतातच.
गीतेसारखा गहन विषय की जो 'हा वेदार्थसागरु' असा उल्लेख ज्ञानेश्वर करतात त्यांच्या पुढे टीकेवरील इतर ग्रंथ नसतील असे संभवणे कठीण त्यात प्राकृतात गीतार्थ सार्थ टीकेतून सांगण्याची जबाबदारी ज्ञाननाथांनी घेतलेली होती.
ह्या वेदार्थाच्या सागरात डुंबायचे म्हणजे विसाव्याला काही आधार हवेतच हे आधार निश्चितच घेतलेले आहेत यात शंका नाही, परन्तु ह्या आधारातून असे निष्पन्न करणे अगदी अयोग्य आहे की, ते त्याच तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते.
आज गीतेवर २८४ टीका लिहिल्या गेल्या आहेत.
ह्या टीका ग्रंथांमध्ये कित्येक ग्रंथ साम्यक तत्वरूप असतील म्हणजे ते त्या-त्या भाष्यकाराच्या तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते असा युक्तीवाद करणे याचा अर्थ 'टीका ग्रंथ' याचा अर्थच न समजून घेतल्यासारखे आहे.
भाष्यकारांचा टीकेचा विषय गीता असल्यावर गीता हा तत्त्वज्ञानाचा मुख्य विषय असेल.
भाष्यकाराचे तत्त्वज्ञान गीतेच्या आधाराने
कोणी सांगत असेल तर सूर्याला काजव्याने मी तुला प्रकाश देतो असेच सांगण्यासारखे आहे.
गीता हा तत्वज्ञानाचा पिंड ब्रह्मपिंड वेदान्त आहे आणि साधन योग आहे.
हा भाग फार महत्वाचा आहे.
गीतेचा जन्म कोठे झाला असे सहज विचारले तर उत्तर येते 'कुरुक्षेत्रावर!'
पण आमच्या मते जन्म झाला आहे कुरुक्षेत्रापासून दूर सुमारे ४० मैलावर असलेल्या हस्तिनापुरातील राजवाड्यात!
व्यासांनी रचनाच अशी केली आहे की तो प्रसंगच फार नाट्यमय आहे.
राजवाड्यात आंधळा ध्रुतराष्ट्र डोळस संजयाला प्रश्न विचारतो 'कुरुक्षेत्रावर माझी मुलं व पंडूची मुलं काय करित आहेत ते सांग.'
संजयाची दिव्यदृष्टी
नंतर संजय सांगावयास सुरुवात करतो.
म्हणजे योगाच्या साहाय्याने दिव्यदृष्टीने ४० मैलांवरील घडत असलेली कथा पाहून व श्रवण करून ती राजाला सांगितली जात आहे.
ह्यातच गीतेचे गूढ आहे.
गीताज्ञान दुसर्यास सांगावयाचे असेल तर भाष्यकार हा दिव्यदृष्टी प्राप्त झालेला व अंतर्मुख होऊन नाद ब्रह्मातील नाद टिपणारा असावयास हवा.
इथे विद्वत्ता हा आमच्या दृष्टीने गौण विषय आहे.
कारण दिव्यदृष्टी प्राप्त झालेला व अंतर्मुख होणारा, नाद ब्रह्मात लीन होणारा हा त्रिकाल ज्ञानी योगेश्वरच असतो.
व्यासांनी हा भाष्याचा संकेत फार उद्बोधकपणे सांगितला आहे.
ह्या कसोटीला आपले ज्ञाननाथ निश्चितच उतरतात.
म्हणूनच ज्ञानेश्वरी अत्यंत बोलकी झाली आहे.
ज्ञाननाथांच्या योगातील प्रगतीची परीक्षा घ्यायला हवी असे म्हणणे म्हणजे ज्ञानेश्वरी योग शून्य करून वाचण्यासारखेच आहे.
गीतेतील तत्वांचा बोध, व्यासांनी सांगितलेल्या संजयासारख्या अधिकारी योग्यास सहज होतो, मग हा तत्वबोध समन अधिकारी असलेल्या योगी भाष्यकारांस वेगळा होईल का?
