🙏चैतन्य श्री गोरक्षनाथ महाराज,
मु. पो. खामगांव ता. फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद.
मु. पो. खामगांव ता. फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद.
श्रावण पाडवा विशेष दर्शन सेवा🙏
संदर्भ- सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ यांच्या अलख निरंजन दीपावली १९७६ मधून
लेखक- सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ
युगायुगांचा तपस्वी गुरुगोरखनाथ
भारतवर्षाला असा एक योगी लाभला की त्यानं हिमालयाच्या शिखरांना, खैबरखिंडीला, गंगेच्या खोऱ्याला कच्छ-मुंबईच्या समुद्र किनाऱ्याला, कन्याकुमारीला योगबलानं मोहित केलं!
भारतीय निसर्गातील अणुरेणुला चेतनाशील केलं!
अनंत आत्म्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला आणि सूर्यचंद्राच्या तेजाप्रमाणे हठयोग दिव्य केला!
आज देखिल अध्यात्मिक क्षेत्रांत गुरु गोरक्षाचं नांव आदरानं घेतलं जात.
इतक भव्य व्यापक व्यक्तिमत्व हठयोगाने, गुरुभक्तिनें, आचरण शुद्धतेने, तपबळाने, समाजासमोर आजपर्यंत ठेवलं!
ह्या दिव्य युगयोग्याचं जीवनचित्र रेखाटणंहि चमत्कारच आहे!
अनंत मायेच्या अनंत कायांतून, सामावलेली गुरुगोरक्षांची योगशक्ति आज समाजासमोर मांडावी तरी कशी असाच विचार त्यांच्या जीवनाविषयी लिहिणारांच्या मनात येत असेल.
चमत्कारानं भरलेलं जीवन चितारू लागलो तरी ती चमत्काराची लिला संपणार नाही.
श्रीगोरक्षाचे तत्वज्ञानांचा विचार केला तरी अगम्यच!
त्यामुळे ह्या दिव्ययोगाच्या जन्मकथाहि चमत्कारिकच आहेत.
गोरक्षाची जन्मकथा
मच्छिन्द्रनाथ माधुकरीसाठी गांवात फिरत असता, एका स्त्रीला मूल होत नव्हत त्या स्त्रीला भस्म चिमुटी दिली.
त्या स्त्रीने भयानं ती न खाता उकिरड्यात टाकली.
त्या उकिरड्यावर देह धारण करून गोरक्ष बारा वर्ष राहिले.
नंतर पुनः त्याच गांवी मच्छिन्द्रनाथ आले असता त्यांना आपण भस्म दिल्याचे आठवते व ते नंतर त्या स्त्रीला शोधून काढतात.
तिला खाणाखुणा विचारतात.
ती स्त्री घडलेली सर्व कथा सांगते.
नंतर जिथे भस्म टाकले ती जागा स्त्री दाखविते.
या गोवराच्या ढिगाऱ्यांतून मच्छिन्द्रनाथ गोरक्षनाथास बाहेर काढतात.
अशी कथा श्री-नवनाथ भक्तिसार ग्रंथात आलेली आहे.
वरील कथेतील स्थान अयोध्येजवळील जयश्री नांवाचे नगर सांगितले जाते, तेथे त्यावेळी विजयध्वज राज्य करीत होता'
निरनिराळ्या लेखकाच्या मते गोरक्षनाथाचा जन्म समाजाच्या खालच्या थरात झालेला असावा तर काहींना उच्च वर्गात झालेला असावा असं वाटतं.
तसेच त्यांच्या जन्मस्थानाविषयी हि निरनिराळे विचार मांडले जातात.
डॉ. मोहनसिंग यांच्या मते गोरक्षनाथाचे जन्मस्थान पंजाबमध्ये असावे असे वाटते तर कांहींच्या मते हे स्थान नेपाळ किंवा गोरखपूर येथे असावे असे आहे.
योगी संप्रदायाविष्कृति ग्रंथामध्ये गोरक्षनाथांचा जन्म गोदा नदीच्या तिरी चंद्रगिरीनामक एका गावात झाला असे दिले आहे.
वरील योगी संप्रदायाविष्कृतिचे मत बरोबर असावे कारण ज्ञानेश्वरांनी गोरक्षाचे वर्णन :दत्तात्रेय-योगी' म्हणुन केले तरी ते त्यांना गोदावरी तीरी भेटले असेच त्यात म्हटले आहे.
ज्ञान गोदावरीच्या तीरी । स्नान केले पंचाळेश्वरी
ज्ञानदेवाच्या अंतरी । दत्तात्रय योगिचा
पैल गुरुच्या शिखरी । एक योगी निराकारी
ज्ञानेश्वर गाथा
हा निराकारी योगी गोदावरीच्या तीरावरील चंद्रगिरीचाच असावा असे सप्रमाण वाटते!
ह्या विषयी असलेली इतर मते खालील प्रमाणे आहेत.
१) नेपाळ दरबार लायब्ररीत हस्तलिखित आहे त्याच्या आधारे गोरक्षांचा जन्म वडव देशामध्ये महामंत्राच्या फलाने झाला.
२) बंगाली दंतकथेवरून गोरक्षाचा जन्म बंगालमध्ये झाल्याचा उल्लेख आहे.
३) क्रूक्स आणि ग्रियर्सन यांनी ठरविलेल्या परंपरेच्या आधारानं गोरखनाथाचा जन्म सत्ययुगांत पंजाबमध्ये, त्रेतायुगांत गोरखपुरांत, द्वापारयुगात हरभूजमध्ये, कलियुगांत काठेवाडीत गोरखमठी या ठिकाणी झाला.
४) नाथसांप्रदायिक योगी गोरक्षाचा जन्म तिलाप येथे झाला असे मानतात.तिलाप हे गांव पंजाबमध्ये आहे.
निरनिराळ्या विद्वानाचे, अभ्यासुकांचे विचार गोरक्षाचा जन्म व जन्मस्थांना विषयीं वर दिले आहेत.
आमच्या मतें गोरक्षाचे जन्मस्थान महाराष्ट्रांतच गोदावरीच्या काठी असावे.
कारण वर दिलेल्या ज्ञाननाथांच्या श्लोकावरून हा बोध होतो.
मच्छिन्द्रनाथांनी बद्रीकेदार हे स्थान तपसाधनेसाठी निवडलेले होते.
बद्रीकेदार वनांत तपसाधना केल्यावर मच्छिन्द्रनाथ हे तीर्थयात्रा करीत महाराष्ट्रांत गिरनार - गुजराथ - मुंबई - ठाणा - लोणावळा- रत्नागिरी दंडक अरण्यांत आले.
त्यावेळी नुकतीच तपसाधना पूर्ण झाल्यानें तपोबळ जवळ होते.
व तीर्थाटनाचा आनंद उपभोगण्याची प्रवृत्ति होती.
ह्याचे समर्थन करावयाचे झाले तर मच्छिन्द्रनाथाच्या जीवनांतील महत्त्वाची स्थाने म्हणून ठरलेली आहेत त्याचा अभ्यास करावा.
ठाणे- जवळील वज्रेश्वरी, हिगळादेवी महाकाली - (कुडाळग्राम-कोकणांतील), नाशिकजवळील सप्तश्रृंगी- ह्या स्थानांचा विचार करता मच्छिन्द्राचे वास्तव्य तपसाधनेनंतर ह्या प्रदेशांत होते ह्याची कल्पना देणाऱ्या कथा व पुरावे म्हणुन ही स्थानं आजहि नाथांचा महिमा गाणारी अशीच आहेत.
ह्या स्थानांचा अभ्यास केल्यावरच ज्ञानेश्वराच्या ओवीतील 'दत्तात्रय योगी' ह्याचा आशय लक्षात येईल.
म्हणून प्रस्तुत लेखकाच्या मते गोरक्षाचा जन्म गोदावरीच्या तीरावर असलेल्या चंद्रगिरी ग्रामीच झाला.
पैठणच्या शिवदीन केसरी मठातील एक जुने हस्तलिखित चोपडे पहाण्यात आले त्यांतहि चंद्रगिरीचा उल्लेख खालील प्रमाणे आहे.
'गोरक्ष संजीवनी पाठ क. चंद्रगिरीस मातीचा पुतळा केला तो सजीव झाला तेहे पालन कर्ण्यास नाथानी कोडींग नावाच ब्राह्मणापासी दिले..
त्याच खोपटींत गोरक्षनाथाच्या आई-वडिलाचे नावापुढे असे लिहिले आहे- 'सब्दोघ-सन्द्रची- जयश्री-बार गुरुवार श्रवण-प्रहरी-'
वरील उल्लेखावरून असे एक स्पष्ट होते की पैठण येथील शिवदिन केसरीच्या मठांत गोरक्षाविषयी बरीच ऐतिहासिक माहिती उपलब्ध असावी, त्याशिवाय स्त्रीचे नाव, वार, तिथी देण्याचा प्रयत्न ह्या चोपडीत झालेला नाही.
अशा त-हेच्या हस्तलिखितांचा अभ्यास होणं आवश्यक आहे.
आम्ही अशी हस्तलिखित मिळविण्याच्या प्रयत्नांत आहोत.
समाजानं सहाय्य केल्यास नाथांचा खरा इतिहास लिहिला जाईल.
प्रस्तुत लेखकाच्या मते ह्या लिखितांच्या आधारे असे विधान मांडता येते की, गोरक्षाचे जन्मस्थान महाराष्ट्रांतच आहे.
कारण गोरक्षाच्या जन्मानंतर गहिनीनाथांचा जन्म झालेला आहे हे ऐतिहासिक सत्य आहे तो संजीवनीनं झालेला असो वा अन्य प्रकारे असो.
