Saturday, August 1, 2020

नाथपंथाचे ज्ञानेश्वर!




नाथपंथाचे ज्ञानेश्वर!

आज ज्ञानेश्वरांचे नाव आबालवृद्धांना माहीत आहे.
दारासमोर दिंडी आली की मृदुंगाबरोबर झांजांच्या तालबद्ध आवाजात "ज्ञानबा -तुकाराम" ह्या नावाचा जयघोष ऐकू येतो व आपणही गुणगुणू लागतो "ज्ञानबा-तुकाराम!" इतकी जादू या शब्दात आहे.

ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्यांच्या जयघोषाने पंढरपुर दुमदुमून जाते.
पंढरीचा एवढा मोठा ओढा लाविणारा ज्ञानोबा आज सातशे वर्षाच्या कालानंतरही तसाच लोकप्रिय आहे.
भक्तीचे वाढते उधान आहे.
पंढरपूरच्या भक्तीरसाच्या सागराला नेहमी उधाणच असते हे सिद्ध करून देणारी ही दोन नावे आज अनंतांची अंत:करणे भरून टाकीत आहेत.

विठ्ठलाच्या ध्यानात एकरूप झालेला ज्ञानोबा हा वारकरी संप्रदायाचा आदर्श आहे यात शंका नाही.
आज अनंतांची अंतःकरणे सद्गदीत करणारी माया ज्ञानोबांनी गेली सातशे वर्षे सातत्याने आपल्या भक्ताला दिली आहे.  आळंदी हे तर आज वारकरी संप्रदायाचे माहेरघरच आहे.
माऊलीच्या जवळ नामजपात दंग व्हायचे आणि भाबड्या अंतःकरणाने आपले दुःख ज्ञानोबाला सांगायचे.
डोळ्यातून ओघळणारे अश्रू समाधिस्थ ज्ञानोबा पहातो व माऊलीच्या रूपाने भक्ताजवळ जाऊन ते अश्रू पुसतो, दुःख दूर करतो.

माऊलीचा दरबार तसा भाबडा आहे. 
मोठ्या भक्तीचा त्याला उमाळा आहे.
चंद्रभागेच्या काठी सिद्धेश्वराच्या शेजारी समाधिस्थ झालेली ही माऊली आज अनंतांची क्रुपेची सावली आहे.
ह्या माऊलीच्या दरबारात कशाही बुद्धीने जा, त्याचे उत्तर तिथे मिळते.
विद्वत्तेचा अहंकार झाला तरी त्याला मिळते.
योगाचा अभिमान झाला तरी त्याचे प्रायश्चित त्वरित मिळते आणि भक्तीच्या दंभात तिथे राहिले तर दंभाचे बीज करपते.
खर्या मार्गाचा आदर्श दाखविला जातो.

आम्हाला एकदा एक सद्गृहस्थ सांगत होते.
आम्ही नाशिकहून आळंदीला आलो ते एका योगी राजाला घेऊन.
त्या योगी राजाला आपल्या यौगिक सामर्थ्याची फारच प्रौढी होती.
तशीच विद्वत्तेचीही.
योगीराज सभामंडपात येताच वेडेवाकडे हात करून म्हणू लागले, होऽऽहो फारच तेजस्वी छे! छे! "मी तर होरपळून जाईन!
'अहो मला बाहेर घेऊन चला!
'माऊली क्षमा करा!
मला ही आपली प्रखरता सहन होत नाही!

.....न्याहो मला बाहेर......!
असे हातवारे करून स्वगत योगीराज बोलू लागले व स्वतः भोवतीच फिरू लागले.
शेवटी दोघांनी त्यांना धरून धर्मशाळेत बसवले-!
शांत झाल्यावर 'योगीराज' बाहेर आले व नतमस्तक होऊन लांबूनच माऊलीला नमस्कार करून बाहेर पडले!"

तो गृहस्थ पुढे सांगू लागला 'आम्ही ज्यावेळी त्यांना विचारलं की, 'योगीराज' आपण असे हातवारे करून काय बडबडत होता?
-त्यावेळी योगीराज घाम पुसत म्हणाले, 'माऊलीचं तेज अगम्य आहे.
साक्षात सूर्यच आहे.
सूर्याजवळ गर्वानं मी गेलो तो होरपळून निघालो!
मला खरा मार्ग आज मिळाला माऊलीच्या कृपेनं!

 ज्ञानेश्वर सामान्य योगी नव्हते

हा वरील प्रसंग १५-२० वर्षापूर्वीचाच आहे.
पण हा प्रसंग विशेषतः बोलका आहे.
एका पंडित योग्याला आलेला तो अनुभव आहे.
त्या योग्याला माऊली पुढे जाताच जे प्रखर चटके बसले ते यौगिक सामर्थ्याचे होते.
पाठीवर भाकरी भाजावयास सांगणाऱ्या ज्ञाननाथांपुढे जायचे म्हणजे हठयोगाशी सामना करण्यासारखेच आहे.
ज्या हठयोगाचे बीज संजीवनी समाधी पर्यंत वाढवले ते ज्ञाननाथ सामान्य योगी नव्हते, इतके समजण्याची बुद्धी, बुद्धीवादी जनातं असू नये ह्याची कीव येते.

ह्या हठयोगामुळेच ज्ञानेश्वरांविषयींचा मोठा वाद गेली शंभर वर्षे माजला आहे.
पंडितांच्या मते ज्ञानेश्वर हे "भाष्यकाराते वाट पुसतु' असे म्हणतात.
याचा अर्थ त्यांच्या पुढे 'श्रीमदाद्यशंकराचार्याचाच आदर्श होता. 
तर काही श्री. गोरक्षनाथाते वाट पुसतु' असा अर्थ असून गोरक्षनाथांचा आदर्श पुढे होता असे म्हणतात.

वादाच्या ह्या वरील दोन बाजूंनी जणु आपापले पक्षच तयार केले.
१ल्या वादाचे रूपांतर ज्ञानेश्वरी' ही 'वैदिक
ऋचावरच आधारलेली आहे व वैदिक तत्वज्ञानच ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे अशा निर्णयाप्रत आले.
प्रस्तुत लेखाचा मानस ह्या दोन्ही बाजूंपैकी कोणा एका बाजूचे समर्थन करावयाचे असे नसून ज्ञाननाथ हे एक योगाचे आदर्श आहेत एवढेच सांगण्याचा आहे.
कारण आज आम्ही जे ज्ञाननाथांच्या संदर्भात लेख वाचतो ते वाचल्यावर असे वाटते की ज्ञाननाथ समजण्यात कोठे तरी चूक होते आहे.

हा वाद खुद्द ज्ञानेश्वरांना आवडला असता का?
असा प्रश्न स्वतःच्या मनाला जर विचारला तर त्याचे उत्तर नाही असेच येते.
कारण एक नाथपंथी योगी हा वादात न शिरता अनुभूतीच्या प्रमाणातील गोष्टी संयमाने स्वतःजवळ बांधून ठेवतो व स्वत:ला बांधून ठेवतो.
असे नसते तर ज्ञाननाथ ( ज्ञानेश्वर ) यांनी एका अभंगात इतक्या लीनतेने म्हटले नसते.
ते त्या अभंगात म्हणतात,

जगामाजी श्रेष्ठ संप्रदाय नाना।
किर्ति ते भुवनामाजी फार।।१।।

आम्ही एक दिन जाणा नाथपंथीं।
नीचाहुनी आथी अति नीच ॥२॥

सर्वांचे चरण वंदितसे सदा ।
श्रेष्ठपणा कदा कीरे नसे।।३।।

नेणोंची स्वरूप धर्माधर्म कांहीं।
निवृत्तीच्या पायीं लीन जाहलों।।४।।

नाठवेचि कांहीं अन्यथा साधने।
ज्ञानेश्वर आन-उरेचिना ।।५।।

(या जगात नाना प्रकारचे श्रेष्ठ संप्रदाय असून त्यांचा लौकीकही फार मोठा आहे. 
आम्ही मात्र नीचाहून नीच आणि दीन नाथपंथी आहोत.
आम्ही नेहमी सर्वांच्या चरणांना वंदन करतो.
मोठेपणाचा अभिमान खरोखर आमच्या मनात कधीही नसतो.
धर्म काय, अधर्म काय हे आम्हांस काही समजत नाही.
आम्ही निवृत्तीनाथाला मात्र अनन्यभावाने शरण गेलो आहोत.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या एका साधनावाचून मला दुसरे काही आठवतच नाही.
मी याच एका साधनाशी एकरूप झालो आहे.)

नाथपंथातील लीनता व गुरूनिष्ठा ज्ञाननाथांनी अभंगात इतकी विनयाने रेखाटली असता, ते कोणाच्या आदर्शाचे पुजारी होते हे समजून घेणे विशेष अवघड नाही.
तथापि 'व्याकरणा' च्या अर्थानेच व्यक्तीला समजून घ्यायचे झाले तरी देखील काही विशेष अवघड नाही.
वरील अभंगात व्याकरणाच्या द्रुष्टीने ज्ञानेश्वर नाथपंथी नव्हते असा काही अर्थ निघत नाही.
तसेच त्यांच्या लीनतेचे व गुरू निष्ठेचे पैलू स्पष्ट होतात हा ही भाग व्याकरणातून काही वेगळा स्पष्ट होत नाही.



नाथ संप्रदायाची थोरी
प्रकट केली ज्ञानेश्वरी
         निळोबाराया गाथा-१५५८

संत निळोबाराया देखोल ज्ञानेश्वरीचा गौरव करताना नाथसंप्रदायाची थोरवी गातात. 
याचा अर्थ 'ज्ञानेश्वरी' हा ज्ञाननाथांनी लिहिलेला नाथसंप्रदायाचा सिद्ध ग्रंथ आहे.

 ज्ञानेश्वरांचीची नाथपंथीय परंपरा

आम्ही ह्या तपशीलात शिरण्याचे कारण इतकेच की जे नाथपंथाविषयी निरर्थक गैरसमज समाजात पसरविले आहेत ते निराधार असून त्यात काहीच तथ्य नाही हे विशद करण्याचाच आहे.
ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) हे आज नाथ संप्रदायाचे एक थोर "हठयोगी' योगी आहेत.
त्यांनी संजीवनी समाधी घेऊन नाथपंथाची परंपरा पाळली व उजळवली.
आता सर्व भावंडांनी संजीवनी समाध्या घेऊन नाथपंथाच्या योग सामर्थ्याचा गौरवच केला आहे.
इतिहासाला हा अध्यात्मिक बोध व्हावयास हवा हाच आमचा दृष्टीकोन आहे!

"नाथ संप्रदायाचे ऐतिहासिक चरित्र लिहावयास घेतल्यास ज्ञाननाथ हे फार महत्त्वाचे चरित्र आहे.
ज्ञाननाथ हे वारकरी संप्रदायांचे आदर्श असले तरी नाथसंप्रदायाचे यौगिक सामर्थ्य दाखविणारे आत्ताच्या काळाला नाथांच्या हठयोगाची ध्येयता राजयोगात कशी विलीन होते हे दाखवून देणारे एकमेव उदाहरण आहे.
इतिहास हा दोन प्रकारांनी लिहिला जातो.
माहिती असलेल्या गोष्टीकडून अज्ञात गोष्टीकडे (म्हणजेच From known to unknown ) किंवा अज्ञात गोष्टीकडून ज्ञात गोष्टीकडे, ( From unknown to known) ह्या बाबीचा विचार केला असता ज्ञानेश्वर हे एकमेव दुवा साधून देणारे 'हठयोगी' साधक आहेत.
निवृत्तीनाथ, सोपान व मुक्ता ही भावंडे अखेर नाथ संप्रदायाची बोलकी उदाहरणे आहेत.

वस्तुतः ह्या चारीहि भावंडांनी गीतेवर टीका केलेली आहे.
पणं ज्ञाननाथांची टीका प्रकाशात आली ती भाषेच्या सौष्ठवाने आणि वादाच्या म्रुदुंगाने
इतिहास संशोधक कै. राजवाडे यांच्या ज्ञानेश्वरीच्या विचाराने विद्वान खडबडून जागे झाले.
लोकमान्य टिळकांच्या एका अग्रलेखातील 'महानुभावपंथ ' ह्या मथळ्याने, विद्वान त्या पंथाच्या अभ्यासात आपली मती गुंतवू लागले व त्या पंथाचे संशोधन झाले त्याचप्रमाणे हे घडले.