जे तत्व तत्वच आहे ते बदलणे कसे शक्य आहे?
ते तसेच राहणार.
त्यामुळे जो अर्थ दिव्य दृष्टीक्षेपात आणि अंतर्मुखातून ध्वनित होतो त्यापेक्षा दुसरा असणे शक्य आहे.
त्यामुळे गीतेतील श्लोकाचे विवरण रामानुज, शंकराचार्यापेक्षा वेगळे कसे केले जाईल?
ज्या गोष्टीत रामानुज व शंकराचार्यापेक्षा वेगळी दृष्टी असेल त्यावेळी त्यात वेगळेपणा निश्चित दिसेल.
ज्ञानेश्वर नाथपंथी हठयोगी साधक होते म्हणून इतर ठिकाणी रामानुज अथवा शंकराचार्यांपेक्षा वेगळेपणा दाखविला जाणारच.
'पिंडे पिंडाचा ग्रासु । तो हा नाथ संकेतीचा ।
परी दाऊनी गेला उद्देशु दंशु। महाविष्णू-'
ह्या वरील ओवीतील वेगळेपणा निश्चितच आहे.
त्यात हठयोगाची साक्ष आहे म्हणून डॉ. पेंडसे यांनी काढलेला निष्कर्ष विचारात घेता आम्हास असे वाटते की ज्ञाननाथांनी केलेली टीका ही दिव्य दृष्टीतून अंतर्मुख होऊन अनुभूतीतूनच लिहिलेली आहे, ह्यात शंका नाही आणि ह्या अनुभूतीचे श्रेय नाथांच्या योग साधनेचे आहे.
डॉ. शं. दा. पेंडसे म्हणतात, “एकंदर २१८ स्थळांची तुलना केली, त्यात असे दिसते की १४९ ठिकाणी शंकर व ज्ञानेशांनी "तत्वज्ञानांच्या व अर्थाच्या दृष्टीने सदृश अशी टीका केली आहे.
त्यापैकी ४२ ठिकाणी शंकराचे शब्द ज्ञानेशांनी योजलेले आहेत.
११० ठिकाणी शंकर आणि ज्ञानेश यांचे दृष्टांतही सारखे आहेत व ५९० ठिकाणी शंकराचा अर्थ घेऊन रामानुजांचा टाकला आहे.
६८ ठिकाणी शंकरांचा किंवा रामानुजांचाही अर्थ न घेता ज्ञानेशांनी स्वतंत्र अर्थ केले आहेत.
२८ ठिकाणी तर निर्गुण किंवा मायावादपर अर्थ शंकरापेक्षाही पुढे जाऊन किंवा त्याच्याही पेक्षा स्पष्टपणे केले आहेत.
एका ठिकाणी शंकर रामानुज दोघांच्याही अर्थाचा समुच्चय केला आहे व फक्त ५ ठिकाणी शंकरांना सोडून रामानुजांचा अर्थ स्वीकारला आहे.
तत्वज्ञानाच्या दृष्टीने शंकरांना विरोधी असे एकही स्थळ नाही; शंकरांना सोडून रामानुजांना अनुसरल्याची स्थळे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची नाहीत.
रामानुजाप्रमाणे जेथे अर्थ केला आहे अशा स्थळांपैकी पाच स्थळे अशी आहेत की, तेथील अर्थ ज्ञानेशांना स्वतंत्रपणे सुचणे असंभवनीय आहे.'
"वरील डॉ. पेंडसे यांच्या निष्कर्षांचे प्रमुख आठ भाग पडतात:--
१. शंकराचार्याच्या भाष्याशी जुळते भाष्य.
२. शंकराचार्यांच्या शब्दसद्रुश भाग.
३. शंकराचार्यातील व ज्ञानेशातील दृष्टांत साम्यता.
४. रामानुजांच्या अर्थाऐवजी शंकराचार्याचा अर्थ.
५. स्वतंत्र अर्थ प्रतिपादन
६. निर्गुण किंवा मायावादपर परिणामकारक अर्थबोध.
जो शंकराचार्यांना साधला नाही.
