श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी

श्री थोरले स्वामी महाराज चरित्र

खंड पहिला. दंड दिक्षा श्रीक्षेत्र उज्जयिनी

शके १८१३.


श्री नारायणनंद सरस्वतींनी श्री स्वामींच्या काना पर्यंत ‌पोहोचेल एवढ्या उंचीचा पळसाचा दंड‌ घेऊन त्यावर काळ्या गायीच्या केसांच्या दोरीचे चार अंगुले वेष्टन करून तो श्रीस्वामांना दिला व " सखे मा गोपाय " या मंत्राने श्री स्वामींनी तो ग्रहण केला. 


त्यानंतर ते त्यांना असे म्हणाले की,   

" चतुर्थाश्रमात प्रवेश केलेल्या आपण आता संन्यास धर्मातील पवित्र असा दंड ग्रहण केला आहे. या दंड ग्रहणामुळे आपल्यावर जी बंधने येतात त्यांची आपण यती असल्यामुळे आपणास पूर्ण जाणीव आहे. सर्वसंग परित्याग केलेल्या ब्रह्मज्ञानी अशा आपणास आज परमहंस ही संज्ञा प्राप्त होत आहे " असे म्हणून श्री स्वामी नारायणानंदांनी वस्त्र वर धरून   "पश्चामि देवान् " या मंत्राने श्री स्वामींना "वासुदेवानंद सरस्वती" असे नाव दिले व ते उच्चस्वराने श्री स्वामींच्या कानात सांगितले. भगवान् श्रीदत्तात्रेयांनी जेव्हा श्रीस्वामींना स्वप्नामध्ये संन्यास दीक्षा दिली होती त्यावेळी यतिधर्माला अनुसरून " वासुदेवानंद सरस्वती " हेच नाव त्यांच्या कानात सांगितले होते. इत:पर अधिकारी माणसालाच संन्यास द्यावा, योगपट्ट करावा व ज्येष्ठ यतीला नमस्कार करावा असा अधिकार श्रीनारायणनंद सरस्वतींनी आपले नूतन शिष्य श्री वासुदेवानंद सरस्वतीस्वामी महाराज यांना दिला. गुरूने शिष्याला दंड दिल्यानंतर संप्रदायानुसार त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वतीस्वामी महाराजांना नमस्कार केला. नंतर " नारायण " असे म्हणून श्री वासुदेवानंद सरस्वतीस्वामी महाराजांनी आपल्या गुरूला उच्चासनावर बसवून त्यांना नमस्कार केला व मग तेथे उपस्थित असलेल्या इतर यतींना नमस्कार केला. 


॥ श्री सद्गुरू नाथ महाराज की जय ॥

॥🌹🌹 श्री गुरुदेव दत्त 🌹🌹॥



प.पु.श्री. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट " श्री योगी"


प. पु. वासुदेवानंद सरस्वती 

(टेंबे) स्वामी महाराज

जन्म: आनंद नाम  संवत्सर. श्रावण वद्य ५ अग्निहोत्री कऱ्हाडे ब्राम्हण कुळात.

आई/वडील: रमाबाई /गणेशभट्ट.

कार्यकाळ: १८५४-१९१४.

विवाह: २१व्या वर्षी १८७५ ला अन्नपूर्णबाईशी विवाह, १८९१ पत्नीचे निधन. 

संन्यास: पत्नीचे निधनानंतर १३ व्या दिवशी.

गुरु: मंत्रोपदेश- गोविंदस्वामी (नरसिह सरस्वती), संन्यास दीक्षा- श्री नृसिंहसरस्वती स्वामी.

समाधी: १९१४ आषाढ शुद्ध प्रतिपदा, गरुडेश्वर येथे.  

शिष्य: श्री रंग अवधुत, श्री गांडा महाराज, योगीराज श्री गुळवणी महाराज.


प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज

प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती

(टेंबे) स्वामी महाराज

जितेंद्रिय गणाग्रणीरभिरत: परे ब्रह्मणि ।

कलौ श्रुतिपथावनेऽत्रितनयोऽवतीर्ण: स्वयम् ॥

करात्तसुकमण्डलु: कुमतखण्डने दण्डभृत् ।

पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यति: ॥


जन्म व बालपण 

एक जाज्वल्य दत्तावतार म्हणजे सन १८५४ ते १९१४ ह्या काळात होऊन गेलेले परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज होय. 


श्री क्षेत्र माणगाव येथे श्री हरिभट टेंबे या दत्तोपासकाचे वास्तव्य होते. त्यांचे थोरले चिरंजीव श्री. गणेशपंत टेंबे हे मुळचेच विरक्त होते. वडिलांच्या दत्तभक्तीचा वारसा श्री. गणेशपंतांनी उचलला होता. ते दररोज श्री दत्तपादुकांची पूजा व श्रीगुरुचरित्राचे वाचन करीत असत. श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने श्रावण शुद्ध षष्ठीला श्रीदत्तरूपाने श्री गणेशपंत टेंब्यांच्या घरी अवतार घेतला. नवजात बालकाचं बाराव्या दिवशी थाटात बारसं झालं आणि बाळाचं नाव ‘वासुदेव’ ठेवण्यात आलं. 


बालपणापासूनच प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि तेजस्वी वाणी असणाऱ्या वासुदेवाची छाप कोणावरही चटकन पडत असे. लहानपणीच वेद मुखोद्गत करून सर्व शास्त्रांचं अध्ययन त्याने केलं होतं. वयाच्या बाराव्या वर्षी दशग्रंथी ब्राह्मण म्हणून ते प्रसिद्ध झाले. 


श्रीवासुदेवशास्त्रीबुवांचा विवाह त्यांच्या वयाच्या २१व्या वर्षी श्रीबाबाजीपंत गोडे यांची कन्या अन्नपूर्णाबाईशी झाला व तद्नंतर त्यांनी ‘स्मार्तागी’ उपासना सुरू केली. त्या सोबत श्रीगायत्री पुरश्चरण आणि ज्योतिषाचा अभ्यास चालू होताच. वडिलोपार्जित दत्तभक्तीचा वारसा श्रीवासुदेवशास्त्रीबुवांकडे आला होताच. अखंड वेदाध्ययन, वैयक्तिक साधना आणि त्यासोबत पीडितांना मार्गदर्शन यांची त्याला मिळालेली जोड, यामुळे ते लहान वयातच उच्च आध्यात्मिक अनुभवाचे अधिकारी बनले. परिणामस्वरूप त्यांना स्वप्नदृष्टांतासह श्रीदेवांची (भगवान श्रीदत्तात्रेय) वाणी ऐकू येत असे. संत नामदेवांबरोबर ज्याप्रमाणे श्रीविठ्ठल बोलत असे, त्याप्रमाणे भगवान श्रीदत्तात्रेय त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांचं संपूर्ण जीवन त्या पथप्रदर्शक श्रीदेववाणीच्या प्रकाशातच व्यतीत झालं, एवढंच नव्हे तर त्यांच्या संपर्कात जे जे आले, त्या त्या सर्वांचं जीवन त्यांनी त्या वाणीसामर्थ्याद्वारे उजळून टाकलं. 


कोकणातील माणगाव येथील ही घटना आहे. एका गृहस्थाच्या घरी दुभती गाय होती.ती त्या दिवशी काही केल्या दूध काढू देईना. ती गाय लाथा झाडीत असे. त्या गृहस्थाला कुणी तरी गावातील श्री गणेशभट टेंबे यांच्या मुलाचे नाव सुचविले. त्याचे नाव वासुदेव. वासुदेवाला  (श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज) मंत्रांची माहिती होती. गाय दूध दईनाशी झाली होती, तीच्यावर मंत्राप्रयोग करण्यासाठी टेंब्यांच्या वासुदेवाला आमंत्रण देण्यात आले. वासुदेव त्या गृहस्थाच्या घरी उपस्थित झाला आणि त्याने त्या धिंगाणा घालणाऱ्या गायीवर मंत्रप्रयोग केला. मंत्रप्रयोग केल्यानंतर, लाथा झाडणारी ती गाय अगदी शांत झाली होती; मग ती दूध काढू द्यायला तयार झाली.वासुदेव हा एकपाठी होता. एकदा वाचलेली गोष्ठ त्यांची तोंडपाठ होत असे. वयाच्या बाराव्या वर्षीच त्याने ऋग्वेद संहिता, पदे, घन, इत्यादीचा अभ्यास केला होता. याच वेळी तो दशग्रंथी ह्या नावाने प्रसिध्यी पावला. गुरुचारीत्राचा पाठ तो प्रतिदिनी वाचत असे. वयाच्या पंधराव्या वर्षापासून लोक टेंब्यांच्या वासुदेवाला शास्त्रीबुवा म्हणून संबोधू लागले. त्या वेळी उज्जैनीला जाण्यासाठी म्हणून शास्त्रीबुवा नर्मदा तीरावरच्या मंडलेश्वर ह्या गावी आलेले होते.तेथे कैवल्याश्रम नावाचे थोर सत्पुरुष वास्तव्य करीत होते.शास्त्रीबुवांनी स्वामींची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी स्वामींनी मी तुम्हाला दंड देतो असे सांगितले. त्यामुळे शास्त्रीबुवा उज्जैनीला न जाता मंडलेश्वरलाच राहिले. त्याच रात्री श्रीदत्त भगवान हे शास्त्रीबुवांच्या स्वप्नात गेले व त्यांना विचारू लागले की तुम्ही माझी आज्ञा उल्लंघन करणार की काय? दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शात्रीबुवानी स्वप्नातली सारी हकिकत कैवल्याश्रमस्वामींच्या कानावर घातली. हे ऐकल्यावर स्वामींनी शास्त्रीबुवाना दंड दिला नाही.


नंतर शास्त्रीबुवा तेथून निघून उज्जैनीला येऊन पोचले. तिथल्या दत्त मंदिरात जाऊन शास्त्रीबुवांनी नारायणस्वामींची भेट घेतली व त्यांना नमस्कार करून मंडलेश्वर गावी, कैवल्याश्रमस्वामींकडे घडलेली हकिकत निवेदन केली. त्यावर नारायणस्वामी त्यांना म्हणाले, अनिरुद्धस्वामी हे माझे सद्गुरूमहाराज आहेत. त्यांनी जर जर का आज्ञा केली तर मला तुमाला दंड देता येईल. एरवी दंड डरता येणार नाही. शास्त्रीबुवा अनिरुद्धास्वमींकडे गेले व त्यांना आदरपूर्वक नमस्कार करून आपली सारी हकिकत त्यांच्या कानावर घातली. तेव्हा ते म्हणाले, फार उत्तम.नंतर स्वामींनी नारायणस्वामींना बोलावून घेतले आणि शास्त्रीबुवाना दंड देण्या विषयी आज्ञा केली. जेष्ठ वद्य द्वितीयेच्या दिवशी शास्त्रीबुवाना दंड देण्याचा विधी झाला, आणि त्यांचे नाव वासुदेवानंदसरस्वती असे ठेवण्यात आले. त्या दिवसापासून सारे लोक शास्त्रीबुवांना, वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज म्हणू लागले. त्या दिवशी वासुदेवानंदानी नारायणस्वामींबरोबर भिक्षा केली.श्री दत्तमहाराजांना ही गोष्ट पसंत पडली नाही. वासुदेवानंदांना ओकाऱ्या सुरु झाल्या. कितीही उपाय केले तरी त्या थांबत नव्हत्या. नारायणस्वामी घाबरून गेले. श्री दत्तमहाराजांची आज्ञा उल्लंघन केल्यामुळे हा सारा प्रकार झाला असे कळताच नारायणस्वामींनी. श्री दत्तमहाराजांना वंदन करून त्यांची प्रार्थना केली. दत्तमहाराज! हा आपला शिष्य आहे. व मीही आपलाच शिष्य आहे. माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. आणि ह्या आपल्या शिष्याला आपण बरं करा. ह्या पुढे आपल्या आज्ञेविरुद्ध कोणतेही कार्य यांना कधी सांगणार नाही, व त्या नंतर वासुदेवानंदांच्या ओकाऱ्या थांबल्या.


नरसोबाच्या वाडीला श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज्यांचे स्मृतिमंदिर आहे. नरसोबा वाडीचे दत्तस्थान हेच श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांचे प्रेरणास्थान होय.


श्रीक्षेत्र माणगाव येथे श्रीवासुदेवशास्त्रीबुवांनी स्थापन केलेलं श्रीदत्तमंदिर, हा त्या श्रीदेववाणीचाच आज्ञारूप आविष्कार आहे. यापुढील सात वर्षे आपण माणगावमध्ये राहणार आहोत, ह्या शब्दांमध्ये श्रीदत्तात्रेयांनी आपल्या परमभक्ताला आश्वासित केलं आणि माणगावात श्रीदत्तमंदिराची स्थापना करवली. ते वर्ष होतं सन १८८३ भगवान श्रीदत्तात्रेय आणि श्रीवासुदेवशास्त्रीबुवा, ह्या देव-भक्ताच्या आल्हाददायक लीलांना साक्षी होण्याचे भाग्य माणगावकरांना लाभले. तसेच हजारो भक्तांनी श्रीदत्तात्रेयांच्या तेथील सान्निध्याचा अनुभव घेत आपले लौकिक आणि पारलौकिक कल्याणही साधून घेतले. माणगावचे श्रीदत्तमंदिर हे श्रीक्षेत्र नृसिंहवाडीचाच एक भाग आहे, अशी धारणा श्रीवासुदेवशास्त्रीबुवांची होती. 


अशाप्रकारे सात वर्ष गेल्यानंतर एके दिवशी वासुदेवशास्त्रीबुवांनी माणगाव सोडण्याची श्रीदेवांची आज्ञा झाली. जितक्या आत्मीयतेने श्रीवासुदेवशास्त्रीबुवांनी ते दत्तस्थान उभारलं आणि वाढवलं होतं, तितक्याच निरपेक्षेतेन आणि तत्परतेने त्यांनी आपल्या सौभाग्यवतींसह पौष मासात सन १८८९ मध्ये श्रीक्षेत्र माणगाव सोडले आणि तीर्थयात्रेला प्रारंभ केला. 


प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज

प. प. श्रीमत्‍ वासुदेवानंद सरस्वती

(टेंबे) स्वामी महाराज

जितेंद्रिय गणाग्रणी रसभिरत: परेब्रम्हणी ।

कलौश्रुतीपथावनेऽ त्रितनयोऽवतिर्ण: स्वयं ।

करात्त सुकमंडलु कूमत खंडने दंडभृत ।

पदप्रणत वत्सलो जयती वासूदेवो यती: । 


 तीर्थयात्रेदरम्यानच ह्या दंपतीला एक पुत्र झाला होता, परंतु तो जन्मत:च मृत झाला. त्या नंतर गंगाखेड इथे सन १८९१ मध्ये त्यांना सतत साथ देणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवतींचे अल्प आजारानंतर देहावसान झाले. प्रापंचिक असले, तरी मुळात वृत्तीने संन्यासीच असणाऱ्या श्रीवासुदेवशास्त्रीबुवांनी पत्नीचं और्ध्वदेहिक उरकल्यावर चौदाव्या दिवशी विधिपूर्वक संन्यास ग्रहण केला. त्याच वर्षी श्रीदत्तात्रेयांच्या आज्ञेनुसार त्यांनी उज्जयिनी येथील श्रीनारायणानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून दंड ग्रहण केला आणि त्यांनी त्यांचे नाव ‘वासुदेवानंद सरस्वती’ असे ठेवले. 


टेंब्ये स्वामींचे संन्यास घेतल्यानंतरचे नाव श्री वासुदेवानंद सरस्वती असे होते. धर्माशास्त्राचे सारे नियम ते काटेकोरपणे पाळीत. भिक्षाटन करीत. त्यांचे अखंड भ्रमण चाले. स्वामी गावागावांतून प्रवचने करीत. त्यांनी गुरुचरित्राची अनेक पारायणे केली, अनेक तीर्थयात्रा केल्या. अति-अवघड अशी व्रते केली आणि अनुभूती व अनुभवातून जे ज्ञान प्राप्त झाले ते उपदेशरूपाने साधकांना सांगत असत. 


श्री दत्तमाहात्म्य, श्रीगुरुदेव चरित्र, शिक्षात्रयम्, श्री दत्तचंपू, श्रीसत्यदत्त पूजाकथा, नित्य उपासनाक्रम अशी श्री महाराजांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. पूज्य टेंब्ये स्वामी यांच्या उपदेशाचे थोडक्यात सार असे,


सर्व उपदेशाचे सार 

१. मनुष्याचे मन, बुद्धी, चित्त शुद्ध असावे.


२. मनुष्याच्या कर्माचा हेतू व भाव शुद्ध असावेत.


३. मनुष्याची वृत्ती विकारांपासून दूर राहिली पाहिजे.


४. मनुष्याने श्रवण, मनन निदिध्यासपूर्वक वेदान्तचिंतन केले पाहिजे.


५. चराचरविश्व म्हणजे ईश्वराचे सगुण स्वरूप होय.


६. गुरुभक्ती हे परमार्थ-मार्गातील एक साधन आहे.


७. मनुष्याने शास्त्रनिष्ठा (धर्मग्रंथ), गुरुसेवा व आत्मानुभव याद्वारा मोक्षधर्माची उपासना करावी.


८. मनुष्य जीवनात विवेक निर्माण व्हावा.


९. समर्पण, आसक्तीविरहीत कर्म, अभ्यास, नित्य-नैमित्तिक कर्म, ईश्वरोपासना, व्रतपालन, तीर्थयात्रा, संतसहवास (सत्संग) , शरणागती, निरपेक्ष भगवद्भक्ती या गोष्टी आध्यात्मिक विकासास आवश्यक आहेत.


१०. ज्ञानविना मोक्ष नाही आणि ईशकृपेशिवाय सद्गुरू प्राप्ती नाही.


११. कर्म, भक्ती, ज्ञान आणि योग हे चार मार्ग नसून मोक्षोपाय आहे.


१२. विवेक, वैराग्य, दैवी गुण संपदा व मुमुक्षुत्व याने भक्तीचा विकास घडतो.


१३. विश्वशांतीसाठी मनुष्याचा सर्वात्मकभाव होणे गरजेचे आहे.


हेच पू. टेंब्ये स्वामींनी सांगितलेल्या उपदेशाचे सार आहे. 


‘सर्व भरतखंडात पायीच संचार करून उपदेश करावा, ईश्वरनिष्ठा व स्वधर्मनिष्ठा जागृत करावी,’ हा श्रीदत्तात्रेयांचा आदेश शिरोधार्य मानून त्यांनी भारतभर तेवीस चातुर्मास केले. संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर भारत आणि गुजरात क्षेत्रात त्यांचा विशेष संचार होता. नर्मदाकिनारीचा प्रदेश आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे त्यांचे अधिकांश कार्य घडले. त्यांच्या तपोनिष्ठ जीवनात देहकष्ट, हालअपेष्टा, उपेक्षा आणि मानहानीचे अनेक प्रसंग आले. परंतु कोणत्याही संकटात लोकोद्धाराच्या कार्यापासून आणि सद्गुरुनिष्ठेपासून ते तसूभरही ढळले नाहीत, इतकी वज्रासारखी अभेद्य कणखरता त्यांच्याकडे होती. ते जिथे जात तिथे भक्तांची प्रचंड गर्दी होत असे. श्रीस्वामी महाराजांच्या पुढ्यात फळे, प्रसाद आणि पैशांचा ढीग पडत असे. रोज सर्वांना पक्वान्नाचं भोजन दिले जात असे परंतु स्वत: श्रीस्वामी महाराज मात्र केवळ भिक्षान्न घेत असत.  


संन्यास ग्रहणानंतर त्यांनी काशीपासून रामेश्वरापर्यंत आणि द्वारकेपासून राजमहेंद्रीपर्यंत भारत-भ्रमण केले आणि शास्त्राचरणाविषयी लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनेक ठिकाणी दत्तमूर्तींची स्थापना केली, दत्तोपासनेचा प्रचार केला आणि उपासनेला सदैव प्रेरक ठरेल अशा मौलिक साहित्याची निर्मिती केली. त्यांनी सर्व प्रवास पायी केला. त्यांची ही पदयात्रा केवळ दोन छाट्या, दोन लंगोट्या व एक कमंडलू एवढ्याच साहित्यानिशी चालू असे. उज्जयिनी, ब्रह्मावर्त, बदरीकेदार, गंगोत्री, हरिद्वार, पेटलाद, तिलकवाडा, द्वारका, चिखलदरा, मेहतपूर नरसी, बढवाणी, तंजावर, मुक्ताला, पवनी, हाबनूर, कुरगड्डी, गरुडेश्वर या ठिकाणी त्यांनी संन्यस्त जीवनातील चातुर्मास काढले. यावरून त्यांच्या संचाराची व्याप्ती समजून येईल. माणगाव, वाडी, ब्रह्मावर्त व गरुडेश्वर असतानाच ज्येष्ठ वद्य ३० शके १८३६ या दिवशी रात्री श्रीदत्तात्रेयाच्या समोर उत्तराभिमुख अवस्थेत त्यांनी निजानंदी गमन केले. गरुडेश्वराला त्यांचे समाधीमंदिर आणि दत्तमंदिर बांधलेले असून तेथे त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतो. 


श्रीस्वामी महाराजांचा शेवटचा, म्हणजे तेविसावा चातुर्मास श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे झाला. तिथे वैशाखामध्ये त्यांची प्रकृती बिघडली. ‘औषध घ्या’ असं सांगणाऱ्यांना ते म्हणाले, "या देहाला दोन वेळा महाव्याधी, दोन वेळा कोड इतके रोग उत्पन्न झाले. संग्रहणी तर कायमचीच आहे. त्या वेळी कोणी औषध दिले ? जन्मापासून ज्या वैद्याला धरले आहे तो याही वेळी आहेच. त्याची इच्छा असेल तसे होईल." 


श्रीस्वामी महाराजांची श्रीनर्मदामातेवर अपार श्रद्धा होती. मातेन कुमारिकेच्या रूपात स्वामींना वेळोवेळी दर्शन दिलं होतं. ‘श्री स्वामी महाराजांनी आपल्या तीरावर वास करून आपल्याला धन्य करावे, ही मातेची इच्छा तिनेच पूर्ण करवून घेतली. मायलेकरातील हे मर्मबंध शेवटपर्यंत अतूट राहिले. आषाढ शुद्ध प्रतिपदा, मंगळवार दि. २४ जुलै १९१४, रोजी श्रीस्वामी महाराजांनी चिरविश्रांती श्रीनर्मदामातेच्या कुशीतच घेतली. 


श्रीसीताराम महाराज टेंबे, श्रीमत् प. प. श्रीनृसिंह सरस्वती दीक्षितस्वामी महाराज, प.प. श्रीयोगानंद सरस्वती स्वामी ऊर्फ श्री गांडा महाराज,सद्गुरुनाथ श्रीसंत वामनरावजी गुळवणी महाराज, श्रीरंगावधूत स्वामी महाराज, श्रीस्वामी शिवानंद महाराज, श्रीनारायण दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज, श्रीपेंढारकर स्वामी महाराज अशा सत्पुरुषांना श्रीमत् प. प. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या अनुग्रहाचा लाभ झाला. 


ढळढळीत वैराग्याचे ऐश्वर्यलेणे लाभलेले, संन्यासधर्माचे कठोर पालन करणारे आणि तरीही परम करुणामय असलेले श्रीस्वामी महाराज अतिशय उत्कटतेने श्रीदत्तभक्ती करत असत आणि तितक्याच उत्साहाने श्रीमत् आद्य शंकराचार्य यांच्या विचारांचा आणि वाङ्मयाचा पुरस्कार देखील करत असत. अशा रीतीने ‘अद्वैत’ त्यांनी स्वत: जाणलं होतं आणि अंगिकारलंही होतं. अशा ह्या लोकोत्तर अधिकारी महापुरुषाला विनम्र अभिवादन! 


श्री टेंबे स्वामी महाराजांचे कार्य 

वासुदेवानंद सरस्वतींची ग्रंथरचना फार मोठी आहे. गुरुचरित्राचे संस्कृत रूपान्तर (‘गुरुसंहिता’), दत्तविषयक पौराणिक सामग्रीचा उपयोग करून आणि आपले विचार त्यांत प्रसंगौचित्याने ग्रंथित करून लिहिलेले संस्कृत ‘दत्तपुराण’, सामान्यजनांसाठी मराठीत लिहिलेले ओवीबद्ध ‘दत्तमाहात्म्य’, जीवनाच्या अवस्थात्रयीचे नियमन करण्यासाठी लिहिलेले ‘शिक्षात्रय’ (कुमारशिक्षा, युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा), ‘सप्तशती गुरुचरित्र’ (मराठी : ओवीबद्ध), ‘माघमाहात्म्य’ (मराठी : ओवीबद्ध), स्त्री-शिक्षा (संस्कृत) इत्यादी ग्रंथ आणि शेकडो संस्कृत व मराठी स्तोत्रे एवढा त्यांच्या रचनेचा व्याप आहे. चार-पाच हजार पृष्ठांचा हा प्रचंड ग्रंथसंभार स्वामींच्या दत्तभक्तीचे, धर्मनिष्ठेचे, प्रगाढ चिंतनशीलतेचे आणि लोकोद्धाराच्या तळमळीचे प्रत्यंतर घडवत आहे. प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराज म्हणजे संन्यासधर्माचे आदर्श आचार्य होत. प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयप्रभूच त्यांच्या रूपाने अवतरले व त्यांनी श्रीदत्त संप्रदायाची संपूर्ण घडी नीट बसवली. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर या दत्तस्थानांवर आचारसंहिता घालून दिली व चालू असलेल्या उपासनेला योग्य दिशा व अधिष्ठान प्राप्त करून दिले. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभस्वामींचे जन्मस्थान- पीठापूर व भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान-कारंजा, ही दोन्ही शोधून काढून तेथेही उपासना सुरू करून दिली.