पण ऐतिहासिकदृष्ट्या गहिनीनाथांचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे व त्यावेळी गोरक्षाचे वय साधारणतः बारा वर्षांचे होते!
नंतर मच्छिन्द्रनाथ गोरक्षनाथाना घेऊन तपाचरणासाठी बदरीकेदारला नेले व तेथे तपाचरणी बसविले.
तप पूर्ण झाल्यावर त्यांनी अखिल देशांत तीर्थाटनाच्या भूमिकेने भ्रमण केले त्यावेळी ते उत्तर हिंदुस्थानांतून झेलम- पंजाब-राजस्थान -सौराष्ट्र-गिरनार-गौड बंगाल-मागे पुनः महाराष्ट्रांत आले असावेत कारण नंतरच्या काळांत चौरंगी नाथाशी झालेली मच्छिन्द्र-गोरक्ष भेट ही कृशांगारी- कृष्णा - तुंगभद्रा ह्या संगमावर झाली आहे.
म्हणजे गोरक्ष मच्छिन्द्र कर्नाटक मार्गे महाराष्ट्रांत आले असावेत असे सप्रमाण वाटते
जन्मस्थानाच्या ओढीने गोरक्षनाथ पुनः महाराष्ट्रात येऊन अहमदनगरहून ७-८ मैलावर असलेल्या डोंगरगण ह्या स्थानी राहिले.
त्या ठिकाणी गोरक्षाचा फार मोठा मठ होता!
गहिनीनाथांना त्या ठिकाणीच तपाला बसविले होते व गोरक्षानंतरच्या काळांत गहिनीनाथांनीच तो मठ पुढे चालविला होता.
गुरुच्या मूर्तिचे पुजन तेथे होत होते.
अद्यापही त्या स्थानी गोरक्षाची उभी मूर्ति आहे!
ह्या स्थानापासून जवळपासच गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी असावे.
"गोरक्ष"- नाभाभिधान
गोरक्ष सिद्धान्त संग्रहात राजगुह्ये श्रीकृष्णकृत गोरक्षनाथ स्तोत्र आले आहे.
त्यांत गोरक्षाचे नामाभिधानावर प्रकाश टाकणारा असा एक श्लोक आहे :-
"ग-कारो गुण संयुक्तो र-कारो रुपलक्षणः ।
क्ष-कारणाक्षयं ब्रह्मश्री गोरक्ष नमोस्तुते॥'
वरील श्लोकांत गोरक्ष हे नाव अर्थवाचक आहे असे सूचित केले आहे.
गोरक्ष हे केवळ व्यक्तिरुप नसून गुणरुप आहे !
ह्या गोरक्ष शब्दांतील 'ग' शब्दांत व्यक्तिचे गुण सामावविलेले आहेत.
'र' ह्या शब्दांत व्यक्तिचे रुप लक्षण सामावलेले आहे.
व क्ष त ब्रह्म सामावलेले आहे.
थोडक्यांत गोरक्ष ह्या शब्दांत गुण-रूप-ब्रह्म असा त्रिवेणी संगम आहे.
गोरक्षमक्ति गुणी आहे, योगीरूपी आहे आणि अद्वैत ब्रह्मी चराचर व्यापी आहे.
असे महात्म ह्या शब्दांत आहे.
“गोरक्ष-उपनिषदांत" म्हटलं आहे-
१. "गो-कहिये इन्द्रिय तिनकी अन्तर्यामियासो रक्षा करे
है भवनूतन की तासों गोरक्षनाथ नाम है।
२. “गो कहिये वाकू शब्द ब्रह्म ताकी 'र' कहियै रक्षा करै,
'क्ष' कहियै क्षयकरी अक्षय ब्रह्म ऐसे श्री गोरक्षनाथ॥"
ह्या गोरक्ष-उपनिषदांत गोरक्ष ह्या शब्दाचे दोन अर्थ ध्वनीत करण्यांत आले आहेत.
पहिला अर्थ गो-रक्ष असा नामाधिनीत आहे.
इंद्रियाम-अंतर्यामी राहून रक्षण करणारा असा अभिप्रेत आहे तर दुसरा अर्थ गोरक्ष सिद्ध सिद्धांताशी जूळणारा आहे.
तसेच एका ठिकाणी
'गवां रक्षतीत गोरक्षः, रक्षतीति रक्षः, गवारक्षः गोरक्षः यावत् गोवदवाच्य अंशांचे जो रक्षण करतो त्याला गोरक्ष म्हणतात.
म्हणजे गो शब्दाचे जितके म्हणून अर्थ आहेत त्या सगळ्या अर्थवाचक वस्तूंचे, गोष्टींचे जो रक्षण करतो त्यांचे नांव गोरक्ष'- (गोरक्ष ग्रंथमाला-८२ पुष्प योगप्रचारिणी')
अशा तर्हेचे गोरक्षाच्या नांवाचे अभिधान सांपडते.
'गो' शब्दाचे जितके अर्थवाचक वस्तुंचे अर्थ असतील त्या सर्व गोष्टीचे रक्षण करतो ह्या युक्तीवादापेक्षा 'गोरक्ष' ह्या यौगिक अर्थाचा समन्वय साधणे अति उत्तम होईल असे लेखकास वाटते.
गोरक्ष हे योगेश्वर होते.
एक नवयुग त्यांनी निर्माण केलं आणि ते निर्माण करतांना त्यांनी द्वैत व अद्वैत असा भेद न ठेवता साम्यक दृष्टीकोन घेतला ह्या त्यांच्या कार्याचे मर्म लक्षात घेता गोरक्ष हा शब्द अर्थवाचक असा आहे.
"गोचरी रक्षतीति गोरक्षः। अगोचरी रक्षः गोरक्षः॥"
गोचर अगोचरीं जो रक्षण करतो, जो ध्यानमग्न ठेवतो तो गोरक्ष असा खरा अर्थ गोरक्ष नामाभिधानाचा होतो असे यौगिकदृष्ट्या आम्हास वाटते.
शबर तंत्रांत २४ कापालीक.
१२ गुरु व १२ शिष्य दिलेले आहेत त्यांत गोरक्षाचे नाव आहे.
१ गुरु : आदिनाथ, अनादिनाथ, कालनाथ, अतिकालनाथ, करालनाथ, विकरालनाथ, महाकालनाथ, कालभैरवनाथ, बटूकनाथ, भूतनाथ, वरिनाथ, श्रीकंठनाथ.
१ शिष्य : नागार्जुन, जडभरत, हरिश्चन्द्र, सत्यनाथ, भीमनाथ, गोरक्षनाथ, चर्टपटनाथ, अद्वयनाथ, वैराग्यनाथ, कंबरनाथ, कंबधारी, जालन्धर किंवा मलयार्जुन 'बौद्धगान ओदोहा' ह्यात जे ८४ सिद्ध आलेले आहेत त्यांत गोरक्षनाथांचे नाव दुसरे आहे. (ह्यात इतर नाथाचेहि नावे आलेली आहेत.
पहिल नाव-मीननाथाचे आहे.
तीसरे नांव चौरंगीचे आहे.
सहावे नांव हालीपा (हाडिपा) चे आहे.
तेरावे नांव कण्ह (कानिफनाथ)चे आहे व एकोणिसाव नांव जालन्धरनाथांचे आहे.)
१ 'नारद परिव्राजक-उपनिषदमध्ये' गोरक्षनाथांच्या नांवाचा उल्लेख आहे.
गोरखनाथ-रांगेय राघव-पृ. ५, ६.
१ वरील सर्व संदर्भ' गुरु गोरखनाथ-रांगेय राघव मधून घेतले आहेत.
गोरक्षनाथांचे नांव भारतीय अध्यात्मिक इतिहासात निरनिराळ्या परंपरेत आलेले दिसते.
ह्या वरून एक स्पष्ट होते की गोरक्षनाथांच्या अंगी जी अष्टपैलु साधन प्रकृति होती त्यामुळे प्रत्येक परंपरेला गोरक्षाचे नांव आपल्या परंपरेत असावं अस वाटत गेल कारण त्यांच्या नांवाने परंपरेचे महत्व वाढत जावे, हा विशाल नामाभिधानाचा प्रकार गोरक्षाच्या व्यक्तिमत्वाचीच साक्ष आहे!
वस्तुतः गोरक्ष हे एक नाथयोगि होते व त्याचे नांव नाथ योगि परंपरेतच फक्त यावयास हवे; पण साधनेतील श्रेष्ठतेमुळे त्याचे नांव निरनिराळ्या परंपरेत आलेले दिसते.
गुरु परंपरा
गोरक्षनाथाचे गुरु मच्छिन्द्रनाथ हे जगविख्यात व सर्वश्रुत आहे.
त्याची गुरु परंपरा व त्याच्या पासून जी शिष्य परंपरा सुरु झाली ती अशी आहे.
वरील गुरुपरंपरेत गोरक्षनाथांनी गहिनीस अनुग्रह देऊन महाराष्ट्रांत एक गोरक्ष गुरुपरंपरा निर्माण केली.
त्या गुरुपरंपरेनेच महाराष्ट्रात नाथपंथ फोफावला.
व पैठण येथे एक फार मोठे गुरुपीठ निर्माण झाले.
शिवदिन केसरी मठ हे ऐतिहासिक सत्य आहे.
'गोरक्ष' शब्दाची प्राचीनता :
गोरक्ष हा शब्द फार जुना असून त्याचा उल्लेख जुन्या साहित्यात ठिकठिकाणी आला आहे.