७. शंकराचार्य रामानुज ह्यांच्या दोघांच्याही अर्थाचा स्वीकार.
८. शंकराचार्यांना सोडून रामानुजांच्या अर्थाचा स्वीकार.
वरील निष्कर्षांचा अभ्यास केला असता खालील पाच गोष्टी निदर्शनास येतात:-
१) शंकराचार्याची तत्त्व साम्यता (अर्थदृष्ट्या)
२) शंकराचाची दृष्टांत साम्यता.
३) रामानुजांच्या शंकराच्या अर्थाचा स्वीकार
४). रामानुजांच्याच अर्थाचा स्वीकार.
५) स्वतंत्र अर्थ प्रतिपादन व परिणामकारक अर्थबोध जो शंकराचार्यांना वा रामानुजांनाही साधला नाही.
आम्ही मागे निर्देश केल्याप्रमाणे दिव्य दृष्टी व अंतर्मुख साध्य जसजे झाले असेल तसतसे गीतेचे तत्वज्ञान समजते.
स्वतः ज्ञाननाथही असेच आदिनाथाच्या तोंडून म्हणतात की, 'रोज नवा अर्थ गीता तत्वज्ञानातून प्राप्त होतो!'
त्याचप्रमाणे वरील विचाराचा भाग येतो.
शंकराचार्यांच्यातील तत्त्वसाम्यता हा जसा यौगिक साध्यतेचा भाग आहे तसाच स्वतंत्र अर्थ प्रतिपादन हा यौगिक साध्यातून प्राप्त झालेल्या श्रेष्ठ दर्जाची खूण आहे.
गीता हे सर्व भाष्यकारांचे मध्यवर्ती तत्वज्ञान केन्द्र असल्याने प्रतिपादनातील साम्यता सहज आढळेल.
डॉ. पेंडसे यांच्या चिकित्सक बुद्धीचे, आणि प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो, पण ज्यावेळी ते असे स्पष्ट करतात की ज्ञाननाथ काही ठिकाणी रामानुज वा शंकरचार्याच्या भाष्यांचा स्वीकार करीत नाहीत.
ह्यामुळे दोन बोध होतात:-
१) ज्ञाननाथांपुढे जी भाष्ये होती ती सर्व जशीच्या तशी स्वीकारण्यासाठी नव्हती.
२) ज्ञाननाथांनी एकाच भाष्यकाराला आपल्यासमोर ठेवले नव्हते.
केवळ भाषांतर नव्हे !
वरील निष्कर्षावरून हे स्पष्ट होईल की ज्ञाननाथांना ज्ञानेश्वरी लिहिताना केवळ प्राकृतात 'गीतासार' भाषांतरीत आणावयाचे नव्हते तर त्यात स्वतंत्रपणा स्वानुभवाचे बोल संग्रहीत करावयाचे होते.
म्हणजे गीतार्थाचे गूढ उकलण्याचा प्रधान हेतू ज्ञाननाथांच्यापुढे होता.
आणि हा मानस पुरा करीत असताना त्यांच्यापुढे काही भाष्येही होती की जी प्रमाण आहेत.
त्यामुळे मोठ्या गौरवाने ज्ञाननाथ म्हणतात-
तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारांते वाट पुसतु ।
ह्यात ज्ञाननाथांची आदराचीच भावना आहे.
भाष्यकारांबद्दलची लीनता हा एक नाथपंथीय पैलू आहे जो ज्ञाननाथांनी ज्ञानेश्वरीत प्रकट केला आहे.
त्यामुळे आमचे मत आहे की, प्रत्येकाचा दृष्टीकोन हा स्वानुभवाने कमी जास्त होणे स्वाभाविक आहे, पण याचा अर्थ आदरार्थी भावाचा अर्थ 'पुरस्कर्ता' म्हणून लावणे अयोग्य असून त्यामुळे ज्ञाननाथांची ज्ञानाची ओळखच झाली नाही असे होईल.
ह्याविषयी सध्या इतकेच पुरे.