पण राजवाड्यांच्या वादाने ज्ञानेश्वरीतील व्याकरण पुढे आले.
नाथपंथाचे सिद्ध तत्त्वज्ञान म्हणून त्याचा तसा दृष्टीकोन निश्चित झाला नाही उलट ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) ह्यांच्या विषयी असे विचार पुढे येऊ लागले की, ज्ञानेश्वरी लिहिणारे' ज्ञानेश्वर हे वेगळे असुन ज्ञाननाथ नावाचे योगी होते व त्यांचा ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीशी काहीच संबंध नाही.
आम्हाला ह्या वादात वाचकाला ठेवायचे नसून स्पष्ट करायचे आहे की, ज्ञानेश्वर, ज्ञानदेव व ज्ञाननाथ हा तिन्ही नावांचे संदर्भ ज्ञानेश्वरीशी असतील तर ते फक्त नाथपंथी ज्ञाननाथांशी आहेत.
आणि ह्या तिन्ही व्यक्ती वेगळ्या नसून एकच आहेत.

ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान हे गीतेचे तत्वज्ञान आहे.
गीता हा वैदिक तत्त्वांचा सिद्धांत आहे.
ज्यांना वेदान्त आणि सिद्धान्त हा भाग कळला नसेल त्यांना ज्ञानेश्वर, ' ज्ञाननाथ, ज्ञानदेव काय समजणार?

 गीतेचे तत्त्वज्ञान

नाथपंथात गीतेचे तत्त्वज्ञान हा सिद्धांत मानला आहे.
गोरक्षाने-'गोरख गीता' व कानिफनाथांनी कान्हूपाद गीता' म्हणून स्वतंत्रपणे टीका केलेली आहे.
या नवनाथ योग्यांनी ही जी ग्रंथ रचना केली ती सामान्य जनाना गीतेचे तत्वज्ञान प्राप्त व्हावे एवढाच त्यातला भाग आहे.
नाथसंप्रदायानेच प्रथम वैदिक तत्वज्ञान सामान्यांसाठी वर्णातीत व धर्मातीत भावनेने प्राकृतात निर्माण केले.
तोपर्यंत देववाणीतच वेदज्ञान सांगितले जात असे.
ते नाथसंप्रदायाने प्राकृतात अधिकार वाणीने सांगावयास सुरवात केली व नवी बंडाळी सुरू केली.

त्याचवेळी त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला व सगुण निर्गुण उपासनांचा भक्ती आणि साधना यात संगम केला.

नाथसंप्रदाय हा ज्ञानकाण्डी आणि उपासकाण्डी आहे.
जे वेदांनी तत्वरूपाने ज्ञान दिले ते तत्वज्ञान अनुभूतीतून तपासून पाहून मग त्याचा स्वीकार केला म्हणून नाथांचे अद्वैत परम अद्वैत गणले गेले आहे.

यौगिक साधनेतून त्यांनी सगुण-निर्गुण अनुभूतीतून पारखून घेतले आहे म्हणून नाथ संप्रदायिक अधिकारवाणीने वैदिक सिद्ध तत्त्वज्ञान जगात प्रतिपादन करतात व वैदिक सिद्ध दैताद्वैताच्या वादात न शिरता भक्तीचा व साधनेचा बोध सिद्ध
भाषेत सामान्यांना देतात.

 सांख्य व योग : ज्ञान व उपासना

गीतेतील वैदिक तत्त्वज्ञानही सांख्य व योग म्हणजेच ज्ञान व उपासना ह्यांचा समन्वय साधणारेच आहे.

सांख्य योगौप्रूथग्बालाः प्रवदन्ति न पण्डिताः
एकमप्यास्थितः सम्यगुमयोविन्दतेफलम् ॥
यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते
एकसांख्यं च योगंच यः पश्यति सपश्यति ॥

भगवत् गीता अ.५.४/५.

[सांख्य व कर्मयोग भिन्न ( फल देणारे) आहेत असे अज्ञ बोलतात, ज्ञानी बोलत नाही.
सांख्य आणि कर्मयोग (यापैकी) एकाचे जरी योग्य अनुष्ठान केले, तरी ते करणाराला दोहोचेही फल (मोक्ष) प्राप्त होते.

सांख्य मार्गाने जाणार्यांना जे (मोक्षरुपी) स्थान प्राप्त होते, तेच (निष्काम) कर्म योगानेच अनुष्ठान करणारांनाहि प्राप्त होते.
सांख्य आणि कर्मयोग हे एकच आहेत असे जाणणारा खरा ज्ञानी होय.]

वरील दोन्ही श्लोकात सांख्य योग यांची सम्यकवादी तुलना आहे.
ह्या श्लोकाचे समर्थन करताना ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) म्हणतात,

'एरव्ही तरी पार्था।
जे मुर्ख होती सर्वथा ।
ते सांख्य कर्मसंस्था।
जाणती केवी-

ज्ञानेश्वरी अ-५/२६

ह्या ठिकाणी ज्ञाननाथ निर्भिडपणे म्हणतात की मूर्ख लोकच हा भेद करतात. 
ह्याच भेदक पंडितांचा समाचार ज्ञाननाथांनी 'मूर्ख' विशेषण लावून घेतला आहे असे आम्ही म्हटले तर व्याकरणाच्या दृष्टीने अतिशयोक्ती तर होणार नाही ना!

सारांश साम्यवाद हा नाथप्रणीत तत्त्वज्ञान भाग आहे आणि ह्या तत्त्वज्ञानाचा वैदिक प्रमाण ग्रंथ गीता आहे.
नवनाथाचा योग हाच प्रधान उपासना धर्म असल्याने त्यांनी गीता तत्वज्ञानाची अनुभूती हठयोगातून घेतलेली आहे.
म्हणून ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) आपल्या ज्ञानेश्वरीत हठयोगाचा गौरव 'पंथराज' म्हणूनच करतात.
भक्तीमार्गाला 'पंथराज' म्हणण्याचा प्रयत्न कोणी केला तर 'ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी' ह्यातला फरकच त्या विद्वानाना समजला नाही असे होईल.
कुंडलिनी प्रधान हठयोग हाच पंथराज आहे.

ज्ञाननाथांनी ह्या तत्वज्ञानाच्या टीकेपूर्वी श्री गोरक्षनाथांची प्रत्यक्ष गाठ घेतली होती असे आमचे मत आहे.
आम्हाला जे यौगिक द्रुष्ट्या ज्ञात झाले ते थोडक्यात खालीलप्रमाणे आहे ह्याविषयी ऐतिहासिक पुरावे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत.

पैठणला ही चार भावंडे आलेली आहेत ही कल्पना येताच श्री गुरू गहिनीनाथ यांनी ह्या भावंडांना आपल्या मठीत बोलावून घेतले.
गहिनीनाथांचे वास्तव्य समाधिस्थ अवस्थेत 'गहिनीगड' गर्भागिरीत होते, तेथे ही चारही भावंडे त्यांच्या गडावर राहिली.
तेथे चार वडाची झाडे आहेत.
त्या झाडाच्या छायेत त्यांनी एक झोपडी बांधली व गुरू निवृत्तीच्या सहवासात ही भावंडे राहिली.

रोज रात्री बाराच्या सुमारास गुरू गहिनीनाथ निवृतीस बोलावून घेत व त्याला नाथपंथी मुद्रांचा अभ्यास उपदेशीत.
पुढे एके दिवशी ज्ञाननाथांना गहिनीनाथांनी बोलाविले व त्यांनाही हठयोगाच्या मुद्रा दिल्या.
असा कार्यक्रम साधारणत: सहा महिने चालला होता.
नंतर त्यांनी सर्वांना गोरक्षनाथांच्या दर्शनास 'डोंगरगण' येथील त्यांच्या मठात जावयास सांगितले.
तेथे गोरक्षनाथांनी ज्ञाननाथांबरोबर गीतेच्या टीकेवर चर्चा केली व गीतेच्या कार्यासाठी नेवासे येथे जाण्याचा आदेश दिला.

ह्या आदेशाप्रमाणे गोरखनाथांची भेट डोंगरगण येथे झाली व त्या मठात ही भावंडे आठ दिवस राहिली.
त्यावेळी गोरक्षनाथांनी गीता तत्वज्ञानावर ह्या भावंडांशी चर्चा केली व त्यातील गूढ उकलून सांगितले.
त्यामुळे निवृत्ती एका ठिकाणी म्हणतात -

निवृत्ती गयिनीदेवे उपदेशिला सर्व
गोरक्षी गुह्यभाव सांगती मज।

- निवृत्तीनाथ-गाथा-११९

तसेच-
निवृत्ति गायिनी कृष्ण जप तो अनुपजाण।
सांगितली खूण गोरक्षाने ।
निवृत्ति सघर गोरक्षगयिनी।
ब्रह्मरुपी पूर्णी समरसे।
निवृत्ति परिवार-गुरू गयिनी अमर ।
गोरक्ष कंधर ब्रह्म माझें।

-निवृत्तीनाथ गाथा

वरील अभंगावरून हे लक्षात येईल की आम्हाला जे ज्ञात झाले ते समर्थनीय आहे.

 गोरक्षनाथांनी मार्ग दाखविला

श्रीगोरक्षनाथांनी डोंगरगणच्या आपल्या मठात ह्या भावंडांना ठेवून घेतले होते व निवृत्तीनाथ ज्ञाननाथ ह्यांना गोरक्षनाथांनी साधनेतील बारकावे तसेच गीतेचे मर्मही सांगितले.
ती जी गीता तत्त्वज्ञानाची चर्चा निवृत्तीनाथ ज्ञाननाथ आणि गोरक्षनाथ यांच्यात झाली ती, गोरख-गीता' म्हणून मराठीत प्रसिद्ध आहे.
ती आम्ही लवकरच प्रसिद्ध करण्याच्या विचारात आहोत.
ह्या भेटीचे वर्णन करताना गोरक्षाचा उल्लेख 'दत्तात्रेय योगिया' असा केलेला आहे.

ज्ञान गोदावरीच्या तीरी। स्नान केले पंचाळेश्वरी ।
ज्ञानदेवांच्या अंतरी । दत्तात्रेय योगिया
पैल-गुरुच्या शिखरी । एक योगी निराकारी

- ज्ञानेश्वर गाथा

श्री गुरु गोरक्षनाथांनी समाधी घेतलेली नाही.
ते अवधूत अवस्थेत असून कोठेही त्यांचा संचार असतो व ते नेहमी दत्तात्रेयांच्या सहवासात असतात.
त्यामुळे दत्तयोगी असा गौरव ज्ञाननाथांनी केला आहे.

तसेच मुक्ताबाईला गोरक्ष भेटल्याचे वर्णन नामदेवाने केले आहे तेही बोलके आहे.

"मोतीयाचा चुरा फेकिला अवरी ।
विजुचिया परी कीळ जाले ॥

जरी पीतांबरे नेसविलीं नमा।
'चैतन्याचा गाभा नील बिंदुः॥

तळी परी पसरे शुन्याकार जाले।
सर्पाची ही पिले नाचु लागे।।

कडकडे वीज निमालि ठायिचे ठायीं।
भेटली मुक्ताबाई गोरोबाला ॥

ज्ञानदेव म्हणे कैसी जाली भेट।
ओळखले अविट आपुले पण ॥"

ह्यात 'गोरोबा' हा शब्द विद्वानांमध्ये गोंधळ करतो की गोरोबा म्हणजे गोरक्ष की गोरा कुंभार ?
पण आमच्या मते वरील आलेले वर्णन हे गोरक्षाचे आहे, गोराकुंभाराचे नव्हे.

गोरक्षाशी झालेल्या चर्चेमुळेच ज्ञानेश्वरी हा नाथपंथाचा सिद्धांत झाला आहे. ज्ञानेश्वरीत सिद्धांत वगळले असता काय शिल्लक राहील ते 'भाष्यकाराते वाट पुसतु' असेच म्हणावे लागेल.

ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना ज्ञाननाथ म्हणतात,

या गीतार्थाची चोरी।
स्वयें शंभू विवरी।
जेथ भवानी प्रश्नु केवी।
चमत्कारोनी ।। ७०।।

-ज्ञानेश्वरी अ.१-७०

'शंकर (आदिनाथ), आपल्या मनाशीच सतत विचार करू लागतात हे पाहून पार्वती विचारते, कसला एवढा गहन विचार करता आहात त्यावर शंकर म्हणाले, 'हे देवी ज्या प्रमाणे तुझ्या स्वरूपाचा शोध लागत नाही त्या प्रमाणे गीतेचाही थांग लागत नाही.
ह्या गीता तत्त्वाचा विचार करू लागावे तर रोज नवीनच काही दिसते--'

ग्रंथाच्या प्रारंभीच आदिनाथांच्या विभ्रमाचा दाखला देऊन गीतेची थोरवी गाऊन नंतर गुरुकृपेने हे मी अवघड काम करीत आहे.
ते सहज सोपे होईल असा निर्वाळा देतात.