असा उल्लेख " नाथाचार्य श्री. गोरक्षनाथ" ह्या डॉ. नागेन्द्रनाथ उपाध्याय यांच्या लेखांत आला आहे.
हा संदर्भ त्यानी गोरक्ष - ग्रंथमाला-८२ पृ.-८-१२ मधून घेतला आहे.
तो असा-
'गोरक्ष शब्द फार जुन्या साहित्यात सांपडतो.
ह्याचा पुरावा म्हणून अथर्ववेद, ब्रह्मांडपुराण, स्कन्दपुराणान्तर्गत केदार खण्ड, अध्याय - ४२, ४५, ४६, ७४, शिवपुराण, महाकालयोग शास्त्र-कल्पद्रुम, गोरक्षगीता, मार्कण्डेय पुराण, शाक्त प्रमोद वगैरे संदर्भ ग्रंथ देता येतील.'
वर निर्देशिल्याप्रमाणे गोरक्ष हा शब्द जसा जुन्या सहित्यात येतो तसा निरनिराळ्या योगी संप्रदायांतहि गोरक्षाच नांव येते.
हठयोग प्रदीपिका ही नाथयोगी संप्रदायाचीच आहे त्यांतहि गोरक्षमच्छिन्द्र ही विद्या जाणत होते व त्यांच्या प्रसादानेच मीहि जाणत आहे असा संदर्भ आला आहे.
"हठविद्यां हि मत्स्येद्र गोरक्षाद्या विजानते
स्वात्मारामोथवा योगी जानीते तत्प्रसादेन"
शाबरी परंपरात अध्यात्मिक परंपरा जी सांगितली आहे ती अशी आहे-
नागार्जुन, शबर, इन्द्रभुति, तिलोपा, नारोवा, नागार्जुन, शबर, लुइपा, जालंधरी, कृष्ण, शबरी, लुइपा, दारिकपा, लीलापा, विरुव, मत्स्येन्द्र, शबर, चौरंगी, मीन तथा गोरक्ष'. ह्यात गोरक्षाचे नांव शेवटी आहे.
तसेच गोरक्ष उपनिषदमध्येही गोरक्षाचे नाव ह्या परंपरेत शेवटी येते.
"एवं श्री गुरु आदिनाथ । मत्स्येन्द्रनाथ । तत्पुत्र उदयनाथ: दण्डनाथ । सत्यनाथ। सन्तोषनाथ । कुर्मनाथः : मत्स्येंद्रपुत्रो भवनार्जिः । तस्य गोरक्षनाथः।"
महानिर्वाण तंत्रांत तीन गुरुपरंपरा दिल्या आहेत- दिव्यौघ, सिद्धौध तथा मानवौघ.
ह्यात मानवौघमध्ये गोरक्षनाथाचे नाव आहे-
"विमलाः कुशलश्चैव भीमसेनः सुधाकरः
मीनोगोरक्षकश्चैव भोजदेवः प्रजापतिः
गोरक्षनाथांनी अशी गुरुपरंपरा अखिल देशांत निर्माण केली व त्या त्या प्रदेशांत गुरुपरंपरेची जोपासना व्हावी म्हणून मठ स्थापन केले.
ह्या मठांना स्वतंत्र कारभारासाठी राजाश्रय मिळून त्यांना जमिनजुमला मिळाला.
पैठणच्या शिवदीन केसरी मठाला ३०० गांवे जहागिरी होती हे इतिहासाला माहितच आहे.
गोरक्षनाथाच्यापूर्वीचे, समकालीन व नंतरचे नाथपंथीय सिद्धाची एक सुची माहितीसाठी देत आहोत.
ह्यातील काही सिद्धांची नावे डॉ. हजारी प्रसाद द्विवेदीच्या सूचीत आलेली नाहीत.
ही सूची इ. स. १३०० पर्यंतच्या गोरखनाथी सिध्दांपर्यंतची आहे.
१ आदिनाथ
२ अनादिनाथ
३ कालनाथ
४ अतिकालनाथ
५ करालनाथ
६ विकरालनाथ
७ महाकालनाथ
८ कालभैरवनाथ
९ बटुक
१० भूतनाथ
११ वरिनाथ
१२ श्रीकंठनाथ
१३ संति
१४ विरुपाक्ष
१५ कुबकुरी
१६ धौम्भि
१७ कण्ह
१८. दारिक
१९ कभारंकवल
२० लुई
२१ धर्मनाथ
२२ भदि
२३ दंडनाथ
२४ दत्तात्रेय
२५ दारि
२६ मंथानभैरव
२७ सिद्धबोध
२८ काणेरी
२९ पुज्यपाद
३० नित्यनाथ
३१ निरंजन
३२ कपाली
३३ बिन्दुनाथ
३४ अलाम
३५ काकचंद्रेश्वर
३६ प्रभुदेव
३७ कापालिक
३८ हालि
३९ उदयनाथ
४० भैरव
४१ भूम्बरी
४२ तंतिया
४३ मलयार्जुन
४४. नागार्जुन
४५ ढेण्डस
४६ जड़भरत
४७ खंडकापालिक
४८ मणिभद्र
(योगिनी)
४९ सत्यनाथ
५० जालंधरनाथ
५१ मत्स्येन्द्रनाथ
५२ गोरक्षनाथ
५३ शबरनाथ
५४ सबर
५५ तिलोपा
५६ नारोपा
५७ गोपीचंद
५८ कंथडि
५९ करंटक
६०. सुरानंदे
६१ सिद्धपाद
६२ चर्पटीनाथ
६३ धोडाचूली
६४ भानुकी
६५ नारदेव
६६ खंड
६७ नाथनाथ
६८ संतोष
६९ नीमनाथ
७० (ज्ञाननाथ)
७१ कन्हडी
७२ भर्तृहरि
७३ अजपानाथ
७४ माणिकनाथ
७५ चामरी
७६ कनखल
७७ धोबी
७८ अचित
७९ चंपक
८० कामरी
८१ धर्मपायतंग
८२ भद्र
८३ सिंपारी
८४ कमलकंगारी
८५ सूर्यनाथ
८६ संतोषनाथ
८७ चौरंगीनाथ
८८ मेनुरा
८९ मीम
९० रेवानाथ
९१ (निवृत्तीनाथ)
९२ गहिनीनाथ
९३ धोरंग
९४ तारक
९५ मेखलापा
९६ चुणकरनाथ
वरील सिद्धांच्या सूचीवरून एक सहज अभ्यासता येईल की, ह्या गोरक्ष समकालीन व उत्तरकालीन सिद्धांमध्ये ज्ञाननाथांचे व निवृत्तिनाथ यांची नावे क्रमांक-७० व ९१ मध्ये आलेली आहेत.
ही सूची ‘गोरखनाथ और उनका युग', ह्या रांगेय राघव यांच्या ग्रंथातून घेतलेली आहे. ( पृष्ठ ३६ )
गोरक्षनाथाचे मठ:
वर सांगितल्याप्रमाणे गोरक्षनाथांनी योग प्रचारासाठी अखिल भारतात निरनिराळ्या ठिकाणी मठ स्थापन केले व ते स्वयंपूर्ण केले.
ह्या मठांना निरनिराळ्या राजांकडून जहागिरी, अनुदान, जमिनी मिळाल्या.
त्यामुळे आजपर्यंत ह्या मठाचा व्यवहार आजही व्यवस्थित चालला आहे.
हरिद्वार येथील मुख्य मठांतून ह्या मठाची व्यवस्था पाहिली जाते.
नाथपंथी पंचयोगी ह्या मठांची व्यवस्था अनुभवी महान् महंताची नेमणूक करुन पहात असतात.
गोरक्षाचे मठ खालील ठिकाणी आहेत.
अंगना (उदयपूर), आदिनाथ (बंगाल), काद्रीमठ (मद्रास), गंभीरमठ (पुणे), गरीबनाथ काठीला (सारमौर स्टेट), गोरक्षक्षेत्र (गिरनार), गोरखवंशी (दमदम, बंगाल), चंद्रनाथ (बंगाल), चंचुलगिरीमठ (मद्रास प्रान्त), त्र्यम्बक मठ (नासिक), नीलकंठ महादेव (आगरा), नोहरमठ (बिकानेर), पंचमुखी महादेव (आगरा), पाण्डुधुनी (मुंबई), पीर सोहर (जम्मू ), बत्तीस सराला (सातारा), भर्तृगुफा (ग्वाल्हेर), भर्तृगुफा (गिरनार), मंगलेश्वर (आगरा), महानाद मंदीर (बर्दवान, बंगाल), महामंदीर मठ (जोधपूर), योगी गुहा (दिनाजपुर), योगी भवन (बगुडा, बंगाल), योगी मठ (मेदिनीपूर), लादुवास (उदयपुर), हांडी भरंगनाथचे मंदीर (म्हैसूर), हिंगुआ मठ (जयपुर).
गोरक्षाची ग्रंथरचना
श्रीगोरक्षनाथाचे व्यापक व्यक्तिमत्व त्यांनी उभारलेल्या मठामुळेच स्पष्ट होते असे नाही तर त्यांनी स्वतंत्रपणे ग्रंथरचना केली व त्या ग्रंथातून त्यांनी योगाचा प्रचार केला.
ह्या ग्रंथांतून त्यांनी नुसते पांडित्य समाजासमोर ठेविले नाही तर यौगिक अनुभव, प्रमाण समाजासमोर ठेऊन समाजाला अध्यात्मिक ज्ञान सर्व थरासाठी मोकळे केले व जे गुढ ज्ञान आहे तेच सर्व थरापर्यंत पोहचवण्याचं महान कर्म श्री गोरक्षांनी अविरत प्रयत्न करून यशस्वी केले!