सगुण-निर्गुणाचा भाव
नाथसंप्रदायात सगुण-निर्गुण ही दोन्ही भाव व अवस्था म्हणून स्वीकारलेले तत्व आहे.
ज्ञाननाथांच्या अभंगात व ज्ञानेश्वरीत ह्या तत्वाचे फार बोलकी उदाहरणे आदळतात.
वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जप।।१।।
जप तप कर्म हरिवीण धर्म।
वाऊगाचि श्रम व्यर्थ जाय ।।२।।
हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमन कलिके ।।३।।
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र।
यमें कुळ गोत्र वर्जियले।।४।।
(या नारायणाच्या नामाचा जप करा असे वेदांचे, श्रुतींचे, स्मृतींचे सार आहे.
श्रीहरीच्या नामस्मरणावाचून इतर सर्व जपतपादी साधने, नेमधर्म, कर्मकांड व्यर्थ असून त्यांच्यापासून काहीच मिळणार नाही, पण ज्यांनी श्रीहरीच्या नामस्मरणाचा पाठ केला ते मात्र सुवासिक फुलांच्या कळीमध्ये भ्रमर गुंतून राहतो त्याप्रमाणे श्रीहरीच्या स्वरूपात एकचित्ताने स्थिरावून जातात.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हाच माझा मंत्र असून हेच माझे शस्त्र आहे.
याच नामाच्या भयाने यमाने आमच्या कुलगोत्राचाच त्याग केला आहे.)
मंत्र, तंत्र, यंत्र सर्वही अबद्ध ।
जव नाही शुद्ध अंत:करण।।१।।
गुरू शिष्यपण हेही मायिकत्व।
जव निज तत्व न ओळखी ।।२।।
प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाण ।
मागुति बंधन दृढ होय ।।३।।
आत्मरूपावीण साधन अन्यत्र।
भ्रमासीच पात्र होई ने की, ।।४।।
सर्व वृत्ति शुन्य म्हणे तोचि धन्य ।
ज्ञानदेव मान्य सर्वस्वेशी ।।५।।
(जो पर्यंत अंत:करण शुद्ध होत नाही तो पर्यंत मंत्र, तंत्र, यंत्र इत्यादीच्या खटपटी व्यर्थ आहेत.
जो पर्यंत निज बोधाची ओळख होत नाही तोपर्यंत गुरुशिष्यपणही व्यर्थ आहे.
अष्टमहासिद्धी जरी प्राप्त झाल्यातरी शेवटी त्यांचे बंधन दृढ होऊन जाते.
आत्मरूपाच्या बंधाशिवाय इतर कुठलेही साधन उगाच भ्रमासच पात्र होईल.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याच्या सर्व वृत्ती शून्य झाल्या आहेत तोच एक धन्य होय.
तोच सर्वांना मान्य होईल.)
आत्माराम देखे सहस्र दलावरी ।
उन्मी हे पाही आरुते तेही ।।१।।
चक्षूचे अंतरी चक्षु देखे पूर्ण।
हेचि की रे खुण तुझे ठायी ।।२।।
मी ब्रह्म सोहं ज्ञानपद ते साजिरें ।
ते ठायीं निर्धारें तुझा तुंची।।३।।
बाप रखुमादेविवरा तुझा तूं आपण ।
सर्व हे चैतन्य तुझे ठायीं ।।४।।
(सहस्त्रदळ कमळात आत्मारामाची वस्ती असलेली तू पहा.
त्यापुढे उन्मनी अवस्था अलीकडेच आहे.
डोळ्याच्या आत जो आत्म्याचा डोळा पाहाणारा आहे तो तू आपल्या ठिकाणी उमजून पहा.
मी ब्रह्म आहे हे ज्ञानाचे पद तुझ्या ठिकाणी निर्धाराने आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रखुमाईच्या पतीच्या, बाप विठ्ठलाच्या कृपेने सर्वत्र व्यापलेले चैतन्य तुझ्याच ठिकाणी तू पहा.)
सगुण-निर्गुणाचा संगम
वरील तिन्ही अभंगात ज्ञाननाथांनी सगुण-निर्गुणाचा संगम साधलेला आहे!