ह्या दोन्ही भावात नाथपंथांच्या तत्वांचा आविष्कार आहे.
आदिनाथ हे सर्वब्रह्म तो ह्या गीतार्थाविषयी साशंकित आहे.
तरी देखील मी गुरुकृपेने हे सर्व करीन.
ह्यात परमतत्त्वाचा मेरुमणि गुरू आहे, हे नाथतत्त्व आहे.

 'भाष्यकाराते वाट पुसतु'

आता इतर तत्त्वांचा वा बाह्यांगाचा विचार न करता फक्त संक्षिप्तपणे 'भाष्यकाराते वाट पुसतु' याचाच विचार करू.
कारण ज्ञानेश्वरीच्या गीता तत्त्वज्ञानावर हाच वादाचा भाग आहे.
'ज्ञाननाथ आणि ज्ञानेश्वरी' ह्या आमच्या पुस्तकात ह्या विषयी स्वतंत्र विवरण केलेले आहे.

अठराव्या अध्यायात ज्ञाननाथ म्हणतात,

'तैसा व्यासाचा मागोवा घेतु। भाष्यकारांतें वाठ पुसतु ।
अयोग्यहि मी न पवतु । के जाईन ।

-ज्ञानेश्वरी १८. १७२९

त्याप्रमाणे व्यासांचा मागोवा घेत घेत व भाष्यकारांना वाट पुसत पुसत मी अयोग्य असलो तरी तेथे (गीतार्थाच्या ठिकाणी)
प्राप्त न होता कोठे जाईन ]

ह्या ओवीमुळे प्रश्न-उपप्रश्नांची सुरुवात होऊन विद्वानांच्या पुढे आद्यशंकराचार्याचा गीतेवरील टीका ग्रंथ उभा राहिला आहे.
त्या टीका ग्रंथातील साम्यता पाहून शंकराचार्यांनाच ज्ञाननाथांनी तत्वतः मान्य केले असा सूर कशा तर्हेने येतो त्यात रामानुज हेही वादात येतातच.

गीतेसारखा गहन विषय की जो 'हा वेदार्थसागरु' असा उल्लेख ज्ञानेश्वर करतात त्यांच्या पुढे टीकेवरील इतर ग्रंथ नसतील असे संभवणे कठीण त्यात प्राकृतात गीतार्थ सार्थ टीकेतून सांगण्याची जबाबदारी ज्ञाननाथांनी घेतलेली होती.
ह्या वेदार्थाच्या सागरात डुंबायचे म्हणजे विसाव्याला काही आधार हवेतच हे आधार निश्चितच घेतलेले आहेत यात शंका नाही, परन्तु ह्या आधारातून असे निष्पन्न करणे अगदी अयोग्य आहे की, ते त्याच तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते.
आज गीतेवर २८४ टीका लिहिल्या गेल्या आहेत.
ह्या टीका ग्रंथांमध्ये कित्येक ग्रंथ साम्यक तत्वरूप असतील म्हणजे ते त्या-त्या भाष्यकाराच्या तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते असा युक्तीवाद करणे याचा अर्थ 'टीका ग्रंथ' याचा अर्थच न समजून घेतल्यासारखे आहे.
भाष्यकारांचा टीकेचा विषय गीता असल्यावर गीता हा तत्त्वज्ञानाचा मुख्य विषय असेल.
भाष्यकाराचे तत्त्वज्ञान गीतेच्या आधाराने
कोणी सांगत असेल तर सूर्याला काजव्याने मी तुला प्रकाश देतो असेच सांगण्यासारखे आहे.

गीता हा तत्वज्ञानाचा पिंड ब्रह्मपिंड वेदान्त  आहे आणि साधन योग आहे.
हा भाग फार महत्वाचा आहे.

गीतेचा जन्म कोठे झाला असे सहज विचारले तर उत्तर येते 'कुरुक्षेत्रावर!'
पण आमच्या मते जन्म झाला आहे कुरुक्षेत्रापासून दूर सुमारे ४० मैलावर असलेल्या हस्तिनापुरातील राजवाड्यात!

व्यासांनी रचनाच अशी केली आहे की तो प्रसंगच फार नाट्यमय आहे.
राजवाड्यात आंधळा ध्रुतराष्ट्र डोळस संजयाला प्रश्न विचारतो 'कुरुक्षेत्रावर माझी मुलं व पंडूची मुलं काय करित आहेत ते सांग.'

 संजयाची दिव्यदृष्टी

नंतर संजय सांगावयास सुरुवात करतो.
म्हणजे योगाच्या साहाय्याने दिव्यदृष्टीने ४० मैलांवरील घडत असलेली कथा पाहून व श्रवण करून ती राजाला सांगितली जात आहे.
ह्यातच गीतेचे गूढ आहे.
गीताज्ञान दुसर्यास सांगावयाचे असेल तर भाष्यकार हा दिव्यदृष्टी प्राप्त झालेला व अंतर्मुख होऊन नाद ब्रह्मातील नाद टिपणारा असावयास हवा.
इथे विद्वत्ता हा आमच्या दृष्टीने गौण विषय आहे.
कारण दिव्यदृष्टी प्राप्त झालेला व अंतर्मुख होणारा, नाद ब्रह्मात लीन होणारा हा त्रिकाल ज्ञानी योगेश्वरच असतो.
व्यासांनी हा भाष्याचा संकेत फार उद्बोधकपणे सांगितला आहे.
ह्या कसोटीला आपले ज्ञाननाथ निश्चितच उतरतात.
म्हणूनच ज्ञानेश्वरी अत्यंत बोलकी झाली आहे.
ज्ञाननाथांच्या योगातील प्रगतीची परीक्षा घ्यायला हवी असे म्हणणे म्हणजे ज्ञानेश्वरी योग शून्य करून वाचण्यासारखेच आहे.

गीतेतील तत्वांचा बोध, व्यासांनी सांगितलेल्या संजयासारख्या अधिकारी योग्यास सहज होतो, मग हा तत्वबोध समन अधिकारी असलेल्या योगी भाष्यकारांस वेगळा होईल का?
जे तत्व तत्वच आहे ते बदलणे कसे शक्य आहे?
ते तसेच राहणार.
त्यामुळे जो अर्थ दिव्य दृष्टीक्षेपात आणि अंतर्मुखातून ध्वनित होतो त्यापेक्षा दुसरा असणे शक्य आहे.
त्यामुळे गीतेतील श्लोकाचे विवरण रामानुज, शंकराचार्यापेक्षा वेगळे कसे केले जाईल?
ज्या गोष्टीत रामानुज व शंकराचार्यापेक्षा वेगळी दृष्टी असेल त्यावेळी त्यात वेगळेपणा निश्चित दिसेल.
ज्ञानेश्वर नाथपंथी हठयोगी साधक होते म्हणून इतर ठिकाणी रामानुज अथवा शंकराचार्यांपेक्षा वेगळेपणा दाखविला जाणारच.


'पिंडे पिंडाचा ग्रासु । तो हा नाथ संकेतीचा ।
परी दाऊनी गेला उद्देशु दंशु। महाविष्णू-'

ह्या वरील ओवीतील वेगळेपणा निश्चितच आहे.
त्यात हठयोगाची साक्ष आहे म्हणून डॉ. पेंडसे यांनी काढलेला निष्कर्ष विचारात घेता आम्हास असे वाटते की ज्ञाननाथांनी केलेली टीका ही दिव्य दृष्टीतून अंतर्मुख होऊन अनुभूतीतूनच लिहिलेली आहे, ह्यात शंका नाही आणि ह्या अनुभूतीचे श्रेय नाथांच्या योग साधनेचे आहे.

डॉ. शं. दा. पेंडसे म्हणतात, “एकंदर २१८ स्थळांची तुलना केली, त्यात असे दिसते की १४९ ठिकाणी शंकर व ज्ञानेशांनी "तत्वज्ञानांच्या व अर्थाच्या दृष्टीने सदृश अशी टीका केली आहे.
त्यापैकी ४२ ठिकाणी शंकराचे शब्द ज्ञानेशांनी योजलेले आहेत.
११० ठिकाणी शंकर आणि ज्ञानेश यांचे दृष्टांतही सारखे आहेत व ५९० ठिकाणी शंकराचा अर्थ घेऊन रामानुजांचा टाकला आहे.
६८ ठिकाणी शंकरांचा किंवा रामानुजांचाही अर्थ न घेता ज्ञानेशांनी स्वतंत्र अर्थ केले आहेत.
२८ ठिकाणी तर निर्गुण किंवा मायावादपर अर्थ शंकरापेक्षाही पुढे जाऊन किंवा त्याच्याही पेक्षा स्पष्टपणे केले आहेत.
एका ठिकाणी शंकर रामानुज दोघांच्याही अर्थाचा समुच्चय केला आहे व फक्त ५ ठिकाणी शंकरांना सोडून रामानुजांचा अर्थ स्वीकारला आहे.
तत्वज्ञानाच्या दृष्टीने शंकरांना विरोधी असे एकही स्थळ नाही; शंकरांना सोडून रामानुजांना अनुसरल्याची स्थळे तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची नाहीत.
रामानुजाप्रमाणे जेथे अर्थ केला आहे अशा स्थळांपैकी पाच स्थळे अशी आहेत की, तेथील अर्थ ज्ञानेशांना स्वतंत्रपणे सुचणे असंभवनीय आहे.'

"वरील डॉ. पेंडसे यांच्या निष्कर्षांचे प्रमुख आठ भाग पडतात:--

१. शंकराचार्याच्या भाष्याशी जुळते भाष्य.
२. शंकराचार्यांच्या शब्दसद्रुश भाग.
३. शंकराचार्यातील व ज्ञानेशातील दृष्टांत साम्यता.
४. रामानुजांच्या अर्थाऐवजी शंकराचार्याचा अर्थ.
५. स्वतंत्र अर्थ प्रतिपादन
६. निर्गुण किंवा मायावादपर परिणामकारक अर्थबोध.
जो शंकराचार्यांना साधला नाही.
७. शंकराचार्य रामानुज ह्यांच्या दोघांच्याही अर्थाचा स्वीकार.
८. शंकराचार्यांना सोडून रामानुजांच्या अर्थाचा स्वीकार.

वरील निष्कर्षांचा अभ्यास केला असता खालील पाच गोष्टी निदर्शनास येतात:-

१) शंकराचार्याची तत्त्व साम्यता (अर्थदृष्ट्या)
२) शंकराचाची दृष्टांत साम्यता.
३) रामानुजांच्या शंकराच्या अर्थाचा स्वीकार
४). रामानुजांच्याच अर्थाचा स्वीकार.
५) स्वतंत्र अर्थ प्रतिपादन व परिणामकारक अर्थबोध जो शंकराचार्यांना वा रामानुजांनाही साधला नाही.

आम्ही मागे निर्देश केल्याप्रमाणे दिव्य दृष्टी व अंतर्मुख साध्य जसजे झाले असेल तसतसे गीतेचे तत्वज्ञान समजते.
स्वतः ज्ञाननाथही असेच आदिनाथाच्या तोंडून म्हणतात की, 'रोज नवा अर्थ गीता तत्वज्ञानातून प्राप्त होतो!'

त्याचप्रमाणे वरील विचाराचा भाग येतो.
शंकराचार्यांच्यातील तत्त्वसाम्यता हा जसा यौगिक साध्यतेचा भाग आहे तसाच स्वतंत्र अर्थ प्रतिपादन हा यौगिक साध्यातून प्राप्त झालेल्या श्रेष्ठ दर्जाची खूण आहे.
गीता हे सर्व भाष्यकारांचे मध्यवर्ती तत्वज्ञान केन्द्र असल्याने प्रतिपादनातील साम्यता सहज आढळेल.
डॉ. पेंडसे यांच्या चिकित्सक बुद्धीचे, आणि प्रयत्नांचे आम्ही कौतुक करतो, पण ज्यावेळी ते असे स्पष्ट करतात की ज्ञाननाथ काही ठिकाणी रामानुज वा शंकरचार्याच्या भाष्यांचा स्वीकार करीत नाहीत.
ह्यामुळे दोन बोध होतात:-

१) ज्ञाननाथांपुढे जी भाष्ये होती ती सर्व जशीच्या तशी स्वीकारण्यासाठी नव्हती.

२) ज्ञाननाथांनी एकाच भाष्यकाराला आपल्यासमोर ठेवले नव्हते.

 केवळ भाषांतर नव्हे !