त्यांची "करुणात्रिपदी" ही अजरामर रचना जवळपास सर्व दत्तभक्त रोजच म्हणतात. त्यांच्या प्रकांड विद्वत्ता आणि विलक्षण बुद्धिमत्तेचे लोभस दर्शन त्यांच्या विविध ग्रंथांमधून आपल्याला होते. ते अतिशय उत्तम ज्योतिषी आणि आयुर्वेदिक औषधांचे जाणकार म्हणूनही प्रसिद्ध होते. संस्कृत आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून अत्यंत सहज, ऐटबाज संचार करणारी त्यांची अद्भुत प्रतिभा भल्या-भल्या पंडितांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. त्यांनी रचलेले "श्रीदत्तमाहात्म्य,  सप्तशती गुरुचरित्रसार, दत्तलीलामृताब्धिसार, त्रिशती गुरुचरित्र, द्विसाहस्री गुरुचरित्र, श्रीदत्तपुराण", यांसारखे ग्रंथ तसेच अत्यंत भावपूर्ण अशी शेकडो स्तोत्रे ही श्रीदत्तसंप्रदायाचे अलौकिक वैभवच आहे ! त्यांनी रचलेली पदे, अभंग त्यांच्या परम रसिक अंत:करणाचा प्रत्यय देतात. ते अतुलनीय भाषाप्रभू तर होतेच शिवाय त्यांची स्मरणशक्ती देखील अफलातून होती. पण मनाने अत्यंत भावूक आणि अनन्यशरणागत असे ते एक थोर भक्तश्रेष्ठही होते ; हेच त्यांच्या अतिशय विलोभनीय, भावपूर्ण रचनांचे खरे रहस्य आहे. त्यांचे अभंग वाचताना डोळे पाणावतात.  प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या वाङ्मयाचे फार मोठे वेगळेपण म्हणजे त्यांची मंत्रगर्भ रचना. ते एकाच स्तोत्रात खुबीने अनेक मंत्र गुंफत असत. श्रीदत्तात्रेय अष्टोत्तरशतनाम स्तोत्रामध्ये त्यांनी केवळ चोवीस श्लोकांमध्ये चौदा वेगवेगळे मंत्र गुंफलेले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत:च श्रीदत्तप्रभूंची नवीन नावे तयार केलेली दिसून येतात, इतकी त्यांची बुद्धिमत्ता प्रगल्भ होती. त्यांनी श्रीदत्तमाहात्म्याच्या शेवटच्या तीन अध्यायांतील ओव्यांमधून मांडुक्य व ईशावास्य ही दोन उपनिषदे देखील गुंफलेली आहेत. अशाप्रकारची अलौकिक व अपूर्व रचना हे श्री. टेंब्येस्वामींच्या वाङ्मयसागराचे वैशिष्ट्यच आहे! प. प. श्री. टेंब्येस्वामींनी संपूर्ण भारत देश पायी फिरून सनातन वैदिक धर्माला आलेली ग्लानी दूर करून धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांचे कार्य इतके अद्भुत आहे की, त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. श्रृंगेरी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्रीमत् सच्चिदानंद शिवाभिनव भारती महास्वामींनी उपस्थितांना प. प. श्री. टेंब्येस्वामी महाराजांची ओळख "गुप्तरूपातील भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्य" अशीच करून दिली होती व हीच वस्तुस्थिती आहे. ते साक्षात् भगवान श्रीशंकराचार्यच होते. 


श्री टेंबे स्वामीचरित्राचे विहंगावलोकन 

श्री. टेंब्येस्वामींचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी, दि. १३ ऑगस्ट १८५४ रोजी सावंतवाडी संस्थानातील माणगांव या छोट्याशा खेड्यात श्री. गणेशपंत व सौ. रमाबाई या अत्यंत सत्त्वशील व दत्तभक्त दांपत्याच्या पोटी झाला. बालपणीच त्यांच्यातील अवतारित्वाची चुणूक दिसू लागली होती. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचा संपूर्ण वेदाभ्यास करून झालेला होता व ते दशग्रंथी ब्राह्मण म्हणून प्रसिद्ध ही झालेले होते. सोळाव्या वर्षापासून ते इतरांना वेद, ज्योतिष, आयुर्वेद, मंत्रशास्त्र इ. शास्त्रे शिकवीत असत. नृसिंहवाडी येथे त्यांना भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी स्वप्नात मंत्रदीक्षा दिली. पुढे श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने त्यांच्या घरी माणगांव येथे त्यांनी दत्तमंदिर बांधून सात वर्षे उपासना चालविली व देवांच्याच आज्ञेने क्षणात ते सगळे वैभव सोडून बाहेरही पडले. पुढे पत्नीच्या निधनानंतर त्यांनी संन्यास घेतला व नंतरची २३ वर्षे श्रीदत्त संप्रदायाच्या संवर्धनाचे अद्भुत कार्य केले. 


श्रीदत्तसंप्रदायाला उपासना आणि तत्त्वज्ञान अशा दोन्ही अंगांनी सबळ आधार आणि दैवी अधिष्ठान देण्याचे कार्य प. प. श्री. टेंब्ये स्वामींच्या ग्रंथांनीच केलेले आहे ! भगवान श्रीदत्तात्रेय प्रभू त्यांच्याशी बोलत असत व देवांच्या आज्ञेशिवाय ते कोणतीच गोष्ट करीत नसत.


श्रीटेंब्येस्वामींचे चरित्र विलक्षण असून नैष्ठिक संन्यासधर्माचा परमादर्श आहे. अत्यंत कडक धर्माचरण हा त्यांचा विशेष सद्गुण, पण त्याचवेळी परम प्रेमळ, कनवाळू अंत:करण हाही त्यांचा स्थायीभाव होता. या दोन गोष्टी सहसा एकत्र सापडत नाहीत. धर्माचरणातील कर्मठपणा आणि अपार करुणा यांचा देवदुर्लभ संगम प. प. श्री. टेंब्येस्वामींच्या ठायी झालेला होता व हे त्यांच्या चरित्रातील प्रसंगांवरून लगेच ध्यानात येते. त्यांच्या लीला फार फार सुंदर आणि साधकांसाठी मार्गदर्शक आहेत.


पुण्याच्या श्रीवामनराज प्रकाशन संस्थेने "प. प. सद्गुरु श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज अक्षयवाङ्मयमाला" या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत, प. प. श्री. टेंब्ये स्वामींचे जवळपास सर्व वाङ्मय सुलभ मराठी अर्थासह पुन्हा प्रकाशित केलेले आहे. साधक भक्तांसाठी हे सर्व शब्दवैभव सेवा म्हणून ना नफा तत्त्वावर केवळ निर्मितीमूल्यात उपलब्ध करून दिले जाते. श्रीमत् टेंब्येस्वामींचे पावन चरित्र म्हणजे आजच्या काळातला जिवंत चमत्कारच म्हणायला हवा. त्यांचे अत्यंत कर्मठ शास्त्राचरण, विलक्षण दत्तभक्ती, अतीव प्रेमळ स्वभाव, लोकांविषयीची जगावेगळी करुणा, तेजस्वी बुद्धिमत्ता, कोणताही विषय सहज आत्मसात करण्याची हातोटी, अंगी वसणारे अनेक कलागुण, सारे सारे अतिशय अलौकिक व अद्भुतच आहे. त्यांचे चरित्र वाचताना आपण वारंवार आश्चर्यचकित होऊन त्यांच्या श्रीचरणीं नतमस्तकच होतो. 


प. प. टेंब्ये स्वामी महाराजांनी वयाच्या साठाव्या वर्षी, गुजराथ राज्यातील नर्मदा काठावरील पवित्र गरुडेश्वर स्थानी, आषाढ शुद्ध प्रतिपदा, दि. २३ जून १९१४ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास नश्वर देहाचा त्याग केला. त्यांचे पावन समाधी मंदिर तेथे उभारण्यात आलेले आहे. श्री. गणेशपंत सातवळेकर यांनी प. प. श्री. टेंब्येस्वामींना एकदा विचारले होते की, आपल्यालाही पुनर्जन्म आहे का? त्यावर प. प. श्री. स्वामी उत्तरले, "हो आहे तर. हा तर केवळ अरुणोदय आहे." त्यानुसार प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांनी प. पू. सौ. पार्वतीदेवी देशपांडे यांना दिलेल्या आशीर्वादानुसार, समाधी घेतल्यावर लगेच दुस-या दिवशी पुन्हा त्यांच्या पोटी जन्म घेतला. तेच पुन्हा "श्रीपाद" रूपाने अवतरले. मुलाचे हे नावही स्वामींनीच आधी सांगून ठेवलेले होते. हेच श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे म्हणजे प. पू. श्री. मामासाहेब देशपांडे महाराज होत. त्यांचेही संप्रदाय सेवाकार्य प. प. श्री. टेंब्येस्वामींसारखेच विलक्षण आहे. 


रुसलासी तू का दत्ता । तुजवरी रुसलो आता ।।१।।                        

हाक न ऐकली माझी । नायके मी बोली तुझी ।।२।।                                              

का न पहिले मला । न पाहीन आता तुला ।।३।।                        

का उपेक्षिले मला । आता उपेक्षु की तुला  ।।४।।                        

वासुदेव रुसला दत्ता । समजावी त्याच्या चि त्ता ।।५।।


शिक्षात्रयम

प. पू. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या अथांग अशा वाडमय सागरातील 'शिक्षात्रयम' हे एक अनमोल ग्रंथरत्न आहे. श्री गुळवणी महाराजांनी पुनः छापून प्रसिद्ध केलेल्या श्री स्वामी महाराजांच्या समग्र वाडमयातील प्रथमखंड याच ग्रंथराजाचा होता. 'शास्त्रानुरूप आचरण ठेऊन, निष्काम कर्मयोग साधित ईश्वरोपासनेद्वारे ज्ञानप्राप्ती करवून घेऊन,मोक्षलाभ कसा साधून घ्यावा? 'या विषयी अत्यंत मर्मग्राही आणि सूक्ष्म असे विवरण सद्गुरू श्रीस्वामीमहाराजानी प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट असणाऱ्या तीन प्रकारणाद्वारे केलेले आहे. हे सर्व विवरण अक्षरश: कलशात सागर साठवावा इतके अद्भुत आणि अपूर्व आहे. 'शिक्षत्रयी' ही 'प्रस्थानत्रयी' चे सार रूपच आहे. साधकांनी या सर्व परंपराबोधाची चिंतन-मनन-निदिध्यासनपूर्वक जोड आपल्या नित्य साधनेला जर दिली, तर ते याची देही  कृतार्थ झाल्याशिवाय  राहणार नाहीत. जेव्हा मानवाचे कल्याण करणाऱ्या धर्माचा अधर्म ह्रास  करू लागतो, तेव्हा अनंतकोटीब्रह्मांडनायक भगवान आपले अजन्मत्व आणि अव्यक्तत्व बाजूला ठेऊन या भूतलावर मानावरूपात प्रकट होतात आणि काल माना नुसार  लोकमनावर उत्पन्न झालेली अविवेकाची काजळी झाडून टाकून आपल्या आचारविचारानी तेथे विवेकदीप प्रज्वलित करतात. याच पार्श्वभूमीवर भगवान दत्तात्रेयांनी श्री दत्तभक्त दाम्पत्या पोटी 'वासुदेव'या नावाने अवतार घेतला. 


स्वामी महाराजांची ग्रंथसंपदा तर साक्षात दत्तप्रभुनी त्यांना निमित्त करून रचलेली आहे, असे ते स्वतःच सांगत असत व ते सत्यही आहे. कारण अध्य यन न करता, मोठ्यामोठ्या विद्वानांना चकित करणारी सुमारे पाऊण लाख इतकी संस्कृत-प्राकृत ग्रंथनिर्मिती  करणे हे त्यांच्याच भाषेत सांगायचे तर,"रामो हरी" करणाऱ्या मुखाचे काम नव्हे.!"  याग्रंथसंपदेपैकी  'कुमारशिक्षा,' 'युवशिक्षा' व 'वृद्धशिक्षा ' ही तीन 'शिक्षत्रयम'  म्हणून प्रसिद्ध असलेली प्रकरणे होत. कर्मयोग, भक्तियोग व ज्ञानयोग या ईश्वरप्राप्तीच्या तीन योगांची साधकांना सांगोपांग माहिती व्हावी म्हणून या प्रकरण  ग्रंथाची रचना करण्यात आलेली आहे. तामिळनाडू प्रांतात कृष्णेच्या तिरावर मुक्त्याला नावाचे गाव आहे. या गावात इ. स. १९०८ मध्ये १८ वा चातुर्मास संपन्न झाला. या ठिकाणी विशेष वर्दळ नसल्याने श्री महाराजांना पूर्ण विश्रांती मिळाली. येथेच त्यांनी शिक्षात्रयीची रचना केली.  त्यातील वृद्धशिक्षेबाबत त्यांचे प. प. दिक्षितस्वामींना  लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे त्यात ते म्हणतात," श्रीकृष्णातिरी निजामशाहीत कोटीलिंग नावा चे  क्षेत्री १० दिवस राहणे झाले. तेव्हा तुम्हाला प्रणव व मात्रा लक्ष्यार्थ वगैरे बरोबर विवेचन सांगण्यास मिळाले नाही, असे मनात येऊन वृद्धशिक्षा नामक प्रकरण (पूर्वी कुमारशिक्षा केली व त्याप्रमाणे युवशिक्षाही असावी म्हणून १०० श्लोक युवशिक्षाही श्रीगुरुकृपेने रचली) व गाहनार्थ जाणून साक्षात व्याख्या सांगितल्या प्रमाणे वर सविस्तर व्याख्या सुरु आहे.आता ७० श्लोक पावेतो व्याख्या पूर्णझाली. जशी नामस्मरणासाठी हातात स्मरणी, तशी उपनिशीत सूत्र स्मरणार्थ ही स्मरणी जाणावी. एकदा अण्णा दीक्षित वगैरे मंडळीस तिचा अर्थ जाणून नंतर दिवसरात्री घडेल तितका विचार करीत जावा. बाकीची टीका अवकाशाप्रमाणे पाठवता येईल. तुम्ही स्वतः वृद्धशिक्षा समयाप्रमाणे  पाहावी  व पाहिल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्रणवोपसना ठेवावी. प्रणावाभ्यासकडे चित्तवृत्ती ठेवल्याने चित्तवृत्ती शांत होईल. आपण सांगितल्याप्रमाणे प्रणवोप।सना चालवावी तीच तारेल' या  पत्रावरून श्री महाराजांचे ग्रंथ, टीका, स्तोत्र व इतर वाडगमय हे कोणत्या न कोणत्या निमित्ताने बनल्याचे लक्षात येते.

  

कुमारशिक्षेत श्रुती स्मृती या ईश्वराच्या आज्ञा आहेत, म्हणून त्यात सांगितलेली कर्मे ईश्वरसंतोषार्थ करावीत' 'ईश्वर।स्तित्वाबद्दल  प्रमाण', 'केनोपनिशिदातील  कथा, 'भक्तांसाठी शरीरधारण', 'शिरोळ गावातील भोजनपात्राची कथा', 'अतिथी सत्काराचे महत्व', इत्यादी विषय  सांगून निष्काम कर्मयोगाचे महत्व विशद केलेले आहे.

युवशिक्षेत 'उपास्यईश्वराचे स्वरूप', ’वेदांचे अपौरुशेयत्व व प्रामाण्य' वेदांची व्यवस्था, श्रोत उपासनेचे स्वरूप, वाम मार्गीय उपासनेचे निराकरण करून उपासनेने ईश्वर कसा प्रसन्न होतो हे नारायणस्वामी व समर्थ रामदासांचे उदाहरणाने स्पष्ट केलेले आहे.


वृद्धशिक्षेत प्रणवोपसना, भागवादाश्रित मंद वैराग्यशील संन्याशालाही ज्ञानप्राप्ती, श्रवणमनना दिकांची व शडविध तात्पर्याची लक्षणे, तत्वपदार्थ विवेचन, दाशोपनिशीत तात्पर्य, इत्यादी ज्ञानमार्गाविषयी सांगोपांग माहिती आलेली आहे. उपनिषदर्थ व सुत्रार्थ स्मरणार्थ हा ग्रंथ स्मरणीय आहे.


या तिन्ही शिक्षात गहन अर्थ असंल्याने महाराजांनी कुमार व वृद्ध या दोन शिक्षांवर स्वतःच टीका लिहिलेली आहे व त्यांचेच पट्ट शिष्य दीक्षित स्वामी महाराजांचे आज्ञेवरून गोव्याचे गोविंदमामा उपाध्ये यांनी युवाशिक्षेवर टीका लिहिली. त्यामुळे ग्रंथाचे आकलन सुलभ झाले. सर्वस्वी प्रमाणभूत असलेल्या वेदांवरून ईश्वराचे स्वरूप, भक्तीचे प्रकार, तिचे फळ इत्यादी गोष्टी शास्त्रात सांगितलेल्या आहेत. पण शास्त्रांचे गूढ व गंभीर ज्ञान सर्वसामान्यांना होणे कठीण आहे. ज्ञान झालेतर त्याकडे प्रवृत्ती व प्रवृत्तीमुळे इष्टसिद्धी होत असल्यामुळे, प्रथम ज्ञान होणे आवश्यक आहे. ते ज्ञान लोकोत्तर प्रभावंसंपन्न व भागवतप्राप्त अधिकारी महात्म्यांकडून मिळाल्यास निःसंदिग्ध व कार्यक्षम होते. म्हणूनच श्रीस्वामीमहाराज।नी शिक्षत्रयी ची निर्मिती केलेली आहे.


Tembe Swami

.

व्रतस्थ योगी 

गणेशभट्ट हे पूर्वजन्मीचे सूर्योपासक होते. वासुदेव लहानपणीच वेद, ज्योतिष अभ्यासातून, मंत्र प्रयोगाचे चमत्कार करू लागले होते. लहानपणापासूनच विरक्त. त्रिकालसंध्या करीत असत. नेहमी छत्री, जोडा, खडावा याशिवाय प्रवास करायचा, इ. नियमांनुसार वागत. चांद्रायण व्रत पाळून गायत्रीचे पुरश्चरण केले होते. नृसिंहवाडीस दत्तात्रेयांनी स्वप्नामध्ये त्यांना मंत्रोपदेश दिला व त्यांना सतत दत्तात्रेयांचे साक्षात्कार होत राहिले. दत्तांच्या उपदेशांप्रमाणे त्यांनी अरण्यात जाऊन योगाभ्यास केला. हिंदुस्थानात चोहीकडे उपयोगी पडण्यासाठी त्यांनी मराठी गुरुचरित्राचे संस्कृतमध्ये रुपांतर केले. दत्तांच्या आज्ञेप्रमाणे त्यांना वागावे लागे. न वागल्यास त्याचे त्यांनाही प्रायश्चित्त भोगावे लागे. माणूस कितीही मोठा असला तरी त्यालासुद्धा शरीरभोगाला तोंड द्यावे लागते. तथापि साधु संतयोगी त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत व शोक करीत बसत नाहीत. त्यांनी अनेक यात्रा केल्या. २ छाट्या, २ लंगोट्या व एक कमंडलू एवढेच त्यांचे साहित्य होते. इ. स. १९१४ साली अमावस्येस रात्री श्री दत्ताच्या समोर उत्तराभिमुख बसून ते कैवल्यपदास गेले व नंतर त्यांचा देह नर्मदेच्या प्रवाहात सोडून दिला. अशातऱ्हेने कर्मज्ञान व भक्ती यांचे एकत्व असलेला दत्तासंप्रदायातील मुकुटमणी दत्तात्रेयामध्ये विलिन झाला. श्री. टेंबेस्वामींनी त्यांच्या ‘दत्तात्रेय षोडशावतार’ या ग्रंथात दत्तात्रेयांनी सोळा अवतार घेतल्याचा तपशीलवार व जन्मतिथीसह वृत्तांत दिला आहे. हे अवतार अत्री ऋषी व अनसूया यांचेसाठी (पुत्र म्हणून) व इतर भक्तांसाठी व सर्वांचे कल्याण करून त्यांना उपदेश देण्यासाठी घेतले होते. हे अवतार याप्रमाणे : योगीराज, अत्रीवरद, स्वयं दत्त, कालाग्नीशमन, योगीजनवल्लभ, लीलाविश्वंभर, सिद्धराज, ज्ञानसागर, विश्वंभरावधूत, मायामुक्तावधूत, याच नावाचा (मायामुक्तावधूत) आणखी एक अवतार, आदिगुरू, शिवरूप, देवदेवावतार, दिगंबर, शामकमल लोचन हे होत.


संन्यासधर्म नियमांप्रमाणे जर भिक्षा प्राप्त झाली नाही तर एकवीस-एकवीस दिवसांपर्यंत उपवास करणारे असे संन्यासी म्हणून त्यांच्याही काळात प्रसिद्ध होते. त्याचबरोबर ते शंकराचार्यांसारखे विलक्षण वेदांती, दशग्रंथी वैदिक, संस्कृत साहित्याचे मर्मज्ञ अभ्यासक आणि संशोधक शास्त्रज्ञ होते. आद्यशंकराचार्यानंतर अशा प्रकारचे साहित्य त्यांच्याचसारखे सतत भ्रमण करीत असताना निर्माण करणारे स्वामी महाराज हे एकमेवाद्वितीय असे संन्यासी आचार्य आहेत, असे बृहन्महाराष्ट्रातील वैदिक आणि संस्कृत पंडितांमध्ये स्वामी महाराजांची ग्रंथसंपदा आणि संस्कृत वाड्मय पाहिल्यानंतर मानले जाते.


स्वामी महाराजांच्या वाड्मयाची संदर्भसूची नजरेखालून घातली तरी आद्य शंकराचार्यांनंतर १८ व्या शतकात वावरणार्या स्वामींच्या अलौकिकतेची जाणीव होते. स्वामी महाराजांनी इ.स. १८८९ मध्ये माणगाव येथे आपला पहिला ‘द्विसाहस्त्री’ हा २000 श्लोकांचा ‘गुरुचरित्र’ या ग्रंथावरील संस्कृत भाष्यग्रंथ लिहिला. त्यानंतर त्यांनी लहानमोठय़ा बावीस ग्रंथांची रचना केली आणि ४५0 हून जास्त संस्कृत व मराठी भाषेत स्तोत्रे, पदे, अभंग याची प्रासादिक अशी रचना आपल्या उर्वरित संन्यासाश्रमातल्या सतत भ्रमणकालात केली.


केवळ दोन छाट्या, लंगोटी, दंड, कमंडलू व एखादी पोथी एवढेच जवळ ठेवून सतत पायी भ्रमण करणार्या आणि गंगा, नर्मदा, कृष्णा अशा नद्यांच्या तीरावर एखाद्या मंदिरात रात्री मुक्काम करणार्या भिक्षान्नावर निर्वाह करणार्या स्वामींनी एवढी ग्रंथसंपदा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशी केली असेल याची कल्पनाही आश्चर्यच वाटावे अशी आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वामींचे हे ग्रंथ मोठमोठय़ा संस्कृत पंडितांनादेखील विस्मयचकित करणारे आहेत.


वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ वाड्मयात ‘द्विसाहस्री गुरुचरित्र’, ‘त्रिशती काव्यम्’, ‘सप्तशती’, ‘समश्लोकी (एकूण श्लोकसंख्या सात हजार) ‘दत्तपुराण’ (संस्कृत श्लोक ४५00), ‘दत्तमाहात्म्य’(मराठी ओवीबद्ध ३५00 ओव्या), स्वतंत्र ‘दत्तपुराण बोधिनी टीका’ (गद्य), ‘त्रयशिक्षाग्रंथ’ म्हणजेच कुमारशिक्षा, युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा हे तीन संस्कृत व ‘स्त्रीशिक्षा’ हा मराठी लघुग्रंथ, ‘कृष्णालहरी’, ‘नर्मदालहरी’ हे लहरीकाव्य लघुग्रंथ, ‘दकारादि दत्तात्रेय सहस्रनाम मंत्रगर्भ स्तोत्रम्’ हा लघुग्रंथ, ‘दत्तचंपु’ हा छंदशास्त्रावर आधारित ग्रंथ, ‘पंचपाक्षिकम’ हा प्रश्नज्योतिषावर आधारित ग्रंथ, ‘समश्लोकी चुर्णिका’ ग्रंथ आणि ‘कूर्मपुराण भाष्य’ अशी अद्भुत ग्रंथरचना दिसून येते. याशिवाय स्वामी महाराजांनी सत्यनारायण पूजेसारखी दत्तपुराण व मार्कण्डेय पुराण इत्यादींचा आधार असलेली ‘सत्यदत्तपूजा’ आणि ‘दत्तात्रेय षोडशावतार’ या लघुग्रंथांची निर्मिती करून ती दत्तोपासकांत रूढ केली.


प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांचा अंतिम संदेश 

Tembeswami

.

१. मुक्तीचा लाभ करुन घेणे हे मनुष्यजन्माचे कर्तव्य आहे.

