श्री दत्त संप्रदाय या सदरा अंतर्गत दररोज एक लेेेखमाला येथे प्रसिध्द केली जाईल, ज्यात दत्त संप्रदाय या संंदर्भात वैशिष्ट्य पूर्ण माहिती प्रसिध्द केली जाईल, आपणांस विनंती की follow व subscrie करावे🙏
गतांका पासून पुढे...
नवनाथ (९ नारायण)
कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.
मत्स्येंद्रनाथ
अरे हा कविनारायण । मच्छोदरी पावला जनन।।
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम । जगामाजी मिरवी की ।।३३।। (नवनाथ ग्रंथ अध्याय १, ओवी ३३ वी)
एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातिरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.
शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातिरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.
गोरक्षनाथ
तरी आता न लावी उशिर । हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।।
ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र । बाळ शब्द उदेला ।।७५।। (अध्या ९ वा, ओवी ७५)
मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. "अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये', असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाशानाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे.
नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून ३ किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे.
गहिनीनाथ
तेंगे करूनी पंचभूत। दृश्यत्त्व पावले संजीवनी अर्थ।।
करभंजन ते संधीत । प्रेरक झाला जीवित्त्वा ।।६१।। (अध्याय १०, ओवी ६१)
कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.
जालंदरनाथ
विप्रो हाते सलील बाळ ते जातें। रक्षता स्पर्शता लागे हाते।।
दृष्टी पाहता बाळाने । जुळवत रुदन करी ।।११२।। (अध्याय ११ ओवी ११२)
पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.
कानिफनाथ
त्वरे येऊन कर्णदृसी। दृष्टी पाहे ब्रह्मचारी ।
सहज करुनी उभयकरी । नमस्कारी प्रेमाणे ।।११५।। (अध्यय १२ वा, ओवी ११५)
बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते.
भर्तरीनाथ
भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरविले शकलांत ।।
क्षिकेचे मोहळ व्यक्त । तेही एकांग जाहले ।।२७।। (अध्याय २४, ओवी २७)
भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून ३१०३ वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगावफाट्यावरून जाता येते.
रेवणनाथ
पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेय ।।
सहज चाली पुढे चालत । बाळ दृष्टी देखिले ।।२१।। (अध्याय ३४, ओवी १२१)
ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (वीटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून १० कि. मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.
रेवण नाथ व दत्तगुरु
"दत्त प्रभू मजवर कृपा करा व मला सनाथ करा" या विनंतीवरुन दत्तगुरुंनी रेवणांस सिध्दी आशिर्वाद रुपाने दिली. दत्ताने दिलेल्या सिध्दीला आवाहन करुन रेवणने धान्यांच्या राशींचे सोन्यात रुपांतर करुन सिध्दीची प्रचिती घेतली.या सिध्दीच्या जोरावर गावांतील लोकांना रेवणने तृप्त व मालामाल करुन देऊन आपला भविष्यातील जनकल्याणाचा मार्गाची निवड केली.
"ब्रह्मदेव सृष्टीचा रचनाकर्ता आपल्या पौरुष्याच्या अंशापासून हजारो ऋषी तयार झाले. त्यावेळी त्याचे तेज थोडेसे रेवा नदीच्या काठी पडले होते. पूर्व ईश्वरी संकेताप्रमाणे नवनारायणांपैकी चमस नारायणानी तेथे प्रवेश केला व एका बालकाचे रूप धारण केले. जल प्रवाहाबरोबर रेवा नदीतून वाहत वाहत आलेले हे बालक किनाऱ्यावर लागले अन् ते मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्यावेळी सहनसारूक नावाचा एक कुणबी तिथं पाणी आणण्यासाठी आला असता त्याने ते सुंदर बालक पहिले. बाळ रडत होते. सहनसारुकचे मन कळवळले. त्याने त्या निराधार अजाण बालकाला उचलून आपल्या घरी आणले व पत्नीकडे दिले. तिने ते बाळ छातीस लावले व नंतर आपल्या मुलाशेजारीच तिने त्याला पाळण्यात झोपविले. एवढे सुंदर बालक ते ही रेवातीरी सापडले म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव रेवण असे ठेवले.