वरील निष्कर्षावरून हे स्पष्ट होईल की ज्ञाननाथांना ज्ञानेश्वरी लिहिताना केवळ प्राकृतात 'गीतासार' भाषांतरीत आणावयाचे नव्हते तर त्यात स्वतंत्रपणा स्वानुभवाचे बोल संग्रहीत करावयाचे होते.
म्हणजे गीतार्थाचे गूढ उकलण्याचा प्रधान हेतू ज्ञाननाथांच्यापुढे होता.
आणि हा मानस पुरा करीत असताना त्यांच्यापुढे काही भाष्येही होती की जी प्रमाण आहेत.
त्यामुळे मोठ्या गौरवाने ज्ञाननाथ म्हणतात-

तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारांते वाट पुसतु ।

ह्यात ज्ञाननाथांची आदराचीच भावना आहे.
भाष्यकारांबद्दलची लीनता हा एक नाथपंथीय पैलू आहे जो ज्ञाननाथांनी ज्ञानेश्वरीत प्रकट केला आहे.
त्यामुळे आमचे मत आहे की, प्रत्येकाचा दृष्टीकोन हा स्वानुभवाने कमी जास्त होणे स्वाभाविक आहे, पण याचा अर्थ आदरार्थी भावाचा अर्थ 'पुरस्कर्ता' म्हणून लावणे अयोग्य असून त्यामुळे ज्ञाननाथांची ज्ञानाची ओळखच झाली नाही असे होईल.
ह्याविषयी सध्या इतकेच पुरे.

 सगुण-निर्गुणाचा भाव

नाथसंप्रदायात सगुण-निर्गुण ही दोन्ही भाव व अवस्था म्हणून स्वीकारलेले तत्व आहे.
ज्ञाननाथांच्या अभंगात व ज्ञानेश्वरीत ह्या तत्वाचे फार बोलकी उदाहरणे आदळतात.

वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन ।
एक नारायण सार जप।।१।।

जप तप कर्म हरिवीण धर्म।
वाऊगाचि श्रम व्यर्थ जाय ।।२।।

हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले ।
भ्रमर गुंतले सुमन कलिके ।।३।।

ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र।
यमें कुळ गोत्र वर्जियले।।४।।

(या नारायणाच्या नामाचा जप करा असे वेदांचे, श्रुतींचे, स्मृतींचे सार आहे.
श्रीहरीच्या नामस्मरणावाचून इतर सर्व जपतपादी साधने, नेमधर्म, कर्मकांड व्यर्थ असून त्यांच्यापासून काहीच मिळणार नाही, पण ज्यांनी श्रीहरीच्या नामस्मरणाचा पाठ केला ते मात्र सुवासिक फुलांच्या कळीमध्ये भ्रमर गुंतून राहतो त्याप्रमाणे श्रीहरीच्या स्वरूपात एकचित्ताने स्थिरावून जातात.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हाच माझा मंत्र असून हेच माझे शस्त्र आहे.
याच नामाच्या भयाने यमाने आमच्या कुलगोत्राचाच त्याग केला आहे.)

मंत्र, तंत्र, यंत्र सर्वही अबद्ध ।
जव नाही शुद्ध अंत:करण।।१।।

गुरू शिष्यपण हेही मायिकत्व।
जव निज तत्व न ओळखी ।।२।।

प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाण ।
मागुति बंधन दृढ होय ।।३।।

आत्मरूपावीण साधन अन्यत्र।
भ्रमासीच पात्र होई ने की, ।।४।।

सर्व वृत्ति शुन्य म्हणे तोचि धन्य ।
ज्ञानदेव मान्य सर्वस्वेशी ।।५।।

(जो पर्यंत अंत:करण शुद्ध होत नाही तो पर्यंत मंत्र, तंत्र, यंत्र इत्यादीच्या खटपटी व्यर्थ आहेत.
जो पर्यंत निज बोधाची ओळख होत नाही तोपर्यंत गुरुशिष्यपणही व्यर्थ आहे.
अष्टमहासिद्धी जरी प्राप्त झाल्यातरी शेवटी त्यांचे बंधन दृढ होऊन जाते.
आत्मरूपाच्या बंधाशिवाय इतर कुठलेही साधन उगाच भ्रमासच पात्र होईल.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याच्या सर्व वृत्ती शून्य झाल्या आहेत तोच एक धन्य होय.
तोच सर्वांना मान्य होईल.)

आत्माराम देखे सहस्र दलावरी ।
उन्मी हे पाही आरुते तेही ।।१।।

चक्षूचे अंतरी चक्षु देखे पूर्ण।
हेचि की रे खुण तुझे ठायी ।।२।।

मी ब्रह्म सोहं ज्ञानपद ते साजिरें ।
ते ठायीं निर्धारें तुझा तुंची।।३।।

बाप रखुमादेविवरा तुझा तूं आपण ।
सर्व हे चैतन्य तुझे ठायीं ।।४।।

(सहस्त्रदळ कमळात आत्मारामाची वस्ती असलेली तू पहा.
त्यापुढे उन्मनी अवस्था अलीकडेच आहे.
डोळ्याच्या आत जो आत्म्याचा डोळा पाहाणारा आहे तो तू आपल्या ठिकाणी उमजून पहा.
मी ब्रह्म आहे हे ज्ञानाचे पद तुझ्या ठिकाणी निर्धाराने आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रखुमाईच्या पतीच्या, बाप विठ्ठलाच्या कृपेने सर्वत्र व्यापलेले चैतन्य तुझ्याच ठिकाणी तू पहा.)



 सगुण-निर्गुणाचा संगम

 वरील तिन्ही अभंगात ज्ञाननाथांनी सगुण-निर्गुणाचा संगम साधलेला आहे!
हाच नाथसंप्रदायाचा साधनेचा गाभा आहे.
सगुण-निर्गुण उपासनेतूनच हठयोग साधना केली जाते.
ज्ञाननाथांनी तेच साधन ठेवले होते म्हणून ज्ञानेश्वरीत मायावादही जास्त परिणामकारक शब्दात रेखाटलेला आहे.
इतकेच नव्हे तर एका ठिकाणी व्यासांनाही प्रश्नाची रचना कशी करावयास हवी होती हे सांगून तो स्पष्ट करून दाखविला आहे.

 (ज्ञा. अ. १४.३२०-२६)

नाथांनी ज्ञाननाथांना सगुण-निर्गुणाचे बाळकडूच पाजले होते असे त्या पंक्ती वाचल्यावर वाटते.
गुणातीत पुरुषाच्या आचाराचा प्रश्नच उद्भवत नाही, असा ज्ञाननाथ स्पष्ट निर्वाळा व्यासांना देत आहेत व म्हणतात की, गुणातीत पुरुष सगुणी कसा असेल, तो गुणाधीन आहे किंवा नाही हे ओळखण्याची तू खूण विचारीत असशील तर मी ते स्पष्ट करीन.

ह्यात ज्ञाननाथांचा नाथपंथीय बाणा स्पष्ट होतो.
नाथपंथीय शिवालाही प्रश्न विचारतात अशा रूपक कथा आपण वाचतो, त्यामागे हेच गूढ असते की, वैदिक प्रश्न नवनाथांना अनुभूतीतून खटकले असतील तर ते त्यांनी शिवाला जाऊन विचारले आहेत.
तद्वत ज्ञाननाथांनी व्यासांना विनयाने गुणातीत भाव न ठेवता गुण-सगुणी कसा असावा असा सरळ प्रश्न मांडा असे सुचविले होते.

अशा स्वतंत्र बाण्याच्या ज्ञाननाथांपुढे कोणाचा आदर्श, होता हे आणखी स्पष्ट सांगणे न लगे!

 आता फक्त ज्ञाननाथांनी गुरूकृपेने प्राप्त केलेल्या नाथपंथीय समाधी बीजाची कल्पना देतो व प्रस्तुत लेख संपवतो.
"ज्ञाननाथ व ज्ञानेश्वर" ह्या पुस्तकात संपूर्ण चर्चा करू.

  गीतेत सांगितलेल्या समाधी योग अध्यायावर भाष्य'' करताना ज्ञाननाथ म्हणतात--

मग त्या मार्गाची धांव ।
पुरेल प्रवृत्तीची हाव।।
जेथ साध्यं साधनी खेंव।
समरसे होय ॥५९॥
जेथ पुढील पैस पारुखे।
मागील स्मरावे ते ठाके।
ऐसिये सरितीये भूमिके।
समाधि राहे ॥६०ll

 ज्ञानेश्वरी ६.

(मग त्या धारणामार्गाची चाल पुरी होऊन अमुक एक गोष्ट करावयाची आहे, अशा विषयीची इच्छा बंद पडून ज्या अवस्थेमध्ये ब्रह्मैवय झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो.
ज्या ठिकाणी पुढील प्रवृत्ती बंद पडून मागील कशाचेही स्मरण होत नाही, अशा या ऐक्याच्या भूमिकेवर समाधी राहते.)

अगदी असेच गोरक्षनाथ आपल्या 'गोरक्ष पद्धती'त म्हणतात,

न गधे न रसं रूपं नच स्पर्श ननिः स्वनम् ।
नात्मानं न परस्वं च योगी युक्तः समाधिना ॥८८॥

-गोरक्षपद्धति पृ. ९१

(जो योगी समाधीत एकत्व पावतो, सर्व इंद्रियांना मनात लीन करून गंध, रस, रूप, स्पर्श, शब्द ह्या पाच विषयांचे ज्याला
ज्ञान नसते, जो कोणतीही वस्तू आपली व दुसर्याची वेगळी मानीत नाही, तसेच जीवात्मा परमात्म्याला वेगळे मानीत नाही, अशा प्रकारे ध्यान करणारे योगी यांनी अन्य कसल्याच वस्तूचे भान नसते.
ह्यालाच समाधी अवस्था म्हणतात.)

 नाथसंप्रदायी किमया

नाथसंप्रदायात सामरस्यसिद्धी प्राप्ती ही साधकाची हठयोगी तळमळ असते, पण ही अवस्थाही हठयोगी अत्यंत संयमाने प्राप्त करतात.
कारण ह्या अवस्थेतून निरंजनपद प्राप्त होऊन अवधूत योगी होतो ही नाथसंप्रदायाची किमया आहे.
हाच ध्येय वाद गोरक्षाने आपल्या तत्त्वज्ञानात दिलेला आहे.
हठयोगातून राजयोग प्राप्त होतो, पण हे आधी केले पाहिजे.
हठयोगाचे फल राजयोग आहे  व राजयोगातील अंतिम ध्येय निरंजनपद आहे.

ज्ञानेश्वरीतील सहाव्या अध्यायात ह्या निरंजन अवस्थेचे वर्णन आलेले आहे.

जे आकाराचा प्रांतु।
जे मोक्षाचा एकांतु ।
जेथ आदि आणि अंतु।
विरोनि गेले ॥३२॥
ते अनिर्वाच्य महासुख।
पै आपणचि जाहले ते पुरुष ।
जयांचे का निष्कर्ष ।
प्राप्तिवेरी ।।३२५।।

ज्ञानेश्वरी अ. ६. ओ. ३२१, २५.

(जे आकाराचा शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवटही नाहीशी झाली आहेत, ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात, ते पुरुष असे हे शब्दातीत उत्कृष्ट सुख आपणच बनतात.)

ह्याच निरंजनपदाची अभंगातील अवस्था ज्ञाननाथांनी वर्णन केली आहे ती अभ्यासू !

चहूं शुन्या आरुते महाशुन्या परुते ।।
सर्वांसी पहाते तेंचि गे गा ।।१।।

दिसे तेहि शुन्य पाहातहि शुन्य ।
देहामाजी निरंतर भिन्न रुप ।।२।।

शुन्य निरशुन्य दोन्ही हरपली ।
तेथूनि पाहिली निजवस्तु ।।३।।

ध्येय ध्यान ध्याता निरसुनी तिन्ही ।
झालो निरंजनी अति लीन ।।४।।

ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे ।।
गुरु मुखे खूण सांगितली ।।५।।

'(जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या या चारही अवस्थांपलीकडची ब्रह्ममहाशुन्यावस्था जी उन्मनी तिच्याही पलीकडे आहे.
जे दिसते ते सर्व मिथ्या असून पाहणारा द्रष्टाही शून्यच असून देहात राहणारा आत्मा नित्य वेगळाच आहे.
शून्य व निरशून्य हे दोन्ही भाव हरपले की त्यानंतर तू निजवस्तूस पाहा.
ध्याता, ध्येय व ध्यान ही त्रिपुटी नाहीशी करून त्या निरंजन स्वरूपाच्या ठिकाणी मी लीन झालो.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरूच्या मुखातून ही अनुभवाची खुण मला कळली.)