२. त्याकरिता प्रथम मन स्थिर व्हावे या उद्देशाने वर्णाश्रमविरहित धर्माचे यथाशास्त्र आचरण झाले पाहिजे.

३. वेदान्ताचे श्रवण, मनन, निदिध्यासन नित्य करावे.

४. मुख्यत: लक्षपूर्वक श्रवणाने मनातील आसक्ती कमी होईल.

५. सात्विक प्रवृत्तीनेच मानवाची उन्नती होते.

६. सात्विक प्रवृत्ती होण्याकरिता आहार हा हित, मित व मेध्य म्हणजे पवित्र असण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

७. आपली प्रकृति सात्विक झाली आहे हे ओळखण्याची खूण अशी, की स्वधर्मावर दृढ श्रद्धा बसून स्नान, संध्या, देवपूजा, पंचमहायज्ञ हे वेळेवर करणे, अतिथिसत्कार, गोसेवा, मातापितरांची सेवा ही हातून घडणे, कथा-किर्तन, भजन-पुराण यांचे श्रवण होणे, सर्वांबरोबर गोड बोलणे, दुसऱ्याचे नुकसान होईल असे न वागणे, स्त्रियांनी सासरी राहून सासू-सासरे व इतरही वडील माणसे यांच्या आज्ञेत पतीची दृढनिष्ठेने सेवा करणे इ. गुण आपल्यामध्ये येणे. आपली प्रकृति सात्विक बनल्याची ही चिन्हे आहेत.

८. उदरनिर्वाहाकरिता व्यापार, शेती, नोकरी, कोणताही व्यवसाय केला तरी वेदविहित कर्म व गुर्वाज्ञापालन कधीही सोडू नये.

९. स्वकर्म केले तरच अंत:करण शुद्ध होते.

१०. अंत:करण शुद्ध झाले तर उपासना स्थिर होते.

११. उपासना स्थिर झाली तर मनाला शांति मिळते.

१२. आणि मनाची गडबड थांबली म्हणजे आत्मज्ञान होऊन मोक्षाचा लाभ होतो. याप्रमाणे जो वागेल तो शेवटी पूर्ण सुखी होईल.


- प. प. श्री. वासुदेवानंदसरस्वती (टेंबे स्वामी) महाराज


दत्तत्रेय स्तोत्रम

दत्तत्रेय स्तोत्रम

श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वांमी महाराज यांची सद्गुरु डाँ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी लिहलेली आरती

आरती भक्तीभावे करुनी, स्मरुया गुरु अंतःकरणी।।धृ।।

सद्गुरु तोची कृपामुर्ती, देत मज कवणाची स्फुर्ती

त्रिभुवन अगाध गुरुमहिमा, कळेना निगमासही सीमा

जेथे वाल्मीकी व्यास ऋषी थकले शक्य कसे मजसी.

परी तो सदय गुरुराणा, वसतसे भक्तांच्या ध्याना

तोची मती देत,मुका वदवित, पंगु गिरीचढत

जयाची अतर्क्यही करणी, तयाच्या लागतसे चरणी ।।१।।

होतो अवनीला भार, कराया त्याचा परिहार

जगाला करावया पुनीत, दत्तगुरु युगेयुगे येत

चिरंतन परंपरा गुरुची, वहाते गंगा योगाची.

ज्या गृही पतिव्रता नारी, प्रभुचा जन्म तिचे दारी

नृसिंह सरस्वती, नाथ प्रभुती, सिद्धसांगती

श्रीमद वासुदेव स्वामी, सतसंकल्पी गुरुवाणी।।२।।

पोळलो तिन्ह ही तापाने, बुडालो स्वकृत पापाने,

षड्रिपु छळती सदाकाळी, मती मम नष्टभ्रष्ट झाली

गेला जन्म फुकट गेला, असा हा निश्चय मनी झाला

सद्गुरु सदा सर्वकाळ, माता होऊनी सांभाळ

तुच माऊली, तुच सावली, बहुत तारली

करावा सार्थ जन्म स्वामी, मज ह्रदयासी लावुनी ।।३।।

जयजय सद्गुरु सर्वेषा,शिष्य तारक परमेशा

जन्मुनी ब्रह्मवर्त देशी, केले तप गंगे पाशी. घेऊनी सुखे चौथी दिक्षा, मानीले वेदाच्या पक्षा.

होई अवतार मुळारंभ, वर्षीतो भक्तीचा मेघ

भक्ती ऊधळीत, द्यान ऊजळीत, योग साधीत

सद्गुरु वासुदेव स्वामी तयाच्या लागतसे भजनी।।४।। 


सद्गुरु विष्णुमहाराज पारनेरकर संकल्पीत कविश्रेष्ठ श्री दासोपंत विरचीत श्रीदत्तमहात्म ग्रंथातुन सादर.


अ) श्री गुरुमहाराजांचे विद्यागुरु

१) वेदमूर्ती हरि भट्ट टेंम्ब्ये (आजोबा) प्राथमिक शिक्षण  

२) वेदमूर्ती तात्या उकिडवे-दश ग्रंथ व काही याज्ञीक

३) वेदमूर्ती भास्करभट्ट ओळकर.-याज्ञीक 

४) ज्योतिषी संभूषस्त्री साधले- संस्कृत, ज्योतिष ज्योतिर्गणीत

५) ज्योतिषी निलांभट्ट खड्गाठे ज्योतिष व वैदक 

६) विष्णूभटजी आळवणी -मौलिक मार्गदर्शन    


ब) गुरु महाराजांचे अध्यात्मिक गुरु 

मोक्षगुरु 

१) गुरु दत्तात्रय- सर्वसाधनांचे मार्गदर्शक

२) प. प. गोविंदस्वामी- मोक्षगुरु

३) प. प. नारायणानंद सरस्वती-दंडगुरु 


क) गुरु महाराजांची दंड परंपरा

प. प अचूतानंदसारस्वती स्वामी महाराज

    |

प. प. अनिरुद्धनंद सरस्वती स्वामी महाराज

    |  

प. प. नारायणानंद सरस्वती स्वामीमहाराज

    |

प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज


श्री टेंबे स्वामी 

कंठातील वाडमयीन हार

प. प. वासुदेवानंद सरस्वती महाराज यांचे कंठातील वाडमयीन हार

प.प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या काही प्रतिमा आपण पाहतो. वंदन करतो. त्यामध्ये स्वामी महाराजांची दंड, कमंडलू, कौपिन, छाटी धारण केलेली भस्म विभूषित एक उभी प्रतिमा आहे. या उभ्या प्रतिमेत महाराजांच्या गळ्यात एक श्लोकबद्ध हार आहे. इ. स. १९१३ मध्ये वैशाखात प. प. गुळवणी महाराज श्री क्षेत्र गरुडेश्वरी आले. येताना त्यानी श्री दीक्षित स्वामी यांनी रचना केलेल्या हारबद्ध व श्लोकबद्ध असलेले एक छायाचित्र आणलेले होते. व त्यांनी ते थोरले महाराजांना अर्पण केले. प. प. थोरल्या महाराजांनी ते श्लोकबद्ध हाराचे चित्र पहिले व त्याचा स्वीकार करून प. प. दीक्षित स्वामी महाराजांना परत करणेस सांगितले. तो श्लोक खालील प्रमाणे,


मेशं केशं सुशंभु, भुवनवनवहं,  मारहं रत्नरत्नं ।

वंदे श्री देवदेवं सगुणगुरुगुरुं, श्रीकरं कंजकंजम् ।। 

मामज्ञं मत्तभर्भ भवदव सुवहं वासनासर्वसंधे |

मातः पातः सुतस्ते वहरहसि हरे देशिके  शिष्य शिष्यम्  ||

                                     

१) मेशं- लक्ष्मीचा ईश, अर्थात विष्णू. 

२) केशं-  ब्रम्हा जो श्रीष्टीकर्ता आहे.      

३) सुशंभु- मोक्षाचे सुख देणारा  शंभू. 

४) भुवन-वन-वहं- १४ भुवनांचा धारण करणारा, पालन करणारा विष्णू.  

५) मारहं- कामदेवाला मारणारा अर्थात शिवस्वरूप. 

६) रत्नरत्नं- श्रेष्ठा मध्ये श्रेष्ठ अर्थात प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. 

७) श्री देवदेवं- देवांचा जो देव तो महादेव, भगवान शंकर.

८) सगुणगुरुगुरुं- सगळ्या गुरूंचा गुरु म्हणजे सगुण  परमेश्वर. 

९) श्रीकरं- वेदवेदांतविद्या शिकवून शिष्यान। तेजस्वी बनवणारा 

१०) कंजकंजम् - करकमळात कमंडलू धारण करणारा. 

११) मामज्ञं- अज्ञ मा वहं म्हणजे अज्ञानी अशा मला ब्राम्हाकडे घेऊन जावे. 

१२) मत्तभर्भ- मत्तम्- अर्भम्  अर्थात मद मोह ग्रस्त बालकास 

१३) भवदव सुवहं- संसाररुपी दावानलातून बाहेर नेणारा 

१४) वासनासर्वसंधे-  वासनांच्या जाळ्यात 

१५) मातः पातः- तुझा पुत्र आहे, माझे पतन न होवो. 

१६) शिष्य शिष्यं- शिष्यांचा शिष्य 


सरळ अर्थ:


"ब्रम्हा विष्णू व शिवस्वरूप चतुर्दश म्हणजे चौदा भुवनांचा पालनकर्ता, विष्णूस्वरूप, कामदेवांचा भस्म करणारे शिवस्वरूप, परमहंस परिव्राजकामध्ये श्रेष्ठ श्री सदाशिवरूप, सगुण, गुरूंचे गुरु, कर कमळात कमंडलू धारण करणारे प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती याना मी वंदन करतो. वासनांच्या जाळ्यात माझे पतन होऊ देऊ नका. मला अधःपतित करू नका. मी तुमचा पुत्र आहे. संसाररूपी दावानलातून मला बाहेर काढा. हे विष्णू स्वरूप गुरुमाते, मला एकांतात ज्ञानोपदेश देऊन शिष्यांचा शिष्य बनवा."


अशा प्रकारे हा श्लोकबद्ध हारबंध म्हणजे एका पूर्णपात्र शिश्योत्तमाने कृपावंत सद्गुरुकडे मागितलेले हे आर्जवपूर्ण गाऱ्हाणे आहे. हे मनुष्य जीवनाचे सर सर्वस्व आहे. हि मागणी लौकिक किंवा ऐहिक नसून शाश्वत ज्ञान सत्चरित्राचे पालन करण्याची प्रार्थना आहे. शब्द विकारांवर मात करून ईश्वरचरणी मन केंद्रित करून आत्मिक विकास आणि उद्धार करून घेण्यासाठी, एकांतामध्ये गुरुमुखातील ज्ञान ग्रहण करणेसाठी गुरूंना केलेली ही आर्त प्रार्थना आहे.


श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी 

मांडीवर सुंदर बालक असलेले प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज

प. प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज एके दिवशी नदीवर स्नानास एकटेच गेले होते. त्याच वेळी एक बाई पाणी आणण्याकरिता नदीवर गेली . तो तिला असा चमत्कार दिसला की, " तीरावर महाराज एका झाडाखाली मांडी घालून बसले आहेत. मांडीवर सुंदर ६ महिन्यांचे बाल आपल्या डाव्या हाताच्या अंगठा तोंडात धरून महाराजांच्याकडे पाहत आहे आणि महाराजही त्याच्याकडे सारखे पाहत आहेत ". ते पाहून तिला पाणी नेण्याचेही शुद्ध न राहून ती त्या द्रुशयाकडे एकाग्र चीत्त्ताने पाहत राहिली. काही वेळाने महाराजांची नजर तिच्याकडे जाताच ते बाल दिसेनासे झाले व बाईही मूर्चित होऊन खाली पडली. महाराजांनी त्या बाईच्या जवळ जाऊन तिच्या तोंडात पाणी घातले व म्हणाले. " तू पुण्यवान आहेस. ही हकीकात कोणाला सांगू नकोस, जा ". मग ती बाई पाणी घेऊन घरी गेली.


अति सुलभ दत्तनाम । न पडे ज्या किमपि दाम ।।१।।                        

निज जिव्हा हि साधन । नाम घेता नोहे दीन ।।२।।                        

दत्त दत्त उच्चारिता । दत्त भेटे भोळ्या भक्ता ।।३।।                        

माहात्म्य दत्त नामाचे । हो अगम्य वेदवाचे ।।४।।                        

वासुदेव म्हणे दत्त । नामे भक्त होती मुक्त ।।५।।


स्वामीमहाराजांच्या वाडगमयाची वैशिष्ट्ये 

कल्पना करा. एखादे भलेमोठे स्तोत्र आपल्यासमोर आहे. आपण ते सरळ वाचतो आहे. अन् कोणी म्हणाले की ‘त्या स्तोत्रातल्या प्रत्येक ओळीतील चौथे अक्षर बाजूला काढ आणि ते सरळ वाच त्यातून एक वेगळेच मंत्र तयार होतो.’ तशी ती झाली, तर.. अश्या रचनाकाराला अपण काय संबोधणार? त्यातही ते संस्कृतमध्ये आणि त्याही अनेक संकटप्रसंगी उपाय असल्यासारखे सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणाऱ्या असतील तर! असे अद्भुत वाङ्मय लिहिणारे होते वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी. सप्तशती गुरुचरित्रातील प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर म्हणजे श्री भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय! श्री दत्तसंप्रदायातील हा महान ग्रंथ. त्यांनी केलेले गणपती स्तोत्रही असेच. त्यातल्या प्रत्येक ओळीतील आधी तिसरे अक्षर घेतले आणि त्यानंतर पुन्हा आठवे अक्षर घेतले तर श्री गणेशाचा वेदांतील गणानांत्वा. हा मंत्र तयार होतो. गंगास्तोत्रातून अशाच काही अक्षरातून गंगेचा मंत्र, हनुमंत स्तोत्रातून हनुमंताचा मंत्र, अशा अनेक रचना!


त्यांचे घोरकष्टोद्धारण स्तोत्र तर प्रत्येक दत्तसांप्रदायिकाच्या रोजच्या उपासनेत आहेच. कोणतेही संकट असो, स्वामींच्या या स्तोत्राचा आधार सगळ्यांनाच! याशिवाय मंत्रात्मक श्लोक म्हणजे उपायांची खात्रीशीर हमी असे समजले जाते! अशी कितीतरी स्तोत्रे अगदी रोजच्या उपयोगाची. सगळ्या रचना लोककल्याणकारी, अद्भुत व दैवी गुणांनी नटलेल्या. त्यांचे जीवनचरित्रही असेच जगावेगळे. त्यांचे रोजचे जेवण कसे? टोपे यांनी १८८७ च्या मे महिन्यात श्रीस्वामींना पाहिल्याची आठवण सांगितली आहे. ‘‘स्वामी रोज दुपारी आमचे घरी भिक्षेला येत असत. भिक्षेत ते तूप वाढू देत नसत. तीन घरची भिक्षा झाल्यावर ते सरळ गंगेवर जात असत. भिक्षान्नाची झोळी तीन वेळा गंगेतील पाण्यात बुडवून ती घेऊन अंताजी पंतांच्या घाटावरील आपल्या झोपडीत परत येत असत. तेथे ती झोळी थोडा वेळ एका खुंटीला टांगून ठेवणार. त्यातील सर्व पाणी गळून गेले की ती खाली घेऊन त्यातील अन्नाचे चार भाग करणार. एक गरीबाला दान करणे, एक कुत्र्याला देणे, एक गंगेला अर्पण करणे व शिल्लक चौथा स्वत: घेणार!’’ जिव्हालौल्य जिंकल्याची, वैराग्याची परिसीमा गाठलेली अशी किती उदाहरणे आज दिसतील हा प्रश्नच आहे.


‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा विश्वशांती मंत्र जगाला देऊन त्यांनी लोकमंगल, लोककल्याणकारी वाङ्मय लिहिले. भारतीय तत्त्वज्ञान व वाङ्मयामध्ये स्वामींनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांच्या वाङ्मयावर महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या प्रांतातील अभ्यासकांनी प्रबंध तयार करून विविध विद्यापीठांतून मान्यता मिळवलेली आहे. आजच्या विज्ञान युगात मानव हा एक यंत्र बनू लागला आहे. शाश्वत चिरंतन मूल्याची मानवाला खरच गरज आहे. वैज्ञानिक प्रगती कितीही झाली तरी मानसिक दौर्बल्य वाढत चाललेले आहे. वरवर सुखी समाधानी, दिसणारा समाज अंतर्यामी दु:खी, खिन्न, उदासीन आहे. या दोन्ही गोष्टीतील तफावत कशी कमी होणार? या प्रश्नांची उत्तरे स्वामींच्या वाङ्मयात आहेत. भौतिक प्रगतीबरोबरच शाश्वत चिरंतन मूल्याचा ठेवा आपण प्राणपणाने जपला पाहिजे असे त्यांचे वाङ्मय सांगते.


श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराज यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा व स्तोत्रे.

१) द्विसाहस्त्रीश्रीगुरुचरितम्सटीकम् (मूळ १८८९)- रचनास्थळ माणगांव, महाराष्ट्र

चूर्णिका (टीका १८९९)- रचनास्थळ प्रभास वद्वारका, गुजरात.

२) श्रीदत्तपुराण (संस्कृत) (१८९२)- रचनास्थळ ब्रम्हावर्त, उत्तरांचल

३) नर्मदालहरी (१८९६)- रचनास्थळ हरिद्वार, उत्तरांचल

४) श्रीदत्तलिलामृताब्धिसार (मराठी) (१८९७)- रचनास्थळ पेटलाद, मध्यप्रदेश

५) कूर्मपुराणाचेदेवनागरीत लिप्यंतर (१८९८)- रचनास्थळ तिलकवाडा, गुजरात

६) अनसूयास्तोत्र (१८९८)- रचनास्थळ शिनोर, गुजरात

७) श्रीदत्तपुराणटीका (१८९९)- रचनास्थळ सिद्धपूर, गुजरात

८) श्रीदत्तमाहात्म्यव त्रिशति गुरुचरित्र (मराठी) (१९०१)- रचनास्थळ मपत्पूर, मध्यप्रदेश

९) समश्लोकीगुरुचरित्र (१९०३)- रचनास्थळ ब्रम्हावर्त, उत्तरांचल

१०) लघुवासुदेवमननसार (मराठी) (१९०३)- रचनास्थळ ब्रम्हावर्त, उत्तरांचल

११) सप्तशतिगुरुचरित्रसार (मराठी) (१९०४)- रचनास्थळ ब्रम्हावर्त, उत्तरांचल

१२) श्रीकृष्णालहरी (५१श्लोक) (१९०५) श्रीगुरुस्तुति- स्तोत्र- रचनास्थळ गाणगापूर, कर्नाटक

१३) दत्तचंपू वकरुणात्रिपदी (१९०५)- रचनास्थळ नरसी, महाराष्ट्र

१४) दव्यर्थीषडाननस्तोत्र व कुमारशिक्षा (१९०७)- रचनास्थळ हंपी, कर्नाटक

शिक्षात्रयम् (संस्कृत) युवाशिक्षा (१९०८)- रचनास्थळ मुक्त्याला, आंध्रप्रदेश

वृद्धशिक्षा (१९०८)- रचनास्थळ मुक्त्याला, आंध्रप्रदेश

१५) गुरुसंहिता (समश्लोकी गुरुचरित्र) (१९०७)- रचनास्थळ तंजावर, आंध्रप्रदेश

१६) स्त्रीशिक्षा (मराठी) (१९०८)- रचनास्थळ मुक्त्याला, आंध्रप्रदेश

१७) गंगेचीस्तुती (१८९६)- रचनास्थळ हरिद्वार, उत्तरांचल

१८) नर्मदास्तुती- रचनास्थळ नेमावर, मध्यप्रदेश

१९) अभंग-मित्रमित्रभांडती- रचनास्थळ चिखलदा, मध्यप्रदेश

२०) सिद्धसरस्वतीस्तुती- रचनास्थळ सिद्धपूर, गुजरात

२१) कृष्णावेणीपंचगंगा स्तोत्र- रचनास्थळ मंडलेश्वर, मध्यप्रदेश

२२) अखंड आत्माअविनाशी दत्तस्तोत्र- रचनास्थळ गाणगापूर, कर्नाटक

२३) साकारतास्तोत्र (१९०६)- रचनास्थळ बडवानी, मध्यप्रदेश

२४) कृष्णालहरीसंस्कृत टिका- रचनास्थळ तजांवर, तमिळनाडू

२५) गोदावरीस्तुती- रचनास्थळ सप्तगोदावरी, आंध्रप्रदेश

२६) वैनगंगास्तोत्र (१९०९)- रचनास्थळ पवनी, महाराष्ट्र

२७) भूतपिशाचस्तोत्र- रचनास्थळ गुर्लहोसूर, कर्नाटक

२८) तुंगभद्रास्तुती, त्रिपुरांतकेश्वर स्तोत्र (१९१०)- रचनास्थळ हावनुर, कर्नाटक

२९) षट्पंचशिकावेदान्तपर स्तोत्र- रचनास्थळ हरिहर, कर्नाटक

३०) दत्तमहात्मन स्तोत्र- रचनास्थळ जैनापूर, कर्नाटक

३१) श्रीपादश्रीवल्लभ स्तोत्र (१९११)- रचनास्थळ कूरवपूर, कर्नाटक

३२) जगदंबास्तुती- रचनास्थळ तुळजापूर, महाराष्ट्र


श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज - महत्वाच्या घटनांचे साल  

१८५४ - श्री प प वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज माणगांव जन्म, आनंद नाम संवत्सर, श्रावण कृ।।५, रविवार

१८६२ - माणगांव व्रतबंध, अध्ययन

१८७५ - माणगांव विवाह, स्मार्ताग्नि-उपासना, गायत्री पुश्चरण, वय २१ वर्षे ज्योतिष अभ्यास

१८७७ - माणगांव पितृछत्र मिटले. (वे.मू.गणेशभटजींचा मृत्यू).वय २३ वर्षे

१८८३ - श्रीदत्तमंदिराची निर्मिती व वैशाख शु।। ५ ला मूर्तीची स्थापना. वय २९ वर्षे

१८८९ - माणगांवचा सहकुटुंब त्याग व वाडीस आगमन. वय ३५ वर्षे कोल्हापूर-भिलवडी-औदुंबर-पंढरपूर-बार्शी मार्गे-

१८९१ - गंगाखेड वै. व।। १४ पत्नीचा मृत्यू व १४व्या दिवशी वय ३५ वर्षे संन्यासग्रहण (ज्यै. शु।। १३). वाशीम-उमरखेड-माहूर-खांडवा-बढवाई-मंडलेश्वर-बलवाडा मार्गे उज्जैनी. प. प. श्रीनारायणानंदसरस्वतींकडून दंडग्रहण व पहिला चातुर्मास. महत्पूर-सारंगपूर-बजरंगगड-पिछौरा-खरेरा-जालवण वय ३८ वर्षे


वासुदेवानंद सरस्वती महाराज मंत्र श्लोक 

मंत्रात्मक श्लोक 

माणगावी असताना वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दिनक्रम

एकविसाव्या शतकात वावरणाऱ्या आजच्या उच्चविद्याविभूषित माणसाना या सर्व गोष्टी कपोलकल्पित वाटतील, आजच्या संगणकीय युगातील मानवाला दया, क्षमा, शांती आदी गुणांचा परमोत्कर्ष मानवामध्ये होऊ शकतो हे कळणे कठीणच आहे. माणसाच्या अधीन राहणारी हिंस्त्र जनावरे त्याने फक्त सर्कशीतच पाहिलेली असतात. परंतु श्रीशास्रीबुवांच्या रुपाने हे सर्व अमूर्त गुण त्यांच्या आश्रयाला येऊन समूर्त झाले होते.


बुवा आता पहाटे चार वाजता उठुन प्रातःस्मरण करुन योगाभ्यास करीत.खरे म्हणजे आता योगाभ्यास तरी कशासाठी करावयाचा? आता त्यांचा संबंध प्रत्यक्ष भगवान श्रीदत्तात्रेयांशीच येत होता. योगाभ्यास करुन जो आत्मसाक्षात्कार साधावयाचा होता तो बुवांना आता साधला नव्हता, असे म्हणण्याचे धाडस कोण करेल? पण त्यांनी नेहमीचा योगाभ्यास चुकवला नाही. पूर्णावतार भगवान श्रीगोपालकृष्णनाथमहाराज सुध्दा ब्राम्हमुहूर्तावर उठूनयोगसाधना करीत असत. खेचरीमुद्रा आणि वज्रोलीमुद्रा यांचा अभ्यास मात्र बुवांनी आपला गृहस्थाश्रम संपल्यावर केला.


एका श्रीरामनवमीची अशी गोष्ट सांगतात की, त्या दिवशी सकाळी बुवांनी नदीवर जाऊन बस्तीची क्रिया केली. बस्तीची क्रिया करण्यासाठी ते पपईची नळी वापरीत. पोटातील मळ जाऊन पोट अधिक शुध्द व्हावे म्हणुन त्यांनी पुन्हा एकदा बस्तीचा प्रयोग केला, त्यामुळे पोटातील सर्व मळ बाहेर पडुन त्यांना फार थकवा आला. चक्कर येउन ते तासभर बेशुध्द होऊन पडले. शुध्दीवर आल्यानंतर त्यांना श्रीरामनवमीची आठवण झाली. अंगात शक्ती नसल्यामुळे थोडावेळ चालत व थोडावेळ थांबत ते मंदिरामध्ये येऊन पोंचले व श्रीदेवांसमोर निजून राहिले. श्रीदेवांसमोर काही फळे होती. ती खाल्ल्यावर त्यांना हुशारी आली.