अखंड तीर्थाटन करून समाजाच्या दुःखाची जाणीव करून घेतली.
खर्या अर्थानं चराचरी ब्रह्म कसा आहे, तो पाहिला व समाजाचं दुःख, ज्ञानानं, योगानं व तपबलानं दूर केलं!
गोरक्षनाथांनी बरच लिखाण संस्कृतमध्येच केलं आहे तसंच हिंदीतहि त्यांचे दोहे आहेत.
मराठीतहि त्याचे लिखाण मिळते.
गोरक्षांनी प्राकृत भाषेतहि अध्यात्म सांगण्याचा परिपाठ सुरू केला व नाथपंथाचा ज्ञान दीप समाजांत तेवत ठेवला!
ही गोरक्षाची-नाथपंथाची वैदिक आचाराविरुद्ध बंडाळीच होती.
गोरक्षनाथाचे ग्रंथ :
१ अमनस्क : एकप्रत बड़ौदा लायब्ररीत आहे.
२ अमरौघशासनम : हा ग्रंथ काश्मीर संस्कृत ग्रंथावली (ग्रंथांक २०) मध्ये प्रकाशित झाला आहे.
हा ग्रंथ महामहोपाध्याय पं. मुकुन्दराम शास्त्रींनी संपादन करून १९१८ मध्ये छापला आहे.
३. अवधूत गीता : गो. सि. सं. पृ. ७५ वर 'गोरक्षकृता' म्हणून संबोधिली आहे.
४ गोरक्षकल्प : (फर्कुहर-ब्रिग्स)
५ गोरक्षकौमुदी : (फर्कुहर-ब्रिग्स )
६ गोरक्षगीता : (फर्कुहर)
७ गोरक्ष चिकित्सा : (आफ्रेरन्ट)
८ गोरक्ष पन्चत्र : (ब्रिग्स)
९ गोरक्ष पध्दति : ह्या ग्रंथाला कोणी गोरक्षज्ञान असेहि म्हणतात.
१० गोरक्ष शतक : ह्याच पुस्तकाला ज्ञानप्रकाश किंवा ज्ञानप्रकाश शतक असेहि म्हणतात.
११ गोरक्ष शास्त्र
१२ गोरक्ष संहिता : पं. प्रसन्नकुमार कविरत्न यानी हे १८९७ मध्ये छापले आहे.
१३ चतुरशोत्यासने : (आफ्रेख्ट)
१४ ज्ञानप्रकाश
१५ ज्ञानशतक
१६ ज्ञानामृतयोग (ऑफख्ट)
१७ नाडीज्ञान प्रदीपिका ( ऑफ्रेख्ट)
१८ महार्थमंजरी : काश्मिर संस्कृत ग्रंथावली (नं. ११) मध्ये.
१९ योगचिन्तामणि : छापली आहे.
हे पुस्तक म. म. पं. (आफ्रेख्ट) मुकुंदराम शास्त्रीने संपादित केले आहे.
२० योगमार्तंड (,,)
२१ योगबीज : गो. सि सं. मध्ये हा भाग आला आहे.
२२ योगशास्त्र (दे. नं. ७)
२३ योगसिद्धासन पद्धति. (आफ्रेख्ट)
२४ विवेक मार्तण्ड
२५ श्री नाथ सूत्र गो. सि. सं. मध्ये काही वचन आलेली आहेत.
२६ सिद्ध सिद्धांत पद्धति (पृ ११)
२७ हठयोग ( आफ्रेख्ट)
२८ ह. संहिता (,,)
२९ गोरखवाणी.
३०) अमरनाथ-संवाद.
३१ दत्तात्रय-गोरक्ष संवाद.
३२) श्री गोरख-गीता.
३३) श्री गोरक्ष-किमयागिरी
ह्या ग्रंथा व्यतिरिक्त डॉ. बड़थ्वाल याच्या संशोधनातून खालील ४० ग्रंथ रचना श्री गोरक्षनाथांची आहे हे स्पष्ट झाले आहे.
१ सबर्या
२ पद
३ सिण्या दरसन
४ प्राणसंकली
५ नखै बोध
६.आत्म बोध
७ आभैमात्राजोग
८ पंद्रहतिथी
९ सप्तवार
१० मच्छिन्द्र गोरखबोथ
११ रोमावळी
१२ ग्यानतिलक
१३ ग्यानचौतीसा
१४ पंचमात्रा
१५ गोरख गणेश गोष्टी
१६ गोरखदत्त गोष्टी
१७ महादेव गोरख गोष्टी
१८ स्तिष्ट पुरान
१९ दयाबोध
२० जाती भोरावळी
२१ नवग्रह
२२ नवरात्र
२३ अष्ट पारछया
२४ रहरास
२५ ग्यानमाला
२६ आत्मबोध
२७ व्रत
२८ निरंजन पुराण
२९ गोरख बचन
३० इन्दो देवता
३१ खाणी वाणी
३२ गोरख संत
३३ अष्टमुद्रा
३४ चौबीस सिद्ध
३५ षडक्षरी
३६ पंचाग्नि
३७ अष्टचक्र
३८ अबलि सिलूक
३९ कफिर
४० मुळगर्भावली
(वरील सर्व ग्रंथ सूची- नाथ संप्रदाय- डॉ. हजारी प्रसाद द्विवेदी यांच्या ग्रंथावरुन पृष्ठ १०९ ते १११ वरुन घेतली आहे.)
वरील निर्देशिलेली ग्रंथ रचना जशी संस्कृत-हिंदीमध्ये गोरक्षनाथाची आहे तशी मराठीतहि त्यांची काही ग्रंथ रचना आहे.
वरील ग्रंथापैकी लेखकानें, श्री गोरक्षनाथ-अमरनाथ व श्री दत्तात्रय-गोरक्षनाथ संवाद ह्या ग्रंथाची हस्तलिखित प्रत राजवाडे-इतिहास संशोधक मंडळ, धुळे येथे पाहिली आहे.
ह्या अंकात श्री गोरक्ष-अमरनाथ संवादावर संक्षिप्त टीका आम्ही लिहिली आहे.
परंतु श्री गोरक्ष-किमयागिरी हा ग्रंथ आमच्या पहाण्यांत आलेला नाही.
तो ग्रंथ उपलब्ध होणे आवश्यक आहे.
हा ग्रंथ भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे असल्याचे समजते पण त्याचा खुलासा झाला नाही.
ह्या ग्रंथाद्वारे बरेच विवरण नाथपंथावर ऐतिहासिक मुल्यातुन करिता येईल असा आत्मविश्वास आहे.
ज्याच्या जवळ असेल त्यांनी आम्हाला उपकृत करावे.
-श्री गोरक्ष-गीतेचे मराठी हस्तलिखित पहाण्यात आले आहे पण ते अपूर्ण होते.
त्यामुळे तेहि प्रसिद्ध करता येत नाही.
तरीपण ते गोरक्षनाथ नावाने ओळखले जाते हे सत्य आहे.
श्री गोरक्षाचे आणखी काही लिखाण पैठण परिसरात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
शिवदीन केसरी मठांत तर निश्चितच हस्तलिखित स्वरूपांत हे लिखाण असणं संभवनीय आहे.
ह्या ग्रंथाधारे गोरक्षाचा काळ ठरविणं ऐतिहासिक दृष्ट्या सोपे जाईल.
गोरक्षनाथाचा काळः
गोरक्ष नाथाचा काळ निश्चित करणं ऐतिहासिकदृष्ट्या जरा अशक्य बाब आहे.
कारण हा एका योगी महात्म्याचा काळ आहे!
अमनस्क महायोगांत श्री गोरक्ष स्वतः म्हणतात.
"गुणत्रयमयी रज्जु सुदृढामात्म बन्धनीम् ।
अमनस्कक्षुरेणैव छित्वा मोक्षमवाप्नुयात ॥८६॥
यथासंहियते सर्वमस्तं गच्छिति भास्करे ।
कर्मजालं तथा सर्वमममनस्के विलीयते ॥८७॥
इन्द्रिय ग्राहनिर्मुक्ते निर्घूते निर्मलामृते ।
अमनस्कह्रदे स्नातः परामृतमुपाश्नुतो ।।८८।।
(जसा सूर्यास्त होताच सूर्य किरणाचा ताप नाहीसा होतो तसा संसारी लोकांचा सारा कर्म तापाचा उपसंहार होतो.
ह्याचप्रमाणे ही अमनस्क सिद्धी प्राप्त होताच योग्याचा जन्म मृत्यूरूप कर्म विलीन होतात व ते पुन्हा निर्माण होत नाहीत.
( पुन्हा पुनर्जन्म घेत नाहीत.)
इंद्रीय वासनेतून मुक्त झालेले निल्कत्मष निर्मल अमृतवाले योगी अमनस्क योग रुपी सरोवरांत स्नान करून योगी परामृताची पारणा करतात.
अर्थात जसे कोणी पवित्र व्रताची विधीपूर्ण पुर्ति करून कोणी व्रती, निर्भय-निर्मल जलाशयांत स्नानादि करून अमृतमय पवित्र फलाहार करतात तसे हे योगी योगाचे पवित्र व्रत ग्रहण करून अमनस्क सिद्धी प्राप्त करून उन्मनी मुद्राने निरुपद्रव विमल अमृतमय सरोवरांत निमग्न होऊन ब्रह्म तत्व सायुज्य मोक्षमय अमृत-अमरत्वाचा उपभोग घेतात.
अजरामर होतात.)