ज्ञाननाथानी संजीवनी समाधी का घेतली ह्याचे खरे गमक ह्याच पदात आहे.
निरंजन अवस्था ज्याने प्राप्त करून घेतली आहे तो संजीवनी समाधीच घेणार.
देहाचे स्वरूप ब्रह्माच्या रूपात पाहिल्यावर कोणी योगी त्या देहाचा त्याग करीत नाही.
ही फक्त नाथसंप्रदायाची निरंजन अवस्था आहे म्हणून श्री नवनाथांनी जिवंत समाध्या घेऊन ही अवस्था जगाला ज्ञात करून दिली.
ज्ञाननाथांनी ही परंपरा पुन्हा उज्ज्वलीत
केली.
राजयोगाची ही खरी श्रेष्ठ अवस्था आहे. 
वादाने ह्या अवस्था प्राप्त होत नाहीत.
संयमाने सद्गुरुशी लीन राहून, साधनाशील प्रवृत्तीने सगुण-निर्गुण सेवेतून हठयोगाच्या प्रभावी साधनेने साधक ह्या राजयोगाच्या निरंजनपदांची प्राप्ती करतो मी राजयोगी आहे ह्याची ग्वाही देतो. 
संजीवनी समाधी हाच त्याच्या राजयोगाचा पुरावा असतो.

लेखक- सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ


जय सद्गुरु श्री देवेन्द्रनाथ💐🙏🏻


🌷🌷🌷
🙏🙏🙏

Thursday, July 30, 2020

श्री निपटनिरंजन


श्री निपटनिरंजन 
(सन १६२३ – १७३८)



जन्म:  चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात जन्म, १६२३
आई/वडिल: ज्ञात नाही 
कार्यकाळ: १६२३-१७३८
संप्रदाय: नाथ संप्रदाय
गुरु: चर्पटनाथ
समाधी: आवतार समाप्ती १७३८

निपटनिरंजन महाराज 

हे एक संतकवी असून यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून यांच्या मनावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयालची भजने हे आवडीने गात. सन १६६३च्या सुमारास आपल्या वृद्ध मातेला घेऊन हे बऱ्हाणपूरमार्गे औरंगाबादेस आले आणि तेथेच राहू लागले. औरंगपुऱ्यात एकनाथमंदिराजवळ चिलखते वगैरे बनविण्याचा यांचा छोटा व्यवसाय होता. परंतु धंद्यात अपयश आल्याने ते निराश झाले. वृद्ध आई मृत्यू पावली तेव्हा गरिबीमुळे त्यांना तिचा अंत्यसंस्कारही नीटसा करता आला नाही. आईच्याच चितेवरची राख अंगाला फासून हे पूर्ण बैरागी बनले.

ध्यानधारणा व योगसाधना यांत त्यांचा काळ जाऊ लागला. काही दिवसांनी मठाच्या बागेतच यांना दत्तदर्शन झाले. चर्पटनाथ नामक साधुपुरुषाकडून यांनी देवगिरीवर गुरुपदेश घेतला. अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष औरंगजेबावरही या योगी पुरुषाच्या सामर्थ्याचा प्रभाव पडला.

त्यांची काही पदे व दोहे प्रसिद्ध आहेत. 

एक अद्भुत दत्तभक्त - कवी निपट निरंजन

आनेकी बाट कोन | जानेका घाट कोन |
ब्रह्म का कपाट कोन |  कहासे जीव आया है |
जीव कोन शिव कौन |  शिवका स्वरूप कोन |
माया कोन धरनी कोन |  धरनी को धरे कोन |
सोवनमे जागे कोन |  देहले भागे कोन |
वादचंद लागे कोन | कोन मे कोन समाया है |
कहे निपट निरंजन |  इतना नाही बुझे तो |
झक मारन नरदेह पाया है |


निपट निरंजन ह्यांना भेटण्यास औरंगजेब सन १६८२ मध्ये आला तो त्यांना वश  करण्यासाठी .कारण त्याने श्री निपट बाबांच्या सिद्धी विषयी ऐकले होते. औरंगजेब आला त्यावेळेस बाबाना ताप आला होता. त्यांनी लगेच ओळखले की हा संतांना शरण नाही तर मराठयांची पाळेमुळे खणण्यासाठी आला आहे.  निपट निरंजन व औरंगजेब ह्यांच्यात जो संवाद झाला, त्याच्या ११४ ओव्या उपलब्ध आहेत. ह्या’ निरंजन बानी’ ह्या पुस्तकात दिल्या आहेत

‘सून आलमगीर दिल से भी जायेगा दुनिया से भी जायेगा’ 
बाबानी औरंगजेबाला त्याच्या क्रूर कर्माबद्दल असे सुनावले.

दावा बादशहा का करते, और दुवा मांगते है तो फकीर से
कहे निपट ये दिल्ली का दरबार नही फकिरी दरबार है
चारो दिशा बाहर मार- काट किया कत्ले आम
और फकीर की दुवा मांगने आया है ?

औरंगजेबाने निपट बाबाची परीक्षा घेण्यासाठी मक्केची बोरे खायची इच्छा केली त्यावेळेस काय झाले त्याचे वर्णन संतकवी महिपतीनीआपल्या भक्तलीलामृत मध्ये वर्णन कारक आहे
मशिदीत मध्य कोनाड्यात गेले 

जावोनि बैसले तयावेळी
पाशह कुराण पढावया आला | अकस्मात याला पाहता हे |
विचारात नाम निपट सांगती |  बोलाविले प्रीती म्हणुनी आलो |
पाशहाने तेंव्हा केला चमत्कार |  सांडोनि कलेवर मक्के गेला |
तेथे सिद्ध सात होते त्या |  नमन बद्री वृक्ष जाण होता तेथे  |
निपट हि गेले त्या वृक्षीं देखील |  बोरे खाती वाहिले आनंदात |
पाशह प्रसाद मागातचि | म्हणत देऊ मशिदी चाल आता |
गेला शरीरात पाहे कोनाड्यात | बैसोनि हे बोरे खात तेथे |
बोराचा प्रसाद देता लोटांगण | घालोनिया म्हणे ईश्वर हा |
                                               -  भक्तलीलामृत

ब्रह्मा पिता है कौन | माया की माता कौन
खात कोन पिता कोन |  कहाँ वाको घर है
निर्गुण की जात कोन |  सगुन की गोत कोन
ज्योतीं का ज्योत कोन |  कोन परात्पर है
सिद्धां का वेद कोन |  योगियो का नाद कोन
वेदन का भेद कोन  | शास्त्र क्या आधार है
कहे निपट निरंजन | गुरुकI न जाना घर
स्वर है की नर या सुकर कूकर है

 
श्री निपटनिरंजन मंदिर
 
महाराष्ट्राच्या संत परंपरेत तसेच सूफी परंपरेत निपट बाबा परिचित होते व त्यांच्या इतर संतांशी गाठी भेटी होत असत. संत कवी महिपतीनी पण आपल्या भक्त लीलामृत मध्ये निपट निरंजनांचे वर्णन केले आहे. असा पण एक प्रवाद आहे की निपट व निरंजन ही गुरु शिष्याची जोडी होती व त्यांचे नाव बरोबर घेतले जाते.

निपट निरंजनाचें लिखाण हे नाथ परंपरेला शोभेल असेच  होते व जास्त करून ते हिंदीतच रचना करत. ह्यांचे किती ग्रंथ उपलब्ध आहेत ह्याबद्दल माहिती नाही.

निपट निरंजन ह्यांचे मंदिर औरंगाबाद येथे विद्यापीठ परिसरात आहे 

🌷🌷🌷
जय निपटनिरंजन
🙏🙏🙏

Wednesday, July 29, 2020

मानसपूजा



मानसपूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्यनियमाने त्यांची मानसपूजा केल्याने सद्गुरु संवादही करु लागतील, व तेव्हापासून साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल.

मानस पूजा




"अहं ब्रम्हास्मि" असे अध्यात्मशास्त्र सांगते. याचा अर्थ, "मी" ब्रम्हस्वरुप आहे.

येथे “मी” याचा अर्थ मानवी शरीर असा नाही. 'मी' म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा 'आत्मा' होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरुपे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण-निराकार असल्याने, भगवंताचे प्रातिनिधिक स्वरुप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकाला सद्गुरुंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्मरुपाने साधकाजवळच असतात. साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते. हे वायुसुत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभु श्रीराम चंद्राची मूर्ति सीतामाईला दाखविली, या वरुन स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्मरुपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरुंना सचेतन देहस्वरुपात कल्पनेने निर्माण करुन मानसपूजेस प्रारंभ करावा.

पहाटेची वेळ मानसपूजेस चांगली असते. अशा वेळी सुखासन घालून बसावे. चर्मचक्षू बंद करावे. अंतर्मुख होऊन कल्पना करण्यास प्रारंभ करावा.

मानस पूजा
आकाशात क्षितिजावर गुलाबी रंगाची स्वैर उधळण होत आहे,
सुगंध चौफेर दरवळतो आहे,
सतारीचे झंकार उमटत आहेत,
मुरलीचा गोड मंजुळ ध्वनी आसमंतात घुमतो आहे, वेद घोषांचे मंद स्वर एकू येत आहेत.

हृदयातील रक्तवर्ण कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलतात. प्रफुल्लित कमळाच्या मध्यभागी सद्गुरुंच्या तेजस्वी पादुकांचे दर्शन घडते
त्यानंतर सूक्ष्मरुपातून प्रकट होण्यासाठी सद्गुरुंना मनोमन प्रार्थना करावी. एक तेजाचा झोत हृदयातील पादुकांपासून निघेल, आणि त्यामघून आपल्या समोर सद्गुरुंची सुहास्यवदन सगुण मुर्ती उभी राहील.

सुस्वागतम् सुस्वागतम् असे म्हणून आपण आपल्या सद्गुरुंचे स्वागत करावे.
त्यानंतर चंदनाचा पाट मांडून त्यावर उभे राहण्याची सद्गुरुंना विनंती करावी. ते पाटावर उभे राहील्या नंतर त्याच्या चरणकमलावर सुवर्ण कलशाने पाणी घालावे.
त्यानंतर चांदीच्या वाटीतील दुध घालून पुन्हा पाणी घालावे. अशा प्रकारे पादप्रक्षालन झाल्यावर एका शुभ्र वस्त्राने चरणकमल पुसून त्यावर हळद-कुंकू वहावे.
सद्गुरुंचा भाळी कुंकुमतिलक लावून सुवर्ण तबकातील रुपेरी नीरांजनांच्या ज्योतींनी पंचारती ओवाळावी.
आपल्या घरातील मखमली मंचकावर विश्रांती घेण्यासाठी सद्गुरुंना प्रार्थना करावी.

थोड्या विश्रांती नंतर त्यांच्या अंगातील कफनी काढून ठेवावी. गळ्यातील तुळशीमाळा, कुबडी आणि स्मरणी बाजूस काढून ठेवावी.
कौपीनधारी सद्गुरुंना स्नानगृहात घेऊन जावे. तेथे सुवर्णाच्या चौरंगावर बसवावे.
चांदीच्या वाटीतील सुगंधी तेल सद्गुरुंच्या सर्वांगास हळूवार लावावे.
रूप्याच्या घंगाळ्यातील गंगोदक सुवर्ण कलशांत घेऊन सद्गुंना अभ्यंगस्नान घालावे.
नंतर सर्वांगास उटणे लावून पून्हा गंगोदक घालावे.
स्नानानंतर स्वच्छ आणि शुभ्र वस्त्राने सद्गुरुंचे सर्वांग पुसून घ्यावे.
नवी कौपीन बदलण्यास द्यावी.

नंतर पुन्हा मखमली मंचकावर बसण्यास विनंती करावी.
त्यांना भरजरी कफनी घालावी. गळ्यात तुळशीमाळा घालाव्या हातात कूबडी स्मरणी द्यावी.
त्यानंतर रत्नजडित सिंहासनावर सद्गुरुंना आणून बसवावे. चरणकमल ठेवण्यास सिंहासनापुढे शिसवीचा चौरंग ठेवावा. जैसा शोभे राजा रघुवीर असे भासले पाहिजे.

त्यानंतर पाद्यपूजेची अनुज्ञा घेऊन, पाद्यपूजेस आरंभ करावा.
शिसवीच्या चौरंगावरील सद्गुरुंच्या गुलाबी चरणकमलावर सुवर्ण पात्राने शुध्दोधक घालून पादप्रक्षालन करावे. त्यानंतर पंचामृताने पादुकांना स्नान घालावे. पुन्हा एकदा शुध्दोदकाने स्नान घालावे. नंतर चरणकमलावर अत्तर लेपन करावे.
शेवटी आणखी एकदा उष्णोदकाने पादुकांना स्नान घालून शुभ्र वस्त्राने चरण कमल पुसून घ्यावेत.

त्यानंतर स्वस्तिक चिन्हांकित चंदन गंध लेपन करावे.
सद्गुरुंच्या भाळी उभे गंधलेपन करुन मध्यभागी बुक्याचा टिळा लावावा.
दोन्ही नेत्रांच्या बाजुस गंधाच्या मुद्रिका लावुन घ्याव्या.
सद्गुरुंच्या गळ्यामध्ये जाई- जुईच्या शुभ्र फुलांचा सुंदर पुष्पहार अर्पण करावा.
दोन्ही हातांच्या मनगटावर छोटे गजरे घालावेत.
नंतर पादुकांवर विविध सुवर्णालंकार घालावेत. पादुका तुळशीहाराने सुशोभित करुन शेवंती, चंपक, गुलाब, पुष्पे अर्पण करावीत.
शेवटी अष्टभाव प्रतिक अष्टदल कमळ वहावे. अक्षता, हळद, कुंकू वाहुन घ्यावे.
अहंकाररुपी धूप घालावा.
निराभिमानी बोधवृत्तीच्या तेजाची निरांजने लावून घ्यावी.

सद्गुरुंना शिऱ्याचा नैवेद्य दाखवुन रुपेरी पात्रांतुन केशर-वेल दोडे मिश्रीत दुग्ध प्राशन करण्यास द्यावे.
शेवटी तेजाने तेजाची आरती करावी.
पूजेने नटलेल्या शांत सुंदर आणि तेजस्वी सद्गुरुंच्या मुर्तीचे अवलोकन करुन साष्टांग दंडवत घालावे.

सिंहासनारुढ सद्गुरुंसमोर हात जोडून उभे राहून शरणागतीकरीता आत्मकथन करावे.
आत्मकथनात एक दिवसातील आपल्या जीवनातील घडलेल्या बऱ्या -वाईट घटनांचे कथन करावे. चुकल्या - मुकल्या गोष्टीबद्दल क्षमा याचना करावी.
त्यानंतर सद्गुरुंना भोजनासाठी भोजनगृहात घेऊन जावे.

भोजनगृहात पाटरांगोळ्या घातलेल्या आहेत, अगरबत्तीचा सुगंध दरवळत आहे.
चंदनी पाटावर सद्गुरुंना विराजमान करावे.
चांदीच्या ताटांत सोन्याच्या वाट्यांतुन सर्व भोज्य पदार्थ वाढलेले आहेत.
सद्गुरुंना भोजनास प्रारंभ करण्याची विनंती करावी.
खाऊन होताच रुपेरी पात्रातून गार पाणी पिण्यासाठी द्यावे. भोजनोत्तर तांबूल द्यावा.

आता आपल्या सद्गुरुंना स्थूलरुपातून सूक्ष्मरुपात हृदयकमलावर विराजमान होण्यासाठी विनवणी करावी.
सद्गुरुंच्या सगुणरुपामघून एक प्रकाश -शलाका निर्माण होईल आणि आपल्या हृदयांत प्रवेश करील. सद्गुरुंचे सगुणरुप अदृश्य होईल.
पण हृदयातील रक्तवर्ण कमळावर सद्गुरुंचा सतेज पादुका दिसतील. त्यांचे दर्शन घ्यावे.

हळूहळू कमळाच्या पाकळ्या मिटू लागतील. शेवटी जागेपणीच पाहात असलेल्या मानसपूजेच्या स्वप्नातून आपण भानावर येऊ. 

अशी मानसपूजा फारच लवकर संपल्याचे आपल्याला हूरहूर वाटल्यास आपण मानसपूजेत रमलो होतो असे समजावे.

सद्गुरुंना मानसपूजा फार आवडते. प्रत्येक साधकाने रोज नियमाने मानसपूजा करावी.

साधकाच्या दैवतालाही भक्ताकडे येण्याची ओढ लागते. एखादे दिवशी जर मानसपूजेला उशिर झाला तर साधकाचे मानसपूजेतील दैवत त्यास जाणीव करुन देते.

सद्गुरुंची मानसपूजा म्हणजे सदेह सद्गुरुंचा सहवास लाभणे होय. सगुणोपासनेचा हा कळस आहे.

क्रममुक्तीच्या  पायऱ्या
क्रममुक्ती चार प्रकारे प्राप्त होते
१) सलोकता
२) समिपता
३) सरूपता
४) सायुज्यता
या क्रममुक्तीच्या पायऱ्या आहेत.

१) सलोकता:- आपले आराध्य दैवत ज्या लोकामध्ये वास्तव्य करून असते त्या लोकांत राहायला मिळते याला 'सलोकता मुक्ती' असे म्हणतात. जसे शिवभक्त शिवलोकांत राहतात. तर विष्णुभक्त विष्णुलोकांत राहतात. ज्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना 'भारतीय' असे म्हटले जाते; परंतु पंतप्रधानांची भेट सर्वच भारतीयांना मिळत नाही. अशी शंभरकोटी माणसे आहेत, की ज्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पाहिलेले नाही. अगदी त्याचप्रमाणे विष्णुभक्त विष्णुलोकांत राहतात. परंतु त्यांना भगवान विष्णुंचे दर्शन प्राप्त होत नाही. ते विष्णुलोकांत राहून विष्णुभक्ती करत रहातात. हळूहळू त्यांची प्रगती होत राहते व त्यांना समिपता ही मुक्तीची दुसरी अवस्था प्राप्त होते.

२) समिपता:- समिपता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्ताला देवाच्याजवळ जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्याशी बोलण्याचे भाग्य त्याला प्राप्त होते. भक्ताने स्मरण करताच त्याची आराध्य देवता त्याच्या समोर प्रगट होते व त्याला मार्गदर्शन करते. क्रममुक्तीचा दुसरा टप्पा येथे संपतो व सरूपता या तिसऱ्या अवस्थेकडे साधकाचा प्रवास सुरु होतो.

३) सरूपता:- सरूपता मुक्ती प्राप्त होण्यापूर्वी साधकाला उत्तम प्रतीचे ध्यान लागण्यास सुरवात होते. साधक जर विष्णुभक्त असेल तर तो विष्णुरूपाचे ध्यान करतो. हळूहळू त्याला स्वतःच्या सूक्ष्म देहामध्ये विष्णुचे रूप दिसू लागते. मीच विष्णू आहे, असा भाव त्याच्यामध्ये प्रकट होऊ लागतो. हळूहळू त्याला पूर्णपणे विष्णुचे रूप प्राप्त होते. शनैः शनैः ही शक्ती वाढत जाते व साधक विष्णुच्या रुपात कोणालाही दर्शन देऊ शकतो.
पृथ्वीतलावर असे असंख्य साधक आहेत, की त्यांना त्यांच्या आराध्य दैवताचे दर्शन झालेले आहे. या दर्शनामागील रहस्य हे आहे, की सरूपता मुक्ती प्राप्त केलेले आत्मे अशा भक्तांसमोर त्यांच्या देवतेच्या रूपांत प्रकट होतात व त्यांना आशीर्वाद देतात, वरदान देतात. परंतु या सर्व गोष्टींना एक विशिष्ट मर्यादा असते. सरूपता मुक्ती प्राप्त केलेल्या आत्म्यांना मूळ देवतेचे फक्त रूप प्राप्त होते, सामर्थ्य व अधिकार प्राप्त होत नाहीत.
परदेशामधील अनेक साधक क्रुसावरील येशूख्रिश्ताचे ध्यान करतात व त्यातच ते एकरूप होतात. हळूहळू त्यांच्या देहाला जखमा होतात व त्यातून रक्त वाहू लागते. 'मी क्रुसावरील येशुख्रिस्त आहे.' या भावसमाधीत ते राहतात. देहासहीत प्राप्त केलेली ही सरूपता मुक्ती आहे असेच म्हणावे लागेल.

४) सायुज्यता:- सायुज्यता मुक्ती म्हणजे आराध्यदेवतेमध्ये आत्मा विलीन होणे. आत्म्याचा परमात्मा होणे.

मानसपूजा का करावी?
आपण शरीराचे व्यायाम आधी करून शरिर मजबूत करत असतो, परंतु मन आज सर्वत्र बलहीन असताना दिसते. या मनाचा सर्वसाधरणतः कोणी विचार करताना दिसत नाही परंतु, सत्य हे आहे की, जो पर्यंत मन मजबूत होत नाही, तो पर्यंत जीवन सुदृढ होत नाही. मनाला मजबूत करण्यासाठी मनाला उभारी देणाऱ्या विचार, कल्पना, भावना यांना खतपाणी घालण्याची गरज असते. मानसपूजेत आपण देवाला, अर्थात सद्गुरुनां, त्या साऱ्या गोष्टी देतो, जे, वास्तविक आपल्याकडे नाहीत आणि आज रोजी आणता ही येत नाहीत, पण मनात आणता येेतात, आणि एकदा मनाने ते सारे धरले की जीवनातही मिळवता येतात.  दुसरी गोष्ट, ज्या अत्यन्त मौल्यवान वस्तू आहेत, अश्या वस्तू देवाला अर्थात सद्गुरुनां अर्पण करणे म्हणजे त्यांना सांगणे आहे की "देवा! ह्या सर्वांपेक्षा  तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस, म्हणून हे सारे मी तुझ्या चरणी अर्पण करतो", आणि तुलाच मागतो 


।। पै नाथ!आता ऐसे करावे, तुझ्यात मी विरून जावे, आणि फक्त तूच तू उरावे।।

सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "सदगुरू" सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा, लहान मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो तसे आपली प्रत्येक गोष्ट सदगुरुंना सांगून करायाची सवय असावी, सदगुरुंची सचेतन मूर्ति मनश्चक्षूपुढे आणून मनातच तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार म्हणजेच उत्तम वस्तू, फुले व नैवैद्य आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनांतल्या मनांत आणि अत्यंत शुद्ध व पवित्र भावनेने ते सदगुरुंना अर्पण करावेत. पूजा आटोपल्यावर सदगुरुंच्या सचेतन मूर्तिचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांति द्यावि. 'तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही' अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी.

मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सदगुरुंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सन्निध आहेत आपल्याशी बोलत आहे, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत, आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत,आपली कृती चुकीची असेल तर तसे सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा, ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सदगुरुंना सांगून करावयाचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सदगुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोषदर्शन होतं ,मीपणा जातो आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू असावं, त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही, हे रामनाम सदगुरुंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं, किंबहुना रामच त्याचं नाम घेतो हे सदगुरुंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो.

मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास सांगतो इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यातच मानसपूजेची खरी मेख आहे -ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे व तसेच वर्तन ठेवले पाहिजे कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वाईट विचार व आणि असे गैर वर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नये, नाही का? थोडक्यात आपल्या हातून सदगुरुंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये, अशी एक वेगळीच जागरुकता आपल्या अंगी आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे , मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत, असा भाव असला पाहिजे .मी तुम्हाला शरण आहे, जे तुम्ही कराल ते मान्य आहे.

जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, थोडक्यात षडरिपुच्या स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चित धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! हे भान जर सतत ठेवले तर आपला देहच मंदिर बनेल, आणि असे वागू लागलो कि आपला मीपणा आपोआप कमी होवून सद्गुरूविषयीचे प्रेम वाढीस लागेल.अशी मानसपूजा हि दिवसाचे चोवीसही तास चालली पाहिजे त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल.


मानसपूजा करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे!

मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्वसमर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा.
आपल्याला शिवमानसपूजा किंवा देवी मानसपूजा परिचित असेलच.  अशीच मानसपूजा सद्गुरूंचीही करावी.


।।गुरू गोविंद दोऊ खडे। काके लागू पाय।।
।। बलिहारी गुरू आपने। गोविंद दियो बताय ।।
(संत कबीर)

सद्गुरू आणि देव दोन्ही समोर असता प्रथम सद्गुरूंच्या पाया पडावे कारण देवाची भेट घडवून आणण्याचे काम सद्गुरू करतात.
त्यात सद्गुरू जर परब्रह्म नित्यचिदानंद योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर गोष्टच वेगळी!
स्वामी म्हणजे चालता बोलता देव!
आपण रोज घरी देवपूजा करतो (?) खर तर उरकून टाकतो पण त्यात आपले मन क्वचितच रमते. नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती खर तर एक औपचारिकता झालेली असते. आपली स्वतःची भावना मात्र त्यात क्वचितच असते. आणि मी पूजा केली तेव्हा आता देवाने प्रसन्न व्हायलाच हवे आणि माझ्या ईच्छा पूर्ण करायलाच हव्यात हा व्यर्थ भावच त्यामध्ये अधिक असतो. पूजेच्या नावाखाली मूर्तीवर किंवा तसबिरीवर केलेले ते कोरडे उपचार असतात.
जेथे पूजेची ही अवस्था तेथे जप, नाम, अनुसंधान, ध्यान ह्या तर फारच दूरच्या गोष्टी.
वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजापण जमत नाही तेथे चित्ताची बैठक (स्थिरता) कशी निर्माण होणार?

सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे 

असे जगद्गुरू तुकाराम महाराजही म्हणतात पण सगुण आराधना करत करत निर्गुण अवस्थेपर्यंत पोहोचण्याइतपत सातत्य आणि निष्ठा अभावानेच आढळते.
अशा वेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा! जेथे तुम्हाला बाह्य पूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते. सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा!
परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पणभाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते.

बाह्य कर्म पूजा करताना आपल्या समोर देवाची मूर्ती असते परंतु मानसपूजेत भगवंताचे अधिष्ठान स्वतःच्या हृदयात करायचे असते म्हणूनच पूजेची सुरूवात ही देवतेच्या ध्यानाने करावी. प्रथम ध्यान श्लोकाने महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे.


ध्यान श्लोक:
नमो स्वामीराजम् दत्तावतारम्  
श्रीविष्णूब्रम्हाशिवशक्तीरूपम् ।
ब्रम्हस्वरूपाय करूणाकराय 
स्वामी समर्थाय नमो नमस्ते ।

("आदिगुरू श्री दत्तप्रभूंचे अवतार स्वरूप असलेल्या स्वामी महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो. आपण साक्षात श्री ब्रम्हदेव, श्रीहरी विष्णू आणि श्री महादेवांचे त्यांच्या शक्तिसहित असलेले एकत्रित स्वरूप आहात.
करूणेची मूर्ती असलेल्या परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थांना माझा नमस्कार असो!)

देहरूपाने जरी महाराज या भूमीवर असले तरी प्रत्यक्षात महाराज म्हणजे चैतन्यस्वरूपच आहेत. गुरूपरंपरेचा उगमस्थान असलेले श्री दत्तात्रेय हे स्वामींमध्येच अंतर्भूत आहेत.


एकदा महाराज खासबागेत बसले होते तेव्हा स्वामींची लाडकी गाय भागीरथी आपल्या कल्याण असे नाव ठेवलेल्या वत्सासह तेथे आली. महाराजांनी लगेच आपल्या खडावा पायात घातल्या, हातात कमंडलू घेतले आणि कौपिनधारी स्वामी मूर्ती अवधूतरूपात आविष्कृत झाली. स्वामी अचानक म्हणाले, "अलख अलख माय गे!" जमलेले सगळे भाविक आनंदाने उभे राहून ते तेजस्वी रूप भावभक्तीने न्याहाळू लागले.
हिमालयातील साधूंनाही महाराजांनी असेच दर्शन दिले होते.
अनेकांना संततीचा आशिर्वाद देऊन जीवनिर्मिती करणारे ते ब्रम्हदेव आहेत.
भक्तांचे पालनपोषण करणारे ते नारायण आहेत. परम ज्ञानाचा उपदेश करणारे ते भगवान सदाशिव आहेत.
प्रकृतीसुध्दा जिच्या अधीन आहे अशी आदिशक्ती सुद्धा स्वामींमध्येच सामावलेली आहे. सर्व देवता आणि त्यांच्या शक्ति एकत्र सामावलेले त्यांचे उगमस्थान महाराज म्हणजे परब्रह्म चैतन्यच आहे. ही सर्व सृष्टीच त्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे त्यामुळे तेच आपले जनक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मनात समस्त जीवसृष्टीविषयी अपार करूणाभाव आहे.

🌷 🌷 🙏  🙏 🌷 🌷


Tuesday, July 28, 2020

श्री दत्त संप्रदाय

श्री दत्त संप्रदाय या सदरा अंतर्गत दररोज एक लेेेखमाला येथे प्रसिध्द केली गेली,  ज्यात दत्त संप्रदाय या संंदर्भात वैशिष्ट्य पूर्ण माहिती प्रसिध्द केली, आज या लेेेखमालेेचा अंतिम लेख आपणांस विनंती की follow व subscrie करावे🙏

श्री गुरुदेव दत्त


आनंद संप्रदाय
सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरु केलेला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म  जन्मेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातून झाला होता असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना १०० पावले टाकल्यावर "श्री दत्त" असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बासवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू -विधी-अत्रि-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण  विश्वामध्ये आनंद व प्रेम भाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वांबरोबर व्यवहार करावा आणि सर्व  विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे. याशिवाय नृसिंहसरस्वती आळंदी परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्री गुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा, इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्री दत्त संप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावानी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रफाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडीत आहेत.

Monday, July 27, 2020

श्री दत्त संप्रदाय

श्री दत्त संप्रदाय या सदरा अंतर्गत दररोज एक लेेेखमाला येथे प्रसिध्द केली जाईल,  ज्यात दत्त संप्रदाय या संंदर्भात वैशिष्ट्य पूर्ण माहिती प्रसिध्द केली जाईल, आपणांस विनंती की follow व subscrie करावे🙏



गतांका पासून पुढे...

श्रीधरस्वामी

दत्तसंप्रदाय- श्रीधर स्वामी

श्री रामदासी आणि श्रीधरस्वामी परंपरा
समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले  दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.

समर्थ रामदास स्वामी


दत्तसंप्रदाय- श्री महानुभाव पंथ

महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. 



असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.

दत्तसंप्रदाय- एकनाथ महाराज

वारकरी संप्रदाय
भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष  जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती केलेली आहे. 


दत्त देवता गेली दीडहजार वर्षे क्रमश: विकास पावत आली आहे. आज सर्वमान्य झालेले दत्तस्वरूपही सदैव स्थिर राहील, असे सांगता येणार नाही. भक्तांच्या अनुभूतीनुसार आणि चिंतकांच्या प्रतिभेतून उद्भवणाऱ्या कल्पनांनुसार त्या रूपात कदाचित आणखीही भर पडत जाईल. दत्तावताराची ऐतिहासिक कामगिरी, तर खचितच फार मोठी आहे; परंतु दत्तोपासनेच्या व्यापक व उदार अशा समन्वयात्मक दृष्टीमुळे जीवनाच्या चिरंतन व शाश्वत मूल्यांवर भर दिल्यामुळे ही उपासनाप्रणाली व तिचे तत्त्वज्ञान आजही नितांत अनुकरणीय आहे व पुढेही तसेच राहील यात तिळमात्रही संशय नाही. जोपर्यंत जगात माणूस तापत्रयांनी त्रस्त राहील व जोपर्यंत त्याला स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव व बोचणी राहील तोपर्यंत दत्तात्रेय अज्ञान-अंधकारात त्याला दीपस्तंभाप्रमाणे पथप्रदर्शन करीत राहतील.


संत तुकारामांची दत्त भक्ती
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना, श्रीदत्तात्रेयांनी भामा डोंगरावर, दर्शन दिले. महाराजांना खूप आनंद झाला. महाराजांनी भावनावेगाने श्रीदत्तात्रेयांचे चरण घट्ट धरले. आनंदाश्रूंनी दत्तगुरूंची पाद्यपूजा केली. त्या अपूर्व अशा सगुण साकार दर्शनाने तुकाराम महाराज तृप्त झाले. महाराजांनी श्रीदत्तात्रेयांच्या या साक्षात्कारी दर्शनाला आपल्या अभंगओळीमधून अक्षररूपात साकार केले. महाराजांच्या मुखातून अभंग पाझरू लागला.

संत तुकाराम महाराज

तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत।।
काखें झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचें स्नान।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभूति सुंदर।।
शंख चक्र गदा हातीं । पायी खडावा गर्जती।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार।।

तुकाराम महाराज म्हणतात, `या भामा डोंगरावरच्या विस्तीर्ण पठारावर पठारावर श्रीदत्तात्रेयांचे अभूतपूर्व दर्शन झाले. तीन मुखांचा, सहा बाहू असलेला, काखेत झोळी अडकवलेल्या अवधुत दत्तगुरुंनी मजवर कृपेचा मेघ धरला. मी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्यांच्या पुढे चार श्वान होते. जान्हवी नदीमध्ये स्नान करून शुचीभूर्त झालेल्या दत्तात्रेयांच्या माथ्यावर जटाभार शोभून दिसत होता. सर्वांगावर विभूती सुंदर शोभून दिसत होती. हातामध्ये शंख, चक्र, गदा ही आयुधे होती. पायात खडावा होत्या. दिशांचे वस्त्र पांघरलेल्या दिगंबर दत्तात्रेयांना मी वारंवार नमस्कार करतो. त्याच्याच नामात गर्क होतो.’ श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना महाराजांच्या साक्षात्कारी वाणीला बहर आला होता. दत्तात्रेयांनी सुंदर दर्शन दिले आणि तो परमानंदाचा सोहळा आपल्या दृष्टीत साठवत असतानाच दत्तात्रेय अचानकपणे गुप्त झाले. महाराज व्याकूळ झाले. त्यांनी दत्तात्रेयांचा धावा करायला सुरुवात केली.

नमन माझें गुरुराया । महाराजा दत्तात्रेया ।।
तुझी अवधूत मूर्ति । माझ्या जीवाची विश्रांती ।।
जीवींचे साकडे । कोण उगवील कोडें ।।
 अनसूया सुता । तुका म्हणे पाव आतां ।।

दत्तगुरुंची आळवणी करताना महाराजांचा स्वर आकाशव्यापी झाला. दत्तात्रेय लुप्त झाले याचे दुःख त्यांच्या स्वरांमधून प्रकट होऊ लागले. त्यांना श्रीदत्तगुरुंच्या दर्शनाची विलक्षण ओढ लागली. महाराजांचा व्याकूळ स्वर ब्रह्मांडभर घुमू लागला. त्या स्वरांनी अवघा भामा डोंगर चंद्रप्रकाशासारखा उजळून निघाला. दत्तगुरुंनी आपल्या भक्ताची आर्त साद ऐकली आणि त्यांनी आपल्या या लाडक्या भक्ताला पुन्हा दर्शन दिले. दत्तात्रेयांनी प्रकाशरूपात आपले दर्शन महाराजांना घडवले होते. श्री दत्तगुरु आपल्या प्रत्येक भक्ताला आपले कृपावैभव अर्पण करतात. श्रीगुरुचरित्राच्या मंगल पारायणाच्यावेळी जसा दत्तवर्णन करणारा संस्कृत श्लोक म्हणतात, तसाच तुकाराम महाराजांचा हा प्रत्यक्ष अनुभूती देणारा, स्वरूप वर्णन करणारा अभंग म्हटला तर मनामध्ये चंदनगंधासारखी विलक्षण लाट उसळते. तुकाराम महाराजांनी जशी श्रीदत्तगुरुंना साद घातली ती आर्तता प्रत्येक दत्तभक्ताच्या मुखातून प्रकट होणे आवश्यक असते. मन शांत झाल्यावर आणि दत्तगुरुंचे प्रत्यक्ष दर्शन घडण्यासाठी `श्रीगुरुचरित्राचे पारायण करावे. असा एक शुभसंकेत आहे. श्रद्धा आणि पावित्र्य दत्तात्रेयांचे निश्चितपणे दर्शन घडविते.

 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

क्रमशः

Sunday, July 26, 2020

गुरुशिखर श्रीक्षेत्र गिरनार

श्रीक्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान

भगवान दत्तात्रेय यांचे स्थान असलेले गिरनार पर्वताचे जवळ जवळ ६० वर्षापूर्वीचे चित्र. याच्यात पर्वतावरील सर्व महत्वाची स्थान दर्शविली आहेत.

स्थान: जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य), हिमालयाचे पेक्षाही जुना पर्वत समूह, पूर्वी रेवतक पर्वत म्हणून उल्लेख
सत्पुरूष: श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान
विशेष: श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान.

गिरनार पवित्र डोंगर

दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार!

१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.

श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.
 दत्तात्रेयांच्या परम पावन पादुका


श्री दत्तात्रेयांच्या पावन पादुका

पवित्र सिद्धतीर्थ स्थान
कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.

ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे. गुरु शिष्य नाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल. याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते.

लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि.मी आत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मिरीबापूंचा आश्रम आहे. श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे १५० वर्षाच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे, याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने पवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक गिरनार चढण्यास सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते, त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात. डोलीवाले एका व्यक्तीसाठी ५,००० ते ११,००० रूपये घेतात. सुमारे २०० पायऱ्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते. पुर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू संतांमध्ये त्याचा मान खूप मोठा होता. २,००० पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो, हे ही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात.


गिरनार प्रवेशद्वार

दर्शनीय स्थाने
२,२५० पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे बाजूला माली परब घाट येतो. तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे.


२,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला जैन मंदिर येते. मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील नेमिनाथांची अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कला-कुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर गौ-मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते, येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ-मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ, भाविक, साधू बैरागी या मार्गांने येत अथवा जात नाहीत, या मार्गांवर कुठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही.