योगाभ्यासानंतर शौच, मुखमार्जन व स्नानसंध्यादी आटोपुन बुवा मंदिरा मध्ये श्रीदत्तमूर्तीची पूजा करीत. भगवान श्रीदत्तात्रेय त्यांचाशी बोलत असत, इतकेच नव्हे, श्रीदेव भक्तांकडून आपले कोडकौतुक करवून घेत होते. मंदिराच्या पाठीमागे व उतरेच्या बाजूला बुवांनी फुलझाडे व तुळशी लावल्या होत्या. त्यांच्या जवळ विद्याभ्यास शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी या फुलझाडांची काळजी घेत. पूजेसाठी ताजी फुले व तुळशी बुवा स्वतः खुडून आणित.जमिनीवर गळून पडलेले फुल श्रीदेवांना चालत नसे.सुरवाती-सूरवातीला रोज महान्यास करुन श्रीदेवाला रूद्रकदाशिनी होत असे. पुढे जसजसा व्याप वाढू लागला तसतसे दररोज एकाच रुद्रावर्तन होऊ लागले. पुढेपुढे तर फक्त पुरुषसुक्तानेच अभिषेक होऊ लागला. अर्थात हे सर्व बदल श्रीदेवांच्याच आज्ञेने होत गेले. हे पाहीले म्हणजे भक्ताची काळजी श्रीदेवांशिवाय कोणाला असणार! या वचनाची प्रचिती आल्याशिवाय रहात नाही.


महायोगिनि सौ.अन्नपुर्णा माता टेंबे यांचे समाधी स्थान श्री क्षेत्र गोदातीर गंगाखेड

महायोगिनि सौ.अन्नपुर्णा माता टेंबे यांचे समाधी स्थान

श्री क्षेत्र गोदातीर गंगाखेड

जप वगैरे रोजचे कर्म पूजा झाल्यावर होत असे. अगदी सुरवातीला श्रीदेवांना नैवेद्य समर्पण करुन बुवा जेवण्यासाठी घरी जात. पण तेथे श्रीगुरुद्वादशीचा पहिला उत्सव झाल्यादिवसापासून बुवांनी घरी जाणे बंद केले. त्यानंतर त्यांनी कोरडी भिक्षा मागण्यास सुरवात केली. ते भिक्षा एकाच घरी मागत असत. भिक्षेहून येताना स्वयंपाकाला लागणारे सरपण स्वतः गोळा करुन आणावयाचे. असा बुवांचा दररोजचा क्रम होता. भिक्षेला जाताना रजस्वला स्त्री किंवा अंत्यज दृष्टीला पडल्यास त्या दिवशी भिक्षा न करता ते उपोषण करीत असत. भिक्षेहून आल्यावर स्नान करुन मध्यान्हसंध्या, ब्रम्हयज्ञ वगैरे आटोपुन मूर्तीची पूजा करावयाची व आणलेल्या भिक्षेतून वैश्वदेव नैवेद्य, करुन मग स्वतः भोजन करावयाचे असा त्यांचा नियम होता. तांदुळ व मुगाची डाळ एकत्र करुन बुवा स्वतः स्वयंपाक करीत. मंदिराला कोणीतरी एक गाय दिली होती, तिचे दुध व तुप ते स्वयंपाकाला वापरीत असत. शिजविलेल्या अन्नातून गोग्रास व अतिथीसाठी भोजन बाजूला काढून उरलेला भाग बुवा स्वतः ग्रहण करीत असत. स्वयंपाकाची भांडी ते स्वतःच घाशीत. पुढे पुढे बुवांचा एक भाचा त्यांच्याबरोबर राहत असे. त्याला बुवांच्या स्वयंपाकाची भांडी घासावयाचे भाग्य लाभले होते. कोणी काही विचारावयाला आले तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे बुवा दुपारी देत. कधी पुराण सांगत. संध्याकाळी स्नानसंध्या झाल्यावर श्रीदेवांना धुप घालून आरती करीत असत. रात्री मंत्रपुष्प होऊन शेजारती झाल्यावर श्रीदेवांना पलंगावर निजविण्यात येत असे. त्यानंतर बुवांचे ग्रंथवाचन होत असे. नंतर पुन्हा योगाभ्यास करुन मग ते झोपावयाला जात असत. बुवा देवळातच झोपत असत. त्यांचे अखंड नामस्मरण चालु असे. या काळात ते पूर्णपणे ब्रह्मचर्यवृत्तीने राहिले होते. श्रीदेवांची आज्ञा झाल्याशिवाय गृहस्थाश्रम सुरु करावयाचा नसल्यामुळे श्रीदेवांची आज्ञा होई पर्यंत त्यांनी स्वस्रीसंबंध मुळीच केला नाही. अपूर्व व कठोर आत्मसंयम करुन ते राहिले. मात्र सौ. अन्नपूर्णाबाईंचा रोज सकाळी श्रीदेवांपुढे सारवून, रांगोळी घालून जाण्याचा व दुपारी जेवण्यापूर्वी देवदर्शन करुन, तीर्थप्रसाद घेऊन जाण्याचा नियम होता.


महायोगिनि सौ.अन्नपुर्णा माता टेंबे श्री क्षेत्र गोदातीर गंगाखेड

महायोगिनि सौ.अन्नपुर्णा माता टेंबे श्री क्षेत्र गोदातीर गंगाखेड

थोरले महाराज व शिष्य शंका समाधान

शिष्य:- अनुबंधचतुष्टय कोणतें?


गुरु:- विषय, प्रयोजन, संबंध आणि अधिकारी हेअनुबंद्घ चतुष्टय होय. वेदांतशास्त्राचा ब्रम्ह विषय, मोक्ष प्रयोजन, बोध्यबोधकभावसंबंध, साधनचतुष्टयसंपन्न प्रमाता अधिकारी होय. ब्राह्मणानेंच बृहस्पतीसव, आणि क्षत्रियानेंच राजसूययज्ञ करावा. त्याप्रमाणेंच या अधिकार्यानें वेदांत श्रवण करावा.


शिष्य:- चार साधनें कोणतीं?


गुरु:- नित्यानित्यवस्तुविवेक (विचार), इहामूत्रार्थभोग विराग (वैराग्य). - शमादिषट्क व मुमुक्षा (मोक्षाची इच्छा) हीं चार साधनें; त्यांतून ब्रम्ह सत्य, आणि जग अनित्य (मिथ्या) असा श्रवणानें होणारा विचार हें पहिलें साधन होय. या लोकांतील स्त्रीभोगादि व स्वर्गीं अमृतपानादि हीं सर्व अनित्य जानून कुत्र्याच्या ओकीप्रमाणें त्या विषयांचा वीट मानणें हें दुसरें (वैराग्य) होय. १ शम, २ दम, ३ उपरति, ४ तितिक्षा, ५ श्रद्धा, ६ समाधान हें शमादिषट्क. विषयांकडूनमनाला वळवून स्वरूपीं ठेवणें तो शम (शांति). बाह्येंद्रियांचा निग्रह करणें (स्वाधीन ठेवणें) तो दम. २ उपरति म्हणजे संन्यास तो न घडेल तर निष्कामकर्मानुष्ठान किंवा व्यवहारलोप करणें. ३ प्रारब्धानें प्राप्त झालेलें शीतोष्ण दु:खादि सहन करणें ती तितिक्षा. ४ गुरुवाक्यावर विश्वास ठेवणें ती श्रद्धा. ५ श्रवणादिक होत असतां मनाचे समाधान करणें हे समाधान. ६ हीं सहा मिळून शमादिषट्क होय. चोहों बाजूंनीं घर जळत असतां धन, धान्य, स्त्री, पुत्रादिकांला सोडून घरधनी स्वतापोपशांत्यर्थ आपणच बाहेर पडून तापशांतीची जशी इच्छा करितो, तशी संसारिक तापत्रय शमन करण्याची जी तीव्र इच्छा होणें ती मुमुक्षा होय.


शिष्य :-ही चार्हीं साधनें पाहिजेत काय?


गुरु:- कित्येकाला नित्यानित्य विचार जाहला तरी विषयाभिलाष असतो तो ज्ञानाला प्रतिबंधक होतो. म्हणून वैराग्य पाहिजे व तें असतांही कित्येकाला कोपताप होतो, म्हणून शमादिक पाहिजे व तेही असले तथापि सगुणोपासकाला मोक्षाची इच्छा होत नाहीं म्हणून मुमुक्षाही पाहिजे. अशा अधिकार्यानें हातीं उपहार (नजराणा) घेऊन गुरूला शरण जाऊन प्रार्थना करावी कीं, हे भगवत् जीव कोण, ईश्वर कोण, जग कसें, हें त्रय कोठून उत्पन्न झालें व याचा उपरम कसा (शांती) होईल असा प्रश्न करावा. श्रुतिश्च (लोकीं नाना योनी फिरतां फिरतां शेवट प्रारब्धवशें वैराग्य उत्पन्न होतें - त्यानें ज्ञानाकरितां श्रीगुरूला (शाब्दज्ञान आणि ब्रह्मानुभव असणार्या पुरुषाला हाती समिधा घेऊन शरण जावें) स्मृतिश्च (तत्त्वदर्शी ज्ञानी जे, त्यांना नमून प्रश्न करून सेवेनें तें ज्ञान जाणावेंतेच उपदेश करतील ) असा शिष्य शरण आल्यावर गुरु सत्व, रज, तमोगुणें, ईश्वर, जीव आणि जगदुद्भव प्रकार सांगून करतलामलकवत् आत्मबोध करतात. अशा अधिकार्याला अशीं साधनें व तो गुरु मिळणें हा ईश्वरानुग्रह आणि याला पूर्वपुण्योदयच पाहिजे. हें ज्ञान देणारा गुरु ईश्वरच जाणावा. त्याच्या प्रसादें जो जीवात्म्याचा आनि ब्रह्माचा भेद निरसून टाकितो तो मुक्त होतो.


tembe swami maharaj astak

अष्टक 

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजानी रचलेल्या स्तोत्रांचे फलित

१. घोरकष्टोध्दरण स्तोत्र- आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच आहे.

२. श्रीदत्तमाला मंत्र- रोज मनोभावे कमीत कमी १०८ वेळा जपला असता मानवी देहाचेच तीर्थक्षेत्र होते.

३. श्री दत्तात्रेय कवच- सर्व शारीरिक संरक्षण.

४. श्री दत्तस्तोत्र- राग कमी होणे, मनशांती व रक्तदाबाचा विकार कमी होणे.

५. श्रीपादवल्लभस्तोत्र- देहरुपी श्रीसदगुरुप्राप्तीसाठी.

६. अपराधक्षमापनस्तुति- नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र.

७. श्री दत्तभावसुधारसस्तोत्र- पूर्ण वाचनाने श्रीगुरुचरित्र वाचनाचे फल मिळते. (मंत्र क्रं ६३ भगवदभक्त संतान होण्यासाठी व मंत्र क्रं ६६ पोटदुखी कमी होण्यासाठी असे सांगितले आहे.)

८. श्री सप्तशतीगुरुचरित्र- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

९. श्री दत्तलीलामृताब्धिसार- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

१०. श्री दत्तमाहात्म्य- घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.

११. वासुदेवमननसार- प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे.

१२. सार्थ बालाशिषस्तोत्र- कुमाराना क कुमारिकांना दृष्ट, नजर लागू नये व अर्भकांना ग्रहादि पीडा पासून मुक्त करणारे.

१३. मंत्रात्मक श्लोक- जप कसा करावा, कर्ज निवारण्याचा व सौभाग्याचा मंत्र..

१४. चाक्षुषोपनिषद- डोळ्यांचे सर्व विकार व नंबर कमी होण्यासाठी व वंशामध्ये कोणालाही नेत्रविकार न होण्यासाठी.


मेशं केशं सुशम्भुं भुवनवनवहं मारहं रत्न रत्नं । वन्दे श्री देवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कंज कंजम ।। 


श्री टेंबेस्वामी जन्म कुंडली 

श्री टेंबेस्वामी जन्म कुंडली 

थोरल्या महाराजांच्या चरित्रातील विशेष

थोरल्या महाराजांच्या चरित्रात त्यांना त्यांच्या आयुष्यात दोन वेळा सर्प दंश ,तीन वेळा महामारी, एक वेळ सन्निपात, दोन वेळा महाव्याधी, दोन वेळा कोड, इतके रोग उत्पन्न झाले, संग्रहणी अर्थात अतिसार व्याधी हि कायम मागे होती. पाणी प्याल्यावर या व्याधीचा उद्रेक जास्त होत असे. सामान्य मनुष्याला इतके रोग झाले असते तर तो तग धरू शकला नसता पण दत्त स्वरूपी अशा थोरल्या महाराजांना काय अशक्य आहे. वक्रतुंड कवीश्वर महाराजानी हे साक्षात दत्त महाराज आहेत हे सांगितलेही होते. संग्रहणी हा आजार त्यांना उत्पन्न व्हायला कारण एक मनुष्याने केलेला अभिचारक प्रयोग होय, पण हे ओळखून देखील त्यांनी त्याचा प्रतिकार केला नाही . 


तिलकवाड्याला आठवा चातुर्मास झाला तेव्हा तेलुगू लिपीतील कूर्मपुराण त्यांनी देवनागरी भाषेत भाषांतरित केले, तेलगू भाषा? बढवाईच्या चातुर्मासानंतर महाराज जेव्हा नृसिंहवाडीला आले तेव्हा पंढरपूर ते वाडी अंतर केवळ एका दिवसात पार केले, नव्वद ते शंभर मैल अंतर एका दिवसात? स्वतः डॉक्टर असलेल्या ताटके यांचा हाड्या व्रण आजार त्यांनी बरा केला (हा आजार वैद्यक शास्त्रात असाध्य मानला जातो) असे असंख्य चमत्कार ते प्रत्यक्ष दत्त महाराज असल्याची साक्ष देत आहेत. दत्त साहित्य म्हणाल तर त्याची तुलना कशाशीच करता येत नाही. केवळ आदी शंकराचार्य हे एक नाव त्यांच्या बरोबरीने येते, आणखी कोणी नाही.  


फार पूर्वीची गोष्ट, मी श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे तीर्थरुपांसोबत असताना वेदशास्त्रसंपन्न बापूशास्त्री कोडणीकर यांचेकडे राहण्याचा योग्य आला, थोरल्या महाराजांनी केलेल्या कृष्णा लहरीच्या अर्थावर ते स्वतः बराच वेळ बोलत होते. प्रत्येक ओवीचे चार चार अर्थ, एक विष्णु पक्षे, एक आकाश पक्षे, एक कृष्णामाईला उद्देशून, एक दत्तात्रेय पक्षे. एकेक श्लोक म्हणजे दत्त साहित्यातील एकेक रत्न आहे.


श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज प्रवास करीत करीत श्रीगंगोत्रीला आले (शके १८१६-१७. इ.स. १८९३-९४). श्रीगंगोत्री म्हणजे श्रीगंगामातेचे मंदीर. एका हिमनदीपासून श्रीगंगेचा उगम झाला आहे. या हिमनदीचे पाणी एका गोमुखातून पडण्याची व्यवस्था केली आहे. हा श्रीगंगेचा खरा उगम अतिशय दुर्गम अशा थंड प्रदेशात आहे. सामान्य यात्रेकरूंना तेथपर्यंत जाता येत नाही म्हणून श्रीमदाद्यशंकराचार्यांनी स्वतः जेथे प्रथम स्नान केले तेथेच त्यांनी श्रीगंगोत्रीच्या मंदिराची स्थापना केली. श्रीगंगोत्री मंदिर गोमुखापासून जवळजवळ पंचवीस मैलांच्या अंतरावर आहे. या मंदिराजवळ जे कुंड आहे त्याला भगीरथ शिळा म्हणतात. यात्रेकरू याच कुंडामध्ये स्नान करतात; पण काही यात्रेकरू पुढे जाऊन गोमुखाजवळच्या प्रवाहात स्नान करतात. येथील प्रवाह मूळ हिम नदीचाच प्रवाह असल्यामुळे त्यातील पाणी अतिशय थंड असते.


श्रीस्वामी महाराजानी गोमुखाजवळ स्नान केले. स्नान करताच त्यांचे शरीर हिमदंशाने बधिर झाले व ते पार गारठून गेले. त्यांना कसलीही हालचाल करता येईना. जणूकाही काष्ठवत् किंवा स्थानुवत् अचेतन अवस्था त्यांना प्राप्त झाली. त्यांची ही अवस्था तेथील यात्रेकरूंच्या नजरेला येताच त्यांच्यापैकी कोणीतरी श्रीस्वामीमहाराजांजवळ पेटलेली शेगडी आणून ठेवली. श्रीस्वामीमहाराजांचा देह यावेळी थंडीने येवढा गारठला होता की, त्याला चेतना आणण्यासाठी दिलेल्या आगीच्या शेकाने त्यांच्या अंगावरील शेम जळून काही ठिकाणी कातडीसुद्धा भाजली. बर्याच वेळाने ते भानावर आले. त्यावेळी त्यांच्या कानावर असे शब्द आले, "उठ अग्निजवळ बसून शेकतोस काय?" हे शब्द कानी पडताच ते उठून शेगदीपासून दूर गेले. संन्याशाश्रम स्विकारल्यानंतर संन्याशाने अग्नीला स्पर्श करावयाचा नाही असा नियम असल्यामुळे एवढाच एक नियमभंग आपल्या हातून घडला, असे श्रीस्वामीमहाराज आपल्या उत्तरायुष्यात सांगत असत.


श्रीवासुदवानंदसरस्वती स्वामी महाराजांच्या हिमालय यात्रेतील एक हकीकत श्री. गंगाधरपंत वैद्य यांनी पुढीलप्रमाणे लिहून ठेवली आहे. श्रीस्वामीमहाराज श्रीबद्रीनारायण आदी उत्तर यात्रेला गेले होते. एके दिवसी सोबतची मंडळी पुढे निघून गेली व त्यानी चट्टीवर राहाण्याची जागा वगैरेची आपआपली तजवीज लावून घेतली. मात्र श्रीस्वामीमहाराजांना संध्याकाळचे आन्हिक उरकावयाचे असल्यामुळे ते प्रथम नदीकाठी गेले, आपले सायंकाळचे आन्हिक उरकून जवळ जवळ दोन तासांनी ते चट्टीवर आले. त्यावेळी तेथील चट्टीवर राहण्यास तसूभरही जागा शिल्लक न राहिल्याने चौकीदाराने त्यांना असे सांगितले की "या ठिकाणी आता उतरण्यास एकाही माणसास जागा बाकी राहिली नाही. आपण फार रात्र करून आलात. यामुळे माझा नाईलाज आहे. आपण आपली सोय दुसरीकडे लावून घ्या." हे ऐकताच "ठीक आहे" एवढेच श्रीस्वामीमहाराजांनी त्याला उत्तर दिले. त्यानंतर चट्टीच्या बाहेरच कोठे बसता येईल का व कशाचा तरी आसरा घेता येईल का हे पाहिले. तेव्हा त्यांना भिंतीला बाहेरून एक कोनाडा असल्याचे व त्यात एका माणसाला सहज बसता येईल एवढा तो मोठा असल्याचे लक्षात आले. श्रीस्वामीमहाराज त्या कोनाड्यात बसले व रात्रभर त्यांनी सूर्यभेदी प्राणायाम करून त्या महाभयंकर अशा कडक थंडीचे निवारण केले.


जशी रात्र होत गेली तशी थंडी वाढत गेली व बर्फही पडू लागला. धर्मशाळेच्या आतल्या लोकाना दोन दोन, तीन तीन ब्लँकेटानी सुधा थंडीचे निवारण होईना. कशीबशी रात्र काढली. पहाट झाली. बाहेर श्रीस्वामीमहाराज कुठल्या अवस्थेत दिसतील अशी सर्वांच्या मनात भीती होती. दरवाजा उघडला. सर्व भयभीत नजरेने श्रीस्वामीमहाजांकडे आले. बघतात तर काय? श्रीस्वामीमहाराज ध्यानमग्न बसलेले दिसले व त्यांच्या शरीरावर घामाचे बिंदू दिसत होते!


अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त


श्री वासुदेवानंद सरस्वती

श्री वासुदेवानंद सरस्वती

श्री वासुदेवानंद सरस्वती एक प्रसंग ज्वलंत तेजाचा

एका ठिकाणी श्री प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांच्या  यांच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेण्यास एक महिला ने महाराज समोर इच्छा व्यक्त केली त्या वेळेस श्री स्वामी महाराज म्हणले तसे दर्शन घेता येणार नाही,परत परत ती महिला विनवणी करीत होती त्यावर महाराज म्हणले ठीक आहे उद्या ये आणि सोबत शेरभर ज्वारी घेऊन ये ती हो म्हणाली आणि विचार करू लागली ज्वारी कशा करीता असेल,दूसरे दिवशी ती ज्वारी घेऊन आली आणि महाराज समोर दर्शन करीता उभी राहीली,सर्वांचे दर्शन झाल्यानंतर त्या  महिलाला म्हणले आधी पायावर ज्वारी टाक मग दर्शन घे ज्वारी पायावर टाकताच ज्वारी फुटून लाह्यांचा ढीग झाला आणि महाराज म्हणले घे दर्शन आता....


महिलाने दर्शन न घेताच हाथ जोडले. 

याचे कारण संन्यासाचे दर्शन महिलाना पायावर डोके ठेऊन घेता येत नाही.


श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व शास्त्रपालन

श्रीशास्रीबुवांनी जेव्हा तो प्रसाद घ्यावयाचे नाकारले तेव्हा सौ. अन्नपूर्णाबाई त्यांना असे म्हणाल्या की, "हा प्रसाद आहे, पाहिजे तर आता खाऊ नका, पण तो घेऊन बांधुन ठेवा."त्यांच्या सांगण्याप्रमाणे श्रीशास्रीबुवांनी तो प्रसाद फडक्यात बांधुन ठेऊन दिला.मात्र त्यांनी तो ग्रहण केला नाही. उभयतांनी एका धर्मशाळेत मुक्काम केला होता. रात्री स्वप्नात श्रीपांडुरंगाने येऊन त्यांना असे विचारले की, "आमचा प्रसाद तुम्ही का ग्रहण केला नाही?" हे ऐकताच बुवा असे म्हणाले की, "तो प्रसाद बाजारच्या भाजलेल्या डाळ्यांचा होता. असे बाजारातील ओले करून भाजलेले डाळे ब्राह्मणाने खाऊ नये असे शास्त्राने सांगितले असुन, हे शास्त्र आपणच निर्माण केले आहे. आम्ही ते पाळतो. शास्त्रपालनासाठी आपल्या हातच्या प्रसादाचा अवमान करावा लागत आहे या बद्दल क्षमा असावी. पण शास्त्रपालनाचे ब्रीद आम्ही सोडणार नाही." बरे तर! नका खाऊ." असे म्हणून श्रीदेव अदृश्य झाले. सकाळी जागे झाल्यावर बुवांनी प्रसादाची पुरचुंडी शोधली, पण ती नाहीशी झाली होती. श्रीदेवांनी आपला प्रसाद परत नेला होता.


अशा प्रकारे श्रीस्वामीमहाराजांनी उभ्या आयुष्यभर कटाक्षाने व काटेकोरपणे शास्त्रपरिपालन केले. या बाबतीत त्यांनी माणसाशी तर नाहीच नाही, परंतु श्रीदेवांशीही कधी तडजोड केली नाही आणि ते आपल्या निश्चयापासून कधी ही ढळले नाहीत. श्रीक्षेत्र पंढरपूरहुन श्रीशास्रीबुवा बार्शीला श्रीअंबरीषवरदाचे दर्शन घ्यावयाला गेले. येथे श्रीक्षेत्र माणगावचे श्री दत्तुशास्री साधले रहात होते. त्यांनी श्रीशास्रीबुवांना पाहीले. आपल्या मातृभूमीच्या सुपुत्राची भेट झाली म्हणून त्यांना आनंद झाला. श्रीवासुदेवशास्री यांनी काही दिवस आपल्या घरी रहावे असा श्री. साधल्यानी त्यांना आग्रह केला. त्याप्रमाणे ते तीन दिवस त्यांच्या घरी राहिले. त्याकाळात एके दिवशी श्री.साधले बुवांना वाटखर्चासाठी सहा रुपये देऊ लागले, पण त्यांनी ते पैसे घेण्याचे नाकारले. शेवटी बुवा बाहेर गेल्याचे पाहून श्रीदत्तुशास्त्री यांनी ते पैसे बुवांच्या नकळत त्यांच्या करंड्यात ठेवले. बुवा बाहेरून येताच ते श्री दत्तुशास्री यांना असे म्हणाले की," आमच्या श्रीदेवांना आता द्रव्य संग्रह करावा असे वाटू लागले आहे." हे ऐकुन आपल्या अपरोक्ष घडलेल्या गोष्टीसुद्धा जाणण्याच्या श्रीशास्रीबुवांच्या सामर्थ्य बद्दल श्रीदत्तुशास्री यांना फार आश्चर्य वाटले.


अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज व यतिचक्रवर्ती वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज

श्री कस्तुरे यांनी यतीश्वर परियात्रा या स्वामी महाराजांच्या चरित्रात एक स्वप्नदृष्टांत सांगितलेला आहे. वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांच्या स्वप्नात एकदा अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आले. त्यांनी जेव्हा दत्तप्रभूंना विचारणा केली की, हे कोण आहेत? तेव्हा दत्तप्रभूंनी उत्तर दिले की, ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज असून ते म्हणजे माझाच दत्तावतार आहेत. हे लक्षात घेऊन तू त्यांच्या दर्शनाला जा. अर्थात दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार यतिचक्रवर्ती वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला गेले व त्यांचे मन प्रसन्न झाले.


श्रीगुरुस्तोत्र

भावें नमूं श्रीगुरुच्या पदासी । जे आपदासी हरि दे पदांसी ।

दासीपरी श्री नमि ज्या पदांसी । यासी भजे तो नमितों पदांसी ॥ १ ॥


सततविनतगम्य श्रेष्ठ दुष्टां अगम्य । सदयहृदयलभ्य प्रार्थिती ज्यासी सभ्य ।

समद विमद होती यत्प्रसादे न हो ती । कुगति सुगति देती त्या पदा हे विनंती ॥ २ ॥


गुरुपदा विपदापहरा सदा । अभयदा भयदामयदारदा ।

हृतवदान्यमदा तव दास्य दे । अमददा गदहा न कुदास्य दे ॥ ३ ॥


नमस्ते भवारे नमस्ते शतारे । नमस्तेऽघवैरे प्रशस्तेष्टकर्त्रे ।

नमस्ते खलारे विहस्तेष्टदात्रे । नमस्तेऽरिवैरे समस्तेष्टसत्रे ॥ ४ ॥


गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी । गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी ।

सतत विनत होतां वारि जें आपदांसी । सतत विनत होऊं आम्हीं ही त्या पदांसी ॥ ५ ॥


भावें पठति जे लोक हें गुरुस्तोत्रपंचक । तयां होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें ॥ ६ ॥


॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीविरचितं श्रीगुरुस्तोत्रं संपूर्णम् ॥


॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥


प. पू. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांचा हिमालय यात्रेतील प्रसंग 

श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज हे पराकोटीचे दत्तोपासक आणि दत्तभक्त होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे दत्तमय आणि दत्त आज्ञेत होते. दत्त महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय ते कुठलेही कार्य करत नसत आणि यदा कदा दत्तात्रेयांच्या आज्ञेचं उल्लंघन झालेच तर तात्काळ त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नसे. स्वामी महाराज संपूर्ण दत्तमय होते. ही भक्तीची सगळ्यात श्रेष्ठ अवस्था आहे जिथे भक्त आणि भगवंत ह्यात काही अंतर राहत नाही आणि म्हणूनच स्वामी महाराज साक्षात दत्तस्वरूपच आहेत. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजानी आसेतु हिमाचल पायी प्रवास केला. हा संपूर्ण प्रवास दत्त महाराजांच्या आज्ञेने आणि अक्षरशः त्यांच्या सांगण्याप्रमाणे होत असे. ह्याच प्रवासात स्वामी महाराज त्यांच्या हिमालयातील वास्तव्यात असतानाचा हा एक प्रसंग आहे.


प. पू. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज एकदा हिमालयाच्या एका तळाच्या काठावरून जात असताना अचानक त्यांना त्या अर्ध बर्फाच्छादित हिमतळाच्या थरावर कंपने आढळली ती पाहून एका एकी स्वामी महाराज स्तब्ध झाले हळू हळू ती कंपने वाढत गेली आणि थोड्याच वेळात त्या अर्ध बर्फाच्छादित जलाशयातून एक सिद्ध योगी वर आले आणि स्वामी महाराजांना पाहून त्यांनी नमस्कार केला आणि भाष्य केले कि आम्ही अनेकानेक वर्षांपासून अगम्य अश्या ठिकाणी बसून तपस्या करीत आहोत तरी सृष्टी मध्ये होणारे बदल आणि शक्तींची उलाढाल आम्हाला ज्ञात आहे. तसेच कलियुगातील अवधूतांचे साक्षात अवतारस्वरूप आपण प. पू. वासुदेवानंदसरस्वती स्वामी ह्या नावाने आसेतु हिमाचल लोकोधारार्थ यती रुपात संचार करीत आहात हे आम्हाला अंतरज्ञानाने कळले आहे. अशा परमहंस चिन्मय मूर्तीचे दर्शन झाले हे आमच्या तपचरणाचे फळ आहे. असे म्हणून त्या सिद्ध योग्याने पुनश्च स्वामी महाराजांना वंदन केले. स्वामी महाराजांनी नारायण असा आशीर्वाद दिला आणि ते योगी आपल्या तपःस्थानी तळाच्या आत पुन्हा तपश्चर्येत विलीन झाले आणि स्वामी महाराज तिथून निघून गेले.


श्रीगुरूमहराजांचा शिष्यपरिवार

श्रीगुरूमहराजांचा शिष्यपरिवार

श्री प.प.वासुदेवानंद सरस्वती स्वामी श्रीगुरूमहराजांचा शिष्यपरिवार

१ प. प. श्रीप्रज्ञानंदसरस्वती (मोघे) स्वामी, दुर्गाघाट काशी 

२ श्री विनायक रामचंद्र तथा प. प. श्रीपूर्णानंदसरस्वती (पेंडसे) स्वामी, आयनी - मेटे 

३ श्री नारायण लक्ष्मण तथा प. प. श्री नृसिंहानंदसरस्वती (दीक्षित) स्वामी, औरवाड  

४ प. प. श्री नारायणदत्तानंदनंदसरस्वती स्वामी, नायकोटवाडी  

५ श्री पू. वामनराव तथा बाबाजीमहाराज ग्रामस्थ, लोधीखेडा  

६ श्री विष्णू गोविंद तथा प. प. श्रीआत्मानंदतीर्थ (मोघे) स्वामी, गढवाल, उत्तरकाशी   

७ श्री कल्याणभाई देसाई तथा प. प. श्री योगानंदसरस्वती (गांडा), स्वामी, गुंज  

८ श्री पू. धुंडीराजमहाराज कवीश्वर, नृसिंहवाडी     

९ श्री पू. योगिराज वामनराव दत्तात्रेय गुळवणीमहाराज, पुणे 

१० ब्रह्मचारी, राजयोगी श्रीसीतारामबुवा टेंब्ये, झिरी 

११ श्री पू. पांडुरंग वि वळामे तथा श्रीरंगावधूतमहाराज, नारेश्वर     

१२ श्री पू मार्तंड शं जोशी तथा नानामहाराज तराणेकर, इन्दौर 

१३ श्री ह. भ. प. विष्णुबुवा कृ पटवर्धन मौजे पोम्हेंडी खु 

१४ श्री पू.गणेशपंत व्यं सातवळेकर, कोलगाव  

१५श्री पू. गोपाळबुवा राजाध्यक्ष, (पंडित) सोलगाव  

१६ ब्र. योगिवर श्रीनरहरी वा दिवाण तथा दत्तमहाराज अष्टेकर, आष्टा   

१७ श्री पू.गोविंदमहाराज पंडित, सिप्री   

१८ श्री शंकर शास्त्री कुलकर्णी तथा प. प. श्री जगदगुरु शंकराचार्यस्वामी, शिरोळकर  

१९ श्री पू.कृष्णाजी सखाराम तथा प. प. श्रीशिवानंद (टेंब्ये) स्वामी, पांगरे   

२० श्री.पू.सखाराम रामचंद्र तथा प. प. श्री केशवानंदसरस्वती (तांबे) स्वामी, इन्दौर 

२१ श्री पू. वामनराव विष्णू तथा काकामहाराज खानोलकर,साळगाव   

२२ श्री पू. निळकंठ अनंत तथा भाऊमहाराज करंदीकर, बोरीवली – खोपोली.


नर्मदा माता व थोरले स्वामी महाराज, शके १८१८ (ई.स. १८९६) मधील एक हृद्य प्रसंग

ब्रम्हावर्तांत गंगातीरीं श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांनी आपल्या तीरावरही यावे असें नर्मदा नदीला वाटून तिनें महाराजांना दृष्टांत देऊन आपली इच्छा कळवली. पण तिकडे महाराजांनी लक्ष दिले नाही. पुढे एकाएकी असा चमत्कार घडला की, एका ब्राम्हणाच्या अंगावर फोड झाले होते व तो फार गांजला होता. त्याला कोणीतरी सांगीतले की तू महाराजांच्या पायांचे तीर्थ घेतले तर तुझा रोग बरा होईल. तो ब्राम्हण संधीची वाट पाहूं लागला.


एके दिवशीं महाराज लिहिण्यास मांडी उपडी करून बसले होते. त्या वेळी त्यांचे पाय मागें होते. ब्राम्हणानें ती संधी साधून पाठीमागे जाऊन महाराजांच्या पायांवर पाणी घातलें व त्यांना शिवून ते सर्व तीर्थजल गोळा करून पिऊन टाकले व अंगाला लावले. महाराजांनी एकदम मागे वळून असे करण्याचे कारण त्या ब्राम्हणाला विचारले, तेव्हा त्याने व्याधींच्या परिहार्थ एकाच्या सांगण्यावरून आपण असे केले आहे, असे सांगून अपराधाची क्षमा मागितली. महाराज लगेच उठून गंगेवर जाऊन स्नान करून आले पण त्यांच्या चित्तास समाधान वाटेना. रात्री स्वप्नांत एक चांडाळीण महाराजांना शिवली. त्यांनी लगेच उठून देवाचे ध्यान केले. सकाळी उठून पहातात तों सर्व अंगभर फोड उठले आहेत. त्या रात्री द्रृष्टांत झाला कीं 'अनअधिकारी माणसाला पायाचें तीर्थ दिल्यामुळे हा त्रास भोगावा लागला. तथापि हे कृत्य बुद्धिपूर्वक घडलेलें नाहीं. करितां तीन दिवस नर्मदेचे स्नान केल्यावर शरीर पूर्ववत् चांगले होईल"


त्याप्रमाणे गंगेची अनुज्ञा घेऊन महाराज किनारी येण्याकरितां ब्रम्हावर्ताहून निघाले. महाराज नर्मदातीरीं नेमावर येथें येऊन पोंचले व नर्मदामातेची नमस्कारपूर्वक प्रार्थना केली कीं 'माझ्या थोड्या अपराधाबद्दल केवढी  ही कडक शिक्षा केली? माझ्याशिवाय तुझें महत्व वाढविणारा दुसरा कोणी नाही काय?' अशी प्रार्थना करून तिथे मुक्काम केला. तीन दिवसांत नर्मदामातेच्या स्नानानें तो विस्फोटक रोग बरा झाला. त्यावेळी नर्मदालहरी म्हणून नर्मदेची स्तुती केली.

नेमावर हे नर्मदेचे नाभी नाभिस्थान असून तेथे सिद्धेश्वर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे.


संदर्भ ग्रंथ: श्री गुरुदेव चरित्र, विद्यावाचस्पती, श्री दत्तात्रय कवीश्वर शास्री


श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रवास, अद्भुत अनुभव

खरेराहुन श्रीस्वामीमहाराज काशीच्या वाटेला लागले. येथून काशीला जाण्याचा मार्ग अतिशय खडतर होता. दोन-तीन दिवसांची वाट होती व तीही जंगलातून जात होती. श्वापदांची भीतीही होती. त्यामुळे सर्व मंडळींनी श्रीस्वामीमहाराजांना असा आग्रह केला की," रेल्वे झाल्यापासून या पायवाटेने कोणीही प्रवास करीत नाही. वाटेत घनघोर जंगल असून तेथे हिंस्र पशुंचा त्रासही होतो. शिवाय प्रवासात दोन-तीन दिवस एकही गाव लागत नाही. तरी आपण पायवाटेने प्रवास न करता रेल्वेनेच प्रवास करावा."


खरेऱ्यातील सर्व मंडळींनी असा प्रेमाने आग्रह केला असला तरी त्या सर्वांना श्रीस्वामीमहाराज असे म्हणाले की," आतापर्यंतचा प्रवास श्रीदत्तमहाराजांच्या आज्ञेने पायीच झाला आहे. यापुढेही तो पायीच होईल. सन्याशांनी वाहनातून प्रवास करु नये अशी शास्त्राज्ञा आहे. यापुढे श्रीदत्तप्रभूंच्या इच्छेला येईल तसेच घडेल." असे सर्व मंडळींना सांगून त्यांनी आपला पुढील प्रवास पायवाटेने सुरु केला.काशीची वाट बिकट होती, पण श्रीस्वामीमहाराजांना त्याचे काय? त्यांनी भगवान श्रीदत्तात्रेयाचे स्मरण करीत आपला मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली होती. वाटेत घोर अरण्य लागले, पण श्रीस्वामीमहाराजांना भीती कशाची आणि कोणाची? सर्व विश्वाशी एकरुप झालेल्या, त्यांना अरण्य काय आणि वस्ती असलेले गाव काय? त्यांच्या लेखी दोन्ही परमेश्वराचीच रुपे होती.


आपल्या भक्ताची काळजी भक्तवत्सल प्रभूला होती. त्यावेळी अरण्यातून प्रवास करीत असताना एक भिल्ल श्रीस्वामीमहाराजांसमोर आला आणि नमस्कार करून कोठपर्यंत प्रवास करणार अशी त्याने चौकशी केली. आपण काशीला जावयाला निघालो आहोत, असे श्रीस्वामीमहाराजांनी त्याला सांगताच तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की," स्वामीमहाराज! काशी येथून फार दूर आहे. कमीतकमी तीनचार दिवस तरी तुम्हाला हे अरण्य तुडवीत जावे लागेल. माझ्या मागुन या. मी तुम्हाला अगदी जवळची वाट दाखवितो. माझ्या पाठीमागून या म्हणजे झाले." असे म्हणून तो भिल्ल पुढे चालू लागला व श्रीस्वामीमहाराज त्याच्या पाठीमागून चालू लागले. दोनतीन तास त्या भिल्लाबरोबर चालून गेल्यावर एक लहानशी टेकडी उतरून ते दोघे खाली आले. तेथून समोर दिसणाऱ्या गावाकडे बोट दाखवून तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की," त्या समोर दिसणाऱ्या गावात गेल्यावर तेथून जो रस्ता पुढे जातो तो सरळ काशीला जातो. "असे म्हणून तो भिल्ल मागे वळलाव अरण्यात दिसेनासा झाला. श्रीस्वामीमहाराज पुढे चालू लागले व त्या गावात आले. तेथे आल्यावर त्यांना असे कळले की, तीन चार दिवसांची वाट आपण काही घटकांमध्येच चालून आलो आहोत. तेव्हा त्यांना प्रभूंची अतर्क्य लीला व त्याचे कौतुक पाहून त्याचे फार आश्चर्य वाटले. तो भिल्ल म्हणजे प्रत्यक्ष श्रीदत्तमहाराजच असावेत असे त्यांना खात्रीने वाटले. प्रभूंची माया एवढी अगम्य असते की, प्रत्यक्ष आपल्या लाडक्या भक्तालाही ते आपणा स्वतःची ओळख पटू देत नाहीत.


श्री टेबें स्वामी महाराज व वैनगंगा

विदर्भातील पद्मावती/पवनी नावाचे प्राचीन नगर वैनगंगा आहे. इथ मध्यप्रदेशातील सिवनी येथे उगम पावलेली ही नदी दक्षिणवाहिनी आहे. पवनीस ती पूर्ववाहिनी होवुन वाहते म्हणुन मोठ्ठ धार्मिक महत्व आलेल हजारो वर्षापासुनच हिंदू, बोद्ध धर्मिंयासाठी. एकोणीसावे शतकातील कथा. गावात एक स्वामी आले. पूर्ववाहिनी वैनगंगा अन, गावातील तीन शतकाच्यां वर असलेली सुंदर स्थापत्याची वेगवेगळी मंदिरे. बघताच त्याना प्रसन्नसे वाटले. अन त्यांनी ठरवले "रहावे इथे", मुक्काम पडला मग त्यांचा. वैनगंगा तीरावरील वैजेश्वराचे मंदिर. स्वयंभू अन जागृत होते. त्यासमोर घाट होता. त्या ठिकाणी एक स्थान होते. तिथे बेलपान वाहिले तर ते बरोबर बुडे तिथे. त्या स्थळी सारे तो चमत्कार स्वहस्ते प्रात्यक्षिक करुन पहात. त्या वैजेश्वराच्या मंदिरात ते उतरले.

अपरिचित होते ते इथे. कोणीही ओळखिचे नव्हते. अलिप्तपणे वागत गावकरी. निर्मोही व अलिप्त ते. त्यांना त्याचे काहीही वाटत नव्हते. रोजचे कर्म शांतचित्ताने चालु होते त्यांचे.


एके दिवशी स्वामींनी पाण्यात पाय घातले. बर वाटल त्यांना. गारेगार पाणी. अन क्षुधा तृषा शांत झाल्या सारखी वाटली. सलग उपवास घडलेला होता दोनतीन दिवस. आजचा चौथा दिवस. "ईश्वरी मर्जी" त्यांनी विचार केला. दत्तगुरो म्हणत ते बाहेर आले. अन ते भिक्षा मागावयास गेले. त्यांची महती कोणी जानत नव्हते. अन निर्मळ, निर्मोही, निर्व्याज्य, असे ते कोणासही सांगत नव्हते. निव्वळ शांत रहात, शांतमुर्ती. 


आजही ते एका घरासमोर उभे राहिले. भिक्षा मागताना रोजच्या सारखच हिडीस फिडीस केल गेल त्यांना. अन आतुन एक स्त्री बाहेर आली जलपात्र घेवुन. कोण आले त्यांना द्यावयास. माहेरी आलेली मुलगी होती ती. बाहेर आली, कोण आले ते पाहवयास. अन तिने स्वामींना ओळखले. "इथे हे कसे?" आश्चर्य चकित ती ! "अरे देवा!" मनातच बोलली ती. "अय्या ब्रम्हावर्ती पाहिले कि ह्यांना आपण !" ती पुटपुटली, अन स्वामींना आत यान ! बोलली. अन वडीलांकडे पहात म्हणाली, "अण्णा, हे थोर स्वामी." अन तिने बसण्यास पाट दिला, पाय धुतले, दुधाचा मोठा पितळी पेला समोर आणुन ठेवला. अन स्नेहादराने बोलली, "घ्या न गोरस!" तिचे अगत्यशील वागणे पाहुन ते प्रसन्न झाले. "सुखी रहा बाळ" आर्शीवाद दिधला.


अन स्वामी नजरेसमोरुन हटताच तिने वडीलांना "काय हे वागणे तुमचे? बरोबर नाही बरे ! मोठ्ठे स्वामी ते! ब्रह्मावर्ती पाहिलेन मी. त्यांचा सन्मान करणे सोडुन अपमान कसा करता बरे?" त्यांचा झालेला मान सन्मान पाहिलेले सारेकाही तिने वर्णन करुन सांगीतले..


अन अण्णा तर्फे सारृया गावास कळले. शिडशिडीत दिसणारे, रागीट वाटणारे, तरी प्रेमळ असणारे, कट्टर धर्माचरण करणारे, शुद्ध तपाचरणी, किर्तीपताका प्रसिद्ध, एकटेच वैजेश्वरास राहणारे, मोठ्ठे स्वामी चार्तुमास करण्यासाठी गावात आलेलेत. हे श्री टेंबे स्वामी महाराज मुळ कोकणातील माणगावचे. आपला तेरावा चार्तुमास करावयास पवनीस आलेले. पण आरंभी उपेक्षा अन अपमानास सामोरे जावे लागले. मग मात्र कौतुकाने डोक्यावर घेतले. संन्याशी जणांना दोन तीन दिवसांशिवाय कुठेही मुक्काम करणे मना, वर्ज्य. चालत पावसाळ्यात जाणार कसे अन कुठे? म्हणुन केलेली ही धर्मसोय. संन्याशी जणांचा चार्तुमास दोन महिन्यांचा. आषाढी ते भाद्रपद पोर्णिमा पर्यंत. अन जवळ नदी असावा हा संकेत. मुख्यसा नदी नाले ओढे वाहत असलेले, प्रचंड पाऊस म्हणुन दोन महिने मुक्काम करावयाची सोय धर्माज्ञेने झालेली. मग एखाद्या मंदिरात, धर्मशाळेत कुटीत, झोपडीत मुक्काम करावा. धर्मचर्चा धर्मगोष्टी कराव्या किर्तने प्रवचने, उपासना, आराधना करावी. लोकांस उपदेश द्यावा, धर्माचरण शिकवावे, मार्गप्रवाही करवुन द्यावे. हा असा चार्तुमास साजरा करीत असत. पुराण, प्रवचने, किर्तने, यज्ञयाग स्वामीपाद्यपुजा, सवाष्ण पुजन, चोळी बांगडी नववार देवुन ब्राह्मणपुजन, अन्नदान, हे व्यवस्थित केल्या गेले, पवनीत स्वामीच्यां देखरेखीखाली.


स्वामी कर्तव्यकठोर धर्माचरणी |

पण जनांसाठी दयाळू मायाळु ||

भासता उग्र पण मउ मवाळसे |

शांतमुर्ती प्रेमळु भक्त प्रतिपाळु ||


१९०९ मधे हा चार्तुमास अधिकमास आल्याने पवनीत तीन महिने केला गेला. श्री दशपुत्रे ह्यांच विठ्ठल रुक्मिणी मंदिर होत ते. दिवसभर तिथल्या औंदुबराखाली बसत अन रात्रो मंदिरात वास्तव्यास असत. पवनीत दत्तमंदिर नव्हते म्हणुन त्यांनी स्वहस्ते दत्तयंत्र तयार करवुन दिले. त्यावर दत्तमंदिर उभारण्यास सांगीतले. १९०९ मधली स्थापना मंदिरातील पंचधातुच्या दत्तगुरु मुर्तीची ती चोरी गेली. मग १९७८ मधे संगमवराची मुर्ती बसवण्यात आली. हिची उपासना त्वरित फळते असा दत्तोपासकांचा अनुभव !


त्या वेळी ज्या पाटावर बसुन ते सांगत, अनुष्ठानास बसत तो पवित्र पाट आजही सुस्थितीत आहे. अन भाविक जन तो पहावयास लांबलाबोंनी येताती. अजुनही तेथिल दत्त मंदिर परिसरातील पान खिडकीच्या वैनगंगा घाटावर ते स्नानास जात. अजुनहि सुस्थितित आहे हा घाट. वास्तव्यात असताना सुंदरसे असे. वैन्यास्तौत्रम त्यांनी रचलेले.


दत्तोपासनेवर स्वामीनीं काय काय लिहलेले ते तुम्हांआम्हास ठावुके. पण मी त्यांना लहानपणापासून ओळखते त्रिपदीवाले स्वामी महाराज म्हणुन. नुस्त त्रिपदी शब्दोच्चार केला की स्वामींची ती आर्त भावाकुल सुंदरखाशी त्रिदत्तपद डोळ्यासमोर येतात. अन रचलेली असंख्य संस्कृत/मराठी स्तुतीस्त्रौत्रम गुणगुणावीशी वाटणारी.


स्वामीचां श्रावण वद्य पंचमी शके १७७६ मंजे १३-१-८-१८५४ मधे जन्म झालेला. माणगावी कोकणात बडोदा जवळ गरुडेश्वरला ते २४-६-१९१४ ला समाधिस्त झाले. अन पत्निच्या मृत्यु नतंर चौदाव्या दिवशी ऊज्जयिनिच्या नारायणानंद सरस्वती स्वामींकडुन संन्याशदिक्षा घेतली.

स्वामींनी भारतभर भ्रमण केले. आनेकांचे ऐहिक अन पारलौकिक हित केले. नदीकिनारी अठरा चार्तुमास केले. भरभक्कम उंदड लिखाण केले. दत्तगुरु मुर्ती बोलतसे ह्यांच्याशी. वरुन जसा आदेश/आज्ञा येई तसे ते वागत.


पूर्ववाहिनी वैनगंगे पवित्रा तु ।

विदर्भातली मुख्य सरिता तु ।।

कित्ती इतिहास जलीजपला ।

भावबळे नमन माते तुजला ।।


त्या वैनगंगेस, वेन्ना, वेण्णा अशीही नाव बर का तिची जलदेस काय मागावे? प्रत्यक्ष दत्तावतार असलेल्याचें स्वामीपाय लागले तुझ्या जलास. आधीच पवित्र सरिता म्हणुन नावलौकिक तुझा पसरलासे. त्यात स्वामीचां सहवास घडलासे. .आम्ही येवु तर तुझ्या पुण्यपावन जलाने कर पवित्र आम्हांस गे. मनोमालिन्य जावो निघुन. स्वच्छ कर जन्मोजन्मीची आत्म्यावरची धुळ काढुन.


अन श्री वासुदेवानंद स्वामी महाराजांस काय मागावे? हे टेबेंस्वामी द्या त्या आदिगुरोची दत्तगुरु ची निस्वार्थ भक्ति. अन कठोर तपाचरण करण्याची शक्ति. आन धर्ममार्गावर चालण्याची युक्ती.

तव पदि नमवु माथां, तुम्हास  दडंवत. दत्तावतारी स्वामी, त्रिवार नमन.


आदिगुरुस दत्तगुरुस तनुमनुआत्मनाहृदयु दंडवत !