वरील श्री गोरक्षाच्या विधानावरून अमनस्क योगी हा अजरामर असतो.
त्याला पुर्नजन्म नाही अथवा मृत्युचही भय नाही याचा स्पष्ट खुलासा होतो.
त्यामुळे अशा योगी महात्म्याचा काळ ठरवितांना इतिहासालाही थोडं वेगळ्या अंगानं गोरक्षाचा काळ ठरवावा लागणार आहे.
आणि त्या काळाला, 'योगिक-काळ' अस, संबोधाव लागणार आहे.
कारण ह्या काळाची गणना योगिक साह्यानेच होईल.
हा प्रदीर्घ काळ एका महान तपस्व्याचा आहे ह्याची खात्री तो काळाचा पटलच समजून देईल!
श्री गोरक्षाचा काळ ठरविताना ऐतिहासिक पुराव्याची गरज आहे.
हे ऐतिहासिक पुरावे गोरक्षाच्या जीवनांत आलेले राजे आहेत.
गोरक्षाच्या संपूर्ण जीवन चरित्रांत खालील योग्यांचे व राजांचे संबंध आले.
संबंधित राजे व स्थाने:
१) राजा भर्तृरी-विक्रम-उज्जयनी.
२) त्रिविक्रम राजा- प्रयाग.
३) शशांगरु-प्रयाग (चौरंगीनाथांच्या संबंधी)
४) धर्मनाथ-ज्येष्ठ पून त्रिविक्रम
५) गोपिचंद-जलिंधरच्या संदर्भात.
६) गूगा
७) रसालू
संबंधित योगी:
१) मच्छिन्द्रनाथ-गुरुस्थानी.
२) गोरक्ष-जालिंदरनाथ भेट, गौड बंगली. हेला पट्टणी
३) गोरक्ष-कानिफानाथ भेट (हेलापट्टन ते जगन्नाथपूरी ह्या मार्गावर)
४) मैनाकिनी-महाराणी-स्त्रीराज्यांत.
वरील संदर्भावरून असे लक्षात येते की श्री गोरक्षाच्या जीवनात जे राजे भेटले त्यात भर्तरी, गोपिचंद व शशांगरु हे महत्वाचे आहेत.
ह्या राजांच्या कालाचा विचार करता ते निरनिराळ्या काळांतील आहेत.
राजाभर्तरीचा काळ ठरवितांना विक्रम राजाच्या काळाचा विचार होणं आवश्यक आहे.
कारण विक्रम राजान भर्तरीस राज्य दिल्याची कथा सांगितली जाते.
म्हणजेच विक्रमराजाच्या सौजन्यानं भर्तरीराजा राज्य करीत होता.
विक्रमराजाची कथा 'गोरक्ष-किमयागिरी प्रवाह' ह्या नाथपंथी ग्रंथात संक्षिप्तानं अशी आहे-
'कुंभारु कुलाळू । कोणी उज्जैनीसीं।
कन्या सत्यवती । स्नुषा झाली।
कुलालाचा दासा गर्दभू गंधर्वू।
शाप भ्रष्टा आसा । होय त्यासी ।
गंधर्वे वरील । राजयाच्या कन्यें।
शापे मुक्ता होता । पुत्रत्यांतें।
विक्रम तो जाणा । सत्यवती पुसू ।
गंधर्वांचा सुतू । कुंभा-गेही।
दुर्गाचा रक्षकू । क्रमी वृत्ति ऐसी।
मारोनी राक्षसु । रत्ने आणी।
दुर्गाचिये द्वारी । हत्ती मालाथारी।
विक्रमु वरील । राज्यकर्ता ।
विक्रमु कुलालु । गंधर्वाचा पुत्रू ।
भर्तरी रानोलु । भ्राता मानी।
वरील संदर्भावरून असे लक्षात येते की, विक्रमाला राज्य अचानक मिळालेले आहे व हत्तीण माळ त्याच्या गळयांत घालते व त्याला उज्जयनीचं राज्य मिळत.
विक्रम संवत्सर सुरू करणारा विक्रम राजा व हा वेगळा नसावा.
राजाची निवड झाल्यावर नव्या राज्याभिषेकाच्या आठवणीसाठी राज्याभिषेक करणारा हाच तो विक्रमराजा असावा.
हा विचार ग्राह्य मानल्यास गोरक्षाच्या वास्तव्याची जाणीव इ. पूर्व पहिल्या शतकात होते.
राजा गोपीचंदाची कारकिर्द लक्षात घेता, गौड देशांत पराक्रमी असा जो गोपिचंद राजा होऊन गेला तो इ. स. ६ व्या शतकांत आहे.
ह्या काळांत जालिंधरांची भेट झालेली ग्राह्य मानल्यास गोरक्षाच्या वास्तव्याची जाणीव सहाव्या शतकात होते.
रसालू चौव्हान राजाचा पुत्र होता.
तो जालंधराचा शिष्य होता.
रसालुचा जन्म गोरक्षनाथाच्या प्रसादान झाला होता.
रसालू साधारणतः ११५० इ. स. पर्यंत जिवंत होता.
त्याचा काल १० व्या शतकात धरला आहे.
म्हणजे गोरक्षाच्या वास्तव्याचा काल दहाव्या शतकांत आला.
गुगाचा व गोरक्षनाथाचा संबंध आलेला होता.
गुगा औरंगजेबाशी लढला आहे.
(१६५९-१७०७) गुंगा राजपूत होता तो महमंद गजनींशी लढता लढता मरण पावला (१०२४) असें टाडचे मत आहे हा परस्पर विरोधी ऐतिहासिक माहितीवरून एकच लक्षात येते की गुगाचा गोरक्षाचा सबंध होता व गूगाचा काल - साधरणतः चौहान वंशावरून १० वे शतक येते.
गोरक्षाची व कबीराची भेट, नानक गोरक्षभेट (१४६९- १५३०) नेपाळच्या व बौध परंपरेवरून गोरक्षाचे वास्तव्य ७ व ८ व्या शतकांत येते तर बंगालच्या शैव-बोध
परंपरेवरून गोरक्षाचे वास्तव्य ११ व्या शतकांत येते.
ज्ञानेश्वराच्या पणजोबाना शिष्यत्व देणारे गोरखनाथ महाराष्ट्रांत १२ व्या शतकात वास्तव्य दाखवतात.
ह्या सर्व ऐतिहासिक संदर्भाचा अर्थ नीट लावणं अशक्य आहे.
दंतकथा-कथा-ऐतिहासिक दुवे, सामाजिक रुढी या सर्वांचा मिलाफ केला तर महाभारतकाळी असलेले गोरखं गोदावरीच्या तीरावर ज्ञाननाथांना भेटतात हे कोणत्या ऐतिहासिक कसोटीला उतरावयाचं.
याचा अर्थ आम्ही इतकाच लावतो की गोरक्षाचा काल ठरविण्यापेक्षा गोरक्षाचा यौगिक काळ ठरविला असता तो इ. स. पूर्व पहिले शतक ते १४ व्या शतकापर्यंत प्रदीर्घ येतो.
आणि हे आश्चर्यकारक कांहींच नाही कारण त्यांच्या शिष्यानं-गहिनीनाथानं निवृत्तीला दिक्षा दिली.
बाराव्या शतकांत दिली तशी १७ व्या शतकांत बहिरोबानाथ (रत्नगिरीकडील ) ह्यांना दिली.
पांचशे वर्षांनं पुन: त्याचं वास्तव्याची इतिहासाला गोरक्षनाथांच्या शिष्यानं करुन दिली.
ह्या सर्व यौगिक किमयेचा अर्थ अमरत्व प्राप्त करुन घेतलेल्या योग्यांना काळ बंधनांत कोठे ठेवायचं
गोरक्षाचा काल ठरवणं हे एक यौगिक-शास्त्राच्या कसोटीचं अंग आहे!
सोमनाथाच्या मंदिरावर गोरक्षाचा शिलालेख आहे तो १२८७ मधला आहे.
त्याच्या आधी १०० वर्षापूर्वीचा तो असावा अस मानतात म्हणजे शिलालेखाचा आधार घेतला तरी गोरक्षाचं वास्तव्य ११ व्या शतकात येत.
ह्यात वास्तव्याचीच जाणिव होते.
आणि त्याच्या वास्तव्याची जाणीव आजहि आम्हाला होते!
म्हणून गोरक्षनाथांना काळ मर्यादेत न अडकवून ठेवता त्याच्या कार्याचा अभ्यास करणंच योग्य होईल.
नवीन साधन जसजशी आणखीन उत्पन्न होतील तसतसा गोरक्षानाथाच्या जीवनावर प्रकाश पडेल.
सर्वसाधारण समाज गोंधळात पडला व धर्मसाधनेंत श्रेष्ठ साधना कोणती हा प्रश्न समाजासमोर उभा राहिला.
मंत्र-तंत्रातील चमत्कार की आत्मानुभुती हा खरा प्रश्न समाजाला जाचू लागला!
चमत्काराकडे सर्व वळू लागले- दबू लागले-वेद-ऋग्वेदापासून अथर्ववेदापर्यंत आला व तंत्र उपनिषदांना स्थान मिळू लागले!
बौद्ध व जैन धर्म आपले प्रस्थ समाजात स्थिर करू लागले!
व खालचा समाज वर्णाचारानं व पुरोहितांच्या अतिरेकानं हिंदू धर्मातून बाहेर पडू लागला त्या वेळीच आचार्याचं अद्वैतहि डळमळू लागलं व मिथ्यामायेच्याच मागे सर्व समाज लागला!
अद्वैताचं स्थान डळमळू लागलं व त्याची जागा द्वैतानं घेऊन शाक्त व वैष्णव प्रभाव वाढला.
शैवाचार भैरव साधनेत गुरफटला जाऊ लागला व यज्ञयागाच्या ऐवजी हिंसाचार साधन क्रियेसाठी होऊ लागले!
अध्यात्म ज्ञानाची भाषा संस्कृत झाली व देववाणीचे स्थान वरच्या वर्गात श्रेष्ठ झाल्यानं सर्वसाधारण समाज तत्त्वज्ञानाच्या कक्षेत न रहाता अविचाराच्या साधनेतच रमु लागला!
चिंतनशील प्रवृत्ती समाजाची न रहाता तांत्रिक प्रवृत्ती निर्माण झाली व समाज आपलं अध्यात्मिक स्वास्थ्य गमावून बसला!
वर्णाचाराचा व जातियतेचा प्रभाव समाजांत उग्रस्वरुप धारण करून समाजाला त्रस्त करू लागला व वामाचार समाजांत प्राधान्य मिळवू लागला.
अशा वेळी नाथसंप्रदांतील योगी अरण्यातून बाहेर आले व त्यांनी हिंदूधर्माची झालेली ही दीनावस्था पाहून भागवत धर्माची प्रस्थापना केली व समाजाला शुद्धाचाराकडे लावले.
शैव शाक्त, वैष्णवी साधनाचे नुतनीकरण केले!
शाक्त प्रभाव
समाजात वाढलेल्या शाक्त प्रभावा विरुद्ध बंड करणं हा त्याकाळी एकच भाग नाथयोगीजनांसमोर होता.
त्यामुळे त्यांनी स्वत: शाक्त साधनाचाच स्विकार करून शाक्त साधनेत सुधारणा घडवून आणली.
कारण शाक्त साधनेत स्त्रीचे शरीरच शाक्त पीठ झालं होतं अस विधान केलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
शक्ते सर्व शरीरं यत् पीठं पूर्ण गिरिर्भतः
तस्याः शिवश्चंद्रभागे उद्यान परिकीर्तितम् ।
स्तनौ जालन्धरं प्रोक्तं कामरुप भगं स्मृतं ।
ह्या शाक्तावर प्रथम नाथसंप्रदायान टक्कर दिली.
स्वतः तंत्रशास्त्रातील प्रमुख साधनातील सातहि आचार साधनेसाठी स्विकारले व कौलज्ञान हा श्रेष्ठतम आचार पंथीय आचार केला.
गुरु गोरक्षनाथाचा काल ठरविणं जसं अवघड झालं आहे तसं त्यांच्या कार्याचं मोजमाप करणं अवघड नाही.
त्यांनी भारत देशांत केलेली कामगिरी अमोल आहे.
भारत देशांतील वाहणाऱ्या सर्व नद्या वाहत्या प्रवाहाबरोबर नित्य नियमानं गुरु गोरक्षाच्या आठवणींना उजाळा देत असतात.
स्नानासाठी येणाऱ्या भक्त-साधन तपस्वीच्या तोंडातून अनेकवेळा गुरु गोरखनाथ नाव ओठावर आल्याशिवाय रहात नाही म्हणून निसर्ग नेहमीच श्री गोरक्षांना आठवत असतो.
ही अतिशयोक्ति नाही, वस्तुस्थिती आहे!
गोरक्षनाथाचे कार्य
गुरु गोरक्षनाथांच्या कार्याचा विचार करायचा झाला तर त्याचं कार्य तीन प्रकारे विभागता येईल व त्यावर स्वतंत्रपणे विचार करता येईल.
श्री गोरक्षाचे कार्य तीन प्रकारे आहे.
१) अध्यात्मिक कार्य
२) सामाजिक कार्य
३) सांप्रदायिक कार्य
श्री गोरक्षाच्या कार्याचा आलेख काढायाचा झाला तर वरील तीन स्तंभ काढावयासच हवेत.
संपूर्ण कार्याची विभागणी तीन विभागांत करावयास हवी.
ह्या एका युग तपस्व्याच्या छायेतच नाथसंप्रदायाचं आज कार्य आहे असं म्हटल तर अतिशयोक्ती होणार नाही.
नाथपंथातील चार व्यक्तिच प्रधान कार्य करून गेल्या त्यांत दोन मुख्य शाखा.
(१) मच्छिन्द्रनाथांची व (२) जालिंदर नाथाची आणि ह्या कौलज्ञान व कापालिक शाखांचे प्रमुख कार्यकर्ते गुरु गोरखनाथ व गुरू कानिफनाथ.
ह्या योगी तपस्व्यांच्या अविरत प्रयत्नानं नाथपंथ राजवाड्यापासून ते अरण्यांतील गुहेपर्यंत आज आपल अढळ स्थान निर्माण करून, अढळ राहिला आहे ह्याचे श्रेय ह्या दोन युग तपस्व्यासच आहे!
अध्यात्मिक कार्य
गुरु गोरक्षाच्या अध्यात्मिक कार्याचा विचार करतांना त्या काळच्या सामाजिक, अध्यात्मिक स्थितीचा विचार करावयास हवा.
वर उल्लेख केल्याप्रमाणे, गोरखनाथ काल
ठरविणं ही एक अवघड बाब आहे तरीपण तंत्रकाळांतच गोरखनाथाचे खरे कार्य सुरु झाले.
तंत्र काळांत तंत्राचा अतिरेक होऊन समाज मंत्र-तंत्रानं जर्जर झाला.
समाजाला स्वास्थ्य अस राहिलं नाही.
वज्रायनी साधकांनी साधनेच्या अतिरेकानं 'पंच-मकार' तंत्राचा स्वीकार करून समाजात साधनेविषयी घ्रुणा निर्माण केली.
साधन प्रकृति तंत्रावर प्रगती करु लागली व समाजांत अध्यात्माचं ज्ञान, तत्वज्ञान म्हणून न रहाता एक शक्ति म्हणून स्थिर होऊ लागली.
तंत्र शास्त्रात सात आचार प्रधान मानले आहेत-
१) वेदाचार २) वैष्णवाचार ३) शैवाचार ४) दक्षिणाचार ५) वामाचार ६) सिन्दान्ताचार ७) कौलाचार.
हे सात आचार नाथ पंथाने स्विकारल्यामुळे सर्व त-हेचा समाज नाथपंथात सामावला गेला व त्यांतून अध्यात्माचा विकास घडवून आणला.
समाजाला दुराचारांतून सोडविलं.
ह्या सात प्रधान आचारांतील साधना कर्म खालील प्रमाणे आहेत.
१) वेदाचार: वेदाचारांतील वैदिक कर्म प्रधान आहे.
यज्ञयागादि साधना.
ही साधना तंत्र साधनेत हलक्या प्रतीची साधना समजली जाते.
२) वैष्णवाचार: मित भोजन, पवित्र भावाची व्रत-उपवास-ब्रह्मचर्य भजन भक्ति.
३) शैवाचार: यम-नियम-ध्यान-धारणा समाधी व शिवशक्ति उपासना.
४) दक्षिणाचार: वैदिक, वैष्णवी, शैवी ह्या तिन्ही साधनांचे आचरण आहे.
रात्री भांग-गांजादि मद्यसेवन करून मंत्राचे जप करणे.
ही आचरण धारा श्रेष्ठ समजली जाते पण ह्या साधना पशुभावासाठी गणल्या जातात व वामाचार, सिद्धान्ताचार व कौलाचार वीरभावासाठी गणल्या जातात.
५) वामाचार: वामाचारांत आत्म्याला वामा (शक्ति) समजून साधना कर्म केली जातात.
६) सिद्धान्ताचार: हा सर्वश्रेष्ट आचार आहे.
मनाला अधिकाधिक शुद्धतेकडे नेऊन सर्व ठाई ब्रह्मरूप पाहून स्वानुभव ब्रह्मरूप होणे हा भाव ह्या साधनेंत आहे.
परमशिव हा सर्वश्रेष्ठ भाव ह्या अद्वैत वादांत आहे!
७) कौलाचार : अत्यंत साम्य दृष्टीने चराचरी ब्रह्मरूपाच्याहि पुढे जाऊन निरीच्छ होऊन पाप - पुण्य - सिध्दसिद्धी- कर्म - अकर्म हा भाव देखील गुरुनिष्ठ होऊन न ठेवणं असा हा आचार आहे.
हा अतिपवित्र असा आचार मानला गेला आहे.
ह्या आचारांतच सर्व साधनांची इतिश्री आहे!
ह्या संदर्भात "भाव चूडामणि" मध्ये असे म्हटले आहे-
"कर्दमे चन्दनेऽभिन्नं पुत्रे शत्रौ तथा प्रिये ॥
श्मशाने भवने देवि वै कान्चने तृणे।
न भेदो यस्य लेशोऽपि सकौल: परिकितितः॥
मार्कंडेय ऋषीनंतर लुप्त झालेला हठयोग श्री गोरक्षानं भारतीय अध्यात्माला पुर्नजन्मानं दिला.
हठयोगाचा साधन प्रकृति म्हणून उपयोग केला.
त्याकाळी म्हणजे साधारणतः ६ व्या शतकांत श्रीगोरक्षनाथांनी साधना कर्मप्रधान न करता शरीरप्रधान केली.
आत्म्याला मुक्ती मिळविणं हा भाग विशेष महत्त्वाचा नसून शरीराला मुक्ती मिळविणं महत्वाचं आहे असे श्रीगोरक्षाने मत प्रतिपादन केलं व मनाला शरीराच्या ताब्यात ठेऊन शरीराला शिस्त साधनेत दिली.