Saturday, July 25, 2020

श्री दत्त संप्रदाय

श्री दत्त संप्रदाय या सदरा अंतर्गत दररोज एक लेेेखमाला येथे प्रसिध्द केली जाईल,  ज्यात दत्त संप्रदाय या संंदर्भात वैशिष्ट्य पूर्ण माहिती प्रसिध्द केली जाईल, आपणांस विनंती की follow व subscrie करावे🙏

श्री दत्त संप्रदाय व नवनाथ संप्रदाय

गतांका पासून पुढे...

नवनाथ (९ नारायण)
कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.

मत्स्येंद्रनाथ
अरे हा कविनारायण । मच्छोदरी पावला जनन।।
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम । जगामाजी मिरवी की ।।३३।। (नवनाथ ग्रंथ अध्याय १, ओवी ३३ वी)

मत्स्येंद्रनाथ संजीवन समाधी (मायंबा)


एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातिरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्‍न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.
शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातिरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्‍वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्‍वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.


गोरक्षनाथ

तरी आता न लावी उशिर । हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।।
ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र । बाळ शब्द उदेला ।।७५।। (अध्या ९ वा, ओवी ७५)

गोरक्षनाथ

मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. "अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये', असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाशानाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे. 
नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्‍चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून ३ किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे.

गहिनीनाथ

तेंगे करूनी पंचभूत। दृश्‍यत्त्व पावले संजीवनी अर्थ।।
करभंजन ते संधीत । प्रेरक झाला जीवित्त्वा ।।६१।। (अध्याय १०, ओवी ६१)

कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्‍यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.


जालंदरनाथ

विप्रो हाते सलील बाळ ते जातें। रक्षता स्पर्शता लागे हाते।।
दृष्टी पाहता बाळाने । जुळवत रुदन करी ।।११२।। (अध्याय ११ ओवी ११२)

पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.

कानिफनाथ

त्वरे येऊन कर्णदृसी। दृष्टी पाहे ब्रह्मचारी ।
सहज करुनी उभयकरी । नमस्कारी प्रेमाणे ।।११५।। (अध्यय १२ वा, ओवी ११५)

बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते.

भर्तरीनाथ

भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरविले शकलांत ।।
क्षिकेचे मोहळ व्यक्त । तेही एकांग जाहले ।।२७।। (अध्याय २४, ओवी २७) 

भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून ३१०३ वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्‍यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगावफाट्यावरून जाता येते.

रेवणनाथ

पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेय ।।
सहज चाली पुढे चालत । बाळ दृष्टी देखिले ।।२१।। (अध्याय ३४, ओवी १२१)

ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (वीटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून १० कि. मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.

रेवण नाथ व दत्तगुरु

"दत्त प्रभू मजवर कृपा करा व मला सनाथ करा" या विनंतीवरुन दत्तगुरुंनी रेवणांस सिध्दी आशिर्वाद रुपाने दिली. दत्ताने दिलेल्या सिध्दीला आवाहन करुन रेवणने धान्यांच्या राशींचे सोन्यात रुपांतर करुन सिध्दीची प्रचिती घेतली.या सिध्दीच्या जोरावर गावांतील लोकांना रेवणने तृप्त व मालामाल करुन देऊन आपला भविष्यातील जनकल्याणाचा मार्गाची निवड केली.

"ब्रह्मदेव सृष्टीचा रचनाकर्ता आपल्या पौरुष्याच्या अंशापासून हजारो ऋषी तयार झाले. त्यावेळी त्याचे तेज थोडेसे रेवा नदीच्या काठी पडले होते. पूर्व ईश्वरी संकेताप्रमाणे नवनारायणांपैकी चमस नारायणानी तेथे प्रवेश केला व एका बालकाचे रूप धारण केले. जल प्रवाहाबरोबर रेवा नदीतून वाहत वाहत आलेले हे बालक किनाऱ्यावर लागले अन् ते मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्यावेळी सहनसारूक नावाचा एक कुणबी तिथं पाणी आणण्यासाठी आला असता त्याने ते सुंदर बालक पहिले. बाळ रडत होते. सहनसारुकचे मन कळवळले. त्याने त्या निराधार अजाण बालकाला उचलून आपल्या घरी आणले व पत्नीकडे दिले. तिने ते बाळ छातीस लावले व नंतर आपल्या मुलाशेजारीच तिने त्याला पाळण्यात झोपविले. एवढे सुंदर बालक ते ही रेवातीरी सापडले म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव रेवण असे ठेवले. 

रेवण खरच आज्ञा धारक मुलगा होता. तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करे. एक दिवस पहाटे रेवण बैलांना घेऊन शेतात जात असताना श्री दत्तात्रय महारांजांची व त्याची भेट झाली. त्यावेळी दत्त महाराजांनी एक नजरेत हा बालक म्हणजे पूर्वीचा चमस नारायण आहे हे ओळखले. त्या छोट्या स्पर्शानेही बाळ रेवणास ज्ञानप्राप्ती झाली. त्याने हे "दत्त प्रभू मजवर कृपा करा. मला सनाथ करा" अशी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या दत्त प्रभूंनी रेवण बाळास एक सिद्धी भेट दिली. ही सिद्धी रृतुझ्या इच्छा पूर्ण करील असा आशीर्वाद ही दिला. आपल्यास प्राप्त झालेली सिद्धी खरच काय करू शकते हे पडताळून पाहण्यासाठी रेवण त्या महिमा सिद्धीला आवाहन करून म्हणाला, “ही शेतातील धान्याची रस सोन्याची करून दाखव.” त्याबरोबर सिद्धीने आपली कृपा नजर फिरवताच धान्याची रास सोन्याची झाली. मग काय ! या सिद्धीच्या बळावर रेवण गावातल्या गोर-गरिबांना यथेच्च इच्छा भोजन देऊ लागला. त्यामुळे अवघ्या पंचक्रोशीत हा बालक सिद्ध पुरुष या विशेषणाने ओळखला जावू लागला.

एक दिवस मच्छिंद्रनाथ हे त्या गावात आले. तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाची माहिती कळली. तसेच मच्छिंन्द्रनाथांच्या हे पण लक्षात आले की हा रेवण बाळ म्हणजेच चमस नारायण आहेत. तेव्हा मच्छिन्द्रनाथांनी एक गम्मत केली. त्यांना आपल्या योग सामर्थ्याने वाघ-सिंह यासारखे पशु यांना आपला मुळचा हिंस्र स्वभाव विसरून मवाळ प्राण्यांप्रमाणे जवळपास खेळवू लागले. तर पक्षी त्यांच्या अंग-खांद्यावर खेळू लागले. हे पाहून लोक मोठे चकित झाले. त्यांनी मछिंन्द्रनाथांचा प्रताप रेवणास सांगितला. रेवण बाळाने स्वत: तेथे जावून प्रत्यक्ष ते दृश्य पाहून खाती करून घेतली. घरी येऊन त्याने सिद्धी आवाहन केले. "मला अशी सिद्धी प्राप्त करून दे" अशी मागणी केली. तेव्हा तेथे प्रकट झालेल्या सिद्धीने सांगितले की ही गोष्ट केवळ एक ब्रह्मयोगीच करू शकतो. तुला ते ब्रह्मज्ञान केवळ दत्त प्रभूंच्या कृपेनेच प्राप्त होईल. हे कळताच रेवण तयार झाला. त्याने त्याजागी पहिली दत्तभेट झाली. त्या स्थानावर दृढ निश्चयाने बैठक मारून ध्यान, तपसाधना चालू केली.

मच्छिंद्रनाथ समवेत दत्त प्रभूंनी रेवण बाळाला मंत्रोपदेश दिला. त्याला नाथ पंथाची दिक्षा दिली. सर्व विद्या शक्ती यात निपुण करून त्यास ब्रह्मज्ञानी बनविले. चमस नारायणाचा प्रथम रेवण आणि नंतर दत्त-मच्छिंद्रनाथ कृपेने रेवणनाथ झाले. भक्ति प्रचाराच्या नाथपंथ कार्यात त्यांचाही सहभाग होऊ लागला. 



नाथपंथीय योगींची ज्ञान, भक्ति व श्रद्धा ही लोकमानसात वाढवत नवनाथांची लोकोद्धाराचे कार्य चालू केलेले होतेच. आणि एक दिवस गावोगाव भ्रमंती अन भिक्षाटन करत रेवणनाथ हे माणदेशातील विटे ग्रामात आले. त्या गावामध्ये सरस्वती नावाचा एक ब्राह्मण अन त्याची पत्नी जान्हवी ही दंपती राहत होती. त्यांना संताने झाली पण ती टिकली नाही. जान्हवीला सहा पुत्र झाले पण ते दहा दिवसापेक्षा जास्त दिवस टिकले नाहीत. देवाची कृपा म्हणून की काय सातवा पुत्र मात्र जवळ जवळ दहा वर्षाचा होईपर्यंत वाढला. त्या आनंद प्रीतर्थ्य सरस्वती ब्राह्मण आनंदाने ब्राह्मण भोजन देत होता. नेमके त्याचवेळी रेवणनाथ हे त्यांचे घरी आले. सरस्वती ब्राह्मणाने त्यांचे उचित आदरातिथ्य केले. भोजन दिले. इतकेच नव्हे तर नाथजी जेव्हा जाऊ लागले तेव्हा त्या दम्पतीने त्यांना त्या रात्री आपल्या घरी मुक्काम करण्याची विनंती केली. रात्री ब्राह्मण रात्री त्याचे पाय दाबून देत बसला. पत्नी मुलासह आत झोपली. पण नेमके मध्यरात्री दैवाने डाव साधला. बाळ मरण पावला. तिला हे कळताच माय बिचारी स्फुंदू स्फुंदून रडू लागली. नाथांची झोपमोड होऊ नये म्हणून सरस्वती ब्राह्मण जगाचा हलला नाही. का ती ब्राह्मणी पण आपल्या मनाच्या दु:खाला मोकळी वाट करून देऊ शकला नाही.

सकाळी नाथांना जाग आली ब्राह्मण पत्नीचे रडणे ऐकूनच. नाथांनी झाल्या प्रकारची नीट चौकशी केली आणि आपण या घरांत असताना इथे यमदूत आलेच कसे? त्यांनी बालकाचे प्राण कसे काय हरण केले? याचे रेवणनाथांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांना रागही आला. रेवणनाथांनी त्या दंपतीला बाळाचे कलेवर सांभाळण्यास सांगून बालकाचे प्राण परत आनायालाते यमलोकी गेले. यमाने नाथांना सांगितले, की हे काम माझे नाही ही शिव आज्ञा आहे. तुम्ही कैलासावर जा व शिवाकडून बाळाचे प्राण आणा! यमलोकीहून रेवणनाथ कैलास पर्वतावर गेले. तेथे ही शिव गणांनी त्यांना अडवले. नाथांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांची दयनीय अवस्था केली. वार्ता मिळताच स्वत; शंकर युद्धाला आले. रेवणनाथांनी वाताकर्षण मंत्र म्हणून वायुरोधन केले त्यामुळे शिव-अष्ट भैरव, शिवगण या साऱ्यांचेच प्राण कंठाशी आले.
मग वैकुंठाहून भगवान विष्णू धावत आले. त्यांनी रेवण नाथास आवरले व आपल्याकडील सरस्वती ब्राह्मणांचे सातही बालकांचे प्राण परत देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे रेवणनाथ शांत झाले. त्यांनी शिवांसह सर्वांचे प्राण वाचवले. भगवान विष्णूंनी आदिनाथांशी भेट घडवली. त्यांना आशीर्वाद देवविले. रेवण नाथांना घेवून विष्णू वैकुंठी गेले. त्यांनी सातही बालकांचे प्राण परत आणले.

वटसिद्ध नागनाथ
असो वटवृक्ष पोखरांत । अंड राहिले दिवस बहूत ।।
अवि होत्र नारायण त्यांत । ईश्‍वर सत्ते संचारला ।।९२।।
दिवसेंदिवस अंडात। वाडी लागले जीववंत ।।
देह होता सामर्थ्यवंत । भगन लागे अंड ते ।।९३।।
त्यांत तलवर पोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।।
निढळवाणी कोण त्यांते । रक्षणाते नसेची ।।९४।। (अध्याय ३६, ओवी ९२, ९३, ९४)

ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून २५ कि. मी. अंतरावर चाकूर तालुक्‍यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.

चरपटीनाथ 

या परी बहुता दिवशी । ईश्‍वर आता अवतार ।।
विप्पलायन त्या रेतासी । नारायण संचारला ।।२१।। (अध्याय ३८, ओवी २१)

एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो.



या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या ८४ आहे. या शिष्यांनाच ८४ सिद्ध असे म्हणतात