जन्म पत्रिका सद्गुरू बदलू शकतात

गुरुसान्निध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असू द्या. जर शिष्याने गुरुसेवा ही ईश्वरसेवा समजून केली तर गुरूंचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते. सामान्य मनुष्य किंवा ज्योतिषी त्यात बदल करू शकत नाही. दत्त अवतार वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींच्या बाबतीत घडलेली ही सत्य घटना आहे. एका स्त्रीचा मुलगा खूप आजारी पडला. ती एका ज्योतिषाकडे गेली असता त्याने  मुलाच्या पत्रिकेत त्यावेळी मृत्यूयोग असल्याचे सांगितले. ती बाई रडत टेंबे स्वामींकडे गेली. स्वामींनी पत्रिका पाहिली. व स्वतः पत्रिकेतील ग्रहांची स्थाने बदलून नवी पत्रिका मांडली. त्यांच्या या कृतीने मुलाचा मृत्यूयोग टळला. 


जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते. कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते. पण प्रवाशाचे ते नसते. तसेच या सद्गुरुंच्या शक्तीचे आहे. म्हणून गुरूंचा अधिकार आणि आधार ईश्वरापेक्षा मोठा असतो. शिष्याने गुरूंना केव्हाही कोठूनही हाक मारली तरी गुरू त्याच्या मदतीला धावून जाणारच. पण आपल्या हाकेत ती श्रध्दा, ती आर्तता असली पाहिजे! 


गुरुकृपा हि केवलम् ! शिष्य परम मंगलम् !


श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व दत्तमहाराजांचं सानिध्य

खरेराहुन श्रीस्वामीमहाराज काशीच्या वाटेला लागले. येथून काशीला जाण्याचा मार्ग अतिशय खडतर होता. दोन-तीन दिवसांची वाट होती व तीही जंगलातून जात होती. श्वापदांची भीतीही होती. त्यामुळे सर्व मंडळींनी श्रीस्वामीमहाराजांना असा आग्रह केला की," रेल्वे झाल्यापासून या पायवाटेने कोणीही प्रवास करीत नाही. वाटेत घनघोर जंगल असून तेथे हिंस्र पशुंचा त्रासही होतो. शिवाय प्रवासात दोन-तीन दिवस एकही गाव लागत नाही. तरी आपण पायवाटेने प्रवास न करता रेल्वेनेच प्रवास करावा."


खरेऱ्यातील सर्व मंडळींनी असा प्रेमाने आग्रह केला असला तरी त्या सर्वांना श्रीस्वामीमहाराज असे म्हणाले की," आतापर्यंतचा प्रवास श्रीदत्तमहाराजांच्या आज्ञेने पायीच झाला आहे. यापुढेही तो पायीच होईल. सन्याशांनी वाहनातून प्रवास करु नये अशी शास्त्राज्ञा आहे. यापुढे श्रीदत्तप्रभूंच्या इच्छेला येईल तसेच घडेल." असे सर्व मंडळींना सांगून त्यांनी आपला पुढील प्रवास पायवाटेने सुरु केला. काशीची वाट बिकट होती, पण श्रीस्वामीमहाराजांना त्याचे काय? त्यांनी भगवान श्रीदत्तात्रेयाचे स्मरण करीत आपला मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली होती. वाटेत घोर अरण्य लागले, पण श्रीस्वामीमहाराजांना भीती कशाची आणि कोणाची? सर्व विश्वाशी एकरुप झालेल्या, त्यांना अरण्य काय आणि वस्ती असलेले गाव काय? त्यांच्या लेखी दोन्ही परमेश्वराचीच रुपे होती.


आपल्या भक्ताची काळजी भक्तवत्सल प्रभूला होती. त्यावेळी अरण्यातून प्रवास करीत असताना एक भिल्ल श्रीस्वामीमहाराजांसमोर आला आणि नमस्कार करून कोठपर्यंत प्रवास करणार अशी त्याने चौकशी केली. आपण काशीला जावयाला निघालो आहोत, असे श्रीस्वामीमहाराजांनी त्याला सांगताच तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की," स्वामीमहाराज! काशी येथून फार दूर आहे. कमीतकमी तीनचार दिवस तरी तुम्हाला हे अरण्य तुडवीत जावे लागेल. माझ्या मागुन या. मी तुम्हाला अगदी जवळची वाट दाखवितो. माझ्या पाठीमागून या म्हणजे झाले." असे म्हणून तो भिल्ल पुढे चालू लागला व श्रीस्वामीमहाराज त्याच्या पाठीमागून चालू लागले. दोनतीन तास त्या भिल्लाबरोबर चालून गेल्यावर एक लहानशी टेकडी उतरून ते दोघे खाली आले. तेथून समोर दिसणाऱ्या गावाकडे बोट दाखवून तो भिल्ल त्यांना असे म्हणाला की," त्या समोर दिसणाऱ्या गावात गेल्यावर तेथून जो रस्ता पुढे जातो तो सरळ काशीला जातो." असे म्हणून तो भिल्ल मागे वळलाव अरण्यात दिसेनासा झाला. श्रीस्वामीमहाराज पुढे चालू लागले व त्या गावात आले. तेथे आल्यावर त्यांना असे कळले की, तीन चार दिवसांची वाट आपण काही घटकांमध्येच चालून आलो आहोत. तेव्हा त्यांना प्रभूंची अतर्क्य लीला व त्याचे कौतुक पाहून त्याचे फार आश्चर्य वाटले. तो भिल्ल म्हणजे प्रत्यक्ष श्रीदत्तमहाराजच असावेत असे त्यांना खात्रीने वाटले. प्रभूंची माया एवढी अगम्य असते की, प्रत्यक्ष आपल्या लाडक्या भक्तालाही ते आपणा स्वतःची ओळख पटू देत नाहीत.


श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी सौ. अन्नपुर्णाबाईंना श्री कुंभारस्वामींचे दर्शन घडविले

देवाच्या आज्ञेचे नुसार वाडीतील आपला एक वर्षाचा मुक्काम संपवून श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सपत्निक ऊत्तरेच्या दिशेने निघाले. कोल्हापूरला आल्यावर धर्मशाळेत ऊतरून पंचगंगेवर दोघे ही स्नानास निघाले. सौ. अन्नपुर्णाबाईंना कोल्हापूर ईथे श्री कुंभार स्वामी म्हणजे श्रीकृष्ण सरस्वतीस्वामी महाराज असतात याची कल्पना होती त्यांचे दर्शन झाले असते तर किती बरे झाले असते असा एक विचार त्यांच्या मनात आला तोच सौ. अन्नपुर्णाबाईंच्या दिशेने एक अवलिया धावत आला आणि त्यांच्या जवळील असलेला तांब्या हिसकावून घेऊन नदी पात्रातून पाणी घेतले आणि पाणी प्याले व परत धावत येऊन त्यांचा त्यांना तांब्या परत केला आणि निघून गेले. सौ. अन्नपुर्णाबाई हे सर्व अवाक होऊन पहातच राहिल्या कोण असेल हा आवलिया या विचारात असतांना आणि श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी कडे प्रश्नार्थक नजरेने पहाताच शास्त्रीबुवा लगेच म्हणाले हे सदगुरू कुंभारस्वामी होते. सौ. अन्नपुर्णाबाईनां आपल्या मनातील ईच्छा एवढ्या लवकर पुर्ण होईल याचे आश्चर्य व समाधान ही वाटले. खरच श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी हे कुणाच्या मनात काय सुरू आहे हे ओळखत होते. म्हणूनतर त्यांनी सौ. अन्नपुर्णाबाईंची ईच्छा त्वरीत पुर्ण केली.


श्री. प. प. नृसिंहसरस्वती (दीक्षित) स्वामी कृत


श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती

जय जय श्रीमदगुरूवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।।

वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।।


सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।।

वसस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मनसे ।। जय जय ।। १ ।।


मुक्ताहारो ब्रह्म्वाह्को वैराडरूपधर ।। 

भक्तराज हृद्ध्वांत तमोहृत स्वीकुरु मां च हर ।। जय जय ।। २ ।।


पक्षस्यैके वातेनैते भीता: काकाधा: ।। 

पलायितास्ते द्रुतं प्रभावात् भवंति चादृश्या: ।। जय जय ।। ३ ।।


एवं सति खलु बालस्तेहं ग्रसित: कामाधै: ।

मातस्त्वरया चोध्दर कृपया प्रेषितशांत्याधै: ।। जय जय ।। ४ ।।


दासस्ते नरसिंहसरस्वती याचे श्रीचरणम् ।।

भक्तिश्रद्धे वासस्ते हृदि सततं मे शरणम् ।। जय जय ।। ५ ।।





*एक योगी रूपातील महापुरुष!*

---------------------------------------

श्री परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज यांचे अफाट त्याग कार्य व सेवा कार्य आपण सर्व जाणतोच. तशीच त्यांची श्री दत्तत्रेयांप्रती असलेली श्रद्धा, वात्सल्य, दृढ़ता आणि अपार विश्वास हा सर्वश्रुत आहे. या विराट त्यागाच्या कणांची उर्जा आपल्या सारख्या दत्त प्रेमीं साठी साक्षात ब्रम्हचैतन्य प्रदान करणारी आहे. 

अशा या पुण्यवंत तपोयोगींनी त्यागाचा ही महात्याग  केला आणि भक्तीचे परमोच्च शिखर गाठून या महात्यागाचा ही परमत्याग केला! 

तर ह्याच एकमेव त्याग भावनेने श्रींनी दत्त साधनेची उत्तमोत्तम अशी उदाहरणे भक्तगणां समोर मांडली. 

ती मांडत असताना त्यांच्या सुमुखावर कधीही असंतोषाचा, द्वेषभावनेचा,मत्सराचा भाव नसे. 

त्यांच्या त्या दत्त तत्वांनी प्रज्वलित अशा मनात केवळ  ममत्वच होते. रंजलेल्या गांजलेल्या साधकाच्या, रोगाने लालबुंद झालेल्या कुष्ठ शरिरास श्रींनी आपल्या थरथरत्या हातांनीच आधार दिला. या आधारात, अनाथांचा करुणामय असा दिनानाथ दडलेला होता. हे करत असताना त्यांचे डोळे जरीही कोरडे भासत असले तरी सुद्धा त्या नयनातून क्षुद्र कटाक्ष क्षेप न पडता केवळ दयावंत अशी पाणीदार नजर वात्सल्य भावनेने ओसंडून वाहात असे. 

कोणीही कितीही अपमानास्पद बोलले तरी सुद्धा आपल्या ओठांवरचे दत्त नाम आणि त्याच  सुकलेल्या ओठांवरचे स्मिथ हास्य कधीही अलिप्त झाले नाही. 

ईतकी नम्रता कशी बरं असावी? 

आपल्या लाडक्या दत्तमुर्तीस देखील आपल्यापासून दूर केले गेले तरीही कोणतीही तक्रार न करता, त्याच गंगाघाटा वर , गंगेच्या झुळझुळीकडे अगदी चातकासारखे डोळे लावून बसले.

ईतकी सबुरी कशी बर असावी? 

पायाला खडावांचा मोह होईल म्हणून त्यांनी उभ्या जन्मात त्या भेगा पडलेल्या, फोड आलेल्या, लालबुंद झालेल्या पायांना लाकडी पादूकांचा स्पर्श होऊ दिला नाही. शेवटच्या क्षणी साधकांनी श्रींकडे चरण पादुकांचा  हट्ट केला तेव्हा देखील नर्मदेच्या एका  गोट्यावर तीन प्रहर, भास्कर किरणांचे चटके भेदरलेल्या केसांच्या डोक्यावर सहन करत उभे राहिले. त्यांचे हे रूप पाहून नर्मदाच काय तर तो पाया खालचा गोटा देखील गहिवरून गेला. 

ईतकी सहनशीलता कुठुन बरं आली असेल? 

अहो... त्यांच्या तळहातावर दंड पकडून पार काळानिळा असा डाग पडला ; तरीसुद्धा त्यांनी दत्तमुर्तीस लागणारे चंदन उजळताना कधीही , हातास होणाऱ्या वेदना दर्शविल्या नाहीत. ह्या उलट तो तळहात त्यांनी रोगी मनुष्याच्या पाया खाली देखील  स्पर्श करताना किंवा ठेवताना मागे पुढे पाहिले नाही.

ईतका निस्वार्थपणा कसा आला असेल? 

आपल्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी एका करत्या पुरुषाच्या शास्वत अशा भूमिकेत राहून आपल्या आईची आणि आपल्या धाकट्या भावंडांची  आत्मीयतेने सेवा आणि काळजी घेतली. 

खरतर त्यांच्या मना विरुद्ध जाऊन त्यांना संसार बंधनात अडकविले गेले, पण ह्या सगळ्याचा दोष त्यांनी आपल्या पत्नीला कधीही दिला नाही, याऊलट शेवटच्या दिवसात तिच्या आजारपणात तिची मनोभावे सेवा केली . पदरी, कुस तृप्त करणारं नवजात बाळ डोळ्या देखत गेलं. ह्या धक्याततून सावरणार तेवढ्यातच त्यांची अर्धभार्या त्यांची अर्धायुष्याची साथ सोडून गेली. 

पण ह्या एवढ्या सगळ्या चढ उतारातून, संकटातून, त्यागातून, मनस्तापातून त्यांचे दत्तनामात रंगलेले चित्त, टाळमृदुंगाने तृप्त भरलेले कर्ण, दत्त दर्शनासाठी आसुसलेले कोरडे डोळे, दत्तनाम घेणारे सुकलेले ओठ, आणि दत्त तत्वात विलीन झालेला शरीरातिल प्रत्येक सुक्ष्म अंश दिवसेंदिवस अधिकाधिक जाज्वल्य होत गेला. 

त्यामुळेच  एक सर्व साधारण मनुष्याच्या कलेने पाहता, श्रींच्या  अनेक मानवी छटा होत्या. 

एक आदर्श पुत्र, एक आदर्श पती, एक आदर्श बंधू, एक आदर्श दत्तसाधक आणि एक सर्वोच्च परम आदर्श प्रदान करणारा थोर सत्पुरुष व सद्गुरु ..!!

त्यामुळेच अगदी नास्तिकांनी देखील श्रींकडे एका साधकाच्या रुपातून न पाहता सर्वसामान्य माणूस म्हणून पाहिले तर त्यांना देखील, श्रींमध्ये एक अत्यंत कर्तव्यदक्ष मानवी रूपातील सत्पुरुष दिसेल..!! कोणिही अशा महापचरुषाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला काय हरकत आहे? 

----------------------------------------

सुनंदन कृष्णराव राऊळ

 मुंबई गोरेगाव 

२२/०५/२०२०

----------------------------------------

*सुचना*:-

*कृपया आपण शेअर करतांना नाव न बदलता याच नांवाने शेअर करणे*🙏🏻💐

__________________________


श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामीमहाराज चरित्र, एक दृष्टिक्षेप.


      वक्तारमासाद्य यमेव नित्या सरस्वती स्वार्थ-
 समन्वितम्।
 निरस्तदुस्तर्ककलंकपंका नमामि तं शंकरमर्चितानिघ्रम्।।
जो महाभाग वक्ता मिळाल्यामुळेच नित्य श्रीसरस्वतीचा म्हणजे वेदवाणीचा चिखलाप्रमाणे असलेला दुस्तर्करुपी कलंक धुऊन जाऊन ती आपल्या खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाली त्या पुज्यपाद श्रीशंकरचार्यांना मी नमस्कार करतो. असे श्रीशंकराचार्यांना नमन आपल्या " श्रीसंक्षेपशारीरक"
ग्रंथाच्या आरंभी सर्वज्ञात्ममुनींनी या दृष्टीनेच केलेले आहे.ब्राह्मणाचा देह हा क्षुद्र विषयसुखाच्या लालसेत बुडून जाण्याकरिता दिलेला नसून अनंत फलदायक अशी खडतर तपश्चर्या करण्याकरिता तो श्रीईश्वराने दिलेला आहे.
क्रमशः
श्रीगुरुदेव दत्त.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


 🌹 *श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास* 🌹


*चातुर्मास १९*

*पवनी महाराष्ट्र, नदी- वैनगंगा*

 इ. स. १९०९, शके १८३१
या वर्षीचा चातुर्मास पवनीसच करण्याचे महाराजांनी ठरवून त्याप्रमाणे आषाढ पौर्णिमेस व्यासपूजा झाली. प्रथम महाराजांची योग्यता लक्षात न आल्यामुळे तेथील मंडळींकडून महाराजांस फार त्रास झाला उन्मत्तपणे वाटेल तसे महाराजांना बोलणे, भिक्षेचीसुद्धा व्यवस्था न करणे असे प्रकार तेथील मंडळींनी आरंभी केले. पण ते सर्व महाराजांनी शांतपणे सहन केले. पवनीस पद्यावरी पुरी असे पुराणांतरी नाव आहे. तेथे वेनगंगा नावाची नदी आहे. महाराजांनी वेनगंगेच स्तोत्र केले आहे.
याप्रमाणे ठिकठिकाणची मंडळी महाराजांचे दर्शनास येऊ लागलेली पाहून मग मात्र पवनीच्या मंडळींचे डोळे उघडले. नंतर त्यांनी महाराजांची क्षमा मागितली व ते सर्व महाराजांचे पूर्ण भक्त बनले. बाहेरून हजारो लोक पवनीस येऊ लागले. त्यावेळी पवनीच्या आसपासच्या गावातून प्लेग जोरात होता. दूषित हवेतून मंडळी येतात त्यामुळे आपल्याही गावात हवा बिघडण्याची भीति आहे असे सर्वांना वाटू लागले. इतक्यात गांडाबुवा रहात होते त्या मुरलीधराच्या देवळात उंदीर पडल्याची वार्ता महाराजांचे कानावर गेली. महाराजांनी लगेच श्रीदत्तमहाराजांची प्रार्थना केली की,‘ प्रभो ! आपल्या आज्ञेप्रमाणे येथे चातुर्मासास आरंभ झाला असून सर्व बालगोपाळ मंडळी येथे दर्शनाकरिता जमली आहेत. यापैकी कोणी मेला तर आपणास न्यूनता येईल. म्हणून आपणास चातुर्मास संपण्यापूर्वीच निघून जाणे भाग आहे’ हे ऐकून देवांनी सांगितले की,‘चातुर्मास संपेपर्यंत येथे कोणालाच त्रास होणार नाही तरी चातुर्मास सोडून जाऊ नये.’
महाराज पवनीस आले. त्यावेळी प्रथम वैजनाथाच्या देवळात तीन दिवस राहिले. नंतर दशपुत्रे यांच्या विठ्ठल मंदिरात राहाण्यास गेले. पहिल्या दिवशी नाईकांच्या घरी भिक्षेस गेले, पण ते गुजराथी असल्याचे समजल्यामुळे भिक्षा तशीच ठेवली. दुसरें दिवशीही काही कारणाने उपवास घडला. तिसरे दिवशी भटांचे घरी भिक्षेस गेले असता त्यांनी महाराजांची फारच चौकशी चालविली, तेव्हा महाराज त्यांना म्हणाले ‘आलेल्या अतिथीस भिक्षा घालणे एवढे गृहस्थाचे काम आहे. जास्ती विचारपूस करू नये’ असे महाराज बोलत असता इतक्यात भटांची उमरेड येथे दिलेली मुलगी उमाबाई बाहेर आली. तिने महाराजांना ओळखून सर्व लोकांना त्यांनी माहिती करून दिली. तिला ब्रह्मावर्त मुक्कामी महाराजांचे दर्शन झाले होते. नंतर ती स्वत: महाराज रहात होते त्या देवळात जाऊन रोज झाडलोट करू लागली.
रोज लोक महाराजांनी गंधाची उटी वगैरे लावून महाराजांची महापूजा करीत असत व भोजनाचा भंडाराही बराच मोठा होत असे. सर्व जातींच्या लोकांना भरपूर अन्न मिळत असे.
पवनी येथील एका बाईचा नवरा रागाने घरातून निघून गेला होता. बारा वर्षे झाली तरी त्याचा काही पत्ता नव्हता. ती बाई अत्यंत दु:खात दिवस कंठित होती. तिने एकदा महाराजांचे दर्शनास येऊन आपले दु:ख सांगितले. तिच्याकडे फक्त एकदा महाराजांनी पाहिले आणि तिला सांगितले की,‘ बाई! लवकरच तुमचा नवरा घरी परत येईल’ असे तिला सांगून एक मंत्र लिहून दिला व त्याचा रोज मानसिक जप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने श्रध्देने जप सुरू करताच एक महिन्यातच ‘आपण लवकर’ येतो असे तिच्या नव-याचे पत्र आले व त्याप्रमाणे पुढे तो घरी येऊन राहिला.
नरसोबाचे वाडीतील पुजारी संकटाने त्रासून महाराजांचे दर्शनास पवनीस आले होते. एकदा पंगत जेवणास बसली असता त्यांनी सत्याग्रह केला. ते म्हणाले, ‘आमचे संकट दूर करण्याकरितां आपण जर वाडीस येण्याचे वचन दिले तरच आम्ही भोजन करू. आम्ही भोजन न करता व वाडीलाही न जाता वाट फुटेल तिकडे जाऊ.’ हे ऐकून महाराजांनी देवांजवळ प्रार्थना केली. देवांनी सांगितले, ‘आता चातुर्मास संपताच उत्तरेकडे न जाता वाडीकडे जावे.’ ही देवांची आज्ञा महाराजांनी पुजा-यांना कळविताच त्यांचे समाधान झाले व नंतर सर्वांनी आनंदाने भोजन केले.
महाराजांना भेटण्यासाठी येतो असा उमरावतीच्या गुलाबराव महाराजांनी एकदा निरोप पाठवला होता. तेव्हा महाराजांनी त्यांना परत कळविले की, ‘तुमचे आमचे अंतरंगात प्रेम आहेच. करिता प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नाही.’ गुलाबराव हे सखीसंप्रदायातील असून स्त्रीवेष घेत होते. तरी असे नटदर्शन महाराजांना नको होते.
कोल्हापूर प्रांतातील वडार गावातील नरहरी दिवाण हे वाडीस महाराजांचे जवळ येऊन राहिले होते. त्यांच्या मातेकडून एकनाथ महाराज आठवे पुरूष होते. त्यांना महाराजांचे सहवासाने वैराग्य उत्पन्न होऊन ते परमार्थाकडे वळले. पंधरा वर्षांचे त्यांचे वय होते. महाराज वाडीहून गेल्यावर ते गाणगापुरास गेले. तेथे स्वप्नात त्यांना श्रीदत्तदर्शन झाले. नंतर पंढरपुरी येऊन त्यांनी हरिहर महाराजांचा अनुग्रह घेतला. हरिहर महाराजांनी संन्यास घेतला. त्यांचे नांवही त्यांचे गुरुंनी ‘वासुदेवानंदसरस्वती’ असे ठेवले होते.
यांनी पायानेच तीर्थयात्रा केल्या. महाराजांचे दत्तपुराण व दत्तमाहात्म्य यावर हे पुराण सांगत असत. हेच पुढे अष्ट्याचे दत्तमहाराज म्हणून प्रसिद्धीस आले. यांची समाधी सांगलीपासून जवळच अष्टे मुक्कामी आहे.
महाराज एकदा सकाळी संगमावर स्नानास गेले. पाण्यात बुडी मारली. ब-याच वेळाने वर आल्यावर सर्वांना हातातून आणलेला कोरडा अंगारा दिला आणि ‘काशीरामेश्वराच्या यात्रेला जाऊन येण्यास इतका वेळ लागला. हा अंगारा तेथलाच आहे’ असे त्यांनी सांगितले.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*
 १२८
श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामीमहाराज चरित्र, एक दृष्टिक्षेप.

      *वक्तारमासाद्य यमेव* *नित्या सरस्वती स्वार्थ-* 
 *समन्वितम्।*
 *निरस्तदुस्तर्ककलंकपंका* *नमामि तं शंकरमर्चितानिघ्रम्।।* 
जो महाभाग वक्ता मिळाल्यामुळेच नित्य श्रीसरस्वतीचा म्हणजे वेदवाणीचा चिखलाप्रमाणे असलेला दुस्तर्करुपी कलंक धुऊन जाऊन ती आपल्या खऱ्या अर्थाने प्रकाशमान झाली त्या पुज्यपाद श्रीशंकरचार्यांना मी नमस्कार करतो. असे श्रीशंकराचार्यांना नमन आपल् *या " श्रीसंक्षेपशारीरक* *"
ग्रंथाच्या आरंभी सर्वज्ञात्ममुनींनी या दृष्टीनेच केलेले आहे.ब्राह्मणाचा देह हा क्षुद्र विषयसुखाच्या लालसेत बुडून जाण्याकरिता दिलेला नसून अनंत फलदायक अशी खडतर तपश्चर्या करण्याकरिता तो श्रीईश्वराने दिलेला आहे.
क्रमशः
श्रीगुरुदेव दत्त.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

१२९
श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामीमहाराज चरित्र, एक दृष्टिक्षेप.