ह्या शिस्तीच स्वरूप म्हणजेच “नाथांचा- हठयोग!"
भारतीय साधना वैदिक व वात्यं साधनेचा परिपाक आहे हेच जाणून श्रीगोरक्षनाथांनी 'ह' व 'ठ' ची युती केली.
सूर्यचंद्र बीज एकत्र आणिली व वैदिक वात्य साधना एकत्रित केली.
हे भारतीय अध्यात्माला श्रीगोरक्षानं दिलेलं वरदानच आहे.
वरील विश्लेषणांचे स्पष्टीकरण समजून घेण्यापूर्वी भारतीय साधनेचा आलेख विचारांत घेऊ.
भारतीय साधना प्रज्ञा व तर्कमुलक आहे ह्यात काहीच वाद नाही पण नंतर तिची स्थित्यंतरं श्री गोरक्ष कालापर्यंत कशी झाली हे खालील आलेखानं समजून येईल.
'नाथपंथ और निर्गुण संत काव्य' ह्या पुस्तकात दिलेल्या भारतीय साधनाच्या आलेखात थोडा बदल करून वर साधनेची स्थिती चितारली आहे.
ह्यांत असे निर्देशनास येईल की नाथ पंथानं योग व तंत्र ह्याबरोबर भक्ति हा भाग साधनेत प्रधान मानल्याने नाथपंथाची श्रेष्ठता सर्वथा मान्य होते.
श्री गोरक्षनाथांनी भारतीय अध्यात्माला हेच खरे वळण दिले.
द्वैताद्वैताच्या वादात भारतीय आध्यात्म न ठेवता योगतंत्र भक्तिच्या कक्षेत भारतीय अध्यात्म आणला व एक हठयोगी परंपरा चालू केली की ज्यामुळे संत व सिद्ध, हे समाजाचे आदर्श बनले.
तपस्वी साक्षात ईश्वररुप झाले!
शरीराला प्राधान्य दिल्याने, श्री गोरक्षनाथांनी साधन प्रवृत्ति ही चिंतनशील करून समाजांत आरोग्य संवर्धन ही एक मोहिम सुरु केली व असा निर्वाळा सर्व थरातील साधकांना दिला की, हठयोगाशिवाय राजयोग नाही.
तरी प्रथम हठयोग प्राप्त करून घ्या व ह्या हठयोगातील अमनस्क योग जो आहे त्याचा सुक्ष्मतेने अभ्यास करून, स्वदेहाला अमरत्व प्राप्त करून घ्या.
ह्या कौलाचाराचा स्विकार मच्छिन्द्रनाथांनी केल्यामुळे नाथपंथात हे सातहि आचार प्राथमिक साधन अवस्थेत दिसतात व नंतर सिद्धावस्थेत आलेला खऱ्या अर्थाने कौल ज्ञानी होतो.
व खरा कौलज्ञानी हा अद्वैती असतो की त्यास जप-तप, प्राणायाम-ध्यान-समाधि- साधना करण्याची गरजच लागत नाही.
त्याची जीव ब्रह्म-सेवा साधनाच श्रेष्ठ साधना असते.
ह्या आचरणानं शाक्त प्रभाव सर्व तांत्रिक साधनेतील नाथपंथानं कमी केला व त्याचे श्रेय गुरु गोरक्षानाहि द्यावे लागेल.
ह्या कौलज्ञानाच्या आचरण ध्येयामुळे श्रीगोरक्षनाथानी सिद्धान्तचाराला मान्यता देऊन समाजाला तोच आदेश दिला व तंत्र शास्त्रावर कडाडून हल्ला केला.
ह्या समयी ते प्रत्यक्ष आपल्या गुरूशी भांडले पण तंत्र साधनेतील शाक्ताचारास सिद्धान्ताचाराची जोड दिली व समाजाला आचरशुद्धतेकडे नेले!
साधना:
अध्यात्मिक कार्यात श्री गोरक्षनाथांनी साधनेला दिलेले वळण हे फार महत्वाचे आहे.
तंत्रशास्त्राप्रमाणे व उल्लेखलेले आचाराचे विश्लेषण श्री गोरक्षनाथांनी आपल्या साहित्यांत केले.
व त्यातील नको असलेल्या आचारावर टीकाहि केली.
ह्या सात आचाराचे भावगुण खालील प्रमाणे आहेत-
आचार भाव
वेद, वैष्णव, शैव, दक्षिण पशु
वाम, सिद्धान्त वीर
कौल दिव्य
ह्या पशु, वीर, दिव्य भाव नाथपंथात त्यामुळेच साधनेत दिसतात व साधक ह्याच हलक्या भावांत रममाण होतात पण श्री गोरक्षनाथांनी साधनेला दिव्य भाव देऊन वीर भावांतून या साधनेला मुक्ती दिली!
हे श्री गोरक्षनाथाचे हिंदु धर्मावर फार मोठे ऋण आहे.
तांत्रिक प्रकृतिला श्री गोरक्षनाथांनी विरोध करून योगमार्ग सर्वश्रुत केला त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे वीर व दिव्य भाव सातत्याने श्री गोरक्षाने साधनेत टिकवले. आजहि अरण्यांत असलेला साधक श्री गोरक्षाच्या कृपेचा प्रसाद वीर व दिव्य भावातूनच मिळवतो.
त्यामुळे श्री गोरक्षनाथांनी योग साधना प्रमाण मानून समाजाला चारित्र्यशील करण्यासाठी चिंतनशील प्रवृत्तीचे केले व योगमार्गाचे मार्गदर्शन करून हठयोगाला दिव्य स्थान दिले!
'यथा संहियते सर्वमस्तं गच्छति भास्करे ।
कर्मजालं तथा सर्वममनस्के विलीयते ।। ८७॥
इन्द्रिये ग्राहनिर्मुक्ते निर्धूते निर्मलामृते ।
अमनस्क ह्मदे स्नातः परामृत मुपाश्नुते ॥ ८८॥'
-अमनस्कयोग
श्री गोरक्षाच्या वरील उक्तीने हे सिद्ध होते की नाथपंथाने साधकाला योगनिष्ट केले व साधनेत जे फक्त तीन वर्ग होते तेथे पांच वर्ग तयार केले.
प्रथम फक्त साधक-योगी-सिद्ध हे योग साधनेतील वर्ग आहेत त्या वर्गाचं वर्गीकरण गोरक्षनाथानी पंचकात केले.
१) भक्त २) साधक ३) योगी ४) तपी ५) सिद्ध.
वरील पंचकामुळे भारतीय आध्यात्माला वैराग्य तिरंगी मिळाले.
इंद्रिय निग्रह, आत्मसाधना व मनसाधना.
ह्या श्री गोरक्षाच्या साधन क्रांतीने नाथपंथाचे वैशिष्ट्य भारतीय आध्यात्मांत आजही असामान्य असेच आहे.
एक दुर्देव असे की ह्या नाथ पंथीय साधनांचा पाहिजे तसा सखोल अभ्यासच झाला नाही.
त्यामुळे टीकात्मक लिखाणच ह्या संप्रदायावर झाले पण चांगली बाजू समोर आलीच नाही.
श्री गोरक्षनाथांचे भारतीय आध्यात्मावर फार मोठे ऋण आहे.
त्यांनी परिश्रमानं परधर्मीय प्रवृत्तीवर आपल्या योगकर्माचाच पगडा बसविला.
ह्या सर्व धर्माना श्री गोरक्षनाथ आपल्यात असावे असेच वाटू लागले त्यामुळे त्यांचे नाव सर्व धर्मात सर्व पंथात मोठ्या आदराने घेतले जाते.
श्री गोरक्षनाथांनी योग धर्म वाढविला व उपदेशपर ग्रंथ रचना केली व भारतीय आध्यात्माला तत्वज्ञान हे अनुभूतीपूर्ण दिल!
सिद्धान्ताचा प्रभाव सर्वत्र पाडला.
भिक्षुकी वर्गावर प्रसंगी टीका करून धर्माला आलेली काजळी नाहीशी केली व खरा अद्वैत मताचा प्रचार साम्य दृष्टीने केला.
भारतीय अध्यात्माची शान प्राकृतांत आत्मबोध देऊन श्री गोरक्षनाथांनी वाढविली.
धर्मभेद, वर्णाचार व जातीभेद यास पंथांत थारा न देता, शरण येणाऱ्यास आश्रय देऊन धर्मोपदेश करीत रावापासून रंकापर्यंत एकत्र दृष्टीभाव ठेवल्याने श्री गोरक्षनाथांनी भारतीय आध्यात्माला वेगळेपणा प्राप्त करून दिला व आध्यात्मिक साहित्याची निर्मिती केली.
आत्मोन्नती ही साधनेतील गुरुनिष्ठेत-भक्तित आहे हे स्वतःच्या आचरणाने बिंबवून साधकास योगनिष्ठ केलं!
श्री गोरक्षाचे अद्वैत हा हिंदूधर्माचा योगनिष्ठ मेरुमणी आहे!
श्री गोरक्षनाथांनी सिद्धवनस्पति असा ग्रंथहि लिहिला आहे.
ह्या ग्रंथांत निरनिराळ्या सिद्ध वनस्पतिचा उल्लेख आहे.
ह्या वनस्पतीच्या उल्लेखावरून श्री गोरक्षाचे आयुर्वेदिक ज्ञान किती उच्च दर्जाचे होते हे सहज लक्षात येते.
श्री गोरक्षनाथांनी समाजांत धर्मजागृति ज्ञानयोगानं केली.
धर्मजागृतीला नैराश्याचा वैराग्याचा आधार घेतला नाही.
राजा भर्तृहरीची कथा सर्वश्रुत आहेच.
ह्या राजाला वैराग्यच आले ते जीवनाची खरी दिशा काय आहे हे समजल्यामुळेच.
श्री गोरक्षांनी धर्म, वर्ण व जातीभेद न मानल्यामुळे नाथपंथाचा प्रचार देशव्यापी झाला व देशाच्या निरनिराळ्या प्रदेशांत श्री गोरक्षाचे श्रद्धेचे स्थान अढळ झाले.
त्यांनी धर्म-साधना, योग-साधना केल्यामुळे चिंतनशील प्रवृत्ती वाढली व समाजाला संयमी व शांत प्रवृत्तीकडे नेले!
आचरणशुद्धता
सामाजिक कार्यात आचरणशुद्धतेत श्री गोरक्षानाथांनी जास्त लक्ष घांतलं.
स्त्री विषयक भोगमय समाजाच्या वासना नाहीशा करून स्त्री ही माता आहे हे प्रतिपादन केले.
समाजाला शुद्धाचरणाची शिकवण दिली.
खालील दोन कवनात श्री गोरक्षाचा बन्धुभाव व स्त्रीभाव स्पष्ट होतो.
घान दे गोरीए गोरष बालामाई बिन प्याले प्याला ।
गिनाँनची डालहीला पाळूवु गोरषबाला पौंढिला ।
देव लोकची कन्या मृत लोकची नारी,
पाताल लोकची नाग कन्या गोरषबाली मारी।
माया मारिली मावसी तजीली, तजीला कुटुंब बधू ।
सहंसार कवल तहाँ गोरष बाला जहाँ मन मनसा सुर संधू
आसा तजीला तृसना तजीला तजीला मनसा माई ।
नौ षंड पृथ्वी फेटि मै घालौ गोरष रहीला मछिंन्द्र ठाई।
गोरखबानी पृ. १४१
दासी नै नारी अरु, घरद्वारी,
तुम्हे बेस्याना करम न की ज्यौ रे।
विधवा नारी नौ संग करेख्यो,
तौ रोमि रोमि नरक पड़ी स्यौ रे।
एक बूद के कारणि आप सबारीथि,
बाल हत्या फल ले स्यों रे।
नरनारी दोन्यु नरकि पडिस्यौं घाणी घालि पडे स्यौ रे ।
अंजनि भूला निरंजन चुका तुम्हें लीयाँ सालिम बालौ रे।
मच्छिद्र प्रसादे जती गोरष बोल्या जीती सारि न हारौ रे।
-गोरखवानी, पृ. १५२
श्री गोरक्षनाथांनी नाथपंथाला दिलेल्या साधनेचे स्वरूप खालील प्रमाणे होते-
ह्या पद्धतीने साधना रुढ करून श्री गोरक्षांनी साधक वर्गास शुद्धाचरणाचा उपदेश करून चिंतनशील व सेवा प्रवृत्ती वाढवून नाथपंथाचा प्रभाव समाजावर पाडला.
१ नाथपंथ और निर्गुण संत काव्य - पृष्ट-१६३ (बदल करून घेतलेला संदर्भ)
श्री गोरक्षनाथांचे सामाजिक कार्य
श्री गोरक्षनाथांच्या अध्यात्मिक कार्याचा धावता आढावा घेतला.
आतां सामाजिक कार्याचा विचार करू.
श्री गोरक्षनाथाने तसे पहाता धार्मिक कार्याइतकेच पण बहुमोल असे सामाजिक कार्य केलं.
सामाजिक कार्य एक योगी करू शकतो.
म्हणजे तो नेमकं काय करतो हाच प्रश्न सर्वसाधारणपणे मनांत येणे सहाजिकच आहे.
नाथपंथ हा शांत संयमी प्रवृत्तीचा माहे.
चिंतनशील साधना असल्यानं नाथयोगी हे नेहमीच अरण्यांत आपल्या साधनेत दंग असतात.
पण ज्या ज्यावेळी समाजात काही स्थित्यंतरं व्हावीत असे वाटे त्या त्या वेळी ही आरण्यातील तपस्वी मंडळी समाजांत मिसळून समाजाला पोषक असलेली अशी प्रवृत्ती निर्माण करतात.
बौद्ध, जैन धर्माचे प्रस्थ देशात वाढले व तांत्रिक साधना फार फोफावल्या.
तांत्रिक साधना ह्या वज्रयनीतून बाहेर आल्याने पंचमकाराचे स्वरूप समाजांत अत्यंत निकृष्ट झाले.
ह्या तंत्र साधनेवर श्री गोरक्षाने कडाडून हल्ला केला व तंत्र साधनेविरुद्ध बंडाळी उभारली.
ह्या साधना, वज्रायनी कापालिक साधक समाजाला त्रस्त करण्यासाठी वापरत त्यामुळे समाजात ह्या साधनेविषयी भय निर्माण झाले होते.
श्री गुरु गोरक्षनाथांनी या तंत्र साधनेविरुद्ध बंडाळी करून स्वतः आपल्या यौगिक सामर्थ्यांचा क्षय करून काही तांत्रिक साधना नष्ट केल्या.
लोकोपयोगासाठी शाबरी मंत्राची निर्मिती केली.
लोकोपयोगी मंत्र
श्री गुरु गोरक्षनाथ निरनिराळ्या ठिकाणी तीर्थ यात्रेसाठी फिरत असतां त्यांना समाजांत जे दुःख दिसत असे ते कसे दूर करावे म्हणून ते विचार करीत.
व ते ज्या ज्या ठिकाणी जात व त्यांना कोणी रोगानं पछाडलेले दिसले की ते भस्म देत व त्या गांवांत मंत्रविद्या कोणा एका शिष्यास देत.
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे “गोरख-गोधडी" नांवाचे जुने बाड आहे त्यात गोरक्षनाथाचे मंत्र एका कासारानं एकत्रित केलेले आहेत व त्यास 'गोरख गोधडी' असे नाव दिले आहे.
आमच्या मते श्री गोरक्षनाथ त्या गांवी गेले असावेत.
तेथे त्यांनी मंत्र लिहून देण्याचे ठरविले असावे.
कंथा म्हणजेच गोधडी व ते सर्व मंत्र श्री गोरक्षानं कापडावर लिहून दिले असावेत.
त्यामुळेच त्याचे नांव गोरख-गोधडी पडले असावे.
अशा त-हेच्या मंत्राच्या निर्मितीने समाजातील दुःख श्री गोरक्षनाथांनी दूर केले.
वरील कवनांतून रेखाटलेले भाव श्री गुरुगोरक्षाच्या सामाजिक कार्याचीच साक्ष आहे.
इंद्रिय निग्रहावर श्री गोरक्षानं भर देऊन समाजांत अध्यात्माला दर्जा प्राप्त करून दिला!
"गोरक्ष कहै हमारा षरतर पंथ ।
जिम्या इंद्री दी जै बंध।
जोग जुगती मैं रहे समाय ।
तो जोगी कूं कलान षाय ।
"रहिमानी रहिम" पासून सुरू होणारे मंत्र पाहिले की, श्री गुरुगोरक्षाच मन किती उदात्त होतं याची कल्पना येईल.
ज्ञाननाथांनी स्वीकारलेल्या नाथपंथाची दीक्षा हेच एक श्री गोरक्षाच्या सामाजिक कार्याचे मोठे द्योतक आहे!
अध्यात्मिक कार्य
श्री गुरु गोरक्षनाथांनी सर्व देशात तीर्थ यात्रेच्या स्वरुपात पर्यटन करून हिंदु धर्माला योग साधनेची जोड दिली व योगधर्म सुटसुटीत व शिस्तबद्ध केला.
हठयोग साधनेची जोपासना व्हावी म्हणून जागोजागी मठांची स्थापना केली व त्या मठांतून सामान्यजनांना धर्मज्ञान मिळेल याची दक्षता घेतली.
द्वैत-अद्वैत हा भेद न ठेविता साधनेस खरा योग व ज्ञान यांचा समन्वय साधला.
इंद्रिय निग्रहातून हठयोग साधनेला प्राधान्य दिले व तंत्रसाधना निकृष्ट केली.
परमार्थ सर्वांना खुला करून श्री गोरक्षनाथांनी हिंदु धर्मातील अद्वैत तत्वज्ञानाला विश्व बन्धुत्वाची धार, चराचरी असलेल्या ब्रह्माच्या अस्तित्वानं दिली.
श्री गुरु गोरक्षाचे कार्य देश कधीच विसरू शकत नाही.
त्यांची ग्रंथरचना, स्थापन केलेले मठ हे श्री गोरक्षाच्या कार्याचे बोलते पुरावे आहेत ते त्याचं अमरत्व नेहमीच व्यक्त करतात.
कार्याचा दाखला देण्यासाठी त्यांची गरज भासतच नाही.
कारण देशाचा निसर्ग रोज श्री गोरक्षांच्या किमयेचें गीत गात असतो.
त्याच्या अस्तिवाची जाणीव करून देतो.
श्री गोरक्षाचे कार्य निदान निसर्ग तरी विसरू शकत नाही कारण निसर्गच श्री गोरक्षांच्या रोमारोमांत वास करतो!
🌷
जय श्री गोरक्षनाथ!
🌷
आदेश
🌷
🙏🙏🙏
अप्रतिम माहिती..
ReplyDeleteछान माहिती....
ReplyDeleteअत्यंत सुंदर विवेचन...
Chan mahiti
ReplyDeleteखुप छान माहिती.🙏🙏
ReplyDelete🙏🙏🙏🙏🙏
ReplyDelete