हाच नाथसंप्रदायाचा साधनेचा गाभा आहे.
सगुण-निर्गुण उपासनेतूनच हठयोग साधना केली जाते.
ज्ञाननाथांनी तेच साधन ठेवले होते म्हणून ज्ञानेश्वरीत मायावादही जास्त परिणामकारक शब्दात रेखाटलेला आहे.
इतकेच नव्हे तर एका ठिकाणी व्यासांनाही प्रश्नाची रचना कशी करावयास हवी होती हे सांगून तो स्पष्ट करून दाखविला आहे.
(ज्ञा. अ. १४.३२०-२६)
नाथांनी ज्ञाननाथांना सगुण-निर्गुणाचे बाळकडूच पाजले होते असे त्या पंक्ती वाचल्यावर वाटते.
गुणातीत पुरुषाच्या आचाराचा प्रश्नच उद्भवत नाही, असा ज्ञाननाथ स्पष्ट निर्वाळा व्यासांना देत आहेत व म्हणतात की, गुणातीत पुरुष सगुणी कसा असेल, तो गुणाधीन आहे किंवा नाही हे ओळखण्याची तू खूण विचारीत असशील तर मी ते स्पष्ट करीन.
ह्यात ज्ञाननाथांचा नाथपंथीय बाणा स्पष्ट होतो.
नाथपंथीय शिवालाही प्रश्न विचारतात अशा रूपक कथा आपण वाचतो, त्यामागे हेच गूढ असते की, वैदिक प्रश्न नवनाथांना अनुभूतीतून खटकले असतील तर ते त्यांनी शिवाला जाऊन विचारले आहेत.
तद्वत ज्ञाननाथांनी व्यासांना विनयाने गुणातीत भाव न ठेवता गुण-सगुणी कसा असावा असा सरळ प्रश्न मांडा असे सुचविले होते.
अशा स्वतंत्र बाण्याच्या ज्ञाननाथांपुढे कोणाचा आदर्श, होता हे आणखी स्पष्ट सांगणे न लगे!
आता फक्त ज्ञाननाथांनी गुरूकृपेने प्राप्त केलेल्या नाथपंथीय समाधी बीजाची कल्पना देतो व प्रस्तुत लेख संपवतो.
"ज्ञाननाथ व ज्ञानेश्वर" ह्या पुस्तकात संपूर्ण चर्चा करू.
गीतेत सांगितलेल्या समाधी योग अध्यायावर भाष्य'' करताना ज्ञाननाथ म्हणतात--
मग त्या मार्गाची धांव ।
पुरेल प्रवृत्तीची हाव।।
जेथ साध्यं साधनी खेंव।
समरसे होय ॥५९॥
जेथ पुढील पैस पारुखे।
मागील स्मरावे ते ठाके।
ऐसिये सरितीये भूमिके।
समाधि राहे ॥६०ll
ज्ञानेश्वरी ६.
(मग त्या धारणामार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करावयाची आहे, अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैवय झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो.
ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते.)
अगदी असेच गोरक्षनाथ आपल्या 'गोरक्ष पद्धती'त म्हणतात,
न गधे न रसं रूपं नच स्पर्श ननिः स्वनम् ।
नात्मानं न परस्वं च योगी युक्तः समाधिना ॥८८॥
-गोरक्षपद्धति पृ. ९१
(जो योगी समाधीत एकत्व पावतो, सर्व इंद्रियांना मनात लीन करून गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द ह्या पाच विषयांचे ज्याला
ज्ञान नसते, जो कोणतीही वस्तू आपली व दुसर्याची वेगळी मानीत नाही, तसेच जीवात्मा परमात्म्याला वेगळे मानीत नाही, अशा प्रकारे ध्यान करणारे योगी यांनी अन्य कसल्याच वस्तूचे भान नसते.
ह्यालाच समाधी अवस्था म्हणतात.)
नाथसंप्रदायी किमया
नाथसंप्रदायात सामरस्यसिद्धी प्राप्ती ही साधकाची हठयोगी तळमळ असते, पण ही अवस्थाही हठयोगी अत्यंत संयमाने प्राप्त करतात.
कारण ह्या अवस्थेतून निरंजनपद प्राप्त होऊन अवधूत योगी होतो ही नाथसंप्रदायाची किमया आहे.
हाच ध्येय वाद गोरक्षाने आपल्या तत्त्वज्ञानात दिलेला आहे.
हठयोगातून राजयोग प्राप्त होतो, पण हे आधी केले पाहिजे.
हठयोगाचे फल राजयोग आहे व राजयोगातील अंतिम ध्येय निरंजनपद आहे.
ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात ह्या निरंजन अवस्थेचे वर्णन आलेले आहे.
जे आकाराचा प्रांतु।
जे मोक्षाचा एकांतु ।
जेथ आदि आणि अंतु।
विरोनि गेले ॥३२॥
ते अनिर्वाच्य महासुख।
पै आपणचि जाहले ते पुरुष ।
जयांचे का निष्कर्ष ।
प्राप्तिवेरी ।।३२५।।
ज्ञानेश्वरी अ. ६. ओ. ३२१, २५.
(जे आकाराचा शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवटही नाहीशी झाली आहेत, ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात, ते पुरुष असे हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात.)
ह्याच निरंजनपदाची अभंगातील अवस्था ज्ञाननाथांनी वर्णन केली आहे ती अभ्यासू !
चहूं शुन्या आरुते महाशुन्या परुते ।।
सर्वांसी पहाते तेंचि गे गा ।।१।।
दिसे तेहि शुन्य पाहातहि शुन्य ।
देहामाजी निरंतर भिन्न रुप ।।२।।
शुन्य निरशुन्य दोन्ही हरपली ।
तेथूनि पाहिली निजवस्तु ।।३।।
ध्येय ध्यान ध्याता निरसुनी तिन्ही ।
झालो निरंजनी अति लीन ।।४।।
ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे ।।
गुरु मुखे खूण सांगितली ।।५।।
'(जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या चारही अवस्थांपलीकडची ब्रह्ममहाशुन्यावस्था जी उन्मनी तिच्याही पलीकडे आहे.
जे दिसते ते सर्व मिथ्या असून पाहणारा द्रष्टाही शून्यच असून देहात राहणारा आत्मा नित्य वेगळाच आहे.
शून्य व निरशून्य हे दोन्ही भाव हरपले की त्यानंतर तू निजवस्तूस पाहा.
ध्याता, ध्येय व ध्यान ही त्रिपुटी नाहीशी करून त्या निरंजन स्वरूपाच्या ठिकाणी मी लीन झालो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरूच्या मुखातून ही अनुभवाची खुण मला कळली.)
ज्ञाननाथानी संजीवनी समाधी का घेतली ह्याचे खरे गमक ह्याच पदात आहे.
निरंजन अवस्था ज्याने प्राप्त करून घेतली आहे तो संजीवनी समाधीच घेणार.
देहाचे स्वरूप ब्रह्माच्या रूपात पाहिल्यावर कोणी योगी त्या देहाचा त्याग करीत नाही.
ही फक्त नाथसंप्रदायाची निरंजन अवस्था आहे म्हणून श्री नवनाथांनी जिवंत समाध्या घेऊन ही अवस्था जगाला ज्ञात करून दिली.
ज्ञाननाथांनी ही परंपरा पुन्हा उज्ज्वलीत
केली.
राजयोगाची ही खरी श्रेष्ठ अवस्था आहे.
वादाने ह्या अवस्था प्राप्त होत नाहीत.
संयमाने सद्गुरुशी लीन राहून, साधनाशील प्रवृत्तीने सगुण-निर्गुण सेवेतून हठयोगाच्या प्रभावी साधनेने साधक ह्या राजयोगाच्या निरंजनपदांची प्राप्ती करतो मी राजयोगी आहे ह्याची ग्वाही देतो.
संजीवनी समाधी हाच त्याच्या राजयोगाचा पुरावा असतो.
लेखक- सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ
जय सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ💐🙏🏻
जय सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ💐🙏🏻
🌷🌷🌷
🙏🙏🙏