Thursday, July 30, 2020

श्री निपटनिरंजन


श्री निपटनिरंजन 
(सन १६२३ – १७३८)



जन्म:  चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात जन्म, १६२३
आई/वडिल: ज्ञात नाही 
कार्यकाळ: १६२३-१७३८
संप्रदाय: नाथ संप्रदाय
गुरु: चर्पटनाथ
समाधी: आवतार समाप्ती १७३८

निपटनिरंजन महाराज 

हे एक संतकवी असून यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून यांच्या मनावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयालची भजने हे आवडीने गात. सन १६६३च्या सुमारास आपल्या वृद्ध मातेला घेऊन हे बऱ्हाणपूरमार्गे औरंगाबादेस आले आणि तेथेच राहू लागले. औरंगपुऱ्यात एकनाथमंदिराजवळ चिलखते वगैरे बनविण्याचा यांचा छोटा व्यवसाय होता. परंतु धंद्यात अपयश आल्याने ते निराश झाले. वृद्ध आई मृत्यू पावली तेव्हा गरिबीमुळे त्यांना तिचा अंत्यसंस्कारही नीटसा करता आला नाही. आईच्याच चितेवरची राख अंगाला फासून हे पूर्ण बैरागी बनले.

ध्यानधारणा व योगसाधना यांत त्यांचा काळ जाऊ लागला. काही दिवसांनी मठाच्या बागेतच यांना दत्तदर्शन झाले. चर्पटनाथ नामक साधुपुरुषाकडून यांनी देवगिरीवर गुरुपदेश घेतला. अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष औरंगजेबावरही या योगी पुरुषाच्या सामर्थ्याचा प्रभाव पडला.

त्यांची काही पदे व दोहे प्रसिद्ध आहेत. 

एक अद्भुत दत्तभक्त - कवी निपट निरंजन

आनेकी बाट कोन | जानेका घाट कोन |
ब्रह्म का कपाट कोन |  कहासे जीव आया है |
जीव कोन शिव कौन |  शिवका स्वरूप कोन |
माया कोन धरनी कोन |  धरनी को धरे कोन |
सोवनमे जागे कोन |  देहले भागे कोन |
वादचंद लागे कोन | कोन मे कोन समाया है |
कहे निपट निरंजन |  इतना नाही बुझे तो |
झक मारन नरदेह पाया है |


निपट निरंजन ह्यांना भेटण्यास औरंगजेब सन १६८२ मध्ये आला तो त्यांना वश  करण्यासाठी .कारण त्याने श्री निपट बाबांच्या सिद्धी विषयी ऐकले होते. औरंगजेब आला त्यावेळेस बाबाना ताप आला होता. त्यांनी लगेच ओळखले की हा संतांना शरण नाही तर मराठयांची पाळेमुळे खणण्यासाठी आला आहे.  निपट निरंजन व औरंगजेब ह्यांच्यात जो संवाद झाला, त्याच्या ११४ ओव्या उपलब्ध आहेत. ह्या’ निरंजन बानी’ ह्या पुस्तकात दिल्या आहेत

‘सून आलमगीर दिल से भी जायेगा दुनिया से भी जायेगा’ 
बाबानी औरंगजेबाला त्याच्या क्रूर कर्माबद्दल असे सुनावले.

दावा बादशहा का करते, और दुवा मांगते है तो फकीर से
कहे निपट ये दिल्ली का दरबार नही फकिरी दरबार है
चारो दिशा बाहर मार- काट किया कत्ले आम
और फकीर की दुवा मांगने आया है ?

औरंगजेबाने निपट बाबाची परीक्षा घेण्यासाठी मक्केची बोरे खायची इच्छा केली त्यावेळेस काय झाले त्याचे वर्णन संतकवी महिपतीनीआपल्या भक्तलीलामृत मध्ये वर्णन कारक आहे
मशिदीत मध्य कोनाड्यात गेले 

जावोनि बैसले तयावेळी
पाशह कुराण पढावया आला | अकस्मात याला पाहता हे |
विचारात नाम निपट सांगती |  बोलाविले प्रीती म्हणुनी आलो |
पाशहाने तेंव्हा केला चमत्कार |  सांडोनि कलेवर मक्के गेला |
तेथे सिद्ध सात होते त्या |  नमन बद्री वृक्ष जाण होता तेथे  |
निपट हि गेले त्या वृक्षीं देखील |  बोरे खाती वाहिले आनंदात |
पाशह प्रसाद मागातचि | म्हणत देऊ मशिदी चाल आता |
गेला शरीरात पाहे कोनाड्यात | बैसोनि हे बोरे खात तेथे |
बोराचा प्रसाद देता लोटांगण | घालोनिया म्हणे ईश्वर हा |
                                               -  भक्तलीलामृत

ब्रह्मा पिता है कौन | माया की माता कौन
खात कोन पिता कोन |  कहाँ वाको घर है
निर्गुण की जात कोन |  सगुन की गोत कोन
ज्योतीं का ज्योत कोन |  कोन परात्पर है
सिद्धां का वेद कोन |  योगियो का नाद कोन
वेदन का भेद कोन  | शास्त्र क्या आधार है
कहे निपट निरंजन | गुरुकI न जाना घर
स्वर है की नर या सुकर कूकर है

 
श्री निपटनिरंजन मंदिर
 
महाराष्ट्राच्या संत परंपरेत तसेच सूफी परंपरेत निपट बाबा परिचित होते व त्यांच्या इतर संतांशी गाठी भेटी होत असत. संत कवी महिपतीनी पण आपल्या भक्त लीलामृत मध्ये निपट निरंजनांचे वर्णन केले आहे. असा पण एक प्रवाद आहे की निपट व निरंजन ही गुरु शिष्याची जोडी होती व त्यांचे नाव बरोबर घेतले जाते.

निपट निरंजनाचें लिखाण हे नाथ परंपरेला शोभेल असेच  होते व जास्त करून ते हिंदीतच रचना करत. ह्यांचे किती ग्रंथ उपलब्ध आहेत ह्याबद्दल माहिती नाही.

निपट निरंजन ह्यांचे मंदिर औरंगाबाद येथे विद्यापीठ परिसरात आहे 

🌷🌷🌷
जय निपटनिरंजन
🙏🙏🙏

Wednesday, July 29, 2020

मानसपूजा



मानसपूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्यनियमाने त्यांची मानसपूजा केल्याने सद्गुरु संवादही करु लागतील, व तेव्हापासून साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल.

मानस पूजा




"अहं ब्रम्हास्मि" असे अध्यात्मशास्त्र सांगते. याचा अर्थ, "मी" ब्रम्हस्वरुप आहे.

येथे “मी” याचा अर्थ मानवी शरीर असा नाही. 'मी' म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा 'आत्मा' होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरुपे नाहीत. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण-निराकार असल्याने, भगवंताचे प्रातिनिधिक स्वरुप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकाला सद्गुरुंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्मरुपाने साधकाजवळच असतात. साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते. हे वायुसुत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभु श्रीराम चंद्राची मूर्ति सीतामाईला दाखविली, या वरुन स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्मरुपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरुंना सचेतन देहस्वरुपात कल्पनेने निर्माण करुन मानसपूजेस प्रारंभ करावा.

पहाटेची वेळ मानसपूजेस चांगली असते. अशा वेळी सुखासन घालून बसावे. चर्मचक्षू बंद करावे. अंतर्मुख होऊन कल्पना करण्यास प्रारंभ करावा.

मानस पूजा
आकाशात क्षितिजावर गुलाबी रंगाची स्वैर उधळण होत आहे,
सुगंध चौफेर दरवळतो आहे,
सतारीचे झंकार उमटत आहेत,
मुरलीचा गोड मंजुळ ध्वनी आसमंतात घुमतो आहे, वेद घोषांचे मंद स्वर एकू येत आहेत.

हृदयातील रक्तवर्ण कमळाच्या पाकळ्या हळूहळू उमलतात. प्रफुल्लित कमळाच्या मध्यभागी सद्गुरुंच्या तेजस्वी पादुकांचे दर्शन घडते
त्यानंतर सूक्ष्मरुपातून प्रकट होण्यासाठी सद्गुरुंना मनोमन प्रार्थना करावी. एक तेजाचा झोत हृदयातील पादुकांपासून निघेल, आणि त्यामघून आपल्या समोर सद्गुरुंची सुहास्यवदन सगुण मुर्ती उभी राहील.

सुस्वागतम् सुस्वागतम् असे म्हणून आपण आपल्या सद्गुरुंचे स्वागत करावे.
त्यानंतर चंदनाचा पाट मांडून त्यावर उभे राहण्याची सद्गुरुंना विनंती करावी. ते पाटावर उभे राहील्या नंतर त्याच्या चरणकमलावर सुवर्ण कलशाने पाणी घालावे.
त्यानंतर चांदीच्या वाटीतील दुध घालून पुन्हा पाणी घालावे. अशा प्रकारे पादप्रक्षालन झाल्यावर एका शुभ्र वस्त्राने चरणकमल पुसून त्यावर हळद-कुंकू वहावे.
सद्गुरुंचा भाळी कुंकुमतिलक लावून सुवर्ण तबकातील रुपेरी नीरांजनांच्या ज्योतींनी पंचारती ओवाळावी.
आपल्या घरातील मखमली मंचकावर विश्रांती घेण्यासाठी सद्गुरुंना प्रार्थना करावी.

थोड्या विश्रांती नंतर त्यांच्या अंगातील कफनी काढून ठेवावी. गळ्यातील तुळशीमाळा, कुबडी आणि स्मरणी बाजूस काढून ठेवावी.
कौपीनधारी सद्गुरुंना स्नानगृहात घेऊन जावे. तेथे सुवर्णाच्या चौरंगावर बसवावे.
चांदीच्या वाटीतील सुगंधी तेल सद्गुरुंच्या सर्वांगास हळूवार लावावे.
रूप्याच्या घंगाळ्यातील गंगोदक सुवर्ण कलशांत घेऊन सद्गुंना अभ्यंगस्नान घालावे.
नंतर सर्वांगास उटणे लावून पून्हा गंगोदक घालावे.
स्नानानंतर स्वच्छ आणि शुभ्र वस्त्राने सद्गुरुंचे सर्वांग पुसून घ्यावे.
नवी कौपीन बदलण्यास द्यावी.

नंतर पुन्हा मखमली मंचकावर बसण्यास विनंती करावी.
त्यांना भरजरी कफनी घालावी. गळ्यात तुळशीमाळा घालाव्या हातात कूबडी स्मरणी द्यावी.
त्यानंतर रत्नजडित सिंहासनावर सद्गुरुंना आणून बसवावे. चरणकमल ठेवण्यास सिंहासनापुढे शिसवीचा चौरंग ठेवावा. जैसा शोभे राजा रघुवीर असे भासले पाहिजे.

त्यानंतर पाद्यपूजेची अनुज्ञा घेऊन, पाद्यपूजेस आरंभ करावा.
शिसवीच्या चौरंगावरील सद्गुरुंच्या गुलाबी चरणकमलावर सुवर्ण पात्राने शुध्दोधक घालून पादप्रक्षालन करावे. त्यानंतर पंचामृताने पादुकांना स्नान घालावे. पुन्हा एकदा शुध्दोदकाने स्नान घालावे. नंतर चरणकमलावर अत्तर लेपन करावे.
शेवटी आणखी एकदा उष्णोदकाने पादुकांना स्नान घालून शुभ्र वस्त्राने चरण कमल पुसून घ्यावेत.

त्यानंतर स्वस्तिक चिन्हांकित चंदन गंध लेपन करावे.
सद्गुरुंच्या भाळी उभे गंधलेपन करुन मध्यभागी बुक्याचा टिळा लावावा.
दोन्ही नेत्रांच्या बाजुस गंधाच्या मुद्रिका लावुन घ्याव्या.
सद्गुरुंच्या गळ्यामध्ये जाई- जुईच्या शुभ्र फुलांचा सुंदर पुष्पहार अर्पण करावा.
दोन्ही हातांच्या मनगटावर छोटे गजरे घालावेत.
नंतर पादुकांवर विविध सुवर्णालंकार घालावेत. पादुका तुळशीहाराने सुशोभित करुन शेवंती, चंपक, गुलाब, पुष्पे अर्पण करावीत.
शेवटी अष्टभाव प्रतिक अष्टदल कमळ वहावे. अक्षता, हळद, कुंकू वाहुन घ्यावे.
अहंकाररुपी धूप घालावा.
निराभिमानी बोधवृत्तीच्या तेजाची निरांजने लावून घ्यावी.