    ही तपश्चर्या म्हणजे 
 *" वेदाभ्यासो हि विप्रस्य* *तप:परमिहोच्यते," "* *वेदोनित्यमधीयताम्," "* *ब्राह्मणेन निष्कारणम् षडंगो* *वेदोध्येयो ज्ञेयश्च"* इत्यादि वचनांवरून वेदाभ्यास अखंड करणे हीच होय.कलिकालामुळे, बुध्दीभेदामुळे, सात्विक धैर्याचा लोप झाल्यामुळे कोणत्याही प्रकाराने का होईना या आपल्या श्रीईश्वरादिष्ट मार्गापासून ब्राह्मण भ्रष्ट झाल्यामुळेच त्यांचा अनेक मुखांनी अध:पात होत आहे, शास्त्रदृष्टीने पाहणाऱ्याला मान्य करावे लागेल.हैड्रोजन बॉंबपेक्षा प्रभावी शस्त्रांनी देखील अर्जुनाला युद्धारंभी उत्पन्न झालेली कुमती घालविता आली नसती, पण अचिंत्य शक्तीच्या श्रीभगवंतांनी आत्मविद्येने ती सहज दूर केली.ज्यामुळे पूर्वी *" न योत्स्य "* असे नेभळटपणाचे उद्गार काढणारा अर्जुन *" करिष्ये* *वचनं तव "* असा खणखणीत कबुली जबाब देऊन कर्तव्यपालनाने शेवटी नराचा नारायण झाला.अशी आत्मविद्या वेदांच्या द्वाराच प्राप्त होणारी आहे, पण सांप्रत हा स्वतःचाच वेदविद्यारूपी परंपराप्राप्त दायभाग ब्राह्मणांकडून उपेक्षीला जात असल्याने त्यांची तेजोहीन अवस्था अपरिहार्य आहे.कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते असा जर संशय उत्पन्न झाला तर त्यावेळी शास्त्र नि:संदिग्ध शब्दात असे सांगत आहे की,
 *" अथ यदि ते* *कर्मविचिकित्सा वा* *वृत्तविचिकित्सा वा स्यात ये* *तत्र ब्राह्मणा: संमर्शिन: यथा ते तत्र* *वर्तेरन तथा तत्र वर्तेथा:।।"*
आचरणाबद्दल जर तुला संशय उत्पन्न झाला तर त्यावेळी शास्त्रविवेकसंपन्न ब्राह्मण जसे वागत असतील तसे तू वाग.इतका विश्वास ज्यांच्याविषयी श्रीवेदपुरुषाने दाखविला आहे त्यांनीच त्या विश्वासाचा आणि पर्यायाने स्वतःचा घात करून घेतल्यास सृष्टिकर्ता तरी काय करील? श्रीस्वामीमहाराजांचे विभूतिमत्त्व या ग्रंथावरून सर्वांना कळून यावे व सर्वांनीच त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जाण्याचा यावच्छक्य प्रयत्न करून सुखी व्हावे, हीच त्या सर्वसाक्षी श्रीप्रभूंच्या जवळ प्रार्थना आहे.
  अशा प्रकारे श्रीसद्गुरूचरणांच्या उपरोक्त कथनावरून ही 
 *" श्रीवेदपादस्तुती "*
किती अभ्यसनीय व मननीय आहे याची कल्पना साधक वाचकांना आल्याशिवाय राहणार नाही.श्रीस्वामीमहाराजांच्या कृपेने या *" श्रीवेदपादस्तुती "* चे सतत मनन व चिंतन घडावे म्हणून त्यांच्या श्रीचरणी अनन्य भावाने प्रार्थना करून ही
 *" श्रीवेदपादस्तुती "*
येथे अर्थासह उद्धृत करीत आहोत.
          ०--०--०
क्रमशः
श्रीगुरुदेव दत्त.
विशेष टीप:- प्रस्तुत भागात व पुढील काही भागात संस्कृत शब्द पुष्कळ येत आहेत.माझ्या परीने मी ते टाइप करण्याचा प्रयत्नही करत आहे.परंतु बऱ्याचदा मोबाईलच्या मर्यादा लक्षात घेता काही वेळा शब्द नीट टाइप होऊ शकत नाहीत.
   अर्थात ही सर्वस्व चूक माझी आहे, आपण अडचण समजून घ्यावी ही विनंती व क्षमस्व.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
कुरवपुर येथील गुहा:...🙏🏻

या ठिकाणी टेंबे स्वामी महाराजांनी प्रत्येक संकटावर रामबाण उपाय असलेल्या घोरकष्टोधरण स्तोत्राची रचना केली. महाराज येथे तपश्चर्येला बसत. रांगत रांगत आत जाता येईल एवढी चिंचोळी वाट आहे. आतमध्ये केवळ एक माणूस बसु शकेल एवढी या गुहेची उंची व जागा आहे.

फारशी गर्दी व मनुष्य स्पर्श न लाभलेल्या कुरवपुरच्या वातावरणात एक पवित्र्य आणि चैतन्य भरलेले आहे. ते तिथे जाणवतेच.

कुरवपूर (जि.रायचूर) कर्नाटक हे क्षेत्र कृष्णा नदीमध्ये असलेल्या एका बेटावर आहे.या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे.या क्षेत्री श्रीपाद वल्लभांनी १४ वर्षे वास्तव्य केले.

श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.याच ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेली गुहा आहे.याच ठिकाणी पाचलेगावकर महाराजांना श्रीपाद वल्लभांचा साक्षात्कार झाला.

मुंबई,बंगलोर(व्हाया गुलबर्गा)या रेल्वे मार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते.तिथे उतरून रायचूर बसस्थानका वरून बस मार्गाने ३०किमी अंतरावर अतकूर हे गाव लागते.तिथे जवळ्च कृष्णा नदीचा तीर लागतो.होडिने १ किमी प्रवास करून मंदिरापर्यंत जाता येते.

दुसरा मार्ग रायचुर-हैद्राबाद या बसमार्गावर मतकल नावाचे गाव लागते तिथे उतरून रिक्षाने किंवा बसने १६ किमी अंतरावर असलेल्या पंचदेव पहाड या कृष्णा नदीच्या तिरावर असलेल्या गावास जावे लागते.नंतर होडिने प्रवास करून १ किमी अंतरावर मंदिरापर्यंत पोहोचता येते.हा मार्ग अधिक सोयीचा आहे.पंचदेव पहाड या गावाजवळ दत्त उपासक विठ्ठल बाबांनी वल्ल्भपूरम नावाचा आश्रम स्थापन केला आहे.या आश्रमात निवासाची व भोजनाची व्यवस्था आहे.स्वत:च्या गाडीने कुरवपूरला जाणा-यांसाठी या आश्रमात गाडी पार्किंगची व्यवस्था आहे.वल्लभपूरम या आश्रमात श्री श्रीपाद वल्लभ स्वामींचा दरबार आहे.याच ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी सूर्यनमस्कार घालण्यासाठी येत असत.याच्या खुणा आजही पाहावयास मिळतात.

कुरवपूरला राहण्यासाठी ३-४ खोल्या आहेत व पुजा-यांना भोजनासाठी आधी सांगावे लागते. वासुदेव भट्ट पुजारी,श्री क्षेत्र कुरवपूर,जि.रायचूर.फोन नं.-(०८५३२-२८०५७०)..🙏🏻


 🌹 *श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास - १* 🌹


श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे एकूण २३ चातुर्मास झालेत त्याची माहिती.

*चातुर्मास १*

श्रीक्षेत्र उज्जयिनी मध्यप्रदेश, नदी- क्षिप्रा, इ.स. १८९१,  शके १८१३
उज्जनी येथे श्रीदत्तप्रभूंच्या आज्ञेने श्रीनारायणानंदसरस्वतीस्वामींचे कडून महाराजांनी दंड ग्रहण केला. सर्वत्र वर्णाश्रम लोप झालेला आहे. तरी सर्व भरतखंडांत पायीच संचार करून सर्व लोकांना उपदेश करावा व धर्ममार्गाची स्थापना करावी अशी श्रीदत्तप्रभूंची आज्ञा महाराजांना झाली. त्याप्रमाणे महाराजांचे वागणे सुरू झाले. दंडग्रहण झाल्याबरोबर पहिला चातुर्मास महाराजांचा उज्जनी येथेच झाला. गुरुस्वामींच्या आग्रहाने ते अन्यत्र कोठे न जाता तेथेच राहिले.
महाराजांचा कार्यक्रम नित्याचा पुढीलप्रमाणे होता. पहाटे उठून शौचमुखमार्जन केल्यावर स्नान व्हावयाचे. स्नान नेहमी त्रिकाल होत असे. नंतर दंडतर्पण, प्रणवजप झाल्यावर दत्तमूर्तीस स्नान घालून भस्म लावावे. संन्याशांना फुले, तुळशी तोडता येत नसल्याने कोणी आणून दिल्यास दत्तमूर्तीस फुले वगैरे उपचार मिळत. नाहीतर नुसते भस्मावरच भागवावे लागे. कोणी विद्यार्थी असल्यास त्याला वेद, शास्त्र आवश्यक तो पाठ द्यावयाचा. दुपारी पुन: स्नानादि नित्यकर्म झाल्यावर दक्षिणी ब्राह्मणाचे घरून भिक्षा आणून ते सर्व अन्न एकत्र करून खावे. तीनच घरी भिक्षा घ्यावयाची असा नियम होता.
संग्रही वृत्ती महाराजांची पूर्वीपासूनच नव्हती. लंगोट्या ४, छाट्या २, दंड व लाकडी किंवा वेळवाचा कमंडलू, एखादे वेळी धाबळी, उपनिषदांची पोथी, पंचायतानाचा संतुष्ट, दोन दत्तमूर्ति व पाणी काढण्याची दोरी इतकेच जिन्नस बरोबर असावयाचे. याशिवाय कसलाच संग्रह नाही. सेवा कोणाकडूनही घ्यावयाची नाही. वस्त्रे धुणे वगैरे स्वत:ची कामे स्वत:च करावयाची. कोणालाही स्पर्श करावयाचा नाही. स्पर्श झाल्यास किंवा शौचास जाऊन आल्यास स्नान करावयाचे. पायात काही न घालता पायांनीच सर्व प्रवास करावयाचा. सर्व सिद्धी प्रसन्न असताही त्यांचा उपयोग कधीच करावयाचा नाही. याप्रमाणे अत्यंत कडकपणाने शास्त्रीय नियमांचे पालन महाराज करीत असत. त्यामुळे त्यांच्या सदुपदेशाचा जनतेवर तत्काल परिणाम होत असे.
‘आधी केले मग सांगितले’ असे महाराजांचे वागणे असे. भाद्रपद पौर्णिमेस चातुर्मास संपल्यावर महाराज उज्जनीहून निघून महत्पुरास आले. तेथे काही मुक्काम झाला. दक्षिणी ब्राह्मणांवाचून इतर कोणाकडेही भिक्षा घ्यावयाची नाही असा महाराजांचा नियम असल्यामुळे फार त्रास पडत असे. तशी वस्ती नसल्यास उपवासाचा प्रसंग येई. पण दहा दहा कोसाचा प्रवास उपोषण पडले तरी व्हावयाचाच, तो कधी चुकला नाही.
ब्रम्हावर्तांत गंगातीरीं श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांनी आपल्या तीरावरही यावे असें नर्मदा नदीला वाटून तिनें महाराजांना दृष्टांत देऊन आपली इच्छा कळवली. पण तिकडे महाराजांनी लक्ष दिले नाही. पुढे एकाएकी असा चमत्कार घडला की, एका ब्राम्हणाच्या अंगावर फोड झाले होते व तो फार गांजला होता. त्याला कोणीतरी सांगीतले की तू महाराजांच्या पायांचे तीर्थ घेतले तर तुझा रोग बरा होईल. तो ब्राम्हण संधीची वाट पाहूं लागला. एके दिवशीं महाराज लिहिण्यास मांडी उपडी करून बसले होते. त्या वेळी त्यांचे पाय मागें होते. ब्राम्हणानें ती संधी साधून पाठीमागे जाऊन महाराजांच्या पायांवर पाणी घातलें व त्यांना शिवून ते सर्व तीर्थजल गोळा करून पिऊन टाकले व अंगाला लावले. महाराजांनी एकदम मागे वळून असे करण्याचे कारण त्या ब्राम्हणाला विचारले, तेव्हा त्याने व्याधींच्या परिहार्थ एकाच्या सांगण्यावरून आपण असे केले आहे, असे सांगून अपराधाची क्षमा मागितली.
महाराज लगेच उठून गंगेवर जाऊन स्नान करून आले पण त्यांच्या चित्तास समाधान वाटेना. रात्री स्वप्नांत एक चांडाळीण महाराजांना शिवली. त्यांनी लगेच उठून देवाचे ध्यान केले. सकाळी उठून पहातात तों सर्व अंगभर फोड उठले आहेत.
त्या रात्री द्रृष्टांत झाला कीं 'अनअधिकारी माणसाला पायाचें तीर्थ दिल्यामुळे हा त्रास भोगावा लागला. तथापि हे कृत्य बुद्धिपूर्वक घडलेलें नाहीं. करितां तीन दिवस नर्मदेचे स्नान केल्यावर शरीर पूर्ववत् चांगले होईल"
त्याप्रमाणे गंगेची अनुज्ञा घेऊन महाराज किनारी येण्याकरितां ब्रम्हावर्ताहून निघाले. महाराज नर्मदातीरीं नेमावर येथें येऊन पोंचले व नर्मदामातेची नमस्कारपूर्वक प्रार्थना केली कीं 'माझ्या थोड्या अपराधाबद्दल केवढी ही कडक शिक्षा केली? माझ्याशिवाय तुझें महत्व वाढविणारा दुसरा कोणी नाही काय?' अशी प्रार्थना करून तिथे मुक्काम केला. तीन दिवसांत नर्मदामातेच्या स्नानानें तो विस्फोटक रोग बरा झाला. त्यावेळी नर्मदालहरी म्हणून नर्मदेची स्तुती केली.
नेमावर हे नर्मदेचे नाभी नाभिस्थान असून तेथे सिद्धेश्वर म्हणून प्रसिद्ध देवस्थान आहे.
श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज, चातुर्मास उज्जयिनी
संन्याशांने तिर्थक्षेत्राचा अपवाद वगळता कोणत्याही एका ठिकाणी तीन दिवसापेक्षा अधिक काळ राहू नये, अग्नीला स्पर्श करू नये, फक्त तीन किंवा पाच घरी भिक्षान्नच घ्यावे, धातुला किंवा पैशाला स्पर्श करू नये, पोहून नदी तरुन जाऊ नये इत्यादी संन्यासधर्माचे सर्व नियम श्रीस्वामीमहाराज काटेकोरपणे पाळू लागले. दंडग्रहण केल्यानंतर श्रीदेवांनी त्यांना अशी आज्ञा केली होती की, "लोक वर्णाश्रमधर्मापासून ढळत आहेत. तरी त्यांना उपदेश करून वर्णाश्रमावरील त्यांची निष्ठा बळकट करावी. लोकांमध्ये धर्माचा लोप होऊ पहात आहे. तेव्हा भरतखंडात सर्वत्र पायीच संचार करून सर्व लोकांना उपदेश करून जनमानसात धर्माची प्रतिष्ठापना करावी." श्रीदेवांच्या या आज्ञेप्रमाणे वागण्यास श्रीस्वामीमहाराजांनी तात्काळ सुरुवात केली.
संन्याशांचा चातुर्मास आषाढ शुध्द १५ ते भाद्रपद शुध्द १५ असा दोन महिन्यांचा असतो. या दोन महिन्यात त्यांनी नदीकिनारी तीर्थक्षेत्रात एकाच ठिकाणी वास्तव्य करावे असा संकेत आहे. संन्यास दिक्षा घेतलेल्या वर्षापासून संन्याशांच्या चातुर्मासांना सुरुवात होते. संन्याशाचे वय त्याचे किती चातुर्मास झाले यावर मोजतात.
श्रीस्वामीमहाराजांनी आपल्या श्रीसद्गुरूंच्या संगतीमध्ये काही दिवस उज्जयिनीमध्ये मुक्काम केला.आषाढ पौर्णिमा जवळ येत होती. श्रीस्वामीमहाराजांनी आपला पहिला चातुर्मास उज्जयिनीलाच करावा असा श्रीस्वामीनारायणानंदसरस्वती स्वामीमहाराजांनी आग्रह धरला. त्यांच्या आग्रहास्तव आपला पहिला चातुर्मास उज्जयिनीलाच करावयाचा असे श्रीस्वामीमहाराजांनी ठरविले.त्यामुळे शके १८१३ अर्थात ई.स.१८९१ चा त्यांचा पहिला चातुर्मास श्रीक्षेत्र उज्जयिनी येथेच झाला.
श्रीस्वामीमहाराजांचे वक्तृत्व अमोघ होते. त्यांच्यापाशी प्रकांड विद्वत्ता होती आणि विषय प्रतिपादनाची शैली अशी होती की, ऐकणारा त्यांच्या वक्तृत्वाच्या प्रवाहात वाहुन जात असे.प्रतिपादन केलेल्या विषयावर मागाहून कोणी शंका काढून त्याचे समाधान करावे लागले असा प्रसंग येत नसे. विषयाची हाताळणी अगदी सांगोपांग होत असे. का होणार नाही? श्रीदत्तप्रभूंच्या कृपेने श्रीस्वामीमहाराजांच्या जिभेवर सरस्वती वास करीत होती. हळुहळु त्यांच्या कीर्तीचा सौरभ सगळीकडे पसरु लागला. प्रत्येक दिवशी पुराणाला गर्दी वाढतच होती. शास्त्र शिकणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली. श्रीस्वामीमहाराज ज्याप्रमाणे पुराण सांगत त्याप्रमाणे प्रवचनही करीत असत. उज्जयिनीमध्येही श्रीस्वामीमहाराज मराठी मधूनच निरूपण करीत, कारण त्यावेळी तेथे मराठी जाणणारी मंडळी पुष्कळ होती. वेळप्रसंगी ते विद्वान श्रोत्यांसमोर अस्खलीत संस्कृतमध्येही बोलत असत. श्रीस्वामीमहाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व पाहून विद्वान शास्त्रीमंडळी आश्चर्यचकीत होत.
श्रीस्वामीमहाराजांचा पुराणांचा, प्रवचनाचा आणि त्यांच्या संगतीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागल्याने त्यांच्या या असामान्य लोकप्रियतेचा त्यांच्या श्रीगुरुस्वामींनाही अचंबा वाटला आणि त्यांच्या मनात आपल्या या शिष्याविषयी असूया जागृत झाली. परमेश्वराची माया किती अतर्क्य आहे पहा! एका संन्यासीगुरूच्या मनात आपल्या शिष्याच्या लोकप्रियतेबद्दल असूया जागृत व्हावी, याच्या इतकी दुसरी विलक्षण व अदभूत गोष्ट कोणती असू शकेल?
श्री क्षेत्र उज्जैन शके १८१३ इ. सन. १८९१ :
मध्यप्रदेशात. क्षिप्रा नदी काठी. सेन्ट्रल रेल्वे स्टेशन. पाळीचे दत्त मंदिर. बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री महांकालेश्वर शिव मंदिर स्थान. जवळच हरिसिद्धीचे मंदिरात श्रीस्वामीमहाराजांचा दंडग्रहण विधी झाला.
उज्जयिनीहून फिरता फिरता श्रीस्वामीमहाराज पुन्हा नर्मदातटाकी आले. श्रीनर्मदेशी आणि श्रीकृष्णानदीशी त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण व्हावयाचे होते. त्यामुळे ते वारंवार या पवित्र नद्यांच्या तिरावरून संचार करीत असत. ओंकारेश्वर हे भगवान श्रीशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रीनर्मदाकाठच्या या लिंगाला अमलेश्वराचे ज्योतिर्लिंग असे म्हणतात. येथे धावरी कुंड आहे. धावरी कुंडाला श्रीनर्मदेचे योनिस्थान मानतात. येथील सृष्टीशोभा अपूर्व आहे. श्रीस्वामीमहाराज येथील सौंदर्याने प्रसन्न झाले. या धावरी कुंडात बाणलिंगे सापडतात. एखादे बाणलिंग आपणास मिळावे म्हणून येथे येणारा प्रत्येक यात्रेकरू धावरी कुंडात वारंवार उड्या मारीत असतो. काही यात्रेकरू धावरी कुंडात बुड्या मारणाऱ्या लोकांना पैसे देऊन कुंडातून बाणलिंग काढावयाला सांगतात. येथे मिळालेले बाणलिंग आपल्या घरी पूजेमध्ये असावे असे लोकांना वाटते. फार थोड्या भाग्यवंतांना या लिंगाची येथे प्राप्ती होते.
एके दिवशी श्रीस्वामीमहाराजांनी स्नान करण्यासाठी धावरी कुंडात बुडी मारली.पाण्यातून वर येताना त्यांनी इतरांना अलभ्य असे ओंजळभर बाण वर आणले.त्या बाणांच्या विविध रंगछटा पाहून श्रीस्वामीमहाराजांना आनंद झाला. त्या बाणांकडे श्रीस्वामीमहाराज कौतुकाने पहात असताना भिल्ल वेषाने शंकर तेथे आले व ते श्रीस्वामीमहाराजांना असे म्हणाले की," संन्यासी महाराज! आपण भाग्यवान दिसता. इतरांना क्वचितच सापडणारे बाण तर आपण ओंजळ भरून आणले आहेत. या सर्व बाणांची आपणच पूजा करणार आहात ना?" हा प्रश्न ऐकताच श्रीस्वामीमहाराज त्यांना असे म्हणाले की," नाही. संन्याशाला बेल, तुळशी, फुले तोडता येत नाहीत. मग या बाणांची कोणत्या साहित्याने पूजा करणार? हे बाण चांगले आहेत असे पाहून सहज कुतूहल म्हणून हे वर आणले." श्रीस्वामीमहाराजांचे हे उत्तर ऐकताच भिल्लरूपी शंकर त्यांना असे म्हणाले की," तसे असेल तर आपण हे सर्व बाण पुन्हा कुंडात सोडून देणेच योग्य होईल."
श्रीस्वामीमहाराजांनी त्या भिल्लाच्या सांगण्याप्रमाणे ते ओंजळभर बाण पुन्हा कुंडात सोडले. पण तेवढ्यात तो भिल्लही अदृश्य झाला. भगवान श्रीशंकरच आपणास दर्शन देऊन गेले याची श्रीस्वामीमहाराजांना खात्री पटली. श्रीस्वामीमहाराज थोर भक्त होते, वेदांती होते, शास्त्रवेत्ते होते, त्यांच्या ठिकाणी प्रगाढ विद्वत्ता होती, पण परमेश्वराच्या मायेने त्यांना याही वेळी संमोहित केले. भगवान श्रीशंकर त्यांच्या समोर उभे असताना श्रीस्वामीमहाराजांनी त्यांना ओळखले नाही. ओंकारेश्वरला श्रीस्वामीमहाराजांचा तेहतीस दिवस मुक्काम होता. येथे रोज जिज्ञासूंना वेदवेदांत सांगणे, शास्त्रे शिकविणे, अभ्यासू लोकांचे प्रापंचिक अडचणीवर उपाय सांगून त्यांना ईश्वर भजनी लावणे व संध्याकाळी पुराण सांगणे हे त्यांचे कार्यक्रम चालूच होते. येथील राजाचे कारभारी श्री बळवंतराव यांना श्रीस्वामीमहाराजांनी स्वतः ब्रम्हकर्म व पंचमहायज्ञ शिकवून त्यांनी त्यांना खऱ्या ब्राम्हण धर्माची दीक्षा दिली.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*
 *दिनविशेष*

प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज यांच्या जीवनावरील *श्रीगुरुदेवचरित्र* या ग्रंथातून...