रेवण खरच आज्ञा धारक मुलगा होता. तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करे. एक दिवस पहाटे रेवण बैलांना घेऊन शेतात जात असताना श्री दत्तात्रय महारांजांची व त्याची भेट झाली. त्यावेळी दत्त महाराजांनी एक नजरेत हा बालक म्हणजे पूर्वीचा चमस नारायण आहे हे ओळखले. त्या छोट्या स्पर्शानेही बाळ रेवणास ज्ञानप्राप्ती झाली. त्याने हे "दत्त प्रभू मजवर कृपा करा. मला सनाथ करा" अशी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या दत्त प्रभूंनी रेवण बाळास एक सिद्धी भेट दिली. ही सिद्धी रृतुझ्या इच्छा पूर्ण करील असा आशीर्वाद ही दिला. आपल्यास प्राप्त झालेली सिद्धी खरच काय करू शकते हे पडताळून पाहण्यासाठी रेवण त्या महिमा सिद्धीला आवाहन करून म्हणाला, “ही शेतातील धान्याची रस सोन्याची करून दाखव.” त्याबरोबर सिद्धीने आपली कृपा नजर फिरवताच धान्याची रास सोन्याची झाली. मग काय ! या सिद्धीच्या बळावर रेवण गावातल्या गोर-गरिबांना यथेच्च इच्छा भोजन देऊ लागला. त्यामुळे अवघ्या पंचक्रोशीत हा बालक सिद्ध पुरुष या विशेषणाने ओळखला जावू लागला.
एक दिवस मच्छिंद्रनाथ हे त्या गावात आले. तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाची माहिती कळली. तसेच मच्छिंन्द्रनाथांच्या हे पण लक्षात आले की हा रेवण बाळ म्हणजेच चमस नारायण आहेत. तेव्हा मच्छिन्द्रनाथांनी एक गम्मत केली. त्यांना आपल्या योग सामर्थ्याने वाघ-सिंह यासारखे पशु यांना आपला मुळचा हिंस्र स्वभाव विसरून मवाळ प्राण्यांप्रमाणे जवळपास खेळवू लागले. तर पक्षी त्यांच्या अंग-खांद्यावर खेळू लागले. हे पाहून लोक मोठे चकित झाले. त्यांनी मछिंन्द्रनाथांचा प्रताप रेवणास सांगितला. रेवण बाळाने स्वत: तेथे जावून प्रत्यक्ष ते दृश्य पाहून खाती करून घेतली. घरी येऊन त्याने सिद्धी आवाहन केले. "मला अशी सिद्धी प्राप्त करून दे" अशी मागणी केली. तेव्हा तेथे प्रकट झालेल्या सिद्धीने सांगितले की ही गोष्ट केवळ एक ब्रह्मयोगीच करू शकतो. तुला ते ब्रह्मज्ञान केवळ दत्त प्रभूंच्या कृपेनेच प्राप्त होईल. हे कळताच रेवण तयार झाला. त्याने त्याजागी पहिली दत्तभेट झाली. त्या स्थानावर दृढ निश्चयाने बैठक मारून ध्यान, तपसाधना चालू केली.
मच्छिंद्रनाथ समवेत दत्त प्रभूंनी रेवण बाळाला मंत्रोपदेश दिला. त्याला नाथ पंथाची दिक्षा दिली. सर्व विद्या शक्ती यात निपुण करून त्यास ब्रह्मज्ञानी बनविले. चमस नारायणाचा प्रथम रेवण आणि नंतर दत्त-मच्छिंद्रनाथ कृपेने रेवणनाथ झाले. भक्ति प्रचाराच्या नाथपंथ कार्यात त्यांचाही सहभाग होऊ लागला.
नाथपंथीय योगींची ज्ञान, भक्ति व श्रद्धा ही लोकमानसात वाढवत नवनाथांची लोकोद्धाराचे कार्य चालू केलेले होतेच. आणि एक दिवस गावोगाव भ्रमंती अन भिक्षाटन करत रेवणनाथ हे माणदेशातील विटे ग्रामात आले. त्या गावामध्ये सरस्वती नावाचा एक ब्राह्मण अन त्याची पत्नी जान्हवी ही दंपती राहत होती. त्यांना संताने झाली पण ती टिकली नाही. जान्हवीला सहा पुत्र झाले पण ते दहा दिवसापेक्षा जास्त दिवस टिकले नाहीत. देवाची कृपा म्हणून की काय सातवा पुत्र मात्र जवळ जवळ दहा वर्षाचा होईपर्यंत वाढला. त्या आनंद प्रीतर्थ्य सरस्वती ब्राह्मण आनंदाने ब्राह्मण भोजन देत होता. नेमके त्याचवेळी रेवणनाथ हे त्यांचे घरी आले. सरस्वती ब्राह्मणाने त्यांचे उचित आदरातिथ्य केले. भोजन दिले. इतकेच नव्हे तर नाथजी जेव्हा जाऊ लागले तेव्हा त्या दम्पतीने त्यांना त्या रात्री आपल्या घरी मुक्काम करण्याची विनंती केली. रात्री ब्राह्मण रात्री त्याचे पाय दाबून देत बसला. पत्नी मुलासह आत झोपली. पण नेमके मध्यरात्री दैवाने डाव साधला. बाळ मरण पावला. तिला हे कळताच माय बिचारी स्फुंदू स्फुंदून रडू लागली. नाथांची झोपमोड होऊ नये म्हणून सरस्वती ब्राह्मण जगाचा हलला नाही. का ती ब्राह्मणी पण आपल्या मनाच्या दु:खाला मोकळी वाट करून देऊ शकला नाही.
सकाळी नाथांना जाग आली ब्राह्मण पत्नीचे रडणे ऐकूनच. नाथांनी झाल्या प्रकारची नीट चौकशी केली आणि आपण या घरांत असताना इथे यमदूत आलेच कसे? त्यांनी बालकाचे प्राण कसे काय हरण केले? याचे रेवणनाथांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांना रागही आला. रेवणनाथांनी त्या दंपतीला बाळाचे कलेवर सांभाळण्यास सांगून बालकाचे प्राण परत आनायालाते यमलोकी गेले. यमाने नाथांना सांगितले, की हे काम माझे नाही ही शिव आज्ञा आहे. तुम्ही कैलासावर जा व शिवाकडून बाळाचे प्राण आणा! यमलोकीहून रेवणनाथ कैलास पर्वतावर गेले. तेथे ही शिव गणांनी त्यांना अडवले. नाथांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांची दयनीय अवस्था केली. वार्ता मिळताच स्वत; शंकर युद्धाला आले. रेवणनाथांनी वाताकर्षण मंत्र म्हणून वायुरोधन केले त्यामुळे शिव-अष्ट भैरव, शिवगण या साऱ्यांचेच प्राण कंठाशी आले.
मग वैकुंठाहून भगवान विष्णू धावत आले. त्यांनी रेवण नाथास आवरले व आपल्याकडील सरस्वती ब्राह्मणांचे सातही बालकांचे प्राण परत देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे रेवणनाथ शांत झाले. त्यांनी शिवांसह सर्वांचे प्राण वाचवले. भगवान विष्णूंनी आदिनाथांशी भेट घडवली. त्यांना आशीर्वाद देवविले. रेवण नाथांना घेवून विष्णू वैकुंठी गेले. त्यांनी सातही बालकांचे प्राण परत आणले.
वटसिद्ध नागनाथ
असो वटवृक्ष पोखरांत । अंड राहिले दिवस बहूत ।।
अवि होत्र नारायण त्यांत । ईश्वर सत्ते संचारला ।।९२।।
दिवसेंदिवस अंडात। वाडी लागले जीववंत ।।
देह होता सामर्थ्यवंत । भगन लागे अंड ते ।।९३।।
त्यांत तलवर पोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।।
निढळवाणी कोण त्यांते । रक्षणाते नसेची ।।९४।। (अध्याय ३६, ओवी ९२, ९३, ९४)
ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून २५ कि. मी. अंतरावर चाकूर तालुक्यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.
चरपटीनाथ
या परी बहुता दिवशी । ईश्वर आता अवतार ।।
विप्पलायन त्या रेतासी । नारायण संचारला ।।२१।। (अध्याय ३८, ओवी २१)
एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो.
या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या ८४ आहे. या शिष्यांनाच ८४ सिद्ध असे म्हणतात
No comments:
Post a Comment