सद्गुरुंना शिऱ्याचा नैवेद्य दाखवुन रुपेरी पात्रांतुन केशर-वेल दोडे मिश्रीत दुग्ध प्राशन करण्यास द्यावे.
शेवटी तेजाने तेजाची आरती करावी.
पूजेने नटलेल्या शांत सुंदर आणि तेजस्वी सद्गुरुंच्या मुर्तीचे अवलोकन करुन साष्टांग दंडवत घालावे.

सिंहासनारुढ सद्गुरुंसमोर हात जोडून उभे राहून शरणागतीकरीता आत्मकथन करावे.
आत्मकथनात एक दिवसातील आपल्या जीवनातील घडलेल्या बऱ्या -वाईट घटनांचे कथन करावे. चुकल्या - मुकल्या गोष्टीबद्दल क्षमा याचना करावी.
त्यानंतर सद्गुरुंना भोजनासाठी भोजनगृहात घेऊन जावे.

भोजनगृहात पाटरांगोळ्या घातलेल्या आहेत, अगरबत्तीचा सुगंध दरवळत आहे.
चंदनी पाटावर सद्गुरुंना विराजमान करावे.
चांदीच्या ताटांत सोन्याच्या वाट्यांतुन सर्व भोज्य पदार्थ वाढलेले आहेत.
सद्गुरुंना भोजनास प्रारंभ करण्याची विनंती करावी.
खाऊन होताच रुपेरी पात्रातून गार पाणी पिण्यासाठी द्यावे. भोजनोत्तर तांबूल द्यावा.

आता आपल्या सद्गुरुंना स्थूलरुपातून सूक्ष्मरुपात हृदयकमलावर विराजमान होण्यासाठी विनवणी करावी.
सद्गुरुंच्या सगुणरुपामघून एक प्रकाश -शलाका निर्माण होईल आणि आपल्या हृदयांत प्रवेश करील. सद्गुरुंचे सगुणरुप अदृश्य होईल.
पण हृदयातील रक्तवर्ण कमळावर सद्गुरुंचा सतेज पादुका दिसतील. त्यांचे दर्शन घ्यावे.

हळूहळू कमळाच्या पाकळ्या मिटू लागतील. शेवटी जागेपणीच पाहात असलेल्या मानसपूजेच्या स्वप्नातून आपण भानावर येऊ. 

अशी मानसपूजा फारच लवकर संपल्याचे आपल्याला हूरहूर वाटल्यास आपण मानसपूजेत रमलो होतो असे समजावे.

सद्गुरुंना मानसपूजा फार आवडते. प्रत्येक साधकाने रोज नियमाने मानसपूजा करावी.

साधकाच्या दैवतालाही भक्ताकडे येण्याची ओढ लागते. एखादे दिवशी जर मानसपूजेला उशिर झाला तर साधकाचे मानसपूजेतील दैवत त्यास जाणीव करुन देते.

सद्गुरुंची मानसपूजा म्हणजे सदेह सद्गुरुंचा सहवास लाभणे होय. सगुणोपासनेचा हा कळस आहे.

क्रममुक्तीच्या  पायऱ्या
क्रममुक्ती चार प्रकारे प्राप्त होते
१) सलोकता
२) समिपता
३) सरूपता
४) सायुज्यता
या क्रममुक्तीच्या पायऱ्या आहेत.

१) सलोकता:- आपले आराध्य दैवत ज्या लोकामध्ये वास्तव्य करून असते त्या लोकांत राहायला मिळते याला 'सलोकता मुक्ती' असे म्हणतात. जसे शिवभक्त शिवलोकांत राहतात. तर विष्णुभक्त विष्णुलोकांत राहतात. ज्याप्रमाणे भारतात राहणाऱ्या सर्व लोकांना 'भारतीय' असे म्हटले जाते; परंतु पंतप्रधानांची भेट सर्वच भारतीयांना मिळत नाही. अशी शंभरकोटी माणसे आहेत, की ज्यांनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पाहिलेले नाही. अगदी त्याचप्रमाणे विष्णुभक्त विष्णुलोकांत राहतात. परंतु त्यांना भगवान विष्णुंचे दर्शन प्राप्त होत नाही. ते विष्णुलोकांत राहून विष्णुभक्ती करत रहातात. हळूहळू त्यांची प्रगती होत राहते व त्यांना समिपता ही मुक्तीची दुसरी अवस्था प्राप्त होते.

२) समिपता:- समिपता मुक्ती प्राप्त झाल्यानंतर भक्ताला देवाच्याजवळ जाण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्याशी बोलण्याचे भाग्य त्याला प्राप्त होते. भक्ताने स्मरण करताच त्याची आराध्य देवता त्याच्या समोर प्रगट होते व त्याला मार्गदर्शन करते. क्रममुक्तीचा दुसरा टप्पा येथे संपतो व सरूपता या तिसऱ्या अवस्थेकडे साधकाचा प्रवास सुरु होतो.

३) सरूपता:- सरूपता मुक्ती प्राप्त होण्यापूर्वी साधकाला उत्तम प्रतीचे ध्यान लागण्यास सुरवात होते. साधक जर विष्णुभक्त असेल तर तो विष्णुरूपाचे ध्यान करतो. हळूहळू त्याला स्वतःच्या सूक्ष्म देहामध्ये विष्णुचे रूप दिसू लागते. मीच विष्णू आहे, असा भाव त्याच्यामध्ये प्रकट होऊ लागतो. हळूहळू त्याला पूर्णपणे विष्णुचे रूप प्राप्त होते. शनैः शनैः ही शक्ती वाढत जाते व साधक विष्णुच्या रुपात कोणालाही दर्शन देऊ शकतो.
पृथ्वीतलावर असे असंख्य साधक आहेत, की त्यांना त्यांच्या आराध्य दैवताचे दर्शन झालेले आहे. या दर्शनामागील रहस्य हे आहे, की सरूपता मुक्ती प्राप्त केलेले आत्मे अशा भक्तांसमोर त्यांच्या देवतेच्या रूपांत प्रकट होतात व त्यांना आशीर्वाद देतात, वरदान देतात. परंतु या सर्व गोष्टींना एक विशिष्ट मर्यादा असते. सरूपता मुक्ती प्राप्त केलेल्या आत्म्यांना मूळ देवतेचे फक्त रूप प्राप्त होते, सामर्थ्य व अधिकार प्राप्त होत नाहीत.
परदेशामधील अनेक साधक क्रुसावरील येशूख्रिश्ताचे ध्यान करतात व त्यातच ते एकरूप होतात. हळूहळू त्यांच्या देहाला जखमा होतात व त्यातून रक्त वाहू लागते. 'मी क्रुसावरील येशुख्रिस्त आहे.' या भावसमाधीत ते राहतात. देहासहीत प्राप्त केलेली ही सरूपता मुक्ती आहे असेच म्हणावे लागेल.

४) सायुज्यता:- सायुज्यता मुक्ती म्हणजे आराध्यदेवतेमध्ये आत्मा विलीन होणे. आत्म्याचा परमात्मा होणे.

मानसपूजा का करावी?
आपण शरीराचे व्यायाम आधी करून शरिर मजबूत करत असतो, परंतु मन आज सर्वत्र बलहीन असताना दिसते. या मनाचा सर्वसाधरणतः कोणी विचार करताना दिसत नाही परंतु, सत्य हे आहे की, जो पर्यंत मन मजबूत होत नाही, तो पर्यंत जीवन सुदृढ होत नाही. मनाला मजबूत करण्यासाठी मनाला उभारी देणाऱ्या विचार, कल्पना, भावना यांना खतपाणी घालण्याची गरज असते. मानसपूजेत आपण देवाला, अर्थात सद्गुरुनां, त्या साऱ्या गोष्टी देतो, जे, वास्तविक आपल्याकडे नाहीत आणि आज रोजी आणता ही येत नाहीत, पण मनात आणता येेतात, आणि एकदा मनाने ते सारे धरले की जीवनातही मिळवता येतात.  दुसरी गोष्ट, ज्या अत्यन्त मौल्यवान वस्तू आहेत, अश्या वस्तू देवाला अर्थात सद्गुरुनां अर्पण करणे म्हणजे त्यांना सांगणे आहे की "देवा! ह्या सर्वांपेक्षा  तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस, म्हणून हे सारे मी तुझ्या चरणी अर्पण करतो", आणि तुलाच मागतो 


।। पै नाथ!आता ऐसे करावे, तुझ्यात मी विरून जावे, आणि फक्त तूच तू उरावे।।

सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत "सदगुरू" सोडून आपल्याला दुसरा ध्यास नसावा, लहान मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करतो तसे आपली प्रत्येक गोष्ट सदगुरुंना सांगून करायाची सवय असावी, सदगुरुंची सचेतन मूर्ति मनश्चक्षूपुढे आणून मनातच तिची पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा करावी. मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार म्हणजेच उत्तम वस्तू, फुले व नैवैद्य आपल्या कल्पनेने उत्तमोत्तम निर्माण करून मनांतल्या मनांत आणि अत्यंत शुद्ध व पवित्र भावनेने ते सदगुरुंना अर्पण करावेत. पूजा आटोपल्यावर सदगुरुंच्या सचेतन मूर्तिचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांति द्यावि. 'तुमच्याशिवाय मला दुसरे कोणी नाही' अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी.

मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सदगुरुंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर महाराज दिवसभर सतत आपल्या सन्निध आहेत आपल्याशी बोलत आहे, आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत, आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत,आपली कृती चुकीची असेल तर तसे सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजे मानसपूजा, ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सदगुरुंना सांगून करावयाचे अशी सवय लावून घेणे आवश्यक आहे. दिवसभरात काही मनाविरुध्द झालं तरी यात माझं काहीतरी कल्याणच सदगुरू करीत आहेत असं वाटून घ्यावे त्याने आपल्यातील दोषदर्शन होतं ,मीपणा जातो आपल्या देहाला काही त्रास होत असला तरी रामनाम घेणं चालू असावं, त्याने दुखण्याकडे लक्ष राहत नाही, हे रामनाम सदगुरुंच्या कृपेने आपल्या तोंडी येतं, किंबहुना रामच त्याचं नाम घेतो हे सदगुरुंचं सांगणं संपूर्ण खरं आहे हे आपण अनुभवतो.

मानसपूजेच्या शेवटी सद्गुरूंना आपण आपल्या हृदयात विश्रांती ग्रहण करण्यास सांगतो इतर पूजे सारखे मानसपूजेच्या शेवटी विसर्जन नाही तर विश्रांती आहे. म्हणजेच आपल्या इष्ट देवतेला आपण हृदयात स्थान ग्रहण करावे अशी विनंती करतो. यातच मानसपूजेची खरी मेख आहे -ज्या सद्गुरूला आपण हृदयात विश्रांती घेण्यास सांगतो, त्यांना राहण्यास आपले हृदय पात्र आहे का याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे व तसेच वर्तन ठेवले पाहिजे कारण आपल्या हृदयात प्रत्यक्ष आपले सद्गुरू विश्रांती घेत आहेत म्हणजे त्यांना विश्रांतीतून जागे करेल किंवा त्यांना त्रास होईल असे वाईट विचार व आणि असे गैर वर्तन दिवसभर आपल्या हातून होता कामा नये, नाही का? थोडक्यात आपल्या हातून सदगुरुंना वाईट वाटेल असे काही घडता कामा नये, अशी एक वेगळीच जागरुकता आपल्या अंगी आली पाहिजे आपल्या हातून तरी जर काही चुकीचं घडलं आणि ते लक्षात आलं तर त्यांची क्षमा मागून पुन्हा असं न घडण्याचा प्रयत्न केला पाहिजे , मात्र तुमची सत्ता कायम माझ्यावर असू देत, असा भाव असला पाहिजे .मी तुम्हाला शरण आहे, जे तुम्ही कराल ते मान्य आहे.

जितके हृदय पवित्र, शांत आणि नामाने भरलेले तितके सद्गुरूंना तेथे राहण्यास आवडेल ते आपल्या हृदयात विश्रांती घेत असताना आपण जर चुकीचे वागलो, दुसऱ्याचे अंतःकरण दुखावणारे बोललो, नीती सोडून आचरण केले, परनिंदा केली, थोडक्यात षडरिपुच्या स्वाधीन झालो तर त्यांच्या विश्रांतीला निश्चित धक्का लागेल याचे सतत भान असणे याचे नाव खरी मानसपूजा! हे भान जर सतत ठेवले तर आपला देहच मंदिर बनेल, आणि असे वागू लागलो कि आपला मीपणा आपोआप कमी होवून सद्गुरूविषयीचे प्रेम वाढीस लागेल.अशी मानसपूजा हि दिवसाचे चोवीसही तास चालली पाहिजे त्यामुळे दिवसभरात आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होणार नाही व हळूहळू आपल्या वागणुकीत सुधारणा होईल.


मानसपूजा करण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे!

मानसपूजा म्हणजे काय तर बाह्य कर्मकांडाचे उपचार न करता मनानेच सर्वसमर्पणयुक्त केलेली देवतेची पूजा.
आपल्याला शिवमानसपूजा किंवा देवी मानसपूजा परिचित असेलच.  अशीच मानसपूजा सद्गुरूंचीही करावी.


।।गुरू गोविंद दोऊ खडे। काके लागू पाय।।
।। बलिहारी गुरू आपने। गोविंद दियो बताय ।।
(संत कबीर)

सद्गुरू आणि देव दोन्ही समोर असता प्रथम सद्गुरूंच्या पाया पडावे कारण देवाची भेट घडवून आणण्याचे काम सद्गुरू करतात.
त्यात सद्गुरू जर परब्रह्म नित्यचिदानंद योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज असतील तर गोष्टच वेगळी!
स्वामी म्हणजे चालता बोलता देव!
आपण रोज घरी देवपूजा करतो (?) खर तर उरकून टाकतो पण त्यात आपले मन क्वचितच रमते. नैमित्तिक कामाचा भाग म्हणून ती खर तर एक औपचारिकता झालेली असते. आपली स्वतःची भावना मात्र त्यात क्वचितच असते. आणि मी पूजा केली तेव्हा आता देवाने प्रसन्न व्हायलाच हवे आणि माझ्या ईच्छा पूर्ण करायलाच हव्यात हा व्यर्थ भावच त्यामध्ये अधिक असतो. पूजेच्या नावाखाली मूर्तीवर किंवा तसबिरीवर केलेले ते कोरडे उपचार असतात.
जेथे पूजेची ही अवस्था तेथे जप, नाम, अनुसंधान, ध्यान ह्या तर फारच दूरच्या गोष्टी.
वेळेअभावी किंवा इतर काही कारणाने जेथे बाह्य कर्म पूजापण जमत नाही तेथे चित्ताची बैठक (स्थिरता) कशी निर्माण होणार?

सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे 

असे जगद्गुरू तुकाराम महाराजही म्हणतात पण सगुण आराधना करत करत निर्गुण अवस्थेपर्यंत पोहोचण्याइतपत सातत्य आणि निष्ठा अभावानेच आढळते.
अशा वेळी या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारी साधना म्हणजे मानसपूजा! जेथे तुम्हाला बाह्य पूजा उपचार केल्याचे मानसिक समाधानही मिळते आणि मनाची सात्विक बैठक सिद्ध होऊन भगवंताशी अनुसंधान राखण्यास मदत ही होते. सगुण आराधनेने समाधान आणि त्याचवेळी निर्गुणाकडे होणारी वाटचाल याचा एकत्रित आनंद देणारी उपासना म्हणजे मानसपूजा!
परमेश्वराप्रती संपूर्ण समर्पणभाव ठेवून केलेली ही मानसपूजाच परमेश्वराला अपेक्षित असते.

बाह्य कर्म पूजा करताना आपल्या समोर देवाची मूर्ती असते परंतु मानसपूजेत भगवंताचे अधिष्ठान स्वतःच्या हृदयात करायचे असते म्हणूनच पूजेची सुरूवात ही देवतेच्या ध्यानाने करावी. प्रथम ध्यान श्लोकाने महाराजांचे स्वरूप मनात स्थिर करावे.


ध्यान श्लोक:
नमो स्वामीराजम् दत्तावतारम्  
श्रीविष्णूब्रम्हाशिवशक्तीरूपम् ।
ब्रम्हस्वरूपाय करूणाकराय 
स्वामी समर्थाय नमो नमस्ते ।

("आदिगुरू श्री दत्तप्रभूंचे अवतार स्वरूप असलेल्या स्वामी महाराज मी तुम्हाला नमस्कार करतो. आपण साक्षात श्री ब्रम्हदेव, श्रीहरी विष्णू आणि श्री महादेवांचे त्यांच्या शक्तिसहित असलेले एकत्रित स्वरूप आहात.
करूणेची मूर्ती असलेल्या परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थांना माझा नमस्कार असो!)

देहरूपाने जरी महाराज या भूमीवर असले तरी प्रत्यक्षात महाराज म्हणजे चैतन्यस्वरूपच आहेत. गुरूपरंपरेचा उगमस्थान असलेले श्री दत्तात्रेय हे स्वामींमध्येच अंतर्भूत आहेत.


एकदा महाराज खासबागेत बसले होते तेव्हा स्वामींची लाडकी गाय भागीरथी आपल्या कल्याण असे नाव ठेवलेल्या वत्सासह तेथे आली. महाराजांनी लगेच आपल्या खडावा पायात घातल्या, हातात कमंडलू घेतले आणि कौपिनधारी स्वामी मूर्ती अवधूतरूपात आविष्कृत झाली. स्वामी अचानक म्हणाले, "अलख अलख माय गे!" जमलेले सगळे भाविक आनंदाने उभे राहून ते तेजस्वी रूप भावभक्तीने न्याहाळू लागले.
हिमालयातील साधूंनाही महाराजांनी असेच दर्शन दिले होते.
अनेकांना संततीचा आशिर्वाद देऊन जीवनिर्मिती करणारे ते ब्रम्हदेव आहेत.
भक्तांचे पालनपोषण करणारे ते नारायण आहेत. परम ज्ञानाचा उपदेश करणारे ते भगवान सदाशिव आहेत.
प्रकृतीसुध्दा जिच्या अधीन आहे अशी आदिशक्ती सुद्धा स्वामींमध्येच सामावलेली आहे. सर्व देवता आणि त्यांच्या शक्ति एकत्र सामावलेले त्यांचे उगमस्थान महाराज म्हणजे परब्रह्म चैतन्यच आहे. ही सर्व सृष्टीच त्यांच्यापासून उत्पन्न झालेली आहे त्यामुळे तेच आपले जनक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या मनात समस्त जीवसृष्टीविषयी अपार करूणाभाव आहे.

🌷 🌷 🙏  🙏 🌷 🌷


Tuesday, July 28, 2020

श्री दत्त संप्रदाय

श्री दत्त संप्रदाय या सदरा अंतर्गत दररोज एक लेेेखमाला येथे प्रसिध्द केली गेली,  ज्यात दत्त संप्रदाय या संंदर्भात वैशिष्ट्य पूर्ण माहिती प्रसिध्द केली, आज या लेेेखमालेेचा अंतिम लेख आपणांस विनंती की follow व subscrie करावे🙏

श्री गुरुदेव दत्त


आनंद संप्रदाय
सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरु केलेला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म  जन्मेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातून झाला होता असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना १०० पावले टाकल्यावर "श्री दत्त" असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बासवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू -विधी-अत्रि-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण  विश्वामध्ये आनंद व प्रेम भाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वांबरोबर व्यवहार करावा आणि सर्व  विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे. याशिवाय नृसिंहसरस्वती आळंदी परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्री गुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा, इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्री दत्त संप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावानी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रफाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडीत आहेत.

Monday, July 27, 2020

श्री दत्त संप्रदाय

श्री दत्त संप्रदाय या सदरा अंतर्गत दररोज एक लेेेखमाला येथे प्रसिध्द केली जाईल,  ज्यात दत्त संप्रदाय या संंदर्भात वैशिष्ट्य पूर्ण माहिती प्रसिध्द केली जाईल, आपणांस विनंती की follow व subscrie करावे🙏



गतांका पासून पुढे...

श्रीधरस्वामी

दत्तसंप्रदाय- श्रीधर स्वामी

श्री रामदासी आणि श्रीधरस्वामी परंपरा
समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले  दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.

समर्थ रामदास स्वामी


दत्तसंप्रदाय- श्री महानुभाव पंथ

महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. 



असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.

दत्तसंप्रदाय- एकनाथ महाराज

वारकरी संप्रदाय
भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष  जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती केलेली आहे. 


दत्त देवता गेली दीडहजार वर्षे क्रमश: विकास पावत आली आहे. आज सर्वमान्य झालेले दत्तस्वरूपही सदैव स्थिर राहील, असे सांगता येणार नाही. भक्तांच्या अनुभूतीनुसार आणि चिंतकांच्या प्रतिभेतून उद्भवणाऱ्या कल्पनांनुसार त्या रूपात कदाचित आणखीही भर पडत जाईल. दत्तावताराची ऐतिहासिक कामगिरी, तर खचितच फार मोठी आहे; परंतु दत्तोपासनेच्या व्यापक व उदार अशा समन्वयात्मक दृष्टीमुळे जीवनाच्या चिरंतन व शाश्वत मूल्यांवर भर दिल्यामुळे ही उपासनाप्रणाली व तिचे तत्त्वज्ञान आजही नितांत अनुकरणीय आहे व पुढेही तसेच राहील यात तिळमात्रही संशय नाही. जोपर्यंत जगात माणूस तापत्रयांनी त्रस्त राहील व जोपर्यंत त्याला स्वत:च्या अपूर्णतेची जाणीव व बोचणी राहील तोपर्यंत दत्तात्रेय अज्ञान-अंधकारात त्याला दीपस्तंभाप्रमाणे पथप्रदर्शन करीत राहतील.


संत तुकारामांची दत्त भक्ती
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना, श्रीदत्तात्रेयांनी भामा डोंगरावर, दर्शन दिले. महाराजांना खूप आनंद झाला. महाराजांनी भावनावेगाने श्रीदत्तात्रेयांचे चरण घट्ट धरले. आनंदाश्रूंनी दत्तगुरूंची पाद्यपूजा केली. त्या अपूर्व अशा सगुण साकार दर्शनाने तुकाराम महाराज तृप्त झाले. महाराजांनी श्रीदत्तात्रेयांच्या या साक्षात्कारी दर्शनाला आपल्या अभंगओळीमधून अक्षररूपात साकार केले. महाराजांच्या मुखातून अभंग पाझरू लागला.

संत तुकाराम महाराज

तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत।।
काखें झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचें स्नान।।
माथा शोभे जटाभार । अंगी विभूति सुंदर।।
शंख चक्र गदा हातीं । पायी खडावा गर्जती।।
तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार।।

तुकाराम महाराज म्हणतात, `या भामा डोंगरावरच्या विस्तीर्ण पठारावर पठारावर श्रीदत्तात्रेयांचे अभूतपूर्व दर्शन झाले. तीन मुखांचा, सहा बाहू असलेला, काखेत झोळी अडकवलेल्या अवधुत दत्तगुरुंनी मजवर कृपेचा मेघ धरला. मी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्यांच्या पुढे चार श्वान होते. जान्हवी नदीमध्ये स्नान करून शुचीभूर्त झालेल्या दत्तात्रेयांच्या माथ्यावर जटाभार शोभून दिसत होता. सर्वांगावर विभूती सुंदर शोभून दिसत होती. हातामध्ये शंख, चक्र, गदा ही आयुधे होती. पायात खडावा होत्या. दिशांचे वस्त्र पांघरलेल्या दिगंबर दत्तात्रेयांना मी वारंवार नमस्कार करतो. त्याच्याच नामात गर्क होतो.’ श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना महाराजांच्या साक्षात्कारी वाणीला बहर आला होता. दत्तात्रेयांनी सुंदर दर्शन दिले आणि तो परमानंदाचा सोहळा आपल्या दृष्टीत साठवत असतानाच दत्तात्रेय अचानकपणे गुप्त झाले. महाराज व्याकूळ झाले. त्यांनी दत्तात्रेयांचा धावा करायला सुरुवात केली.

नमन माझें गुरुराया । महाराजा दत्तात्रेया ।।
तुझी अवधूत मूर्ति । माझ्या जीवाची विश्रांती ।।
जीवींचे साकडे । कोण उगवील कोडें ।।
 अनसूया सुता । तुका म्हणे पाव आतां ।।

दत्तगुरुंची आळवणी करताना महाराजांचा स्वर आकाशव्यापी झाला. दत्तात्रेय लुप्त झाले याचे दुःख त्यांच्या स्वरांमधून प्रकट होऊ लागले. त्यांना श्रीदत्तगुरुंच्या दर्शनाची विलक्षण ओढ लागली. महाराजांचा व्याकूळ स्वर ब्रह्मांडभर घुमू लागला. त्या स्वरांनी अवघा भामा डोंगर चंद्रप्रकाशासारखा उजळून निघाला. दत्तगुरुंनी आपल्या भक्ताची आर्त साद ऐकली आणि त्यांनी आपल्या या लाडक्या भक्ताला पुन्हा दर्शन दिले. दत्तात्रेयांनी प्रकाशरूपात आपले दर्शन महाराजांना घडवले होते. श्री दत्तगुरु आपल्या प्रत्येक भक्ताला आपले कृपावैभव अर्पण करतात. श्रीगुरुचरित्राच्या मंगल पारायणाच्यावेळी जसा दत्तवर्णन करणारा संस्कृत श्लोक म्हणतात, तसाच तुकाराम महाराजांचा हा प्रत्यक्ष अनुभूती देणारा, स्वरूप वर्णन करणारा अभंग म्हटला तर मनामध्ये चंदनगंधासारखी विलक्षण लाट उसळते. तुकाराम महाराजांनी जशी श्रीदत्तगुरुंना साद घातली ती आर्तता प्रत्येक दत्तभक्ताच्या मुखातून प्रकट होणे आवश्यक असते. मन शांत झाल्यावर आणि दत्तगुरुंचे प्रत्यक्ष दर्शन घडण्यासाठी `श्रीगुरुचरित्राचे पारायण करावे. असा एक शुभसंकेत आहे. श्रद्धा आणि पावित्र्य दत्तात्रेयांचे निश्चितपणे दर्शन घडविते.

 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

क्रमशः

Sunday, July 26, 2020

गुरुशिखर श्रीक्षेत्र गिरनार

श्रीक्षेत्र गिरनार दत्तप्रभूंचे अक्षय निवासस्थान

भगवान दत्तात्रेय यांचे स्थान असलेले गिरनार पर्वताचे जवळ जवळ ६० वर्षापूर्वीचे चित्र. याच्यात पर्वतावरील सर्व महत्वाची स्थान दर्शविली आहेत.

स्थान: जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य), हिमालयाचे पेक्षाही जुना पर्वत समूह, पूर्वी रेवतक पर्वत म्हणून उल्लेख
सत्पुरूष: श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान
विशेष: श्री दत्तपादुका, नाथ संप्रदायाचे उपासना केंद्र, नेमिनाथ भगवान मंदिर, गीर जंगल, कमंडलू कुंड, आंबा मातेचे स्थान.

गिरनार पवित्र डोंगर

दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार!

१०,००० पायऱ्या चढुन जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी दत्तभक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच पूर्व इतिहास व परिसर गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे. स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात. रेवताचल, कुमुद, उज्जयंत हि नावे त्रैमुर्ती (ब्रह्मा, विष्णू, शंकर) यांच्याशी निगडीत आहेत.

श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणांत मिळतात. पुराणांमध्ये याचा श्वेताचल, श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो. तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो. वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहेत. असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्रीदत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे. पश्चिम भारतातील गुजरात राज्यामध्ये जुनागड या शहरापासून गिरनार तळ ५ कि. मी. अंतरावर आहे. या पर्वताचा विस्तार सुमारे ४ योजनं म्हणजेच १६ गावांपर्यत आहे. सुमारे २८ चौ. कि. मी. ने व्याप्त आहे. गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य, विलोभनीय, वन्यप्राणी, जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीने युक्त आहे.
 दत्तात्रेयांच्या परम पावन पादुका


श्री दत्तात्रेयांच्या पावन पादुका

पवित्र सिद्धतीर्थ स्थान
कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात् दर्शन दिले आहे. अनादीकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुंफामध्ये साधना करत आहेत. बाबा किनाराम अघोरी, श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज, यांसारख्या संताना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे.

ही भूमी योगी सिध्द महात्मे यांनी संपन्न आहे. म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्यांच्या स्थानावर तपश्चर्येला बसलेले आढळून येतात. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. महाशिवरात्रीला येथे पाच दिवसांची जत्रा भरते. तेथे मृगी कुंड आहे. शिवरात्रीच्या मेळ्याला या कुंडाजवळ भगवान महादेव मंदिरच्या दर्शनाला १० ते १२ लाख लोक जमा होतात. मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते. अशी एक आख्यायिका आहे कि, स्वयं शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
मृगी कुंडामध्ये हे नागा साधू स्नानाला जेंव्हा उतरतात, त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो, की जो मृगी कुंडात डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही. अंतर्धान पावतो. तोच स्वयं शिव असतो. आजूबाजूच्या परिसरामध्ये जुना आखाडा, निरंजन आखाडा, आव्हान आखाडा, अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत. त्यापैकी श्रीशेरनाथ बापू संचलित गुरू त्रिलोकनाथ बापूंचा एक आश्रम बघण्यासारखा आहे. अतिशय सात्त्विक आणि आपल्या तपोबलाने तेजस्वी अशा श्री शेरनाथ बांपूचे दर्शन सर्व भाविकांनी घेण्यासारखे आहे.आश्रमामध्ये गेली अनेक वर्षे अव्याहतपणे अन्नदान चालू आहे. गुरु शिष्य नाथ परंपरा येथे अजूनही जपली जाते. आलेल्या प्रत्येक भाविकाने येथे प्रसाद घेतला जाईल. याकडे स्वतः शेरनाथ बापूंचे कटाक्षाने लक्ष असते.

लंबे हनुमान समोरील एका पायवाटेने सुमारे अडीच ते तीन कि.मी आत जंगलाच्या दिशेने संत श्री काश्मिरीबापूंचा आश्रम आहे. श्री काश्मिरी बापूंचे वय अंदाजे १५० वर्षाच्या आसपास आहे. अशी स्थानिकांची तसंच भाविकांची श्रध्दा आहे, याही आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मिरी बापूंच्या तापाने पवित्र असे हे स्थान आवर्जुन बघण्यासारखे आहे. वाटेत जाताना विविध इतर ही स्थाने आहेत. पायऱ्या चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक गिरनार चढण्यास सुरुवात करतात. ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते, त्यांच्यासाठी कमानीजवळ डोलीवाले असतात. डोलीवाले एका व्यक्तीसाठी ५,००० ते ११,००० रूपये घेतात. सुमारे २०० पायऱ्यावर डावीकडे श्रीभैरवाच्या मुर्तीचे दर्शन होते. पुर्वी एक सिद्ध श्री लक्ष्मण भारती दिगंबर तेथे राहात होते. सर्व साधू संतांमध्ये त्याचा मान खूप मोठा होता. २,००० पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दृष्टीला पडतो, हे ही एक सिद्धस्थान आहे असे सांगतात.


गिरनार प्रवेशद्वार

दर्शनीय स्थाने
२,२५० पायऱ्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुंफा आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेतल्यास दोन सुबक मूर्ती आढळून येतात. थोडे बाजूला माली परब घाट येतो. तेथे श्रीरामाचे मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी गोड पाण्याचे थंडगार पाणी असलेले कुंड आहे.


२,६०० पायऱ्यावर आसपास राणक देवीमातेची शिळ आहे. त्या शिळेवर दोन हातांच्या पंजाचे निशाण आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर सुमारे ३,५०० पायऱ्यांपाशी प्रसूतीबाई देवीचे स्थान आहे. संतान प्राप्ती झाल्यावर येथे त्या संतानाला घेऊन दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथून थोडे पुढे गेल्यावर दत्त गुंफा, संतोषी माता, काली माता, वरूडी माता, खोडीयार माता अशी छोटी छोटी मंदिरे आहेत. बाजूला जैन मंदिर येते. मुख्य मंदिर २२वे जैन तीर्थंकर नेमिनाथचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. काळ्या पाषाणामधील नेमिनाथांची अतिशय सुंदर सुबक मोहक अशी नेमिनाथाची मूर्ती आहे. नेमिनाथ याच ठिकाणी सातशे वर्षे साधना करीत होते अन् हेच त्यांचे समाधिस्थान आहे. या मंदिरातून थोड्या पायऱ्या उतरल्यावर जैन धर्मातले पहिले तीर्थंकर आदिनाथांची भव्य आणि उंच प्रतिमा आहे. थोडे पुढे गेल्यावर जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कला-कुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. थोडे पुढे गेल्यावर गौ-मुखी गंगा या नावाने स्थान आढळून येते, येथे गाईच्या मुखातून गंगाचे पाणी येते. बाजूला गंगेश्वर महादेव मंदिर व बटुक भैरवाचे मंदिर आहे. गौ-मुखी गंगा मंदिराच्या उजव्या बाजूने वर चढण्याचा मार्ग आहे. डाव्या बाजूला एक उतण्याचा मार्ग आहे. ग्रामस्थ, भाविक, साधू बैरागी या मार्गांने येत अथवा जात नाहीत, या मार्गांवर कुठल्याही प्रकारची मदतीसाठी माणसे डोलीवाले नसल्यामुळे बऱ्याच जणांना हा मार्ग माहीत नाही.

Saturday, July 25, 2020

श्री दत्त संप्रदाय

श्री दत्त संप्रदाय या सदरा अंतर्गत दररोज एक लेेेखमाला येथे प्रसिध्द केली जाईल,  ज्यात दत्त संप्रदाय या संंदर्भात वैशिष्ट्य पूर्ण माहिती प्रसिध्द केली जाईल, आपणांस विनंती की follow व subscrie करावे🙏

श्री दत्त संप्रदाय व नवनाथ संप्रदाय

गतांका पासून पुढे...

नवनाथ (९ नारायण)
कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.

मत्स्येंद्रनाथ
अरे हा कविनारायण । मच्छोदरी पावला जनन।।
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम । जगामाजी मिरवी की ।।३३।। (नवनाथ ग्रंथ अध्याय १, ओवी ३३ वी)

मत्स्येंद्रनाथ संजीवन समाधी (मायंबा)


एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातिरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्‍न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.
शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातिरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्‍वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्‍वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.


गोरक्षनाथ

तरी आता न लावी उशिर । हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।।
ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र । बाळ शब्द उदेला ।।७५।। (अध्या ९ वा, ओवी ७५)

गोरक्षनाथ

मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. "अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये', असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे १०० कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाशानाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे. 
नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्‍चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून ३ किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे.

गहिनीनाथ

तेंगे करूनी पंचभूत। दृश्‍यत्त्व पावले संजीवनी अर्थ।।
करभंजन ते संधीत । प्रेरक झाला जीवित्त्वा ।।६१।। (अध्याय १०, ओवी ६१)

कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्‍यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.


जालंदरनाथ

विप्रो हाते सलील बाळ ते जातें। रक्षता स्पर्शता लागे हाते।।
दृष्टी पाहता बाळाने । जुळवत रुदन करी ।।११२।। (अध्याय ११ ओवी ११२)

पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.

कानिफनाथ

त्वरे येऊन कर्णदृसी। दृष्टी पाहे ब्रह्मचारी ।
सहज करुनी उभयकरी । नमस्कारी प्रेमाणे ।।११५।। (अध्यय १२ वा, ओवी ११५)

बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते.

भर्तरीनाथ

भर्तरी भंगताचि बाळ त्यांत । तेजस्वी मिरविले शकलांत ।।
क्षिकेचे मोहळ व्यक्त । तेही एकांग जाहले ।।२७।। (अध्याय २४, ओवी २७) 

भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून ३१०३ वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्‍यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगावफाट्यावरून जाता येते.

रेवणनाथ

पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेय ।।
सहज चाली पुढे चालत । बाळ दृष्टी देखिले ।।२१।। (अध्याय ३४, ओवी १२१)

ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (वीटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून १० कि. मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.

रेवण नाथ व दत्तगुरु

"दत्त प्रभू मजवर कृपा करा व मला सनाथ करा" या विनंतीवरुन दत्तगुरुंनी रेवणांस सिध्दी आशिर्वाद रुपाने दिली. दत्ताने दिलेल्या सिध्दीला आवाहन करुन रेवणने धान्यांच्या राशींचे सोन्यात रुपांतर करुन सिध्दीची प्रचिती घेतली.या सिध्दीच्या जोरावर गावांतील लोकांना रेवणने तृप्त व मालामाल करुन देऊन आपला भविष्यातील जनकल्याणाचा मार्गाची निवड केली.

"ब्रह्मदेव सृष्टीचा रचनाकर्ता आपल्या पौरुष्याच्या अंशापासून हजारो ऋषी तयार झाले. त्यावेळी त्याचे तेज थोडेसे रेवा नदीच्या काठी पडले होते. पूर्व ईश्वरी संकेताप्रमाणे नवनारायणांपैकी चमस नारायणानी तेथे प्रवेश केला व एका बालकाचे रूप धारण केले. जल प्रवाहाबरोबर रेवा नदीतून वाहत वाहत आलेले हे बालक किनाऱ्यावर लागले अन् ते मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्यावेळी सहनसारूक नावाचा एक कुणबी तिथं पाणी आणण्यासाठी आला असता त्याने ते सुंदर बालक पहिले. बाळ रडत होते. सहनसारुकचे मन कळवळले. त्याने त्या निराधार अजाण बालकाला उचलून आपल्या घरी आणले व पत्नीकडे दिले. तिने ते बाळ छातीस लावले व नंतर आपल्या मुलाशेजारीच तिने त्याला पाळण्यात झोपविले. एवढे सुंदर बालक ते ही रेवातीरी सापडले म्हणून त्यांनी त्या बालकाचे नाव रेवण असे ठेवले. 

रेवण खरच आज्ञा धारक मुलगा होता. तो आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करे. एक दिवस पहाटे रेवण बैलांना घेऊन शेतात जात असताना श्री दत्तात्रय महारांजांची व त्याची भेट झाली. त्यावेळी दत्त महाराजांनी एक नजरेत हा बालक म्हणजे पूर्वीचा चमस नारायण आहे हे ओळखले. त्या छोट्या स्पर्शानेही बाळ रेवणास ज्ञानप्राप्ती झाली. त्याने हे "दत्त प्रभू मजवर कृपा करा. मला सनाथ करा" अशी प्रार्थना केली. प्रसन्न झालेल्या दत्त प्रभूंनी रेवण बाळास एक सिद्धी भेट दिली. ही सिद्धी रृतुझ्या इच्छा पूर्ण करील असा आशीर्वाद ही दिला. आपल्यास प्राप्त झालेली सिद्धी खरच काय करू शकते हे पडताळून पाहण्यासाठी रेवण त्या महिमा सिद्धीला आवाहन करून म्हणाला, “ही शेतातील धान्याची रस सोन्याची करून दाखव.” त्याबरोबर सिद्धीने आपली कृपा नजर फिरवताच धान्याची रास सोन्याची झाली. मग काय ! या सिद्धीच्या बळावर रेवण गावातल्या गोर-गरिबांना यथेच्च इच्छा भोजन देऊ लागला. त्यामुळे अवघ्या पंचक्रोशीत हा बालक सिद्ध पुरुष या विशेषणाने ओळखला जावू लागला.

एक दिवस मच्छिंद्रनाथ हे त्या गावात आले. तेव्हा त्यांना या सिद्ध पुरुषाची माहिती कळली. तसेच मच्छिंन्द्रनाथांच्या हे पण लक्षात आले की हा रेवण बाळ म्हणजेच चमस नारायण आहेत. तेव्हा मच्छिन्द्रनाथांनी एक गम्मत केली. त्यांना आपल्या योग सामर्थ्याने वाघ-सिंह यासारखे पशु यांना आपला मुळचा हिंस्र स्वभाव विसरून मवाळ प्राण्यांप्रमाणे जवळपास खेळवू लागले. तर पक्षी त्यांच्या अंग-खांद्यावर खेळू लागले. हे पाहून लोक मोठे चकित झाले. त्यांनी मछिंन्द्रनाथांचा प्रताप रेवणास सांगितला. रेवण बाळाने स्वत: तेथे जावून प्रत्यक्ष ते दृश्य पाहून खाती करून घेतली. घरी येऊन त्याने सिद्धी आवाहन केले. "मला अशी सिद्धी प्राप्त करून दे" अशी मागणी केली. तेव्हा तेथे प्रकट झालेल्या सिद्धीने सांगितले की ही गोष्ट केवळ एक ब्रह्मयोगीच करू शकतो. तुला ते ब्रह्मज्ञान केवळ दत्त प्रभूंच्या कृपेनेच प्राप्त होईल. हे कळताच रेवण तयार झाला. त्याने त्याजागी पहिली दत्तभेट झाली. त्या स्थानावर दृढ निश्चयाने बैठक मारून ध्यान, तपसाधना चालू केली.

मच्छिंद्रनाथ समवेत दत्त प्रभूंनी रेवण बाळाला मंत्रोपदेश दिला. त्याला नाथ पंथाची दिक्षा दिली. सर्व विद्या शक्ती यात निपुण करून त्यास ब्रह्मज्ञानी बनविले. चमस नारायणाचा प्रथम रेवण आणि नंतर दत्त-मच्छिंद्रनाथ कृपेने रेवणनाथ झाले. भक्ति प्रचाराच्या नाथपंथ कार्यात त्यांचाही सहभाग होऊ लागला. 



नाथपंथीय योगींची ज्ञान, भक्ति व श्रद्धा ही लोकमानसात वाढवत नवनाथांची लोकोद्धाराचे कार्य चालू केलेले होतेच. आणि एक दिवस गावोगाव भ्रमंती अन भिक्षाटन करत रेवणनाथ हे माणदेशातील विटे ग्रामात आले. त्या गावामध्ये सरस्वती नावाचा एक ब्राह्मण अन त्याची पत्नी जान्हवी ही दंपती राहत होती. त्यांना संताने झाली पण ती टिकली नाही. जान्हवीला सहा पुत्र झाले पण ते दहा दिवसापेक्षा जास्त दिवस टिकले नाहीत. देवाची कृपा म्हणून की काय सातवा पुत्र मात्र जवळ जवळ दहा वर्षाचा होईपर्यंत वाढला. त्या आनंद प्रीतर्थ्य सरस्वती ब्राह्मण आनंदाने ब्राह्मण भोजन देत होता. नेमके त्याचवेळी रेवणनाथ हे त्यांचे घरी आले. सरस्वती ब्राह्मणाने त्यांचे उचित आदरातिथ्य केले. भोजन दिले. इतकेच नव्हे तर नाथजी जेव्हा जाऊ लागले तेव्हा त्या दम्पतीने त्यांना त्या रात्री आपल्या घरी मुक्काम करण्याची विनंती केली. रात्री ब्राह्मण रात्री त्याचे पाय दाबून देत बसला. पत्नी मुलासह आत झोपली. पण नेमके मध्यरात्री दैवाने डाव साधला. बाळ मरण पावला. तिला हे कळताच माय बिचारी स्फुंदू स्फुंदून रडू लागली. नाथांची झोपमोड होऊ नये म्हणून सरस्वती ब्राह्मण जगाचा हलला नाही. का ती ब्राह्मणी पण आपल्या मनाच्या दु:खाला मोकळी वाट करून देऊ शकला नाही.

सकाळी नाथांना जाग आली ब्राह्मण पत्नीचे रडणे ऐकूनच. नाथांनी झाल्या प्रकारची नीट चौकशी केली आणि आपण या घरांत असताना इथे यमदूत आलेच कसे? त्यांनी बालकाचे प्राण कसे काय हरण केले? याचे रेवणनाथांना मोठे आश्चर्य वाटले आणि त्यांना रागही आला. रेवणनाथांनी त्या दंपतीला बाळाचे कलेवर सांभाळण्यास सांगून बालकाचे प्राण परत आनायालाते यमलोकी गेले. यमाने नाथांना सांगितले, की हे काम माझे नाही ही शिव आज्ञा आहे. तुम्ही कैलासावर जा व शिवाकडून बाळाचे प्राण आणा! यमलोकीहून रेवणनाथ कैलास पर्वतावर गेले. तेथे ही शिव गणांनी त्यांना अडवले. नाथांनी त्यांच्याशी युद्ध करून त्यांची दयनीय अवस्था केली. वार्ता मिळताच स्वत; शंकर युद्धाला आले. रेवणनाथांनी वाताकर्षण मंत्र म्हणून वायुरोधन केले त्यामुळे शिव-अष्ट भैरव, शिवगण या साऱ्यांचेच प्राण कंठाशी आले.
मग वैकुंठाहून भगवान विष्णू धावत आले. त्यांनी रेवण नाथास आवरले व आपल्याकडील सरस्वती ब्राह्मणांचे सातही बालकांचे प्राण परत देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे रेवणनाथ शांत झाले. त्यांनी शिवांसह सर्वांचे प्राण वाचवले. भगवान विष्णूंनी आदिनाथांशी भेट घडवली. त्यांना आशीर्वाद देवविले. रेवण नाथांना घेवून विष्णू वैकुंठी गेले. त्यांनी सातही बालकांचे प्राण परत आणले.

वटसिद्ध नागनाथ
असो वटवृक्ष पोखरांत । अंड राहिले दिवस बहूत ।।
अवि होत्र नारायण त्यांत । ईश्‍वर सत्ते संचारला ।।९२।।
दिवसेंदिवस अंडात। वाडी लागले जीववंत ।।
देह होता सामर्थ्यवंत । भगन लागे अंड ते ।।९३।।
त्यांत तलवर पोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।।
निढळवाणी कोण त्यांते । रक्षणाते नसेची ।।९४।। (अध्याय ३६, ओवी ९२, ९३, ९४)

ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून २५ कि. मी. अंतरावर चाकूर तालुक्‍यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.

चरपटीनाथ 

या परी बहुता दिवशी । ईश्‍वर आता अवतार ।।
विप्पलायन त्या रेतासी । नारायण संचारला ।।२१।। (अध्याय ३८, ओवी २१)

एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो.



या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या ८४ आहे. या शिष्यांनाच ८४ सिद्ध असे म्हणतात

Friday, July 24, 2020

श्रीक्षेत्र सुलीभंजन


श्री दत्त संप्रदाय


श्री दत्त संप्रदाय या सदरा अंतर्गत दररोज एक लेेेखमाला येथे प्रसिध्द केली जाईल,  ज्यात दत्त संप्रदाय या संंदर्भात वैशिष्ट्य पूर्ण माहिती प्रसिध्द केली जाईल, आपणांस विनंती की follow व subscrie करावे🙏



गतांका पासून पुढे 
नाथपंथीयांची वेशभूषा 

१) भस्म- भस्माला विभूती असेही म्हणतात. काही ठीकाणी क्षार असाही उल्लेख आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ते काही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावले पाहीजे. सर्व देहाचे अखेर भस्मच होणार आहे. यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्माकडे मन केंद्रित करा असा संदेशच जणू काही भस्म देत आहे. शिवाय भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्तिकेंद्रेही जागृत होतात. भस्माचे असे महात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याने स्वीकार केल्याचे दिसते.

२) रूद्राक्ष- हे एका झाडाचे फळ असून त्यास रूद्र अक्ष म्हणतात. शिवाचा नेत्र असा शब्दाचा अर्थ आहे. जपासाठी रूद्राक्ष माळ वापरतात. लक्ष्मी स्थिरावणे, शस्त्राघात न होणे अशा काही हेतूंसाठीही रूद्राक्षांच्या माळा विशेष करून वापरल्या जातात. शिवाय रूद्राक्षांचे औषधी गुणधर्मही अनेक आहेत.

३) मुद्रा- मुद्रा हे नाथपंथातील एक महत्वाचे साधन आहे. ही मुद्रा कानाच्या पाळीस छिद्र पाडून त्यात घातली जाते. ही बहूदा वसंत पंचमीच्या शुभ दिवशीच धारण केली जाते. अशा मुद्राधारक योग्यांनाच कानफाटे योगी असेही म्हणतात.कारण ते कानात छिद्र पाडून ती धारण केलेली असते.

४) कंथा- कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र. यालाच गोधडी अथवा गुदरी असेही नाव आहे, आपल्या वाकळेसारखे चिंध्यांचे हे बनविलेले असते.

५) मेखला- सूमारे २२ ते २७ हात लांबीची ही लोकरीची बारीक दोरखंडासारखी दोरी असून, नाथ योगी ही कमरेपासून छातीपर्यंत विशिष्ट पद्धतीने गुंडाळतात. ही कटिबंधिनी मोळ्याच्या दोरीची करतात. कधी ही मेंढीच्या लोकरीचीही असते. मेखला दुहेरी पदरात असून तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू लावलेले असते.

६) हस्तभूषण मेखली- बारीक सुतळीएवढ्या जाडीची ही लोकरीची दोरी असून ती मनगटावर बांधतात. चार फुटांच्या या मेखलीवर रूद्रमाळ बांधलेली असते.

७) शैली- ही सुद्धा लोकरीची असून दुपदरी शैली जानव्यासारखी घातली जाते. शैलीच्या टोकाला लोकरीचा गोंडा असतो.

८) शृंगी- जानव्याच्या शेवटी अडकवलेली हरणाच्या शिंगाची बनवलेली ही एक प्रकारची शिट्टीच होय. शृंगी बांधलेले जानवे ''शिंगीनाथ जानवे'' म्हणून ओळखले जाते. शृंगीची वा शिंगीची लांबी साधारणपणे एक इंच असते. भिक्षेचा स्वीकार केला, की शिंगी वाजविण्याचा प्रघात आहे.

९) पुंगी- ही सुद्धा हरणाच्या शिंगाची बनविलेली असते. साधु दारासमोर भिक्षेसाठी आला, की पुंगी वाजवितो. पुंगी शृंगीपेक्षा बरीच मोठी म्हणजे ७ ते ८ इंच लांबीची असते पुंगी डाव्या खांद्यात अडकवून ठेवलेली असते.

१०) जानवे- नाथपंथीयांचे जानवे हा एक विशेष प्रकार आहे. ते लोकरीच्या पाच -सात पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकवलेली असते चकतिच्या छिद्रात तांब्याच्या तारेने एक रूद्राक्ष बसविलेला असतो.त्याच्या खालीच शृंगी अडकवलेली असते. हा गोफ म्हणजेच नाथपंथी जानवे होय.

११) दंडा- दिड हात लांबीची ही एक काठी असते.हीस गोरक्षनाथ दंडा असे नांव आहे. नाथपंथी साधूच्या हातात ती असते.

१२) त्रिशूळ- साधनेत विशेष अधिकार प्राप्त झाला, त्रिशूळ वापरतात.नवनाथश्रेष्ठी त्रिशूळधारी होते सामरस्यसिद्धी ज्यांनी प्राप्त केली ते केवळ त्रिशूळधारी होत.

१३) चिमटा- अग्निदीक्षा घेतलेला साधक चिमटा बाळगतो. याची लांबी साधरणतः २७, ३२, ५४, इंच अशी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात पुन्हा नऊ लहान कड्या असतात. नाथपंथीयांची चाल या विशिष्ट नादावर व धुंदीत असते. अग्निचे उपासक नाथपंथी धुनी सारखी करण्यासाठी चिमट्याचा उपयोग करतात.

१४) शंख- शंखास फार पुरातन काळापासून महत्व आहे. भगवान विष्णूंच्या हातातील शंख हेच दर्शवितो. भिक्षेच्या अथवा शिवाच्या दर्शनाच्या वेळी नाथपंथीय साधू शंख वाजवितात. शंखनाद हा ओंकाराचा प्रतिक मानला आहे.

१५) खापडी (खापरी)- नाथपंथी साधू फुटक्या मडक्याच्या तुकड्यावर भिक्षा घेतात. हा तुकडा म्हणजेच खापडी किंवा खापरी. कधी खापरी नारळाच्या कवटीची अथवा कांशाची बनवितात.

१६) अधारी- लाकडी दांडक्याला खालीवर पाटासारख्या फळ्या बसवून हे एक आसनपीठ तयार केलेले असते. कोठेही बसण्यासाठी योगी याचा उपयोग करतात.

१७) किंगारी- हे एक सारंगीसारखे वाद्य असून भिक्षेच्या वेळी नाथपंथी याच्यावर नवनाथांची गाणी म्हणतात.

१८) धंधारी- हे एक लोखंडी वा लाकडी पटट्यांचे चक्र असून त्याच्या छीद्रातून मालाकार असा मंत्रयुक्त दोरा ओवलेला असतो. याचा गुंता सोडविणे अतिशय अवघड असल्याने त्याला "गोरखधंधा" असेही नांव आहे. गुरूकृपेने हा गुंता सुटला तर संसारचक्रातून सुटका होईल अशी कल्पना आहे.

१९) कर्णकुंडले - जो कानफाट्या नावाचा संबंध नाथपंथाशी आहे. तो कानांस छिद्रे पाडून त्यात कुंडले अडकवितात. कुंडल धातुचे किंवा हरणाच्या शिंगाचे किंवा सुवर्ण गुंफित असते.

नवनाथ (९ नारायण)
कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.

मत्स्येंद्रनाथ
अरे हा कविनारायण । च्छोदरी पावला जनन।।
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम । जगामाजी मिरवी की ।।३३।। (नवनाथ ग्रंथ अध्याय १, ओवी ३३ वी)

एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातिरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्‍न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.
शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातिरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्‍वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्‍वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.

Thursday, July 23, 2020

पाटणादेवी

पाटणादेवी
पाटणादेवी चंडिका माता


पाटणादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चाळिसगाव पासुन नैऋत्येस १८.०० कि.मी. अंतरावर असलेले जागृत आदिशक्ति चंडिकादेवीचे पुरातन मन्दिर आहे. हे मन्दिर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी
ऊंच चौथार्‍यावर धवल तिर्थापासुन उगम पावलेल्या डोगरी नदीच्या किनारी आहे.जवळ्च असलेल्या पाटणा य़ा लहान गावाचे नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते. मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य
आणि मनमोहक अशा निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.तिन्हीबाजुने अर्धचन्द्राकार सह्याद्रि पर्वताचे ऊंचकडॆ, विविध वृक्ष, वनस्पति डोंगरातुन खळखळ वाह्णणारे ओढे यामुळे मन मोहुन जाते. विशेषत: पावसळ्यात
औगस्ट सप्टेंबरमधे येथील वातावरण मनला प्रसन्नता देणारे, शांत व अल्हाददायक असते. ह्या दिवसात मन्दिरच्या चौथार्‍यावरुन मन्दिराचे भोवतलचा परिसर म्हणजे वनराइने नटलेले पर्वताचे ऊंच कडे, रंगिबेरंगी
फ़ुला – फ़ळानी बहरलेले वृक्ष, सापासारखे नागमोडी खळ्खळ वाहनारे ओढे, हे सर्व दृष्य पाहताना मन सर्व गृहस्थी जिवन विसरुन निसर्गाशी एकरुप झल्याशीवाय राहात नाही. अशा या रमणीय़ ठिकणाचा पुर्व ईतिहास तितकाच ऎतिहासिक महत्वाचा आहे.

 मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत्त नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे
वाट्त नाही कही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात.
अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातुन भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी
तांदळा नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवरात्र महोत्सव व वासंतिक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पोर्णिमेस भगवतीची महापूजा करण्यात येते.
आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणित आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.


देवालयाचा ईतिहास
पुर्वी भारतवर्षातील महाराष्ट विदर्भ, खान्देश भागामध्ये पाटणा (विज्जलगड) प्रांत ऎतिहासिक महत्वाचा होता. येथे पुर्वी यादव सम्राट व त्यांचे मांडलिक राजे यांचे राज्य होते. त्यावेळी हे शहर ४-५ मैल लांबी रुंदीचे होते. शहराचे भोवती ऊंच पर्वतीय तट तसेच शहरांमध्ये निसर्ग सौंदर्य वाढविणारी अनेक वॄक्ष-वेली यामुळे हे शहर प्रेक्षणीय होते. शहराचे राजमार्ग विशाल असून दुतर्फा निरनिराळी फळझाडे लावलेली होती.
पर्वताचे ऊंच भागावर पाण्याचे टाके खॊदून नळाद्वारे शहरामध्ये पाणी पुरवठा केलेला होता. शहरामधील धातूच्या खाणी व पर्वतावरील निरनिराळ्या वनस्पतींमुळॆ हे शहर शालिवाहन शक काळापासुनच व्यापार, कला, विद्या, रहदारी व देवस्थान यासाठी खूप प्रसिध्द होते. त्यावेळी यादवांचे मांडलिक राजे यांनी वाघळी येथील सिध्देश्वर मंदिर (शके ९९१) बहाळ येथील शारदादेवी मंदिर (शके १९४४) व पाटणा येथील चंडिकादेवी मंदिर ( शक पुर्व कलिन स्थापना असलेले) शके ११२८ ही देवालये यादवराव खॆऊणचंद्र व गॊविंदराज मौर्य यांनी शके ११५० आषाढ ३० सूर्य ग्रहणावर पितृ स्मृती स्मरणार्थ लोकदर्शनास्तव खुली केल्याचा उल्लेख श्री संत जनार्दनचरित्रामध्ये आहे. त्यावेळी त्यांचे दरबारामध्ये उपमण्यु गोत्री देशपांडे यांचे मूळ पुरुष कृष्णदेव यांचेकडे व्यवस्थापन कार्य होते. त्यांना त्या प्रित्यर्थ चाळीस लहान लहान वाड्यांचे अधिपत्य भूमीसह देऊन देशपांडेपण दिले होते. ते पुढे त्याच ठिकाणी रहिवासाकरिता राहिल्यामुळे तो भाग चाळीसगाव म्हणुन ओळखला जावू लागला.पुढे शके १२१६ चे सुमारास अल्लाउद्दिन खिलजी एलिचपूर देवगिरी ( दौलताबाद ) कडे रामदेवराय यादवास कपटाने जिंकण्यास गेला. एकीकडून गुलबर्गा येथे स्थापन झालेली बहामनी शाही व दुसरीकडून दिल्ली मोगल साम्राज्य यात हा प्रांत अडचणीत सापडला. त्यामुळे पूर्वीच्या हिन्दु राज्याची धर्ममय प्रभावशाली राज्यप्रणाली जावून तेथे इस्लामी धर्मसत्ता शके १२१६ पासून आली. चतुवर्ण व सनातन हिंदू धर्म जर्जर झाला व सर्वत्र एकजात इस्लाम धर्माचे हिरवे निशाण फडकू लागले व हा प्रान्त नामशेष झाला.




 चंडिका ( पाटणा) देवी मंदिर हे एक शक्तिपीठ आहे. ह्या शक्तिपीठाचे नाव वरदहस्त असे आहे. ह्या शक्तिपीठा संदर्भात कथा अशी आहे की, सतीचे वडील दक्षप्रजापती त्यांनी एकदा पुत्रसंतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. परंतु शिव – सतीस यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. कारण शिव-सतीचा विवाह वडील दक्षप्रजापती यांचे मनाविरुध्द झाला,ह्या विवाहास त्यांची संमती नव्ह्ती. हे एक यज्ञास न बोलविण्याचे मुख्य कारण तसेच शिवजीचे सर्वभक्तगण स्मशाणात राहणारे , चित्रविचित्र पोषाख करणारे, कफल्लक, अंगास भस्म फासणारे त्यामुळे ह्या डामडौलाच्या यज्ञ सोहळ्यात ह्या सर्वांचे प्रयोजन नाही असे कारण दाखवून दक्षप्रजापतीने शिव-सतीस निमंत्रण दिले नाही. भव्य अशा यज्ञ मंडपात यज्ञाची सुरुवात झाली. सर्व देव आपाआपला भाग घेण्यासाठी निमंत्रणाप्रमाणे आले हे पाहून नारदमूनी सतीस जावून भेटले. आपल्या रसभरीत मधुर वाणीने यज्ञाचे वर्णन सतीस ऎकवीले व विचारले की आपण अजून का गेला नाहीत. त्यावर सतीने आम्हास निमंत्रण नसल्याचे सांगितले त्यावर पितागृही भेटीसाठी व यज्ञाचे ठिकाणी दर्शनासाठी कुठ्ल्याही निमंत्रणाची जरुरी नाही हे युक्तीवादाने सतीस पटवून दिले. यज्ञाचे निमित्ताने गेल्यावर सर्वांच्या भेटी होतील. अशी इच्छा सतीने शिवजीस सांगितली. ही वेळ योग्य नाही ही गोष्ट शिवजींनी सतीस समजावीण्याचा प्रयत्न केला. परंतु श्रीहट्टापुढे तो जमला नाही. म्हणून त्यांनी सतीस एकटीने जाण्यास परवानगी दिली. सती नंदीसोबत यज्ञाचे दर्शनासाठी सर्व प्रथम पितॄगॄही गेली. त्या ठिकाणी जमलेल्या सर्व आप्तगणगोतांनी विनानिमंत्रण तू का आलीस असे हिनवून सतीचा अपमान केला. वादविवाद टाळून हा अपमान सतीने सहन केला. सती पुढे यज्ञमंडपाकडे निघाली तिथे गेल्यावर सर्व देवतेंचे भाग यज्ञपीठावर मांड्लेले सतीने पाहिले. परंतु महादेवाचा भाग त्या ठिकाणी नव्हता असा शिवजीचा अपमान योग्य नाही हे समजाविण्याचे प्रयत्न सतीने केला पण अभिमानाने व गर्वाने धूंध झालेल्या दक्षप्रजापतीस सतीचे म्हणणे पटले नाही. उलट शिवजी तुझे पती आहे त्यामुळे हे तु बोलतेस व त्याने सतीस तू यज्ञमंड्पातून चालती हो असे सांगितले त्यामुळे देवधीदेव महादेवासह आपल्या पतीचा हा अपमान सतीकडून सहन न झाल्यामुळे सतीने आपल्या पित्याकडून निर्माण झालेले शरीर हे य़ज्ञ मंड्पातच संपविण्याचा निश्चय केला. तिने आत्मशक्ती जागृत करुन शरीरातुन प्राण काढून घेतला व ती निष्प्राण झाली ही गोष्ट शिवजीस नंदीने जावून सांगितली. शिवजी खूप क्रोधीत झाले त्यांनी आपल्या जटा आपटून विरभद्र निर्माण केला व दक्षयज्ञाचा विद्ध्वंस केला व सतीचे शव दोन्ही हातात घेवून कैलासाकडे जावयास निघाले परंतु पत्नी वियोगाचे क्रोधामुळे तांडव नृत्य करु लागले. त्यातच त्यांचा तिसरा नेञ उघडला गेला व जो समोर येइल तो भस्म होवू लागला. अश्या ह्या संहारामुळे सर्वांचा विनाश होइल अशी काळजी सर्व देवांना पडली. त्यावळी सर्व देव भगवान विष्णुकडे शरण गेले ह्यावर काही उपाय योजना करावी अशी विनंती केली त्यावेळी भगवान विष्णुंनी क्रोधाचे कारण असलेले शिवजीच्या हातातील सतीचे शव नष्ट करण्याशिवाय दूसरा मार्ग नाही हे लक्षात घेवुन आपल्या सुदर्शन चक्राने शिवजीच्या हातातील शवाचे तुकडे केले. ज्या ज्या ठिकाणी त्या शवाचा तुकडा पडला त्या त्या ठिकाणी एक शक्तिपीठ निर्माण झाले. मंदिरा मागील डोंगरावर भगवतीसतीच्या उजव्या हाताचा पंजा तुटून पडल्यामुळे त्या ठिकाणी वरदहस्त शक्तिपीठ निर्माण झाले. शक्तिपीठाची मुळ जागा डोंगराच्या उंच कडेवर आहे.भगवतीचे आद्य उपासक गोविंद स्वामी यांनी भगवतीची नित्य उपासना केली. वृध्दापकाळाने गात्र शिथील होवु लागले. त्यामुळे उपासनेत खंड पडेल ह्या विचाराने ते चिंतीत झाले. त्यावेळी एक अनुष्ठान त्यांनी केले त्यावेळी भगवतीने त्यांचेवर प्रसन्न होवून दर्शन दिले व वरदान मागण्यास सांगितले. त्यावेळी त्यांनी भक्तांसाठी व स्वतःकरीत असलेल्या नित्य उपासनेसाठी भगवतीने उंच कडेवरुन खाली यावे अशी विनंती केली. आपल्या परमप्रिय भक्तासाठी ही विनंती मान्य केली. मी तुझ्या भक्तिपोटी तुझ्याबरोबर खाली येइल पण मी मागे येत असताना तु मागे वळून पाहू नये असे सांगितले त्याप्रमाणे भगवती आपल्या परमप्रिय भक्तामागे येवु लागली डोंगरकडा उतरुन आल्यावर गोविंदस्वामी धवलतिर्थ कुंडाजवळ येवून पोहचले व त्यांनी अल्हादकारक जलपान करुन आपली त्रुषा शांत केली पुढील मार्गक्रमणास सुरुवात करते वेळी त्यांना भोवळ आली व त्यातुन सावरताच त्यांना खूप मोठा कर्कश आवाज ऎकु आला. त्यामुळे ते भांबावून गेले व भगवती आपले मागे आहे किंवा नाही भान विसरुन त्यांनी मागे वळून पाहिले त्यावेळी भगवतीने त्यांना दर्शन दिले व त्याच ठिकाणी भगवती अदॄश्य झाली. घडल्या प्रकाराचे त्यांना खूप वाइट वाटले. पण ते दॄढ निश्चयाने ते त्या ठिकाणी मरणांत अनुष्ठानास बसले शेवटी भगवतीने त्यांना पुन्हा दर्शन दिले व सांगितले की मी तुझ्या मागे येणार नाही. तर तुला दिलेल्या वचन पुर्तीसाठी तू या कुंडात स्नान कर, स्नान करतेवेळी तुझ्या हातात स्वयंभू मुर्ती येइल ती तू घे व माझी स्थापना कर, अश्या रितीने स्नानानंतर गोविंद स्वामीच्या हातामध्ये पाषाणाची स्वयंभू मुर्ती आली. त्याच मुर्तीची स्थापना गोविंद स्वामींनी आजच्या चंडिकादेवी मंदिरात त्यावेळी केली.ह्याच मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस शिवमंदिर आहे. मध्यभागी विष्णू मंदिर आहे. तसेच गोविंद स्वामींनी आपल्या निश्चयाप्रमाणे अखंड निरंतर भगवतीची सेवा केली व सेवा करत असतानाच वचन पुर्तीसाठी जिवंत समाधी घेतली त्यांची समाधी आज मंदिराचे पुढे आहे.

आज मंदिरात असलेली मुर्ती खुपच भव्य आहे. तितिकीच प्रसन्न्मुख आहे. भक्तांनी एकदा दर्शन घेवुन त्यांचे समाधान होत नाही तर त्यांना पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावेसे वाटते. भक्तांना मंदिरातुन निघावेसे वाटत नाही काही तर भगवतीचा प्रसन्न व हसतमुख चेहरा पाहुन आपले भानच विसरुन जातात.

अनेक हिन्दु जाती-जमातीची ही कुलस्वामीनी आहे. आजही कुलधर्म कुलाचारात बरेच भक्त धवलतिर्थातून भगवतीचे स्मरण करुन पुजेसाठी तांदळा नेतात दरवर्षी भगवतीचे शारदीय नवराञ महोत्सव व वासंतीक यात्रा महोत्सव मोठ्या प्रमाणात भक्तांचे हर्ष उत्साहात साजरे होतात दर पौर्णिमेस भगवतीची महापूजा करण्यात येते. भक्तांच्या मुलभूत गरजा पुरविण्याच्या दॄष्टीने पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्ठाण या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. आपल्या उद्देशपुर्तीसाठी प्रतिष्ठाण प्रयत्नशील असते. दर पोर्णिमेस प्रतिष्ठाणांमार्फत महाप्रसाद वितरण माध्यान्य कालीन पूजेनंतर केला जातो. तसेच न्यासाने यात्रीनिवास बांधण्याचे काम सुद्धा हाती घेतले आहे. आज हे मंदिर भारतीय पूरातन विभागाचे निग्राणीत आहे. येणा-या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी वनखात्यामार्फत काही खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. तसेच नवस व इतर कार्यक्रमासाठी एक धर्मशाळा उपलब्ध करुन दिलेली आहे हे स्थान प्रत्येक भगवती उपासकाने पाहण्यासारखॆ आहे.

प्रेक्षणीय स्थळे
नागार्जून कोठी
नागार्जुन कोठी

या लेण्याचा आकार प्रमाणबध्द नसुन व्हरांडा १८ फुट लांब, ६ फुट रुंद आहे. यास काही चौकोनी तर काही खांब षटकोनी आहेत.लेण्यासमोर एक खांब असुन त्यास सतीचा खांब अशी संज्ञा आहे. मूल होण्यासाठी चंडिकादेवीचे दर्शन घेउन नागार्जुन येथील सतीच्या खांबाजवळ नवस बोलला जातो व इच्छा पूर्तीनंतर त्या नवसाची सांगता देवीजवळ केली जाते. या खांबाची उंची सहा फूट आहे. आतील सभामंडप २० फूट * १८ फूट आहे. मध्यभागी दोन नक्षीकाम केलेले सुशोभित खांब आहेत. खांबाच्या दर्शनी भागावर अंबा व इंद्र यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.सभागृहाच्या आतील समोरील भिंतीला लागून कमळावर ध्यानस्थ बसलेल्या महावीरांची मूर्ती आहे. दोन्ही बाजुस दोन दिगंबर तीर्थकारांच्या मुर्त्या आहेत. वरच्या बाजूस दोन चौरी धारी सेवक आहेत. मकर व छत्र कोरलेले आहे. याच सभागृहाच्या पुर्वेकडील भिंतीवर एक ६ फुट उभी मुर्ती आहे हिच मुर्ती नवसाला पावते असा लोकांचा विश्वास आहे.

धवलतीर्थ



धवलतीर्थ
पाटणादेवी मंदिराजवळुन १ कि.मी. अंतरावर पायवाटेने गेल्यावर धवलतीर्थ हा धबधबा आहे. पावसाळ्यात उंचावरुन पडत असलेल्या पाण्याचे दृश्य खुपच मनमोहक असते. ह्याच ठिकाणी देवीचे आद्दउपासक गोविंदस्वामी यांना देवीचा साक्षात्कार झाला. देवीच्या पौराणीक कथेप्रमाणे देवी ह्याच ठिकाणी अदॄश्य झाली म्हणुनच आजही कुळाचारात अनेक भक्त पूजेसाठी येथे येवून देवीचे स्मरण करुन देवीचा तांदळा येथुनच घेवुन जातात.

पितळखोरा लेणी



पितळखोरा लेणि
पाटणा देवी मंदिरापासुन सुमारे ३ कि.मी. अंतरावतर पितळखोरे हे प्राचिन लेणे आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पॆठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोर्‍याहुन जात होता. त्यामुळेच ह्या जागेची निवड बौध्दांनी लेणी कोरण्यासाठी केली आसावी. महामायुरी ह्या बौध्दधर्मीय ग्रंथामध्ये शकरीन हा यक्ष पितलिंगया येथे राहतो. असा उल्लेख आला आहे. वरील ग्रंथाचे संदर्भातुनच पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे होय. येथील लेणी खोल अरुंद दरीच्या दोन्ही काठावर दगडात कोररेली आहे. लेण्याचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत. एका भागात १ ते ९ लेण्या आहेत व दुसर् भागात १० ते १२ लेण्या आहेत. दोन्ही गटातील लेण्या एकामेकासमोर आहेत. येथुन एक मार्ग औरंगाबादकडे जातो. इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फग्य्रुसन व बोर्जेस ह्यांनी ह्या लेण्या प्रथम लोकाभिमुख केल्या. येथील झालेल्या पुरातत्वीय संशोधनावरुन ह्या लेण्या पहिल्या शतकाच्या जवळपास वापरात असाव्या. नंतरच्या काही काळात ह्या लेण्या वापरात नसाव्या. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरु झाली हे दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते. लेण्यांच्या प्रवेश द्वाराला अकरा पायर्‍या आहेत.
उजव्या बाजूस ह्त्तीची रांग आहे. जणु काही लेण्यांच्या सर्व बोजा हेच पेलत आहे. असा भास त्यावरुन होतो. प्रवेशद्वार ५ फूट ४ इंच * ७ फुट ६ इंच आहे. दरवाज्याचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे.. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल हे अतिशय रुबाबदार पणे उभे आहेत. येथेच द्वारपालाचे वरचे बाजूस हत्तीचे शिल्प आहे. उजव्या ह्त्तीचे वर किन्नराचे शिल्प आहे. दरवाजाचे वर गजलक्ष्मीचे शिल्प होते. आज ते खाली पडले आहे. अशा रितीने गतकालाचा पुरावा देत ह्या लेण्या उभ्या आहेत.

महादेव मंदिर
महादेव मंदिर 

महादेव मंदिर हे मंदिर चाळीसगाव-पाटणादेवी रस्त्यावर पाटणादेवी पासून सुमारे १.५ कि. मी. अंतरावर आहे. ६/७ फुट उंच चौथऱ्यावर पुर्वेभिमुख मंदिर आहे. नेहमीप्रमाणे गर्भगृह सभामंडप आणि व‍र्‍हांडा अशी याची बांधणी आहे. महाराष्टातील मोठ्या मंदिरात याची गणणा होते. गर्भगृह चंद्राकृती असून आतून गोलाकार २८ कोपर्‍यांचा आहे. मदिर ७५ फुट लांब , ३६ फुट रुंद व १८ फुट उंच आहे. गर्भगृहाचा दरवाजा सुंदर नक्षीकामाचा आहे. वर गणेश पट्टी असून या गणेश पट्टीवर शिव गणेशासहित सप्तमात्रुका कोरल्या आहेत. गर्भगृह व सभामंडपामध्ये असलेल्या जागेत एक दगडी शिलालेख कोरलेला आहे.

केदारकुंड व केदारेश्वर



केदारकुंड व केदारेश्वर
पाटणादेवी मंदिराजवळून २ के. मी.अंतरावर घनदाट झाडीमध्ये पायवाटेने चालत गेल्यावर बर्याच उंचावरुन पाणी पडत असल्याचे दॄश्य पावसाळ्यात दिसते. ज्या ठिकाणी हे पडलेले पाणी साचते तीच जागा म्हणजे केदारकुंड पाणी पडतेवेळी चे दृश्य मनाला आनंद देणारे व अल्हादकारक असते. येथूनच पुढे काही अंतरावर केदारेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर पुर्वी बुजले गेले होते. मद्रासी बाबा नावाच्या साधुने ते मंदिर माती काढुन मोकळे केले. जवळच पाण्याचे एक कुंड असुन त्यास नॆसर्गिक अश्या पायर्या आहेत. त्या ठिकाणी गणपतीची एक मुर्ती आहे ह्या गणापतीस उभा गणपती असे संबोधले जाते. ह्याच ठिकाणी मद्रासी बाबांनी मनःशांतीसाठी वसती केली. असे हे ठिकाण मनःशांतीसाठी उत्तम आहे.

महान गणिती भास्कराचार्य
 भास्कराचार्य

भास्कराचार्य या एकाच नावाचे दोन भारतीय विद्वान गणिती संशोधक होवून गेले. त्यापॆकी दुसरे भास्कराचार्य हे विज्जलबिड येथील होते. हे गांव पाटणा हेच असावे असा तर्क येथील एका शिलालेखावरुन ज्ञानकोशकार डाँक्टर. केतकर यांनी केला आहे. ते शान्डिल्य गोत्राचे असून गणेश हे त्यांचे उपास्य दैवत आहे. ज्योतिषशास्त्राचे अध्ययनासाठी त्यांनी ह्या ठिकाणी एक मठ स्थापन केला होता. तो त्यांचा नातु चांगदेव यानेही चालु ठेवला होता. या मठास देवगिरीचे यादवांचे मांडलिक निकुंभ राजे यांचा राजाश्रय होता त्यांचे सिध्दांत शिरोमणी करणकुतूहल,वासनाभास्य, भास्कर व्यवहार.विवाहपटल,सर्वतोभद्र यंत्र, वसिष्ठतुल्य अशी ग्रंथसंपदा आहे. त्यातील लिलावती ग्रंथ सर्वज्ञात आहे. सिध्दांत शिरोमणी ग्रंथाचे चार खंड आहेत. त्यातील प्रथम खंड म्हणजेच लिलावती (पाटीगणित) ह्या ग्रंथाचे उरलेले तिन भाग बिजगणित,ग्रहगणित. गोलाध्याय असे आहेत. वासनाभाष्य हा ग्रहगणीत व गोलाध्याय या दोन भागावरील टिका ग्रंथही त्यांचाच आहे. अशी खुप मोठी ग्रंथसंपदा भास्कराचार्यांची आहे. शुन्याची संकल्पना त्यांनीच मांडली. त्यामुळे गणिताचे एक नवे युग सुरु झाले.
या महान गणितीचे आजचे पाटणादेवी हे जन्मस्थान आहे. अंदाजे इ.स.१११४ ते इ.स.११८५ हा त्यांचा कालखंड आहे.
शून्याचा अविष्कार करणारे थोर गणिती श्री भास्कराचार्य


जगाला शून्याची ओळख करून देणाऱ्या भास्कराचार्यांनी ज्या जागी शून्याचा शोध लावला, ते ठिकाण औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत आणि चाळीसगाव तालुक्यात पाटणादेवी या जागी आजही त्यांच्या नावाचा शिलालेख आहे.


वालझिरी
पाटणादेवी येथुन चाळीसगावकडे जाणार्या रस्त्यावर तपस्वी ॠषी वाल्मिकी यांचे मंदिर आहे. तेथून जवळच असलेल्या रांजणगावाजवळ घाटातील रस्त्यावर वाल्मिकी (वाल्या कोळी) वाटमारी करीत होते व सध्या असलेल्या मंदिराजवळील नदी किनारी त्यानी खडतर तपश्चर्या करुन पापमुक्ती केली होती. सध्या हे ठिकाण वालझिरी नावाने प्रसिध्द आहे. येथे महाशिवरात्रीचे वेळी मोठी यात्रा भरते.

शॄंगार चावडी
शॄंगार चावडी

ही एक हिंदु धर्मीय लेणी असून प्रथम अभ्यास करणार्या बोर्जेस यांनी तिचा काळ ११ व्या शतकातील ठरविला आहे. लेण्यास दोन भाग असून एक व्हरांडा व दुसरी आतील खोली. आतील मंडप ९ फुट रुंद व ७फुट लांब आहे. त्यात कोणतेच शिल्प नाही. दरवाजा ८फुट उंच त्याला तिन द्वारशाखा आहेत. द्वारशाखेच्या खालच्या बाजूस उभ्या असलेल्या स्त्रीचे शिल्प आहे. लेण्याचा दुसरा भाग म्हणजे व्हरांडा हा ७ फुट रुंद १० फुट लांब असा आहे. यामध्ये कही शृंगारीक शिल्पे कोरलेली आहेत.


वन्यजीव विभाग-पाटणादेवी परिसर
वन्यजीव विभाग-पाटणादेवी परिसर

वन्यजीव विभाग-पाटणादेवी परिसर
पाटणादेवी परिसर आज गौताळा अभयारण्यात जोडला गेला आहे. त्या ठिकाणी बिबटे, तडस, लांडगे,ससे,कोल्हे,मोर, माकड, रानडुकर व वेगवेगळ्या प्रकारच्या विषारी व बिनविषारी सापांच्या जाती आहेत. ह्या सर्व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाने अनेक कामे हाती घेतलेले आहेत. तसेच येथील परिसराच्या माहितीसाठी एक निसर्ग शिक्षण केंद्र चालु केले आहे.

॥ पाटणादेवीची आरती ॥

पाटणके चंडिके तुझा रहिवास डोंगरी हो।
नाना परीच्या वल्ह्या शोभा देती निरंतरी हो।
जाई जुई शेवंती प्रिती मोठी पुष्पावली हो।
दिवट्यांचे कल्लोळ आपण खेळे महाकाली हो।

आदिनाथ योगिनी चंडिका पाटण के स्वामिनी हो।
पर्वतावलोकनी भक्ता अभयवर देऊनी हो॥१॥

पितांबर नेसुनी पद्मासनी बैसली हो।
अंगीची काचोळी केशर बुक्क्यांनी भाळली हो।
वैजयंती हार गळा मोतीयाची जाळी हो।
नाकीचे सुपान चरणी घागरीया लोळती हो॥२॥

विप्रकुली जन्म झाला तैसा अवतार धरीला हो।
भक्तांचा देह अंश तिने उद्धरीला हो।
भक्ती तिचा देह विष्णू लोका प्रती गेला हो
भ्क्तांकित अभिमानी विष्णु दासाची माउली हॊ ॥३॥

चुनगच्ची मंदिर दुरुनी दिसतसे शिखर हो।
ध्यानस्थ बैसले ॠषी ब्राह्मण थोर थोर हो।
तीर्थाचा महिमा धवल तीर्थ उदक स्थिर हो।
ब्राम्हण सोडती मंत्र अक्षदा भक्त गर्जती जयजयकार हो॥४॥

॥ नित्योपासना ॥

॥ श्री देवीचा ध्यानमंत्र ॥

ॐ ऎं ह्रिं क्लीं चामुण्डायै विच्चे ॥ (श्री चंडिकादॆव्यै नमो नमः)
ॐ सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ सधिके ॥ शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते॥
ॐ नमो दॆव्यै महादॆव्यै शिवायॆ सततं नमः। नमः प्रकॄतै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् ॥


॥ श्रीसूक्तम्‌ ॥

श्री गणेशाय नम:॥ श्रीमहाकालीमहालक्ष्मी महासरस्वती देवाताभ्यो नम:।

ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजाम्। चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो म आ-वह॥१॥

तां म आ-वह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीम्। यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्‌॥२॥

अश्व्पूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्। श्रियं देवीमुपह्र्ये श्रीर्मां देवीर्जुषताम्‌ ॥३॥

कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीम्‌। पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपव्ह्यये श्रियम्‌ ॥४॥

चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदाराम्‌ तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्देऽलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे॥५॥

आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्व:। तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्च बाह्याऽअलक्ष्मी:॥६॥

उपैतु मां देवसख: कीर्तिश्च मणिंना सह। प्रादुर्भूतोसुराष्ट्रेऽस्मिन्‌ कीर्तिमृध्दिं ददातु मे॥७॥

क्षृप्तिपासामलां ज्येष्ठांअलक्ष्मीं नाशयाम्यहम्‌। अभूतिमसमृध्दिं च सर्वां निर्णुद्द मे गृहात ॥८॥

गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम्‌। ईश्वरीं सर्वभूतांनां तामिहोपव्हये श्रियम्‌ ॥९॥

मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि। पशूनां रुपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः ॥१०॥

कर्दमेन प्रजा भूता मयि संभव कर्दम । श्रियं वासय मे कूले मातरं पद्ममालिनीम्‌ ॥११॥

आपः सृजन्तुस्निग्धानि चिक्लीत वस मे गृहे । नि च देवीं मातरं श्रियं वासय मे कुले॥१२॥

आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिंगलां पदमालिनीम्‌। चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह॥१३॥

आर्द्रां यः करीणीं यष्टिं सुवर्णां हेमेमालिनीम्‌। सूर्यां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो म आवह ॥१४॥

तां म आवह जात वेदो लक्ष्मीमनपगामिनीम्‌। यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दास्योऽश्वान्विन्देयं पुरुषानहम्‌॥१५॥

यः शुचि. प्रयतो भूत्वा जुहूयादाज्यमन्वहम्‌। सूक्तं पन्चशर्चं च श्रीकामः सततंजपेत॥१६॥

पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसंभवे। तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्य लभाम्यहम्‌॥१७॥

अश्वदायै गोदायै धनदायै महाधने। धनं मे जुषतां देवि सर्वकामांश्च देहि मे॥१८॥

पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायतांक्षी। विश्वप्रिये विश्वमनोऽनुकूले त्वत्पादपद्मं मयि संन्निधत्स्व॥१९॥

पुत्रपौत्रं धन धान्यं हस्त्यश्वादि गवे रथम्‌ प्रजानां भवसी माता आयुष्यमंतं करोतु मे॥२०॥

धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसुः। धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणोधनमश्विणौ ॥२१॥

वैनतेय सोमं पिब सोमं पिबतु वृंत्रहा। सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः॥२२॥

न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत्‌॥२३॥

सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुककगंधमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवभूतिकरी प्रसीद मह्यम॥२४॥

विष्णु पत्नीं क्षमांदेवीं माधवीं माधवप्रियाम्‌। लक्ष्मी प्रियसखीं देवी नमाम्यच्युतवल्लभाम्‌॥२५॥

महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि। तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्‌॥२६॥

श्रीवर्चस्वमायुऽमारोग्यमाविधाच्छोभमानं महीयते। धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥२७॥