गंगाखेड मुक्कामी बुवांच्या पत्नीचे देहावसान झाल्याचे वृत्त मागे दिलेच आहे. त्यानंतर तेरा दिवसपर्यंत पत्नीचे सर्व और्ध्वदेहिक यथाविधि केले *आणि लगेच चौदाव्या दिवशी ज्येष्ठ शु.१२ ला (११निर्जला एकादशी* *असते)संन्यासाश्रम घेतला* रात्री श्रीदत्तप्रभूंनी श्रीगोविंदस्वामींच्या रूपाने स्वप्नात येऊन प्रणवाचा उपदेश करुन त्याचा जप करण्यास सांगितले व यापुढे माधुकरीचेच अन्न घ्यावे, मठभिक्षा नको असे सांगितले. 'अनाश्रमी न तिष्ठेत' या वचनाप्रमाणे गृहास्थाश्रम संपल्याबरोबर संन्यास झाला हे विशेष आहे.
*संदर्भ: श्रीगुरुदेवचरित्र*
*श्री दत्तात्रेय धुंडिराज कवीश्वर शास्त्री*

 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*५५- श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीमहाराज चरित्र, एक दृष्टिक्षेप.*

*श्रीगांडामहाराज व श्री. सीताराम महाराज यांना घेऊन श्रीस्वामी महाराज श्रीक्षेत्र नरसोबावाडीच्या मार्गाला जाण्याच्या विचाराने निघाले. त्यावेळी बरोबर श्री. विष्णूबुवा, श्री. किसनराव व श्री.बापूराव ही भक्त मंडळी होती. बाकीची मंडळी आगगाडीने पुढे निघाली.*

*श्रीस्वामी महाराज जेव्हा बोरी गावाहून पुढे निघाले, तेव्हाच श्रीगोदावरीच्या किनाऱ्याने प्रवास करावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु जाताना श्रीक्षेत्र माहूर येथे जाऊन देवीचे व श्रीदत्तात्रेयांचे दर्शन घेऊन पुढे जावे असा श्रीगांडामहाराजांनी आग्रह धरल्यामुळे श्रीक्षेत्र माहूर वरून पुढे जाण्याचे ठरले.*

*श्रीक्षेत्र माहुरच्या अलीकडे १०-१५ मैलांवर श्रीशरभंगऋषींचा आश्रम आहे. त्या ठिकाणी श्रीउनकेश्वरांचे स्थान असून तेथे ऊन पाण्याचे एक व थंड पाण्याचे एक अशी दोन कुंडे आहेत. त्या दोन कुंडांच्या निर्मितीची अशी आख्यायिका आहे की, एकदा शरभंगऋषींना कुष्ठरोग झाला. त्या बाधेतून मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी या स्थानावर तीव्र तपश्चर्या आरंभिली. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन प्रभू श्रीरामचंद्रांनी या ठिकाणी बाण मारून ही दोन कुंडे निर्माण केली. या कुंडांमध्ये स्नान करून श्रीशरभंगऋषी रोगमुक्त झाले व ते ब्रम्हलोकाला गेले.*

*या दोन कुंडांपैकी एका कुंडात श्रीशिवलिंग आहे व तेथील मंदिरात श्रीराम, श्रीलक्ष्मण, व श्रीसीतामाई यांच्या वनवासी वेषातील मूर्ती असून श्रीशरभंग ऋषींच्या पादुकाही आहेत. तेथील दोन कुंडांपैकी गरम पाण्याच्या कुंडात फार मोठ्या प्रमाणात गंधक आहे. या पाण्यात स्नान केल्याने चर्मरोग, कुष्ठरोग वगैरे बरे होतात. तसेच या पाण्याने स्नान करून पांघरून घेऊन निजले असता शरीराला घाम सुटून शरीर अगदी हलके झाल्यासारखे वाटते. याठिकाणी दोन दिवस मुक्काम करून श्रीस्वामी महाराज पुढे जावयाला निघाले. येथून श्रीवैनगंगा नदी ४-५ फर्लांगावर आहे.*
*क्रमश.*

*श्रीगुरुदेव दत्त.*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


 🌹 *श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास* 🌹


*चातुर्मास २*

श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १८९२, शके १८१४
महाराज जालवणहून निघून फिरत फिरत ब्रह्मावर्तास येऊन पोचले. येथे येण्याची ही त्यांची पहिली खेप. यावेळी येथे आठ महिने मुक्काम झाला. अंताजिपंतांचे घाटावर राम मंदिरानजिक एका झोपडीत महाराजांचे वास्तव्य होते. तेथे रोज सकाळी शौचमुखमार्जन व स्नान झाल्यावर झोपडीचे दार लावून भिक्षेची वेळ होईपर्यंत बसत असत. नंतर पुन: गंगेवर मध्यान्ह स्नान करून येऊन व आवश्यक ती कर्म करून तीन घरची भिक्षा आणावयाची व ती घ्यावयाची. हे होईपर्यंत झोपडीचे दार उघडे असे. नंतर पुन: संध्याकाळ होईपर्यंत दरवाजा बंद.
केवळ श्रीदत्तप्रभूंची आज्ञा म्हणूनच महाराजांचे हे काम चालले होते. त्यात लोकेषणेचा काही संबंध नव्हता. त्यामुळे नित्य अनेक मंडळी पुराणश्रवणास येऊ लागली. काही विद्यार्थीही अध्ययनास येऊ लागले. आषाढ पौर्णिमेपासून चातुर्मास सुरू झाला. ज्योतिष, याज्ञिक, वेदांत, योग इत्यादी विविध विषयांच्या अभ्यासाकरिता महाराजांचेकडे अनेक लोक येऊ लागले. महाराजांचा मुक्कामही त्यावेळी ब्रह्मावर्तास चांगला दीड वर्ष झाला. बऱ्याच मंडळींना सन्मार्गाचा उपदेश होऊन त्यांचे कल्याण झाले. वर्णाश्रमाधर्माकडे लोकांची प्रवृत्ती विशेष वाढली. पुढे पुढे महाराजांची किर्ती बरीच दूरवर पसरली.
ब्रह्मावर्तास असताना महाराजांनी दत्तपुराण नावाचा एक ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला. एकंदर श्र्लोकसंख्या साडेतीन हजार असून टीकाही विस्तृत केलेली आहे. एकंदर अध्याय ६४ असून आठ अष्टके आहेत. ऋक्संहितेप्रमाणेच याची रचना झालेली आहे. ऋक्संहितेतील प्रत्येक अध्यायातील आरंभ व दत्त पुराणातील अध्यायाचा आरंभ एकसारखा आहे. पहिल्या अध्यायातील प्रत्येक श्लोकांत एक, दोन असे ऋक्पाद घालून स्तुति केली आहे. यालाच वेदपादस्तुति असे म्हणतात. असा हा अप्रतिम ग्रंथ ब्रह्मावर्तास गंगातीरावर निर्माण झाला.
श्री क्षेत्र ब्रह्मावर्त
शके १८१४ इस १८९२ उत्तरप्रदेशात. गंगानदीकाठी. कानपूर रेल्वे स्टेशनस्टेशन 20 किमी.मोटारने जाता येते.बाळासाहेब यांची विठुर कोठी. नानासाहेब पेशवे यांचा वाडा. उत्तम घाट, भरपूर मंदिरे. येथे महाराजांचे चार चातुर्मास झाले (२ रा शके १८१४ इस. १८९२, १२ वा शके १८२४ इस. १९०२, १३ वा, शके १८२५ इस. १९०३, १४ वा शके १८२६ इस. १९०४) राममंदिरासमोर पर्णकुटीत महाराज रहात होते. तेथे सध्या श्री दत्तमंदिर आहे.
श्री क्षेत्र ब्रह्मवर्त येथील चतुर्मासातील प्रत्यक्ष दर्शीचे कथन
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना ज्यांनी लहानपणी अगदी जवळून व समक्ष पाहिले होते व मे १९८७ पर्यंत हयात होते असे ब्रम्हावर्त येथील वृद्ध गृहस्थ श्री. टोपे (तात्या टोपे यच्या घराण्यातील वंशज) यांची प्रत्यक्ष भेट झाली असताना ते श्रीस्वामीमहाराजांसंबंधी आठवणी सांगताना असे म्हणाले, "श्रीस्वामीमहाराज रोज दुपारी भिक्षेला येत असत. त्यावेळी ते आमच्या घरातील मंडळींना असे म्हणत असत की, 'भिक्षान्नात तूप वाढू नका'. तीन घरची भिक्षा घेतल्यावर ते सरळ गंगेवर जात असत व तेथे आपली भिक्षान्नाची छाटीची झोळी तीन वेळा पाण्यात बुडवून ती घेऊन अंताजीपंताच्या घाटावरील आपल्या झोपडीत परत येत असत. तेथे ती झोळी थोडावेळ एका खुंटीला टांगून ठेवीत असत. भिक्षान्नाच्या झोळीतून सर्व पाणी गळून गेले की, मग ती खाली काढून त्यातील अन्नाचे चार सारखे भाग करीत असत. त्यातील एक भाग ते श्रीगंगेला अर्पण करीत असत. दुसरा भाग ऐखाद्या भिकार्याला देत असत. तिसरा भाग ते एखाद्या कुत्र्याला खाऊ घालत व चौथ्या भागाचे बरोबर आठ घास करून ते स्वतः भक्षण करीत असत.
श्रीस्वामीमहाराजांची ही भिक्षेची रीत पाहिली की, मला लहानपणी फार आश्चर्य वाटत असे. आजही त्या गोष्टीची आठवण झाली की, श्रीस्वामीमहाराज आपली भिक्षान्नाची झोळी गंगेत बुडवीत असल्याचे दृश्य माझ्या डोळ्यासमोर साक्षात् उभे राहते व जिव्हालौल्य जिंकल्याची त्यांची ती अद्भुत व अलौकिक साक्षच आहे, असा विचार मनात येउन माझे मन अगदी भारावून जाते. मला तर ही वैराग्याची पराकाष्ठा आहे असे वाटते. या ब्रम्हावर्त क्षेत्रात माझे उभे आयुष्य गेले. मी अनेक साधुसंताचे दर्शन घेतले; परंतु आजतागायत असा जिव्हा जिंकणारा, आपल्या रसनेवर ताबा मिळवणारा व अखंड वैराग्यसंपन्न असणारा साधू माझ्या पहाण्यात आला नाही. खरे सांगावयाचे म्हणजे श्रीस्वामीमहाराज हे नुसते साधू नव्हते; तर ते महासाधू होते! या महासाधूंचे मला दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो. या भूतलावर पुन्हा असा लोकोत्तर महासाधू होणे नाही हेच खरे आहे!"
संदर्भ ग्रंथ: श्रीथोरलेस्वामीमहाराज खंड तिसरा

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*
 दिन विशेष --
आज प प श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज ह्यांचा संन्यास ग्रहण दिन
गंगाखेड ला मुक्कामी असता बुवांच्या पत्नी चे देहावसान झाले । शास्त्रीबुवांनी अन्नपूर्णाबाईचे और्ध्वदेहिक कर्मयथाविधी पार पाडिले। नंतर श्रीदत्तभगवानाच्या आज्ञेनुसार पत्नीच्या १४व्या दिवशी सन्यास ग्रहण केला ।
शास्त्रीबुवांना श्री गोविंदस्वामीच्या स्वरूपाने येवुन श्रीदत्त महाराजांनी रात्री प्रेषोच्चार दिला व सांगितले की,ʼʼआजपासून तुमचे नांव वासुदेवानंद सरस्वती ठेवले आहे।आज पासून तुम्ही नित्य माधुकरी मागत जावे । ह्या प्रमाणे सांगून ते भगवंताचे स्वरूप अंतर्धान षावले । दुस-या दिवशी शास्त्रीबुवांनी ब्राह्मणांना बोलावुन यथाविधी प्रायश्चित घेवुन संन्यास ग्रहण केला ।
श्रीदत्तप्रभुनी आज्ञा केली की उज्जयनी येथे पाळीवरील दत्त मंदिरात श्री नारायणानंद सरस्वती यांसकडून दंड घ्यावा ।
स्वामी महाराज गंगाखेड सोडून निघाले ते उज्जैन ला दण्ड ग्रहण केला तो दिवस होता -आषाढ शु २ शके १८१३ 
        नारायण
 *श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज*
*दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा* हा महामंत्र सर्व दत्त भक्तांना आणि संपूर्ण जगताला मिळालेल खूप मोठं  वरदान आहे. दत्त संप्रदायात हा मंत्र जणू संजीवनी मंत्रच आहे. *प. प. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज*ह्यांच्या अखंड साधनेतून सृजन पावलेला हा महामंत्र दत्त संप्रदायाच गौरव आहे. *प. प. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांच्या* संपूर्ण अवतार कार्याचं सार म्हणजेच हा महामंत्र.आणि म्हणूनच गुरु तत्वाची संपूर्ण शक्ती ह्यात एकवटली आहे. हा *सिद्ध* मंत्र आहे,दत्त संप्रदायात ह्या मंत्राला *तारक* मंत्र असेही म्हंटल्या जाते.ह्यात प्रामुख्याने *अग्निबीजाचा* वापर केल्या गेलेला आहे त्यामुळे अध्यात्मिक साधकांसाठी हा महामंत्र म्हणजे भवसागरातून पार करणारी नवकाच आहे. *प. प. श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज*म्हणजे *कर्म भक्ती आणि ज्ञानोपासनेचा* अद्वितीय संगम होते शिवाय भगवान दत्तात्रेय हे महायोगी आहेत त्यामुळे योग मार्ग हा दत्तसंप्रदायाचं आकर्षणच आहे आणि त्या ओघानीच स्वामी महाराजांची योग मार्गावर फार प्रीती होती आणि प्रभुत्व हि होते.सन्यास धर्माचं अत्यंत शास्त्र शुद्ध आणि शिस्त बद्ध पालन नित्य ध्यान धारणा उपासना अश्या कर्म मार्गाचं आचरण करून त्यांनी आजन्म कर्म मार्गाचा पुरस्कार केला आणि सर्व साधक वर्गासाठी अत्यंत उत्कृष्ट उदाहरण प्रस्तुत केलं आणि त्यांच्या ह्याच साधनेच उपासनेच आणि  पावित्र्याच तेज *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा* ह्या महामंत्रात आहे. स्वामी महाराजांच्या अखंड शिष्य परंपरेतील अनेक सिद्ध सत्पुरुषांनी ह्या महामंत्राला आपल्या हृदयात स्थान दिले त्यात प्रामुख्याने *पू .श्री गुळवणी महाराज*, *पू. श्री. नाना महाराज तराणेकर* ह्यांचा उल्लेख केल्या शिवाय राहवत नाही. 
*हे नामामृत अघसंहाराक भवभय हारक त्रिभुवन तारक*

🌺 *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा* 

*।। श्री वासुदेव दत्त विजयते।।*
🌺🙏🙏🙏🌺

🌹 *श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास* 🌹


*चातुर्मास ३*

श्रीक्षेत्र हरिद्वार उत्तरप्रदेश, नदी-गंगा, इ. स. १८९३, शके १८१५
ब्रह्मावर्ताहून निघून गोकुळ, मथुरा, वृंदावन इत्यादि स्थाने पहात पहात महाराज शके १८१५ वैशाख पौर्णिमेच्या सुमारास हरिद्वारास येऊन पोचले. तेथे गंगेच्या तीरावर अहिल्याबाईंच्या धर्मशाळेजवळ असणाऱ्या दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम झाला. त्यावेळी तेथे शारदापीठाधीश श्रीराजराजेश्र्वरस्वामी शंकराचार्य यांचाही मुक्काम होता. त्यांच्या आग्रहावरून तेथेच चातुर्मासात राहण्याचे महाराजांनी ठरविले. चातुर्मासांत शंकराचार्यांना उपनिषभ्दाष्य ऐकवून भाद्रपद पौर्णिमेनंतर बद्रिनारायणाचे यात्रेकरिता महाराज निघाले.
श्री क्षेत्र हरिद्वारः
शके १८१६-१७, १८१८ व इस.१८९४-९५ व इस. १८९६ दोन चातुर्मास झाले.उत्तराखंडात. गंगानदीकाठी. रेल्वेस्टेशन. अहल्यादेवी होळकर धर्मशाळेजवळ दत्तमंदिरात महाराजांचा मुक्काम होता. 

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*
 🌹 *श्री वासुदेवानंद सरस्वतींचे चातुर्मास* 🌹

*चातुर्मास ४ व ५*

 हिमालय उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १८९४-९५ शके १८१६-१७
महाराज बद्रिनारायणाचे दर्शनार्थ निघाले. रस्त्यात ऋषीकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, गुप्तकाशी, बद्रिकेदार इत्यादि स्थाने पहात पहात बद्रिनारायणाचे दर्शन केले. प्रत्येक ठिकाणी एक-दोन दिवस, कोठे अधिकही मुक्काम होत असे. बरोबर दक्षिणी ब्राह्मण यात्रेकरू असल्याने भिक्षेची अडचण पडली नाही. हिमालयात बद्रिनारायणाचे दर्शनास जात असता एका ठिकाणी मोठा कडा तुटलेला असून पुढे जाण्यास मार्ग नाही असे पाहून महाराज तेथेच थबकले. इतक्यात कड्यावरून दोघेजण खाली येऊन महाराजांना म्हणाले की, ‘पुढे जाण्यास रस्ता नाही. मागे परत जा. नाहीतर देहपात होईल.’ हे त्या दोघा पुरुषांचे बोलणे ऐकून महाराजांनी त्यांना सांगितले की, ‘देह पडला तरी हरकत नाही. नरनारायणांचे दर्शनार्थ आपण आलो आहो. ते दर्शन झाल्याशिवाय आपण परत फिरणार नाही. पुढे वाट नसेल तर आपण दोघे तिकडून कसे आला?’ हे महाराजांचे निर्धाराचे भाषण ऐकून ते दोघेही पुरुष अदृश्य होऊन त्याठिकाणी प्रत्यक्ष नरनारायणप्रभू मुनि दिसू लागले. महाराजांनाही नरनारायणांचे दर्शन घडल्यामुळे आनंद झाला.
बद्रिनारायणाचे मूर्तीचे दर्शन दुरूनच घ्यावे लागते. कारण मूर्ति परिसाची आहे अशी लोकांची समजूत असल्यामुळे तेथे जवळ जाऊन कोणी लोखंडाचे सोने करतील या भीतीने देवळाचे गाभाऱ्यात यात्रेकरूंना जाण्यास बंदी आहे. पण महाराजांना मात्र असा काही प्रतिबंध न होता त्यांनी अगदी जवळ जाऊन दर्शन व पूजन केले.
गंगोत्रीस गेल्यावेळी तेथे स्नान करताच थंडीने महाराजांचे अंग अगदी गारठून गेले. काही हालचाल होईना. इतक्यात कोणी पेटलेली शेगडी आणून ठेवली. बराच वेळ शेकल्यावर अंगांत ऊब आली. अग्निस्पर्श न करण्याबद्दल श्रीदत्तांची आज्ञा होती. पण या ठिकाणी मात्र ती पाळता आली नाही.
श्रीक्षेत्र हिमालयः
उत्तराखंडात. गंगा नदीकाठी.शके १८१६-१७ व १८१७, इस. १८९४-९५ व १८९६. ४ था व ५ वा दोन चातुर्मास झाले परंतु ते अज्ञातवासात झाल्यामुळे माहिती उपलब्ध झाली नाही.

*संकलन :- अशोककाका कुलकर्णी*

 १९३
श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामीमहाराज चरित्र, एक दृष्टिक्षेप.

   श्रीस्वामीमहाराज गोंड गावाहून निघाल्यावर 
गंगामसले या गावी आले व तेथून श्रीगोदावरीनदीच्या तीरावरील गुंज या गावी आले.गुंज हे गाव श्रीस्वामीमहाराजांना विशेष पसंत पडले असावे, कारण येथे आल्यावर त्यांनी श्रीगांडामहाराजांना पुढील काळात येथे राहून साधन करण्याची आज्ञा केली.या आज्ञेप्रमाणे श्रीस्वामीमहाराज समाधिस्थ झाल्यावर श्रीगांडामहाराजांनी आपले उर्वरित आयुष्य गुंज या गावीच साधना करण्यात घालविले.येथेच त्यांनी श्रीदत्तमंदिर स्थापन केले व 
 *" श्रीगुरुमूर्तिचरित्र "*  हे श्रीस्वामीमहाराजांचे ओवीबद्ध चरित्र लिहून आपल्या श्रीसद्गुरूंची वाङ्मयीन सेवा केली.
   श्रीस्वामीमहाराज गुंजहून निघून देऊळगावराजा येथे आले.या गावातील श्री.रंगनाथराव पुराणिक नावाच्या गृहस्थांना फार दिवस नाकातून रक्त पडण्याचा त्रास होत होता.त्यांनी आपली ही व्याधी दूर व्हावी म्हणून मिरज इत्यादि ठिकाणी जाऊन मोठमोठ्या वैद्यांना व डॉक्टरांना आपली प्रकृती दाखवून पुष्कळ उपचार केले, परंतु काहीच गुण न आल्यामुळे अगदी उदास व दुःखी झाले होते.अशा व्याधीग्रस्त जर्जर अवस्थेत असताना आपल्या गावात एक थोर संत-महात्मे महापुरुष आले असल्याचे व  ते जणूकाही दुसरे धन्वंतरीच असल्याचे त्यांच्या कानावर आले.हे ऐकताच श्री.रंगनाथराव श्रीस्वामीमहाराजांच्या दर्शनासाठी त्यांच्याकडे गेले व त्यांनी आपली सर्व व्यथा त्यांच्या श्रीचरणी निवेदन केली.त्यांची ती व्यथा ऐकून व एकदंर अवस्था पाहून श्रीस्वामीमहाराजांना अत्यंत दया आली व त्यांनी त्यांना गंगावती नावाची वनस्पती दाखविली आणि तिचा रस नाकात घालण्यास सांगितले. श्रीस्वामीमहाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री.रंगनाथराव पुराणिक यांनी तीन दिवस उपचार करताच त्यांचा दुर्धर रोग दूर होऊन ते पूर्णपणे बरे झाले.
क्रमशः
श्रीगुरुदेव दत्त.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज स्थापीत दत्त मूर्ती 
श्री अगस्तेश्वर महादेव मंदीर काशी ऊ.प्र

श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांनी कै.पुरूषोत्तम भा. नारायण सदाशिव पारखी यांच्या स्मरणार्थ दत्तात्रयाची मुर्ती व विघ्नेश्वराचे लिंग स्थापून अगस्तेश्वराला अर्पण केले .

        ।। श्री गुरूदेव दत्त ।।

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.

     व्यक्तीमत्व विशेष ...वाचासिध्दी .

शास्त्रीबुवा जेव्हा नरसोबाची वाडी वरून माणगाव ला परतले तो पर्यत त्यांचे घर बांधून पुरे झाले होते त्यामुळे वास्तुशांती पुजा करून गृह प्रवेश करायचे ठरले मुहूर्ताच्या दिवशी शास्त्रीबुवाच्या आईचे व  
सुनेचे भांडण झाले त्यामुळे अन्नपुर्णा बाई ह्या पुजेला लवकर आल्याच नाही त्या ही 
खुप रागावल्या होत्या .झाल्या प्रकारामुळे शास्त्रीबुवा फार उदिग्न झाले त्या भरात ते आई ला ऊद्देशून म्हणाले की या घरात कोणी नांदणार नाही या घराची धर्मशाळा होईल .
त्यांच्या मुखातून नियती बोलून गेली आणि भविष्यात ही वाणी ही खरी ठरली पुढे त्या घराचा उपयोग धर्मशाळा म्हणूनच केला गेला शास्त्रीबुवांचे बोलणे खरे ठरले .
सदगुरू श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींना वाचासिध्दी होती ,त्यांच्या मूखातून जो शब्द निघे तो प्रत्यक्षात येत असे  खरे होत असे .

     ।।। श्री गुरूदेव दत्त ।।
*अघोरकष्टोध्दरण स्तोत्रम्*  

ची जन्म कथा 

श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा २१वा चातुर्मास शके १८३३ (इ.स. १९११) कुरुगड्डी (कुरवपूर) येथे संपन्न झाला.

कोल्हापूरचे श्री. शेषो कारदगेकर दर्शनासाठी सहकुटुंब आले होते. त्यांना संतती होत नव्हती व कर्जही बरेच झाले होते. त्यांची श्रीास्वामी महाराजांवर एकांतिक श्रद्धा होती. "आपली दुःखे आपल्या देवाजवळ सांगावयाची नाही तर दुसर्या कोणाजवळ सांगावयाची?", असा विचार करून त्यांनी या दोन्ही गोष्टी श्री स्वामीमहाराजांच्या कानावर घातल्या. 
स्वामीमहाराजांनी श्री. शेषो कारदगेकर यांच्या मंडळींच्या ओटीत प्रसादाचा नारळ घातला व संतती होईल व कर्ज फिटेल असा आशिर्वाद दिला. त्याप्रमाणे पुढे त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली व कर्जही फिटले.

शेषो कारदगेकर यांच्या प्रार्थनेप्रमाणे महाराजांनी त्यांना वेंकटरमणचे पद करून दिले होते. या प्रकारे आपल्या सर्व अडचणी दूर करून घेतल्यावर आपल्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट दूर व्हावेत, सर्व लोक सुखी रहावेत आणी सर्वांना अखंड मंगलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक दिवस श्री. शेषो कारदगेकर यांनी श्री स्वामीमहाराजांना अशी प्रार्थना केली की,"माझ्याप्रमाणेच सर्व लोकांचे कष्ट निवारण व्हावेत म्हणून श्रीपादश्रीवल्लभांचा धावा करता येईल असे एखादे स्तोत्र सर्वांसाठी करून द्यावे."
शेषो कारदगेकर यांच्या इच्छेप्रमाणे श्रीस्वामीमहाराजांनी "घोरसंकटनिवारणपूर्वक श्रीदत्तप्रीतिकारकस्तोत्र" रचून त्यांना दिले.

श्रीक्षेत्र नरसोबाच्या वाडीस हे स्तोत्र रोज म्हंटले जाते. या स्तोत्राचा अनुभव अनेक लोकांना आला आहे व येत आहे. काहीजण तर याचा १०८ वेळा पाठ रोज करणारे आहेत व त्यांचे ऐहलौकिक व पारलौकिक कल्याण झाले आहे.
खरोखर श्री शेषो कारदगेकरांचे आपणा सर्वांवर उपकार आहेत की त्यांच्यामुळे हे दिव्य स्तोत्र प्राप्त झाले आहे.

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
 *अघोरकष्टोधरणस्तोत्रम

श्रीपाद श्रीवल्लभ त्वम् सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। १।।

त्वम् नो माता त्वम् पिताऽऽप्तोऽधिपस्त्वम् । त्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वम् ।।
त्वम् सर्वस्वम् नोऽप्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। २।।

पापम् तापम् व्याधिमाधिम् च दैन्यम् । भीतिम् क्लेशम् त्वम् हराऽऽशु त्वदन्यम् ।।
त्रातारम् नो वीक्ष्य ईशास्तजूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ३।।

नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वत्तो देव त्वम् शरण्योऽकहर्ता ।।
कुर्वात्रेयानुग्रहम् पूर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ४।।

धर्मे प्रीतिम् सन्मतिम् देवभक्तिम् । सत्संगाप्तिम् देहि भुक्तिम् च मुक्तिम् ।
भावासक्तिम् चाखिलानन्‍दमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ।। ५।।

श्लोकपंचकमेततद्यो लोकमङ्गलवर्धनम् । प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।।

।। इति परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्द सरस्वती (टेंबे) स्‍वामीमहाराज विरचितं अघोरकष्टोधरणस्तोत्रम सम्‍पूर्णम् .

3 comments: